ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ५६

ध्यानाला बसल्यावर मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊन गर्दी करतात, ही जर तुमची अडचण असेल तर ती अडचण विरोधी शक्तींमुळे येत नाही, तर मानवी मनाच्या सर्वसाधारण प्रकृतीमुळे ती अडचण येते. सर्वच साधकांना ही अडचण येते आणि काहींच्या बाबतीत तर ती खूप दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. त्यापासून सुटका करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मनात जे विचार येतात त्यांच्याकडे पाहायचे, ते मानवी मनाच्या प्रकृतीचे जे दर्शन घडवीत असतात ते काय आहे याचे निरीक्षण करायचे पण त्या विचारांना कोणतीही अनुमती द्यायची नाही आणि ते अगदी निःस्तब्ध होत नाहीत तोवर त्यांना तसेच प्रवाहित होत राहू द्यायचे, हा एक मार्ग आहे. विवेकानंदांनी त्यांच्या ‘राजयोगा’मध्ये याच मार्गाची शिफारस केली आहे.

दुसरा मार्ग असा की, विचारांकडे ते आपले विचार आहेत असे समजून पाहायचे नाही, तर साक्षी पुरुषाप्रमाणे त्यांच्याकडे अलिप्त राहून पाहायचे आणि त्यांना अनुमती द्यायची नाही. हे विचार म्हणजे जणू काही बाहेरून, प्रकृतीकडून येणाऱ्या गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याकडे पाहायचे. मनाचा प्रदेश ओलांडून पलीकडे जाणाऱ्या वाटसरूंप्रमाणे ते विचार आहेत अशी जाणीव मात्र तुम्हाला अवश्य झाली पाहिजे. ज्यांच्याशी तुमचा कोणताही संबंध असत नाही आणि ज्यांच्यामध्ये तुम्ही स्वारस्यही दाखवीत नाही अशा वाटसरुंप्रमाणे ते आहेत अशा रीतीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा प्रकारे या मार्गाचा अवलंब केला असता, सहसा असे घडते की, कालांतराने मन दोन गोष्टींमध्ये विभागले जाते. मनाचा एक भाग म्हणजे प्रकृतीचा जो भाग असतो आणि जो निरीक्षणाचा विषय असतो, त्यामध्ये विचार इतस्ततः ये-जा करत असतात, भरकटत असतात. आणि दुसरा भाग, मनोमय साक्षी होऊन पाहत राहतो आणि तो पूर्णपणे अविचल व शांत असतो. कालांतराने मग तुम्ही निश्चल-नीरवतेकडे (silence) प्रगत होऊ शकता किंवा प्रकृतीच्या त्या भागालासुद्धा अविचल (quiet) करू शकता.

आणखी एक तिसरी पद्धतदेखील आहे. ती सक्रिय पद्धत आहे. यामध्ये विचार कोठून येत आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि तुम्हाला असे आढळते की, ते विचार तुमच्यामधून येत नाहीयेत तर, ते विचार बाहेरून तुमच्या मस्तकामध्ये प्रवेश करत आहेत. अशा वेळी, म्हणजे तुम्हाला ते विचार आत येत असल्याचे लक्षात आले तर, त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पूर्णपणे बाजूला फेकून दिले पाहिजे.

कदाचित हा सर्वात कठीण मार्ग आहे आणि सर्वच त्याचा अवलंब करू शकतील असे नाही. पण जर या मार्गाचा अवलंब करता आला तर निश्चल-नीरवतेकडे घेऊन जाणारा तो सर्वात नजीकचा आणि परिणामकारक मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 301-302)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago