ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारताचे भाषावैभव

भारत – एक दर्शन २०

संस्कृत भाषेतील प्राचीन आणि अभिजात ग्रंथांची गुणवत्ता, त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या उत्कृष्टतेची विपुलता, त्यांच्यामध्ये असणारी मौलिकता, त्यांचे सामर्थ्य आणि सौंदर्य, त्यांच्यातील आशय, त्यांची कला व रचना, त्या ग्रंथांमधील भाषेचे वैभव, विषयाला दिलेला न्याय, त्यांच्या वाणीची मोहकता, त्यांच्या प्रवृत्तीच्या पल्ल्याची उंची आणि रुंदी या सर्वच दृष्टींनी हे ग्रंथ जगाच्या महान साहित्यामध्ये निर्विवादपणे अग्रस्थानी बसण्यासारखे आहेत.

निर्णायक मत देण्याच्या योग्यतेच्या व्यक्तींकडून ज्या भाषेस सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे, ती स्वयमेव संस्कृत भाषा ही, मानवी मनाद्वारे निर्माण करण्यात आलेले सर्वांत भव्य, सर्वांत परिपूर्ण आणि आश्चर्य वाटावे इतके पर्याप्त कार्यक्षम साहित्यसाधन आहे; ही भाषा एकाच वेळी ऐश्वर्यशाली आहे, मधुर आहे, लवचीक आहे, सामर्थ्यवान आहे, सुस्पष्टपणे रचलेली आहे, आणि परिपूर्ण आहे, ती जोशपूर्ण आहे, सूक्ष्म आहे. आणि ज्या संस्कृतीचे ती प्रतिबिंबरूप माध्यम होती त्या संस्कृतीच्या आणि ज्या मनांना ती अभिव्यक्त करत होती त्या मनांच्या, वंशाच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या चारित्र्याचा पुरेसा पुरावाच म्हणता येईल अशी तिची गुणवत्ता होती आणि असे तिचे स्वरूप होते. संस्कृत कवींनी व विचारवंतांनी, तिच्या क्षमतांच्या वैभवाला साजेसा असा तिचा महान आणि उदात्त उपयोग करून घेतला आहे.

भारतीय मनाने जे अत्यंत प्रमुख, सृजनशील आणि भव्योदात्त साहित्य निर्माण केले आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा हा संस्कृत भाषेचा असला तरीदेखील केवळ संस्कृतमध्येच भारतीय मनाने उत्तुंग आणि सुंदर आणि परिपूर्ण गोष्टींची निर्मिती केली आहे, असे मात्र नाही. भारतीय साहित्याचा संपूर्ण अंदाज येण्यासाठी, संस्कृत भाषेप्रमाणेच, पाली भाषेमधील बौद्ध साहित्य आणि संस्कृतमूलक आणि द्राविडी अशा जवळजवळ बारा भाषांमधील काव्यात्मक साहित्याचा, – जे काही ठिकाणी सुसंपन्न आहे तर, काही ठिकाणी निर्मितीच्या दृष्टीने पाहता संख्येने तुरळक आहे, – अशा सर्व साहित्याचा धांडोळा घ्यावा लागतो.

…भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक ज्याला महान साहित्यकृती आणि थोर व्यक्ती म्हणतात त्यामध्ये वेद आणि उपनिषदे, महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये, कालिदास, भवभूती, भर्तृहरी आणि जयदेव यांसारख्या थोर व्यक्ती तसेच भारतीय नाट्यशास्त्र, काव्य आणि अद्भुतरम्य अशा समृद्ध अभिजात रचनांचा समावेश होतो; त्यामध्ये धम्मपद आणि जातके, पंचतंत्र, नानक आणि कबीर आणि मीराबाई यांची भजने आणि तुलसीदास, विद्यापती आणि चंडीदास व रामप्रसाद, रामदास आणि तुकाराम, तिरुवल्लुवर आणि कंबन तसेच तसेच दक्षिणी शैव संत आणि अलवार यांचाही समावेश होतो. तरी येथे केवळ सुविख्यात लेखक आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचाच विचार केला आहे. उत्कृष्टतेच्या दृष्टीने प्रथम आणि द्वितीय श्रेणीमध्ये ज्यांची गणना होऊ शकेल असे विपुल साहित्य विविध भाषांमध्ये निर्माण झाले आहे; त्यांची जगामधील सर्वात जास्त विकसित आणि सृजनशील लोकांमध्ये आणि जगातील सर्वात महान सभ्यतांमध्ये निश्चितपणे गणना करावी लागेल.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 314-315]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

5 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago