भारत – एक दर्शन २०

संस्कृत भाषेतील प्राचीन आणि अभिजात ग्रंथांची गुणवत्ता, त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या उत्कृष्टतेची विपुलता, त्यांच्यामध्ये असणारी मौलिकता, त्यांचे सामर्थ्य आणि सौंदर्य, त्यांच्यातील आशय, त्यांची कला व रचना, त्या ग्रंथांमधील भाषेचे वैभव, विषयाला दिलेला न्याय, त्यांच्या वाणीची मोहकता, त्यांच्या प्रवृत्तीच्या पल्ल्याची उंची आणि रुंदी या सर्वच दृष्टींनी हे ग्रंथ जगाच्या महान साहित्यामध्ये निर्विवादपणे अग्रस्थानी बसण्यासारखे आहेत.

निर्णायक मत देण्याच्या योग्यतेच्या व्यक्तींकडून ज्या भाषेस सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे, ती स्वयमेव संस्कृत भाषा ही, मानवी मनाद्वारे निर्माण करण्यात आलेले सर्वांत भव्य, सर्वांत परिपूर्ण आणि आश्चर्य वाटावे इतके पर्याप्त कार्यक्षम साहित्यसाधन आहे; ही भाषा एकाच वेळी ऐश्वर्यशाली आहे, मधुर आहे, लवचीक आहे, सामर्थ्यवान आहे, सुस्पष्टपणे रचलेली आहे, आणि परिपूर्ण आहे, ती जोशपूर्ण आहे, सूक्ष्म आहे. आणि ज्या संस्कृतीचे ती प्रतिबिंबरूप माध्यम होती त्या संस्कृतीच्या आणि ज्या मनांना ती अभिव्यक्त करत होती त्या मनांच्या, वंशाच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या चारित्र्याचा पुरेसा पुरावाच म्हणता येईल अशी तिची गुणवत्ता होती आणि असे तिचे स्वरूप होते. संस्कृत कवींनी व विचारवंतांनी, तिच्या क्षमतांच्या वैभवाला साजेसा असा तिचा महान आणि उदात्त उपयोग करून घेतला आहे.

भारतीय मनाने जे अत्यंत प्रमुख, सृजनशील आणि भव्योदात्त साहित्य निर्माण केले आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा हा संस्कृत भाषेचा असला तरीदेखील केवळ संस्कृतमध्येच भारतीय मनाने उत्तुंग आणि सुंदर आणि परिपूर्ण गोष्टींची निर्मिती केली आहे, असे मात्र नाही. भारतीय साहित्याचा संपूर्ण अंदाज येण्यासाठी, संस्कृत भाषेप्रमाणेच, पाली भाषेमधील बौद्ध साहित्य आणि संस्कृतमूलक आणि द्राविडी अशा जवळजवळ बारा भाषांमधील काव्यात्मक साहित्याचा, – जे काही ठिकाणी सुसंपन्न आहे तर, काही ठिकाणी निर्मितीच्या दृष्टीने पाहता संख्येने तुरळक आहे, – अशा सर्व साहित्याचा धांडोळा घ्यावा लागतो.

…भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक ज्याला महान साहित्यकृती आणि थोर व्यक्ती म्हणतात त्यामध्ये वेद आणि उपनिषदे, महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये, कालिदास, भवभूती, भर्तृहरी आणि जयदेव यांसारख्या थोर व्यक्ती तसेच भारतीय नाट्यशास्त्र, काव्य आणि अद्भुतरम्य अशा समृद्ध अभिजात रचनांचा समावेश होतो; त्यामध्ये धम्मपद आणि जातके, पंचतंत्र, नानक आणि कबीर आणि मीराबाई यांची भजने आणि तुलसीदास, विद्यापती आणि चंडीदास व रामप्रसाद, रामदास आणि तुकाराम, तिरुवल्लुवर आणि कंबन तसेच तसेच दक्षिणी शैव संत आणि अलवार यांचाही समावेश होतो. तरी येथे केवळ सुविख्यात लेखक आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचाच विचार केला आहे. उत्कृष्टतेच्या दृष्टीने प्रथम आणि द्वितीय श्रेणीमध्ये ज्यांची गणना होऊ शकेल असे विपुल साहित्य विविध भाषांमध्ये निर्माण झाले आहे; त्यांची जगामधील सर्वात जास्त विकसित आणि सृजनशील लोकांमध्ये आणि जगातील सर्वात महान सभ्यतांमध्ये निश्चितपणे गणना करावी लागेल.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 314-315]

भारत – एक दर्शन १९

हिंदुधर्मामध्ये, ‘अनंता’च्या संकल्पनेखालोखाल जर मुख्य स्थान कोणाला मिळाले असेल तर ते ‘धर्मा’च्या संकल्पनेला आहे; आत्म्याखालोखाल धर्म हा त्याच्या जीवनाचा पाया असतो. अशी कोणतीच नीतिकल्पना नाही की जिच्यावर हिंदुधर्माने भर दिलेला नाही. प्रत्येक नीतिकल्पना हिंदुधर्माने आदर्श स्वरूपात आणि आदेशात्मक पद्धतीने मांडली आहे. या धर्माने शिकवणुक, आदेश, बोधकथा, कलाकृती, रचनात्मक उदाहरणे यांच्या साहाय्याने नीतिकल्पना लागू केल्या आहेत. सत्य, मानसन्मान, निष्ठा, इमान, धैर्य, पावित्र्य, प्रेम, सहनशीलता, आत्मत्याग, अहिंसा, क्षमा, करुणा, सौजन्य, परोपकार या हिंदुधर्मामधील सार्वत्रिक नीतिकल्पना आहेत, हिंदुधर्माच्या दृष्टिकोनातून या नीतिकल्पना म्हणजेच सुयोग्य मानवी जीवनाचे मूलद्रव्य, मनुष्यधर्माचा गाभा आहेत.

बौद्धधर्मामध्ये उच्च व उदात्त नीती आहे. जैन धर्मामध्ये आत्मजयाचे कठोर ध्येय आहे. हिंदुधर्मामध्ये धर्माच्या सर्वांगाची जी भव्य उदाहरणे आहेत ती कोणत्याही धर्मातील किंवा कोणत्याही प्रणालीमधील नैतिक शिकवणीपेक्षा आणि नैतिक आचरणापेक्षा काकणभरदेखील कमी नाहीत. किंबहुना ही उदाहरणे सर्वोच्च श्रेणी प्राप्त करतात. आणि इतर धर्मांहून त्यांचा परिणाम सर्वात प्रभावशाली शक्ती म्हणून झाला आहे. प्राचीन काळी या गुणांचे आचरण मोठ्या प्रमाणात होत होते हे सिद्ध करणारे आंतरिक आणि बाह्य असे पुष्कळ पुरावे आहेत.

…भारतीय आध्यात्मिक साधकांना सुपरिचित असणारा एक नियम पाश्चात्त्य टिकाकारांना कदाचित माहीत नसावा किंवा त्याचा अर्थ त्यांच्या लक्षात आला नसावा. तो नियम असा की, दिव्य ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम मन व जीवन शुद्ध, सात्विक असणे आवश्यक असते; भगवद्गीतेमध्ये असे सांगितले आहे की, “दुष्कर्म करणाऱ्यांना मी गवसत नाही.” पाश्चात्त्य टिकाकार हेही जाणून घेण्यात असमर्थ ठरले की, भारतीयांच्या विचारसरणीनुसार, सत्याचे ज्ञान होणे म्हणजे बुद्धीने सत्य ओळखणे किंवा बुद्धीने सत्याला मान्यता देणे असे नसून, सत्याचे ज्ञान होणे म्हणजे त्या आत्म-सत्यानुसार नवीन चेतना जागृत होणे व नवीन जीवन जगणे.

पाश्चिमात्य मनासाठी नीती ही बहुतांशरित्या बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; पण भारतीय मनासाठी वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे फक्त एक साधन आहे, आणि ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमावली, काही आदेश कधीकधी जरूर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक किंवा नैतिक शुद्धीवर. वर्तन, कृती ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे येथे सांगितले जाते; येथे “तुम्ही हिंसा करू नका” असे जोरदारपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण याहून अधिक ठामपणे एका आदेशावर भर दिला जातो की, “तुम्ही कोणाचाही द्वेष करू नका; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नका.‘’ कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.

आणखी एक गोष्ट म्हणजे हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. युरोपीय बुद्धीला ही शहाणीव (wisdom) पचविणे जड जाते. ‘अहिंसा परमो धर्मः’ – अहिंसा हा हिंदुधर्मातील सर्वात श्रेष्ठ नियम आहे – तथापि योद्ध्यासाठी भौतिक (शारीरिक) अहिंसा हा नियम ठेवलेला नाही; मात्र न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजविषयी योद्ध्याने दया, दाक्षिण्य व सन्मानबुद्धी दाखवलीच पाहिजे अशी हिंदुधर्म त्याच्याकडून आग्रहपूर्वक अपेक्षा बाळगतो. अशा प्रकारे सर्वांना एकच एक निरपवाद नियम लावण्यात जी अव्यावहारिकता असते ती हा धर्म टाळतो.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 148-149]

भारत – एक दर्शन १८

 

भारतीय धर्माने मानवी जीवनासमोर चार आवश्यक गोष्टी मांडल्या. प्रथमतः त्याने, ज्या सर्वोच्च चेतनेमधूनच सारे काही उदयाला येत असते, ज्या चेतनेचा परिचय न होताच, ज्या चेतनेमध्ये सारे जीवनकार्य चालू असते; ज्या परिपूर्ण, शाश्वत आणि अनंत चेतनेविषयी एक ना एक दिवस सर्वांनी जागृत होणे आणि जिच्याकडे परत येणे गरजेचेच आहे, त्या सर्वोच्च चेतनेविषयीचा किंवा विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाच्या प्रांताविषयीचा विश्वास मानवी मनावर बिंबवला.

नंतर, भारतीय धर्माने या महत्तर अस्तित्वाच्या सत्यामध्ये विकसित होण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी जोपर्यंत मनुष्याची तयारी होत नाही तोपर्यंत व्यक्तिगत जीवनामध्ये, अनुभव आणि विकास यांच्याद्वारे होणाऱ्या स्वतःच्या तयारीची आवश्यकता मनुष्यामध्ये ठसवली.

तिसरी गोष्ट म्हणजे, या धर्माने मनुष्याला सुस्थापित, सु-अन्वेषित, बहुशाखीय, नित्य विस्तारत जाणारे ज्ञानाचे मार्ग आणि धार्मिक व आध्यात्मिक साधनापद्धती प्रदान केल्या.

आणि सरतेशेवटी चौथी गोष्ट म्हणजे, या उच्चतर पायऱ्यांसाठी ज्यांची अजून पुरेशी तयारी झालेली नाही अशांसाठी त्याने व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनासाठी एक संरचना प्रदान केली, वैयक्तिक आणि समाजाच्या आचरणाची आणि शिस्तीची, मानसिक व नैतिक आणि प्राणिक विकसनाची एक चौकट पुरविली. ही अशी चौकट होती की जिच्यामध्ये व्यक्ती स्वतःच्या मर्यादांमध्ये राहून, स्वतःच्या प्रकृतीनुसार वागू शकत होती आणि हे सारे अशा रीतीने घडत असे की त्यामुळे अखेरीस, त्या व्यक्तीची त्या उच्चतर जीवनासाठी तयारी होत असे.

यातील पहिली तीन तत्त्व ही कोणत्याही धर्मासाठी अगदी अनिवार्य अशी तत्त्वं असतात, परंतु हिंदुधर्माने या चौथ्या तत्त्वालासुद्धा खूप महत्त्व दिले; त्याने जीवनातील कोणताही घटक हा निव्वळ ऐहिक आहे, अ-धार्मिक आहे आणि धार्मिक व आध्यात्मिक जीवनासाठी परका आहे असे समजून, त्यामधून त्याला कधीही वगळले नाही.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 181]

भारत – एक दर्शन १७

हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती, आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचे पारलौकिक जगताच्या सत्याशी व ‘अनंता’च्या सत्याशी योग्य नाते त्याला प्रस्थापित करता आले तर हिंदुधर्म समाधानी होत असे. दुसरी एक गोष्ट हिंदुधर्म जाणत होता की, धर्म केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांना वास्तविकता म्हणून उपयोगात आणायचा असेल तर, त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोहोचली पाहिजे; ती केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांपर्यंत पोहोचणे पुरेसे नाही, तर ती अस्तित्वाच्या इतर अंगांपर्यंत पोहोचणे देखील आवश्यक आहे; कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांच्यापर्यंतही ती हाक पोहोचली पाहिजे. एवढेच नव्हे तर, अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोहोचली पाहिजे. ही सर्व अंग धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत.

धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे नेले पाहिजे, आणि त्या वाटचालीमध्ये त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे पण असे करत असताना, आपल्या जटील प्रकृतीच्या उर्वरित अंगांना ‘ईश्वरत्वा’कडे घेऊन जाण्याबाबत दुर्लक्ष करणे त्याला परवडण्यासारखे नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, त्याला जे जाणवत असेल त्या माध्यमातूनच, हात देऊन धर्माने त्याला आध्यात्मिक बनवले पाहिजे, अध्यात्मपरायण बनवले पाहिजे; सत्य आणि जिवंत शक्तीचे तो जोवर आकलन करू शकत नाही तोवर ती गोष्ट त्याच्यावर लादता कामा नये. प्रत्यक्ष-ज्ञानवादी बुद्धी (positivist intelligence), हिंदुधर्मातील ज्या गोष्टींना अतार्किक वा तर्कविरोधी असे संबोधते, लांछन लावते त्या सर्व गोष्टींचा हा खरा अर्थ आहे आणि हे त्या गोष्टींचे खरे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 147-148]

भारत – एक दर्शन १६

 

(भारतीय धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. आता तिसरी संकल्पना पाहू.)

भारतीय धर्माला आधारभूत असणारी तिसरी अत्यंत परिणामकारक संकल्पना ही आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. ज्याप्रमाणे ‘परमेश्वरा’शी किंवा ‘ईश्वरा’शी वैश्विक चेतनेद्वारे संपर्क साधता येतो किंवा सर्व आंतरिक व बाह्य ‘प्रकृती’चा भेद करून संपर्क साधता येतो, त्याचप्रमाणे ‘तो ईश्वर’ प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे त्याच्या स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो. कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ‘ईश्वरी अस्तित्वा’शी, ‘सत् तत्त्वा’शी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ‘ईश्वरी अस्तित्वा’शी संबंधित तरी असते; ही ती अत्यंत परिणामकारक अशी तिसरी संकल्पना आहे. आपल्या मनापासून आणि प्राणापासून हे आत्म-ज्ञान दडवून ठेवणाऱ्या ‘अज्ञाना’तून आपण बाहेर पडू शकू आणि आपल्यामध्ये वसणाऱ्या ‘दिव्यत्वा’विषयी आपण जागृत होऊ शकू अशा पद्धतीने आपण जीवन जगावे, विकसित व्हावे, हे आपले ध्येय असावे हा भारतीय धर्माचा गाभा आहे. या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच ‘हिंदु’ धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणती श्रद्धा आवश्यक असेल तर हीच ती श्रद्धा होय.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 195]

भारत – एक दर्शन १५

(‘भारतीय’ धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दुसरी संकल्पना पुढील प्रमाणे)

भारतीय धर्माची दुसरी पायाभूत संकल्पना अशी आहे की, ‘शाश्वत’ आणि ‘अनंता’कडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. जे मूळ ‘अनंत’ आहे त्यात अनेक अनंत आहेत, आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत ‘शाश्वत’च आहे. आणि येथे विश्वाच्या मर्यादांमध्ये ‘ईश्वर’ स्वत:ला अभिव्यक्त करतो, आणि अनेक मार्गांनी या विश्वामध्ये तो स्वत:ची परिपूर्ती करतो; परंतु हा प्रत्येक मार्गच त्या ‘शाश्वता’चा मार्ग असतो. प्रत्येक सान्तामध्ये आपल्याला ‘अनंता’ची भेट होऊ शकते. सर्व गोष्टी या अनंताची रूपे व प्रतीके असल्याने, त्यांद्वारे आपण ‘अनंता’कडे जाऊ शकतो. ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्या ‘एका’चेच आविष्कार आहेत. सर्व शक्ती त्या ‘एका’च्या शक्ती आहेत. ‘प्रकृती’च्या कार्यामागे असणाऱ्या देवदेवतांकडे, त्या एका ‘ईश्वरा’च्या विविध शक्ती आहेत, ती एकाच ‘ईश्वरा’ची विविध नामरूपे आहेत अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे आणि त्यांचे पूजन केले पाहिजे.

सर्व घटनांच्या पाठीमागे, मग त्या घटना आपल्याला चांगल्या दिसोत वा वाईट, ग्राह्य वाटोत वा अग्राह्य, भाग्याच्या वाटोत अथवा दुर्भाग्याच्या वाटोत, त्यांच्या पाठीमागे अनंत ‘चित्शक्ती’ असते, कार्यकारी ‘शक्ती’ असते, अनंताचा ‘संकल्प’ किंवा ‘कायदा’ असतो, ‘माया’ असते, ‘प्रकृती’ असते, ‘शक्ती’ किंवा ‘कर्म’ असते. ‘अनंत’ निर्मिती करतो आणि ‘ब्रह्मा’ होतो, तो रक्षण करतो आणि ‘विष्णु’ होतो, संहार करतो किंवा स्वत:मध्ये सामावून घेतो आणि ‘रुद्र’ वा ‘शिव’ होतो. जी आद्य शक्ती या विश्वाला धारण करण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी उपकारक ठरते ती किंवा जी स्वत:ची निर्मिती ‘जगत्-जननी’ म्हणून करते ती लक्ष्मी किंवा दुर्गा असते. अगदी संहारक रूप धारण करूनदेखील, जी कल्याणकारिणीच असते; तिला ‘चंडी’, ‘काली’, ‘कालीमाता’ म्हणतात.

एकच ‘ईश्वर’ विविध नामांनी आणि विविध देवदेवतांच्या रूपाने, विभिन्न गुणवैशिष्ट्यांद्वारे अभिव्यक्त होतो. ‘वैष्णवां’चा दिव्य प्रेमाचा देव आणि ‘शाक्तां’चा दिव्य शक्तिशाली देव हे दोन वेगळे देव असल्याचे भासतात, परंतु खरेतर वेगवेगळ्या रूपांमधून अभिव्यक्त होणारी ती एकच अनंत ‘देवता’ असते. व्यक्ती यांपैकी कोणत्याही नामरूपाच्या आधाराने ‘परमेश्वरा’शी संपर्क साधू शकते, ज्ञान असताना किंवा ज्ञान नसतानाही संपर्क साधू शकते; कारण अंतिमतः या नामरूपांद्वारे, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत असलेला परम अनुभव घेण्यासाठी आपल्याला पुढे जाता येते.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 194-195]

भारत – एक दर्शन १४

आपण भारतीय धार्मिक मनाच्या समन्वयी प्रवृत्तीला, सर्वसमावेशक एकतेला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. तसे केले नाही तर, भारतीय जीवनाचा आणि भारतीय संस्कृतीचा अर्थ आपल्याला सर्वार्थाने लक्षात येणार नाही. या मनाची व्यापक, लवचीक प्रवृत्ती जाणून घेतल्यानेच आपल्याला भारतीय धार्मिक मनाचा समाजावर आणि व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम झालेला आहे तो नीट समजेल. कोणी जर आपल्याला असा प्रश्न विचारला की, “हिंदुधर्म म्हणजे काय, तो कसा आहे? हा धर्म काय शिकवतो? त्याचे आचरण कसे केले जाते? त्यामध्ये असलेले सर्वसाधारण घटक कोणते?” तर उत्तरादाखल आपण असे म्हणू शकतो की, सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर ‘भारतीय’ धर्म आधारलेला आहे.

‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’

प्रथम मनात येणारी संकल्पना म्हणजे वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘एकच अस्तित्व’ आहे ज्याला विद्वान लोकं अनेक वेगवेगळी नावे देतात. (‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’) उपनिषदांत याचे वर्णन ‘एकमेवाद्वितीय’ (ब्रह्म) असे केलेले आहे; या विश्वामध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व ब्रह्मच आहे, (एवढेच नव्हे तर,) ते या सर्वांच्या पलीकडेसुद्धा आहे. ‘बुद्धधर्मीय’ या तत्त्वाला ‘चिरंतन तत्त्व’ म्हणतात. ‘मायावादी’ याला ‘केवल तत्त्व’ म्हणतात; ‘आस्तिक’ याला ‘परम ईश्वर’ किंवा ‘पुरुष’ म्हणतात. त्या पुरुषाने त्याच्या शक्तीमध्ये जीव आणि ‘प्रकृती’ या गोष्टी धारण केलेल्या असतात. एका शब्दात सांगायचे तर या तत्त्वाला ‘शाश्वत’, ‘अनंत’ असे म्हणता येते. हिंदुधर्माचा हा सर्वत्र समान असा पहिला मूळ आधार आहे. परंतु मानवी बुद्धीद्वारे त्याचे अगणित सूत्रांच्या माध्यमातून आविष्करण करता येते आणि तसे ते केले गेले आहे. या ‘चिरंतना’चा, ‘अनंता’चा, ‘शाश्वता’चा शोध लावणे, त्याच्या अगदी निकट जाणे, त्यात प्रविष्ट होणे, त्याच्याशी कोणत्याही प्रमाणात, कोणत्याही प्रकारे एकरूप होणे, हा त्याच्याविषयीच्या आध्यात्मिक अनुभूतीचा अखेरचा व सर्वोच्च उंचीचा प्रयत्न (आजवर) राहिलेला आहे. असा प्रयत्न करणे ही पहिली सार्वत्रिक श्रद्धा भारतीय धार्मिक मनात आढळते.

या पायाभूत तत्त्वामध्ये तुम्ही कोणत्याही एका सूत्राने प्रविष्ट व्हा, भारतात संमत असलेल्या सहस्रावधी मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने हे महान आध्यात्मिक ध्येय अनुसरा, अथवा त्यातून उदयाला आलेल्या एखाद्या नव्या मार्गाने त्या ध्येयाचे अनुसरण करा; तसे तुम्ही केलेत की, तुम्ही या धर्माच्या गाभ्याशी जाऊन पोहोचाल.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 193-194]

भारत – एक दर्शन १३

उपनिषदं म्हणजे भारतीय मनाची एक परमोच्च कृती आहे आणि तशी ती असायलाही हवी कारण भारतीय मनाच्या प्रतिभेचे उच्चतम आत्माविष्करण, त्याचे सर्वांत उन्नत काव्य, विचार आणि शब्दांची महत्तर निर्मिती ही केवळ एक सामान्य दर्जाची साहित्यिक किंवा काव्यात्मक कलाकृती असता कामा नये तर, ती साहित्यकृती म्हणजे थेट आणि सखोल स्वरूपाच्या आध्यात्मिक साक्षात्काराचा जणू महान गंगौघच असला पाहिजे. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेचा आणि आत्म्याच्या असामान्य वळणाचा तो पुरावा आहे. ती एक लक्षणीय वस्तुस्थिती आहे.

उपनिषदं ही एका बाजूने गहनगंभीर धर्मग्रंथ आहेत कारण उपनिषदं म्हणजे गहन अशा आध्यात्मिक अनुभूतींच्या नोंदी आहेत; आणि दुसरीकडे उपनिषदं म्हणजे अक्षय प्रकाश, शक्ती आणि व्यापकतेच्या साक्षात्कारी आणि अंतर्ज्ञानात्मक तत्त्वज्ञानाचे दस्तऐवजदेखील आहेत, मग ती पद्यामध्ये लिहिलेली असू देत वा लयबद्ध गद्यामध्ये लिहिलेली असू देत, उपनिषदं म्हणजे परम, अमोघ अंतःस्फूर्तीतून स्फुरलेली, शब्दरचनेच्या बाबतीत अपरिहार्यपणे निर्दोष असलेली अशी आध्यात्मिक काव्यं आहेत; लय आणि आविष्काराबाबत ती अद्भुत आहेत.

उपनिषदं म्हणजे, ज्या मनामध्ये ‘तत्त्वज्ञान, धर्म आणि काव्य’ एकजीव झालेली आहेत अशा मनाचे आविष्कार आहेत. कारण हा ‘धर्म’ कोणत्या एखाद्या संप्रदायामध्ये परिणत होत नाही किंवा तो एखाद्या धार्मिक-नैतिक आकांक्षेपुरताही सीमित राहत नाही, तर तो ‘ईश्वरा’च्या, ‘स्व’च्या अनंत शोधाप्रत उन्नत होतो, तो आपल्या आत्म्याच्या समग्र आणि सर्वोच्च वास्तवाप्रत आणि अस्तित्वाप्रत उन्नत होतो, आणि तो प्रकाशमान ज्ञानाची आणि प्रेरित व परिपूर्ण अनुभूतीच्या आनंदाची वाणी उच्चारतो. हे ‘तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘सत्या’विषयीचा एखादा अमूर्त बौद्धिक तर्क नाही किंवा तार्किक बुद्धिमत्तेने केलेली कोणतीही रचना नाही, तर ते आंतरतम मनाने आणि आत्म्याने पाहिलेले, अनुभवलेले, जगलेले आणि साठवून ठेवलेले ‘सत्य’ आहे, खात्रीपूर्वक लागलेल्या शोधाचे आणि स्वामित्वाचे ते प्रसन्न उच्चारण आहे. आणि हे ‘काव्य’ म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा आध्यात्मिक आत्मदृष्टीचे सौंदर्य आणि त्याचे आश्चर्य अभिव्यक्त करण्यासाठी, आणि ‘स्व’च्या, ‘ईश्वरा’च्या आणि विश्वाच्या गहनतम, ज्योतिर्मयी सत्याची अभिव्यक्ती करण्यासाठी, मनाच्या सर्वसामान्य क्षेत्राच्या अतीत, वर उचलल्या गेलेल्या सौंदर्यात्मक मनाचे कार्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 329-330]

भारत – एक दर्शन १२

वैदिक शिकवण ही मनुष्याच्या आंतरिक जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे त्या शिकवणुकीचे मोठे सामर्थ्य आहे आणि त्यामुळेच ती शिकवण नंतरच्या सर्व भारतीय तत्त्वज्ञानांचा, धर्मांचा, योगप्रणालींचा उगम ठरली.

मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून ‘सत्या’कडे वळले पाहिजे; त्याने ‘प्रकाशा’कडे वळले पाहिजे आणि ‘अंधकारा’च्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी ‘शक्तीं’च्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन तो या गोष्टी करतो; ईश्वरी ‘शक्तीं’च्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते.

जगभरातील ‘रहस्यां’ना ज्याप्रमाणे आंतरिक अर्थ देण्यात आलेला असतो त्याप्रमाणेच तो येथे बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना देण्यात आला आहे. ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती प्रतीके मानव व देवदेवतांना जोडत असतात, त्या दोहोंमध्ये विनिमय घडवीत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्यत्व घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निर्माण होऊ लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे ‘सत्या’चे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते ‘अमर्त्यत्वा’च्या शक्ती आहेत, ते अनंत असणाऱ्या ‘माते’चे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो ‘सत्या’चा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, ‘ऋतस्य पंथः’ असे ज्याला म्हटले जाते त्या ‘सत्या’च्या धर्मामध्ये मनुष्याचे आरोहण आहे.

मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे येऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आंतरात्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि ‘सत्या’च्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया आहे आणि तेथे त्रिविध ‘अनंता’चे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आंतरात्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय ‘योगा’चा गाभा सामावलेला होता.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 202-203]

भारत – एक दर्शन ११

(हिंदुधर्मातील देवदेवतांच्या वैपुल्याबद्दल अन्य धर्मांमध्ये काहीसा तिरकस सूर लावला जातो. त्या देवदेवतांचे नेमके मर्म काय, हेच श्रीअरविंद येथे एक प्रकारे स्पष्ट करत असल्याचे दिसते.)

ब्रह्मांडातील देवदेवतांच्या आंतरात्मिक गौरवाच्या विस्तारीकरणानिशी आंतरिक ‘वैदिक’ धर्माचा प्रारंभ झाला. जगतांची एक श्रेणी आहे आणि या विश्वामध्ये अस्तित्वाच्या पातळ्यांची एक चढती श्रेणी आहे अशी ‘वैदिक धर्मा’ची प्राथमिक कल्पना होती. त्या जगतांच्या श्रेणीसारखीच, त्याच्याशी संबंधित अशी, मनुष्याच्या प्रकृतीमध्येही चेतनेच्या प्रतलांची किंवा त्यांच्या परिमाणांची किंवा त्यांच्या स्तरांची एक चढती श्रेणी आहे, हे वैदिक धर्माने पाहिले. ‘सत्य’, ‘न्याय’ आणि ‘धर्म’ (Truth, Right and Law) यांची एक त्रयी प्रकृतीच्या या सर्व स्तरांना धारण करते, त्या स्तरांचे ती शासन करते; या त्रयीचे सारभूत स्वरूप एकच असले तरीदेखील ती विभिन्न पण सजातीय रूपं धारण करते.

उदाहरण द्यायचे झाले तर प्रकाशाची एक मालिका असते. या मालिकेमध्ये बाह्य भौतिक प्रकाश असतो; मानसिक, प्राणिक आणि आंतरात्मिक चेतनेचे वाहन असणारा असा उच्चतर आणि आंतरिक प्रकाश असतो; तसेच आणखी एक आध्यात्मिक प्रदीपनाचा उच्चतम, आंतरतम असा प्रकाश असतो.

सूर्य म्हणजे सूर्यदेव हा भौतिक सूर्याचा स्वामी होता, परंतु त्याच वेळी वैदिक द्रष्ट्या-कवींसाठी मात्र तो मन उजळविणारे ज्ञान-प्रकाश किरण देणारा आहे, तसेच तो आध्यात्मिक प्रकाशाचा आत्मा, ऊर्जा आणि शरीरदेखील आहे. आणि या सर्व शक्तींमध्ये तो एकमेवाद्वितीय, अनंत ईश्वराचे एक ज्योतिर्मय रूप आहे.

सर्व वैदिक देवदेवतांना अशा प्रकारे बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अशी कार्ये असतात, त्यांना ज्ञात आणि गुप्त अशी ‘नामं’ असतात. या सर्वांची बाह्य व्यक्तित्वं पाहिली असता, त्या देवदेवता म्हणजे जडभौतिक प्रकृतीच्या शक्ती आहेत; आंतरिक अर्थाने पाहता, त्यांना काही आंतरात्मिक कार्य असते, त्यांना काही मनोवैज्ञानिक लक्षणांद्वारा ओळखले जाते. तसेच त्या देवदेवता या एका परमोच्च ‘सद्वस्तु’च्या, ‘एकम्’ सत्च्या, एकमेव अनंत ‘अस्तित्वा’च्या विविध शक्तीदेखील असतात. जाणण्यास अत्यंत कठीण असलेली ही परमश्रेष्ठ ‘सद्वस्तु’, वेदामध्ये बरेचदा ‘तत् सत्यम्’, ‘तद् एकम्’ या नावाने ओळखली जाते.

जे लोक या देवदेवतांना बाह्य भौतिक अर्थच देऊ पाहतात त्यांना वैदिक देवदेवता जी विविध रूपं धारण करतात त्यांचे जटिल स्वरूप समजत नाही आणि त्याविषयी त्यांचा पूर्णपणे गैरसमज होतो. वस्तुतः या देवदेवतांपैकी प्रत्येक देव हा त्या एकमेवाद्वितीय अस्तित्वाची स्वयमेव संपूर्ण आणि स्वतंत्र वैश्विक व्यक्तित्वं आहेत आणि त्यांच्या विविध शक्तींच्या संयोगाने त्या परिपूर्ण अशी वैश्विक शक्ती, ब्रह्मांडगत शक्ती, विश्वदेव्यम्, असे रूप धारण करतात. आणि पुन्हा, त्यांच्या या विशेष कार्याशिवाय, प्रत्येक देवदेवता ही दुसऱ्या देवदेवतांशी मिळून आणखी एक देव तयार होतो, ते देव स्वतःमध्येच वैश्विक दिव्यत्व धारण करून असतात, प्रत्येक देव म्हणजे इतर सर्व देव असतात.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 201-202]