साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)
माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.
तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.
कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.
उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.
मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)
– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025