ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आध्यात्मिक जीवनाची मानसिक कल्पना

आध्यात्मिकता ३०

(भाग ०२)

व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक जीवनाकडे आणि सत्यतेकडे वळते, त्याच क्षणी ती ‘अनंता’ला, त्या ‘शाश्वता’ला स्पर्श करते आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडे कमीअधिक क्षमता आहेत किंवा शक्यता आहेत असा प्रश्नच शिल्लक राहत नाही. आध्यात्मिक जीवन जगण्याची एखाद्याकडे जास्त क्षमता आहे किंवा दुसऱ्या एखाद्याकडे कमी क्षमता आहे असे म्हणणे ही आध्यात्मिक जीवनासंबंधीची मानसिक संकल्पना आहे, मात्र हे विधान अजिबात उचित नाही. एखादी व्यक्ती निर्णायक आणि (चेतनेच्या) संपूर्ण प्रतिक्रमणासाठी (reversal of consciousness) कमी-अधिक सज्ज आहे, असे फार फार तर म्हणता येईल. वस्तुत: सामान्य गतीविधींपासून मागे वळून, आध्यात्मिक जीवनाच्या शोधात निघायचे ही जी मानसिक क्षमता असते, तिचे मोजमाप करता येऊ शकते.

परंतु जोपर्यंत व्यक्ती मानसिक क्षेत्रामध्ये वावरत असते, त्या अवस्थेत असते, चेतनेच्या त्या स्तरावर असते तेथून व्यक्ती इतरांसाठी फारसे काही करू शकत नाही, म्हणजे सर्वसाधारण जीवनाबाबत किंवा काही विशिष्ट व्यक्तींबाबत फारसे काही करू शकत नाही, कारण व्यक्तीला स्वतःविषयीच खात्री नसते, तिला स्वतःला निर्णायक असा अनुभव आलेला नसतो, तिची चेतना ही आध्यात्मिक विश्वामध्ये सुस्थापित झालेली नसते. आणि म्हणून त्या सर्व गोष्टींबाबत असे म्हणता येते की, त्या सर्व मानसिक कृती असतात आणि त्यांना बऱ्यावाईट बाजू असतात, परंतु त्यांच्यामध्ये फारशी शक्ती नसते, आध्यात्मिक संक्रमणाची शक्ती, जी वास्तविक एकमेव खरी परिणामकारक शक्ती असते, ती त्यांच्यामध्ये अजिबात नसते.

व्यक्ती स्वतः ज्या चेतनेमध्ये जीवन जगत असते ती चेतनेची अवस्था इतरांमध्ये संक्रमित करण्याची शक्यता ही एकमेव खरी परिणामकारक गोष्ट असते. पण अशी शक्ती कल्पनेने तयार करता येत नाही. व्यक्ती तिचे अनुकरण करू शकत नाही, स्वतःकडे ती शक्ती असल्याचे व्यक्ती दाखवू शकत नाही; व्यक्ती जेव्हा स्वतः त्या अवस्थेमध्ये सुस्थिर होते तेव्हाच ती क्षमता सहजस्वाभाविकपणे उदयाला येते, जेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ती क्षमता तिच्या अंगी नसते, मात्र व्यक्ती जेव्हा अंतरंगामध्ये जीवन जगत असते, जेव्हा ती तेथे असते तेव्हा ही क्षमता त्या व्यक्तीच्या अंगी येते. आणि म्हणूनच जे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन जगत असतात त्यांची फसवणूक केली जाऊ शकत नाही.

जे अजूनही मानसिक स्तरावरच जीवन जगत आहेत ते, आध्यात्मिक जीवनाची नक्कल पाहून, भुलू शकतात, फसू शकतात, परंतु ज्यांना स्वतःलाच चेतनेच्या प्रतिक्रमणाचा अनुभव आलेला आहे, ज्यांचे बाह्य अस्तित्वाशी असलेले नाते हे पूर्णपणे वेगळे आहे, ते अशा रितीने फशी पडत नाहीत किंवा ते (बेगडी, बाह्य रूपाला भुलण्याची) चूक करू शकत नाहीत.

अशा लोकांना, म्हणजे मानसिक स्तरावरील जीवन जगणाऱ्या लोकांना हे कळू शकणार नाही.

(क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 09 : 414-415]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

7 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago