ध्यान आणि प्रगती – ०२

साधना, योग आणि रूपांतरण – १८ (भाग ०२)

ध्यान करणाऱ्या काही लोकांपैकी काही जण असे असतात की ज्यांना खरोखर ध्यान कसे करायचे हे माहीत असते आणि ते कोणत्या एखाद्या संकल्पनेवर नाही तर, शांतीमध्ये, आंतरिक ध्यानामध्ये मन एकाग्र करत असत आणि त्याद्वारे ‘ईश्वरा’शी सायुज्य पावण्याच्या स्थितीपर्यंतसुद्धा ते जाऊन पोहोचत असत, असे त्यांचे म्हणणे असायचे आणि हे अगदी बरोबर आहे.

आणखीही काही जण असे असतात, अगदी थोडे जण, पण ते कोणत्यातरी एखाद्या संकल्पनेचे अगदी तंतोतंत अनुसरण करू शकतात आणि त्या संकल्पनेचा अर्थ काय तो नेमकेपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, हे सुद्धा योग्य आहे.

(पण) बऱ्याचवेळा लोक जेव्हा एकाग्रता साधायचा प्रयत्न करत असतात तेव्हा ते एक प्रकारच्या अर्धवट निद्रेमध्ये शिरतात आणि ती अत्यंत तामसिक स्थिती असते. ते जणूकाही एक प्रकारची जड, सुस्त गोष्ट बनून जातात, त्यांचे मन निष्क्रिय झालेले असते, भावना सुस्त झालेल्या असतात आणि शरीर अचल झालेले असते. अशा स्थितीत ते तास न् तास बसून राहू शकतात कारण आळशीपणा, जडता यांच्यापेक्षा अधिक टिकाऊ दुसरे काहीच नसते! मी हे आत्ता तुम्हाला जे काही सांगत आहे, ते अनुभवाच्या आधारे सांगत आहे; मी ज्यांना ज्यांना भेटले आहे अशा लोकांचे हे अनुभव आहेत. आणि अशी लोकं जेव्हा त्यांच्या ध्यानामधून बाहेर यायची, तेव्हा त्यांना खरोखरच प्रामाणिकपणे असे वाटायचे की त्यांनी काहीतरी फार मोठी गोष्ट केली आहे. परंतु ते फक्त जडत्व आणि अचेतनेमध्ये गेलेले असायचे. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 41-42)

श्रीमाताजी