साधना, योग आणि रूपांतरण – ३०
आपले (समग्र) अस्तित्व ‘श्रीमाताजीं’नी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)
*
साधक : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?
श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे असते. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा अधिक कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे (हृदय-केंद्रावर) चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही तेथेच प्रथम चैत्य अस्तित्वाच्या (psychic) संपर्कात येता. परंतु जर का तुम्ही मस्तकामध्ये चित्त एकाग्र केलेत तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी (psychic being) एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, मस्तकाकडून हृदयाकडे जावे लागते.
तसेच तुम्ही तुमच्या ऊर्जा एकत्र करून (चित्ताची) एकाग्रता करणार असाल तर, त्या ऊर्जांचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक चांगले; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. मस्तकामधून उदित होणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.
– श्रीमाताजी (CWM 06 : 389)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025