अमृतवर्षा १८
सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतूने म्हणजेच, हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; तसेच आजवर त्याला जे सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार होतो; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.
दीर्घ ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही.
त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून आता काहीच लपून राहू शकत नाही.
अगदी कोणत्याही त्रुटी, अज्ञान या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो त्याला कोणत्याही त्रुटींचा त्रास होत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”त्रुटी म्हणजे जीवनाचा सत्याच्या दिशेने चाललेला पहिलावहिला प्रयत्न असतो.”
अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.
– श्रीमाताजी [CWM 02 : 28]
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025