ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मानसिक-आध्यात्मिक ध्यान आणि आंतरात्मिक ध्यान

साधना, योग आणि रूपांतरण – ३५

ध्यानाच्या वेळी तुम्ही तुमचे लक्ष (शरीरांतर्गत) कोणत्या भागावर केंद्रित केले आहे यावर ध्यानाचे स्वरूप अवलंबून असते.

मानसिक केंद्रं
व्यक्तीच्या प्रत्येक स्तराशी संबंधित अशी केंद्रं शरीरामध्ये असतात. (शरीरामध्ये म्हणण्यापेक्षा सूक्ष्म शरीरामध्ये असतात, असे म्हणणे अधिक योग्य होईल. अर्थात ती केंद्रं सूक्ष्म शरीरात असली तरी ती स्थूल शारीरिक देहामधील संबंधित भागांशी जोडलेली असतात.) मस्तकाच्या शिखरावर एक केंद्र असते आणि त्याच्याही वर मनाच्या अतीत असणारे किंवा उच्चतर चेतनेचे केंद्र असते. कपाळावर भ्रूमध्यामध्ये जे केंद्र असते ते विचारी, चिंतनशील मनाचे, मानसिक संकल्पाचे आणि मानसिक दर्शनाचे केंद्र असते. कंठामध्ये असणारे केंद्र हे अभिव्यक्ती करणाऱ्या किंवा बाह्याविष्करण करणाऱ्या मनाचे केंद्र असते. ही सर्व केंद्रं मानसिक केंद्रं असतात.

प्राणिक केंद्रं
(मानसिक केंद्रांच्या) खाली प्राणिक केंद्रं असतात. हृदय-केंद्र (भावनिक केंद्र), नाभी-केंद्र (गतिमान प्राण-केंद्र), नाभीखाली उदरामध्ये असणारे केंद्र हे कनिष्ठ किंवा संवेदनात्मक प्राण-केंद्र असते.

शारीरिक केंद्र
सर्वात शेवटी, मणक्याच्या तळाशी मूलाधार किंवा शारीरिक केंद्र असते.

आंतरात्मिक केंद्र
हृदयाच्या पाठीमागे आंतरात्मिक किंवा चैत्य केंद्र (psychic centre) असते. अनेक जण करतात त्याप्रमाणे व्यक्तीने जर मस्तकावर लक्ष एकाग्र केले तर ते मानसिक-आध्यात्मिक ध्यान असते, ज्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते. व्यक्तीने जर हृदयकेंद्रावर लक्ष एकाग्र केले तर ते आंतरात्मिक ध्यान असते. व्यक्ती सहसा जेथे लक्ष केंद्रित करत असते अशी ही दोन स्थानं आहेत. परंतु जे केंद्र प्रथम उन्नत होते किंवा खुले होते ते मानसिक किंवा आंतरात्मिक केंद्रच असेल असे नाही; ते भावनिक किंवा प्राणिक केंद्रसुद्धा असू शकते. ते व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. कारण व्यक्तीमध्ये खुले होण्यासाठी जे सर्वाधिक सोपे असते ते चक्र प्रथम खुले होण्याची शक्यता असते.

जर प्राणिक केंद्र खुले झाले तर ते ध्यान, चेतनेला प्राणिक स्तर आणि त्याचे अनुभव घेण्यासाठी प्रक्षेपित करण्याची शक्यता असते. परंतु तेथून व्यक्ती त्या प्राणिक अनुभवांमध्ये गुंतून न पडता, स्वतःला त्यापासून वेगळे करून, त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहू शकली – म्हणजे जणू काही ती व्यक्ती स्वतः आतमध्ये खोलवर स्थित आहे आणि तेथून स्वतःच्या बाहेर असणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करत आहे या पद्धतीने जर ती त्या अनुभवांकडे पाहू लागली – आणि अशा रीतीने जर ती अधिकाधिक आत वळत गेली, तर ती व्यक्ती अंतरात्म्याप्रत जाऊन पोहोचण्याची शक्यता असते.

त्याचप्रमाणे, विचारांवर लक्ष एकाग्र केल्यामुळे आणि त्याच्याशी संबंधित असे अनुभव घेतल्यामुळे, व्यक्तीला मानसिक अनुभव येऊ शकतात. उदा. ‘सर्वकाही ब्रह्मच आहे’, असा विचार व्यक्ती करू शकते किंवा व्यक्ती स्वतःला विचारापासून मागे ओढून घेऊ शकते आणि बाहेरील वस्तुंकडे पाहावे त्याप्रमाणे ती स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करू शकते. आणि सरतेशेवटी व्यक्तीचा शांतीमध्ये आणि निखळ आध्यात्मिक अनुभवामध्ये प्रवेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 306-307)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

9 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago