ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारत – एक दर्शन (प्रस्तावना)

भारत – एक दर्शन ०१

 

“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” असे म्हटले जाते. तेव्हा स्वर्गापेक्षाही जिची महानता अधिक आहे अशी आपली मातृभूमी म्हणजे ‘भारत’. भारत या शब्दामध्ये भा आणि रत ही दोन पदं आहेत. भारत या शब्दाची संस्कृतातील व्युत्त्पत्ती ‘भा नाम अभा, अभा नाम प्रभा, प्रभा नाम ज्ञानम्‌, तत्र रतः’ अशी आहे; म्हणजेच ज्ञानामध्ये रममाण झालेल्या लोकांचा देश म्हणजे ‘भारत’, अशी भारताची व्याख्या आहे.

भारताला एक महान परंपरा लाभलेली आहे, ज्ञानवारसा लाभलेला आहे. एकेकाळी सर्व जगाचे लक्ष ज्या भारताकडे वळलेले होते, त्या भारताच्या वैभवसंपन्नतेचे काय वर्णन करावे? भारत एकेकाळी समृद्धीच्या, ज्ञानशोधांच्या, कर्मकौशल्याच्या, कलानिपुणतेच्या गिरीशिखरावर विराजमान होता. सरस्वती आणि लक्ष्मी दोघीजणी येथे गुण्यागोविंदाने नांदत होत्या. भारतामध्ये आजही टिकून असलेली प्राचीन मंदिरे, वास्तुकलेचे नमुने याची साक्ष देतात.

परंतु परधार्जिणेपणाचा, अवमानाचा, यातनांचा एक अचेतन कालखंडही या भारताने सोसला. सारी समृद्धता, ज्ञानवैभव, कलाकौशल्य नामशेष होत गेले. भारतभूमीला दास्यत्व पत्करावे लागले. भारत आणि भारतीयांच्या प्रत्येक गोष्टीकडेच नकारार्थी दृष्टीने पाहणाऱ्या काही विद्वज्जनांच्या विखारी प्रचारामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये खोलवर न्यूनगंड निर्माण झाला. तो वाढतच राहिला आणि भारत खचत खचत गेला.

पुढे अनेकानेकांच्या प्रयत्नांमुळे, बलिदानामुळे, चातुर्यामुळे, व्यूहरचनेमुळे, मुत्सद्दीपणामुळे भारताला यथावकाश स्वातंत्र्य मिळाले. पण दुर्दैवाची बाब अशी की, ते होते विभाजित स्वातंत्र्य. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये भारताने काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखा आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. कारण त्यातील काही गोष्टींचे आपण साक्षी आहोत.

आज जग पुन्हा एकदा भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. एकेकाळी भारताच्या केवळ भौतिक समृद्धतेला भुललेले जग, आता काहीसे अधिक सुजाण झाले आहे. सोनेनाणे, पैसाअडका, जडजवाहीर, किमती मसाले, धनधान्य इत्यादी भौतिक संपत्तीपेक्षा, अधिक मौल्यवान संपत्ती भारताकडे आहे, याची जाणीव आता जगाला झाली आहे. अर्थसंपदेच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा का क्रमांक असेना, पण योगमार्ग, दर्शनं, पराविद्या, अध्यात्म, तत्त्वज्ञान, यांची भांडारं आणि मुख्यतः आंतरिक शांतीचे झरे भारतात जागोजागी आहेत, त्याचा शोध घ्यायला हवा, याची जाण आता जगाला झाली आहे. आणि म्हणूनच भारताकडे जिज्ञासेने येऊ पाहणाऱ्या परदेशी व्यक्तींची संख्या आज वाढत आहे.

अशा वेळी, एक भारतीय नागरिक म्हणून आपण स्वतःतरी या बाबतीत कितपत सुजाण आहोत, हे स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की, केवळ इतिहासाच्या गौरवशाली वारशाचे ढोल बडविण्यामध्येच आपण कृतकृत्यता मानतो? आपल्याला भारताच्या समृद्ध वारशाची खरंच ओळख आहे का? की आपण केवळ पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने, भारताला नावे ठेवत राहतो? एकीकडे नुसतेच स्तुतिपाठक आणि दुसरीकडे निंदानालस्ती करणारे आपल्याच अस्तनीतले निखारे, हे दोघेही भारताचे सारखेच नुकसान करत नसतात का? तेव्हा आता गरज आहे, या दोन्ही टोकांच्या विचारसरणीचा त्याग करून, भारताची खरी महानता कशामध्ये दडलेली आहे, याचा शोध घेण्याची!

भारत पारतंत्र्यामध्ये असताना, देशबांधवाच्या मनात देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटविण्यासाठी ‘कर्मयोगिन्’ साप्ताहिकाच्या माध्यमातून श्रीअरविंद यांनी भारतीय संस्कृतीचे, तिच्या समृद्ध वारशाचे जे संस्मरण केले होते, त्याचाच मागोवा आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘भारत – एक दर्शन’, या मालिकेच्या माध्यमातून घेणार आहोत. भारत हा नेहमीच श्रीअरविंदांच्या चिंतनाचा विषय राहिलेला होता. त्यांनी भारताविषयी विपुल लेखन केले आहे, त्यातील निवडक भागाचा समावेश या मालिकेमध्ये आपण करणार आहोत. सद्यकालीन भारत पुन्हा एकदा त्याच गिरीशिखरावर विराजमान होण्यासाठी एक नागरिक म्हणून आपल्याला नेमके काय करता येणे शक्य आहे, याची दिशा तुम्हाआम्हाला, आपल्या सर्वांना लाभावी, या भूमिकेतून भारताचे ‘दर्शन’ घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

10 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago