विचारशलाका २३

 

साधक : समजा, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा तिला मागर्दर्शनाची आवश्यकता असेल किंवा तिला इतर काही हवे असेल, तर त्या व्यक्तीला तिच्या गरजेनुसार ती गोष्ट ‘ईश्वरा’कडून कशी मिळू शकेल?

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’कडे ती गोष्ट तुम्ही मागितलीत तर ती तुम्हाला मिळू शकेल. पण तुम्ही जर त्याची मागणीच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल?

तुम्ही ‘ईश्वरा’कडे वळलात आणि त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवलात आणि ‘त्याच्या’कडे मागणी केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला मिळेल – अर्थात् जी गोष्ट गरजेची आहे असे ‘तुम्हाला वाटते’ ती मिळेलच असे नाही; तर तुम्हाला ज्या गोष्टीची ‘खरोखरच गरज’ असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्यासाठी त्या गोष्टीची तुम्ही ‘त्याच्या’कडे मागणी केली पाहिजे.

मात्र तुम्ही हा प्रयोग प्रामाणिकपणे केला पाहिजे. ती गोष्ट मिळविण्यासाठी इतर सर्व प्रकारचे बाह्य मार्ग आधी अवलंबायचे, धडपड करायची आणि (सर्व मार्ग खुंटले की मग) नंतर ‘ईश्वरा’कडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती गोष्ट द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही त्याच्याकडे न मागता; हे असे करता कामा नये. खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, हो की नाही? आणि ‘ईश्वरा’ने मात्र ती गोष्ट तुम्ही न मागतासुद्धा तुम्हाला द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही त्याच्याकडून कशी बरे बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया (अपेक्षित प्रक्रियेच्या) बरोबर उलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला या नातेसंबंधाची आवश्यकता आहे; मला हे प्रेम, ही ममता हवी आहे; मला अमुक गोष्टीचे ज्ञान हवे आहे इत्यादी आणि ‘ईश्वरा’ने ते मला दिलेच पाहिजे, अन्यथा तो ‘ईश्वर’च नाही.” म्हणजे असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

पहिली गोष्ट ही की, तुम्ही म्हणता, ”मला अमुक गोष्टीची गरज आहे.” पण तुम्हाला खरंच माहीत असते का, की त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज आहे? की तशी तुमच्या मनात काहीतरी धूसर कल्पना असते? का ती केवळ एक इच्छा असते? का (मनात उमटलेला) तो फक्त एक अज्ञानी तरंग असतो? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, “मला याची आवश्यकता आहे,” असे म्हणत, खरंतर तुम्ही तुमची इच्छाच ‘ईश्वरा’वर लादू पाहत असता आणि तरीदेखील, “मला ते दे”, अशी मागणीसुद्धा तुम्ही ‘त्याच्या’जवळ करत नाही. उलट तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळाली पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ‘ईश्वरा’चे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे एकतर तुम्हाला माहीत नसते. आणि दुसरे म्हणजे तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि ‘ईश्वरा’कडे वळतसुद्धा नाही, ‘त्या’च्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते तुम्ही निर्माण करत नाही, ‘त्या’चा क्षणभरही विचार करत नाही, किंवा ‘त्या’च्याकडे जेव्हा वळता तेव्हा तुमच्या दृष्टिकोनात थोडीसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ‘ईश्वरा’कडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, ‘त्याने’ तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही.

पण तुम्ही जर ‘ईश्वरा’कडे मागणी केलीत, तर ‘तो’ ‘ईश्वर’च असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तुम्हाला ज्याची (खरोखरच) गरज आहे ते तो तुम्हाला देईलच.

परंतु, तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी आणि खरंतर तुम्हाला त्या गोष्टीची काहीच गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्ही मागितलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही पुन्हा तक्रार करू लागता आणि म्हणू लागता की, “मला त्रास होईल अशी गोष्ट ‘ईश्वरा’ने मला दिलीच कशासाठी?” पण तुम्ही तेव्हा हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच त्याच्याकडे मागितली होती.

दोन्ही बाबतीत, तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले होते, ते ‘त्या’ने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपाय होण्याऐवजी जर अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि ‘त्या’ने ते तुम्हाला दिले नाही तरी तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी तर ‘त्याला’ सांगितले की, मला याची गरज आहे आणि तरी ‘तो’ मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ‘ईश्वरा’लाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्यामध्ये ‘त्या’चा शोध घेण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, तशी आत्यंतिक निकड तुम्हाला वाटत असेल, ज्याला साधारणत: तुम्ही कमीअधिक स्पष्टपणे तुमच्या अस्तित्वाचे सारभूत ‘सत्य’ समजता, वस्तुजाताचे मूळ ‘उगमस्थान’ समजता, सर्वोत्तम ‘हितकारक’ अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील ‘समाधान’ मानता, आपल्या सर्व समस्यांवरील ‘उपाय’ मानता, त्याविषयीची तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ‘ईश्वरा’ला कधीच असे म्हणणार नाही, की ” मला हे दे, मला ते दे.” किंवा ”याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही ‘त्या’ला अशी विनवणी कराल की, ”माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या ‘सत्या’प्रत तू मला घेऊन चल; हे ‘ईश्वरा’, माझ्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे असे तुझ्या ‘परमप्रज्ञे’ला दिसते, ती तू मला प्रदान कर.”

आणि त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची तुम्हाला खात्री असेल. आणि ‘ईश्वर’ही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

…आणि नंतर, पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती ‘ईश्वरा’समोर बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “मी इथे आहे, माझा स्वीकार कर आणि मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.” त्यानंतर मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी [CWM 08 : 121-124]

विचारशलाका २२

 

बुद्धी, तर्कबुद्धी (Reason) ही सामान्य जीवनाच्या तर्कसंगत क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टींचेच मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, मानवी जीवनातील प्राणिक आणि मानसिक कृतींचे, गतिविधींचे संयोजन आणि नियंत्रण करणे, हेच बुद्धीचे खरे कार्य असते.

समजा, जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल (vital disorder) असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि तेव्हा जर त्या व्यक्तीने बुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या बुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न केला तर अशा प्रत्येक वेळी, ती व्यक्ती या सर्व गोष्टी पुन्हा सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व गतिविधी संघटित करणे आणि त्यांचे नियमन करणे हे बुद्धीचे खरे कार्य आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, की विरोधी आहेत; तुमच्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही बुद्धीचा आश्रय घेऊ शकता. या व अशा सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे हे बुद्धीचे कार्यक्षेत्र आहे आणि कदाचित त्यापेक्षा काकणभर अधिकच असे म्हणता येईल: अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे हे पाहणे; तसेच त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, त्यामुळे तो आवेग चालवून देण्यायोग्य आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम बुद्धीचे आहे. हे बुद्धीचे संपूर्ण कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी [CWM 07 : 166-167]

विचारशलाका २१

संक्रमणकाळात ‘विचारा’ची आत्यंतिक आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड हा अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या दोन प्रकारच्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून कडवेपणाने चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस (moderate man) उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नव्यामधलेही काहीतरी असे दोन्ही घेऊया. उपरोक्त दोन टोकाच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी, नेमस्त माणूसदेखील काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाला एक सूत्र आणि दैवी प्रतिमा मानून, मध्यममार्गाच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्यांच्या दृष्टीपुढे अशाच प्रकारचा विचार होता.

‘विचार’ केव्हाही एखादे सूत्र ठरवत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. एखादा माणूस जर असे म्हणेल की, प्रबुद्ध (enlightened) युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार त्याला उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस त्याला म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का, याबाबत मी साशंक आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते, नेमकी तशीच सध्याच्या काळात या देशातील माणसे झाली असतील. आपल्या भारतीय सभ्यतेच्या (civilization) वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि त्या सभ्यतेमध्ये नित्य, शाश्वत काय आणि अनित्य, तात्पुरते काय याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आपण गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिन लोकांकडे असू शकतील.”

भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ‘ज्ञानाने’ भारतीय असणे होय, केवळ ‘पूर्वग्रहाने’ नव्हे. मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुरुषार्थासाठी तसेच, मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 01 : 499-500]

विचारशलाका २०

 

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

एखाद्याला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल आणि त्याच्या या निवडीमुळे त्याला जर शांती लाभत असेल तर त्याने खुशाल तसे करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या ‘योगा’मध्ये (पूर्णयोग) सुद्धा, माझ्या कार्यक्षेत्रात भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे, असे मला आढळून आले.

अन्य ध्येयं जशी आध्यात्मिक आहेत, तसेच हे ध्येयदेखील ‘आध्यात्मिक’ आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा पाठपुरावा करणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाबद्दलचा आणि विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप याविषयीचा हा अनुभव व हा दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ समग्र सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण (pursuit) करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. पण अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा ‘योग’ (पूर्णयोग) आचरणे त्याला शक्य होणार नाही.

– श्रीअरविंद [CWSA 35 : 234]

विचारशलाका १९

नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; तत्त्वज्ञानाच्या सर्व पुस्तकांमधून, अगदी योगामध्येसुद्धा तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तुमच्या जन्माबरोबरच तो आलेला असतो, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी अत्यंत अवघड असे काही तुम्हाला करावे लागते. (कारण) तुम्हाला केवळ तुमचीच प्रवृत्ती बदलायची नसते तर, (तुमच्यामध्ये असलेली तुमच्या) पूर्वजांची प्रवृत्तीदेखील तुम्हाला बदलायची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही (कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो), पण तुम्हाला मात्र  तुमच्यामधील ती प्रवृत्ती बदलणे आवश्यक असते.

त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात – तुमच्या जन्माबरोबर जणू या सुंदर भेटवस्तू तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या तुम्हाला बदलायच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही जर त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर, एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त झालेले असाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती झालेले असाल; नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 262]

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]

विचारशलाका १७

साधक : ज्याला स्वत:ची शारीरिक अवस्था सुधारण्याची इच्छा आहे, ज्याला उपचाराचा परिणाम दिसून यावा असे वाटते किंवा जो स्वत:च्या शारीरिक कमतरतेवर उपाय करू पाहतो त्याने काय केले पाहिजे? जो बदल घडून येणे अपेक्षित आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करून, त्याने स्वत:ची इच्छाशक्ती उपयोगात आणावी की, केवळ ते घडून येईलच अशा खात्रीने जगत राहावे की, ‘ईश्वरी शक्ती’ योग्य वेळ आली की, योग्य मार्गाने अपेक्षित तो परिणाम घडवून आणेलच असा विश्वास बाळगावा?

श्रीमाताजी : एकच गोष्ट करण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग हे भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरतात. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला लागू पडेल, हे तुमच्यामध्ये विकसित झालेल्या चेतनेवर आणि कोणत्या स्वरूपाच्या शक्ती तुम्ही कार्यरत करू शकता यावर अवलंबून आहे.

तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात किंवा तुमच्यामध्ये अपेक्षित बदल घडून आला आहे अशा चेतनेमध्ये तुम्ही राहू शकता आणि तुमच्या आंतरिक रचनाशक्तीद्वारे बाह्य अवस्थेमध्ये देखील हळूहळू तो बदल घडवून आणू शकता. किंवा त्या गोष्टींवर परिणाम करू शकतील अशा शक्ती कोणत्या याची दृष्टी जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ते जाणून घेऊ शकलात आणि त्या हाताळण्याचे कौशल्य जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्यांना खाली बोलावू शकता आणि ज्या भागांमध्ये कार्य होणे आवश्यक आहे तेथे त्या शक्ती उपयोगात आणू शकता; असे केलेत तर त्या शक्तीद्वारे तो बदल घडवून आणला जाईल. किंवा तुम्ही तुमची समस्या ‘ईश्वरा’समोर मांडलीत आणि त्यावर उपाय करावा म्हणून ‘ईश्वरी शक्ती’वर पूर्णपणे भरवसा ठेवून विनवणी केलीत तर, तेव्हाही तो बदल घडवून आणला जाईल.

पण जरी तुम्ही यांपैकी काहीही केलेत, कोणतीही प्रक्रिया अवलंबलीत आणि त्याबाबतचे आत्यंतिक कौशल्य व शक्तीदेखील तुम्हाला प्राप्त झालेली असली तरीदेखील, त्याचे फळ मात्र तुम्ही त्या ‘ईश्वरा’च्या हाती सोपविले पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत परंतु तुमचे ते प्रयत्न सफल होणार का निष्फळ होणार हे ‘ईश्वरा’च्या हाती असते. तेथे तुमची वैयक्तिक शक्ती खुंटलेली असते; जर परिणाम दिसून आला तर तो परिणाम तुमच्यामुळे नसून, ‘ईश्वरी शक्ती’मुळे घडून आलेला असतो.

तुम्ही असे विचारले आहे की, ‘ईश्वरा’कडे अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करणे योग्य आहे का? नैतिक दोषांचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’ची विनवणी करण्याच्या तुलनेत, शारीरिक अपूर्णतेचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे अधिक बरे. अर्थात, तुम्ही कशाचीही मागणी करत असाल, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, अगदी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करत असतानादेखील, किंवा तुमचे ज्ञान उपयोगात आणतानादेखील किंवा शक्तीचा वापर करत असतानादेखील तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की, त्याचा परिणाम दिसून येणे ही गोष्ट ‘ईश्वरी कृपे’वर अवलंबून असते.

एकदा तुम्ही ‘योगमार्ग’ स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे पण त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 96-97]

विचारशलाका १६

ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे. विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

प्रगती हेच पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन आहे. तुम्ही जर प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो प्रत्येक क्षण तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

– श्रीमाताजी [CWM 15 : 75]

विचारशलाका १५

‘दिव्य अस्तित्व’ तुमच्या अंतरंगातच असते. ते तुमच्या आतच असते, आणि तुम्ही मात्र त्याचा बाहेर शोध घेत राहता; अंतरंगात डोकावून पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे त्या ‘अस्तित्वा’ची उपस्थिती असते. सामर्थ्य मिळण्यासाठी तुम्हाला इतरांकडून प्रशंसा हवी असते – त्यातून ते सामर्थ्य तुम्हाला कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या अंतरंगातच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वेाच्च उद्दिष्ट – सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम – आहे असे वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगू शकता. ते तुमच्या अंतरंगातच आहे – अन्यथा तुम्ही कधीच त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व सापडेल.

आणि हे करणे खूप अवघड आहे, असे समजू नका. ते अवघड आहे, असे वाटते कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही. पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे ते जाणण्यासाठी, त्याचा मार्ग जाणण्यासाठी, अंतरंगांमध्ये, सर्वोच्च ज्ञानाकडे – प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथेच अंतरंगातच आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल.

आणि जर कधी अडचण आली तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी – तुम्ही त्या अडचणीला सर्वोच्च प्रज्ञेकडे सुपुर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो आता तुमच्या काळजीचा विषय उरतच नाही : तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, ‘परमेश्वर’ स्वत:च तो हाती घेतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे इतर कोणापेक्षाही तोच अधिक चांगल्या रीतीने जाणतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 399-400]

विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]