कृतज्ञता – ०४

करुणा आणि कृतज्ञता हे मूलत: चैत्य गुण आहेत. चैत्य पुरुष जेव्हा सक्रिय जीवनामध्ये भाग घेऊ लागतो तेव्हाच चेतनेमध्ये हे गुण प्रकट होऊ लागतात. वास्तविक हे गुण सामर्थ्यशक्तीवर आधारित असतात परंतु, मन व प्राणाला हे गुण म्हणजे दुबळेपणा आहे असे वाटते. कारण ते मनाच्या आणि प्राणाच्या आवेगांना स्वैरपणे प्रकट होण्यापासून रोखतात.

पुरेसे शिक्षित नसलेले मन, हे बहुधा नेहमीच प्राणाचे साथीदार असते आणि शारीर प्रकृतीचे गुलाम असते आणि अशा मनाचे कायदे प्राणाच्या व शरीराच्या अर्धजागृत यंत्रणेमध्ये इतके काही बळकट असतात की, त्यांना करुणा आणि कृतज्ञता या गुणांचा अर्थच नेमकेपणाने समजत नाही. जेव्हा मन प्रथमत: चैत्य हालचालींविषयी जागृत होऊ लागते तेव्हा स्वत:च्या अज्ञानामुळे त्या हालचालींचा ते पार विपर्यास करून टाकते आणि करुणेचे रूपांतर दया किंवा कणव यांमध्ये करून टाकते किंवा फार फार तर त्याचे रूपांतर भूतदयेमध्ये करते. कृतज्ञतेचे रूपांतर परतफेडीच्या इच्छेमध्ये करते…

जेव्हा व्यक्तीमध्ये चैत्य जाणीव ही पूर्णपणे प्रभावी झालेली असते तेव्हाच फक्त ज्या ज्या कोणाला मदतीची गरज भासते, त्या व्यक्तींविषयी तिला करुणा वाटते; मग ती मदत कोणत्याही क्षेत्रातली का असेना. तसेच ज्या कोणत्या गोष्टीमधून ईश्वरी अस्तित्वाची आणि कृपेची अभिव्यक्ती होते अशा सर्व गोष्टींविषयी, मग त्या गोष्टी कोणत्याही रूपामध्ये असू देत, त्या जर त्यांच्या अगदी मूळरूपात आणि तेजोमय शुद्धतेने अभिव्यक्त होत असतील तर, कोणत्याही मेहेरबानीचा लवलेशही नसलेली अमिश्रित अशी करुणा किंवा न्यूनगंडाची कोणतीही भावना नसलेली अशी कृतज्ञता, (चैत्य जाणीव प्रभावी झालेल्या व्यक्तीमध्ये) आढळून येते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 277)

कृतज्ञता – ०३

(‘ईश्वरी साक्षात्कारा’साठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय) या निश्चयाशी निष्ठा राखायची असेल तर व्यक्तीने प्रामाणिक, एकनिष्ठ, विनम्र आणि आत्मनिवेदनाप्रत (consecration) कृतज्ञ असले पाहिजे, कारण हे गुण सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत आणि एक स्थिर आणि वेगवान प्रगती ही प्रकृतीच्या उत्क्रांतिमय प्रगतीच्या वेगाचे अनुसरण करण्यासाठी अनिवार्य असते. हे गुण नसतील तर कधीकधी व्यक्तीमध्ये प्रगतीचा आभास निर्माण होऊ शकेल पण तो केवळ बाह्य दिखावाच असेल, ते एक ढोंग असेल आणि पहिल्या वेळीच तो डोलारा कोलमडून पडेल.

‘प्रामाणिक’ असण्यासाठी, अस्तित्वाचे सारे भाग हे ईश्वराविषयीच्या अभीप्सेमध्ये (Aspiration) संघटित झाले पाहिजेत – एक भाग आस बाळगत आहे आणि इतर भाग नकार देत आहेत किंवा अभीप्सेशी प्रामाणिक राहण्याबाबत बंडखोरी करत आहेत, असे असता कामा नये – ईश्वर हा प्रसिद्धीसाठी किंवा नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा सत्तेसाठी, शक्तीसाठी किंवा बढाईच्या समाधानासाठी नव्हे तर, ईश्वर हा ‘ईश्वरा’साठीच हवा असला पाहिजे, आत्मनिवेदनाबाबत अस्तित्वाच्या साऱ्या घटकांनी एकनिष्ठ आणि स्थिर असले पाहिजे म्हणजे एक दिवस श्रद्धा बाळगली आणि दुसऱ्या दिवशी, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे श्रद्धा गमावली आणि सर्व प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनात घर केले, असे होता कामा नये. शंका म्हणजे व्यक्तीने ज्यामध्ये रममाण व्हावे असा एखादा खेळ नाही; तर ते एक असे विष आहे की, जे आत्म्याला कणाकणाने क्षीण करत नेते.

आपण कोण आहोत याचे व्यक्तीला अचूक भान असणे आणि आपल्याला कितीही गोष्टी साध्य झालेल्या असल्या तरीही ‘आपण काय असले पाहिजे’ अशी ईश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे, तिच्या परिपूर्तीच्या तुलनेत, आपल्याला साध्य झालेल्या गोष्टी व्यवहारतः अगदी नगण्य आहेत, हे कधीही न विसरणे तसेच, ईश्वराचे व त्याच्या मार्गांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण अक्षम असतो, याची पुरेपूर खात्री असणे म्हणजे ‘विनम्र’ असणे होय.

एखादी व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे तिचे अज्ञान, तिचे समज-गैरसमज, तिचा अहंकार, त्या व्यक्तीचा विरोध, त्या व्यक्तीची बंडखोरी अशा गोष्टी असूनदेखील, परमेश्वराची अद्भुत कृपा त्या व्यक्तीला तिच्या ईश्वरी उद्दिष्टाप्रत अगदी जवळच्या मार्गाने घेऊन जात असते. या अद्भुत कृपेचे कधीही विस्मरण होऊ न देणे म्हणजे ‘कृतज्ञ’ असणे होय.

– श्रीमाताजी
(The Aims And Ideals of The Sri Aurobindo Ashram : 16-17)

कृतज्ञता – ०२

कोणे एके काळी एक भव्य राजवाडा होता, त्याच्या गाभ्यामध्ये एक गुप्त असे देवालय होते. त्याचा उंबरठा आजवर कोणीच ओलांडलेला नव्हता. एवढेच नव्हे तर, त्या देवालयाचा अगदी बाह्य भागसुद्धा मर्त्य जिवांसाठी जवळजवळ अप्राप्य असाच होता, कारण तो राजवाडा एका अतिशय उंच ढगावर उभारलेला होता आणि कोणत्याही युगातील अगदी मोजकीच मंडळी त्याच्याप्रत पोहोचण्याचा मार्ग शोधू शकत असत.

हा ‘सत्या’चा राजवाडा होता.

एके दिवशी तेथे एक उत्सव आयोजित करण्यात आला होता, तो माणसांसाठी नव्हता, तर तो अत्यंत वेगळ्या जीवयोनींसाठी होता. ज्या देवदेवतांना पृथ्वीवर त्यांच्या ‘गुणवैशिष्ट्यां’नुसार पूजले जाते, अशा लहानमोठ्या देवदेवतांसाठी तो उत्सव होता.

त्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक भलेमोठे सभागृह होते. त्याच्या भिंती, त्याची जमीन, त्याचे छत, सारे काही प्रकाशमान होते. ते असंख्य लखलखणाऱ्या अग्नींनी उजळून निघालेले होते. ते ‘बुद्धिमत्ते’चे सभागृह होते. जमिनीजवळ अतिशय सौम्य प्रकाश होता आणि त्याला एक सुंदरशी नीलवर्णी छटा होती, पण छताकडे मात्र ती क्रमाक्रमाने अधिकाधिक सुस्पष्ट होत गेली होती, तेथे हिऱ्यांचे झुबके छताला झुंबरासारखे लटकलेले होते आणि त्यातून असंख्य किरण झगमगत होते.

तेथे प्रत्येक ‘सद्गुणा’ने स्वतंत्रपणे प्रवेश केला होता, पण लवकरच त्यांचे समविचारी असे छोटेछोटे समूह तयार झाले. एकदा का होईना, पण सारे एकत्र जमल्यामुळे ते आनंदात होते, कारण अन्यवेळी ते सारे या विश्वामध्ये आणि अन्य लोकांमध्येही दूरदूर पसरलेले असतात, भिन्न भिन्न जिवांमध्ये विखुरलेले असतात.

त्या उत्सवावर ‘प्रामाणिकते’ची (Sincerity) सत्ता होती. तिने नितळ पाण्यासारखा, पारदर्शक असा एक पोषाख परिधान केलेला होता, तिच्या हातामध्ये एक अतिशय शुद्ध असे घनाकार स्फटिक होते आणि त्यामधून साऱ्या गोष्टी एरवी जशा दिसतात त्यापेक्षा भिन्न अशा म्हणजे वास्तविक त्या जशा आहेत तशा दिसत होत्या, कारण तेथे त्यांची प्रतिमा कोणत्याही विकृतीविना प्रतिबिंबित होत होती.

तिच्या जवळच, जणू तिच्या विश्वासू रक्षकांप्रमाणे वाटावेत असे ‘विनम्रता’ आणि ‘धैर्य’ हे दोन गुण उभे होते. विनम्रता ही आदरणीय होती आणि त्याच वेळी ती स्वाभिमानी होती. तर धैर्य हा उन्नत-माथा असलेला, स्वच्छ डोळ्यांचा होता, त्याचे ओठ दृढ आणि हसणारे होते, त्याच्या अवतीभोवतीचे वातावरण शांत आणि निर्णायक होते.

‘धैर्या’च्या जवळच, त्याच्या हातात हात घालून एक स्त्री उभी होती, तिने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतलेले होते, तिने परिधान केलेल्या त्या अंगरख्यामधून तिच्या शोधक नजरेव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते; अंगरख्याआडून फक्त तिचे डोळे चमकताना दिसत होते, ती ‘विवेकबुद्धी’ होती.

त्या सगळ्यांमध्ये वावरणारी, इकडून तिकडे ये-जा करणारी आणि तरीही सतत प्रत्येकाजवळच आहे असे वाटावी अशी एक व्यक्ती होती, तिचे नाव ‘उदारता’ असे होते. ती एकाच वेळी सतर्क आणि शांत होती, ती सक्रिय होती आणि तरीदेखील सर्वांपासून स्वतंत्र होती.

ती त्या समूहामधून बाहेर पडताना, तिच्या मागे एक सौम्य पांढऱ्या रंगाची प्रकाशरेषा सोडून जात होती. ‘उदारता’ जो प्रकाश प्रस्फुरित करत असते, जो ती सौम्यपणे पसरवित जात असते, त्या प्रकाशाची प्रभा इतकी सूक्ष्म असते की, बहुसंख्य डोळ्यांना ती अदृश्यच असते. ती प्रभा उदारतेला तिच्या अगदी घनिष्ठ मैत्रिणीपासून, कधीही विलग होऊ न शकणाऱ्या अशा सहचारिणीपासून, तिच्या जुळ्या बहिणीपासून म्हणजे ‘न्यायबुद्धी’कडून प्राप्त होत असते.

‘उदारते’च्या आजूबाजूला ‘दयाळूपणा’, ‘सहनशीलता’, ‘मृदुता’, ‘उत्कंठा’ आणि तत्सम इतरांनी दिमाखदार घोळका केला होता. सारे जण तेथे उपस्थित होते. पण एकाएकी, त्या सुवर्णमय उंबरठ्यावर एका नवागत स्त्रीचे आगमन झाले.

दरवाज्यापाशी राखण करणाऱ्या द्वारपालांनी मोठ्या नाखुषीने तिला आत प्रवेश करण्यास संमती दिली. त्यांनी तिला यापूर्वी कधी पाहिले नव्हते किंवा त्यांच्यावर प्रभाव पडावा असे तिचे रंगरूपही नव्हते. ती खरोखरच अगदी लहानशा चणीची आणि सडपातळ होती आणि तिने जो पोशाख परिधान केलेला होता तोही अगदी साधासा, गरिबासारखा होता. ती काहीशी संकोचून, अवघडल्यासारखी काही पावले टाकत पुढे आली. त्या एवढ्या मोठ्या ऐश्वर्यसंपन्न आणि तेजःपुंज लोकांमध्ये, नक्की कोणाकडे जावे हे न कळल्याने, गोंधळून गेलेली ती तिथेच थबकली.

सख्यासोबत्यांबरोबर झालेल्या काही जुजबी संभाषणानंतर, त्यांच्याच विनंतीवरून ‘विवेकबुद्धी’ पुढे झाली आणि त्या नवख्या व्यक्तीच्या दिशेने गेली. त्या नवख्या स्त्रीला विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विवेकबुद्धीने दोन क्षण जाऊ दिले आणि मग त्या स्त्रीकडे बघून ती म्हणाली, ”आत्ता इथे जमलेल्यांपैकी आम्ही सर्व जण नावानिशी आणि प्रत्येकाच्या गुणांनुसार एकमेकांना ओळखतो. आम्ही सारे तुझ्या येण्याने आश्चर्यचकित झालो आहोत कारण तू आमच्यासाठी नवखी आहेस, किंवा किमान आम्ही तुला याआधी कधी पाहिले असल्याचे स्मरत नाही. तू कोण आहेस, ते कृपा करून आम्हाला सांगशील का?”

एक निःश्वास टाकत ती नवखी व्यक्ती उद्गारली, ”या राजवाड्यामध्ये सर्वांना मी अनोळखी असल्याचे वाटत आहे, यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटत नाहीये, कारण मला क्वचितच कोठे आमंत्रित केले जाते. माझे नाव ‘कृतज्ञता’!”

(तात्पर्य : कृतज्ञता हा एक अत्यंत दुर्मिळ गुण आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 02 : 05-07)

कृतज्ञता – ०१

योगमार्गामध्ये कृतज्ञतेद्वारे चेतनेची एक विशिष्ट अवस्था अभिव्यक्त होते, त्यामध्ये समर्पण व विश्वास या भावनेतून ईश्वराभिमुख होणे असते; ईश्वराकडून ज्या कोणत्या आंतरिक व बाह्य भेटवस्तू मिळतात त्यांचा आनंदाने स्वीकार असतो. किंबहुना, कृतज्ञतेच्या या अवस्थेमध्ये व्यक्ती जीवनातील प्रत्येक घटनाच ईश्वरी कृपेची देणगी आहे, आशीर्वाद आहे, या भूमिकेतून स्वीकारते.

कृतज्ञता म्हणजे काय, ती व्यक्तींबाबत बाळगायची की ईश्वराबाबत, त्याचे साधकाच्या जीवनातील स्थान काय, या आणि या सारख्या अनेक गोष्टींबाबत जाणून घेऊयात उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘कृतज्ञता’ या मालिकेद्वारे! वाचक त्याला नेहमीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

संपादक,
अभीप्सा मराठी मासिक

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘प्रकृती’ ही उत्क्रांतीच्या माध्यमातून एक प्रकारे योगच करत आहे. या योगप्रवासामध्ये जडसृष्टी, प्राण, मन यांच्या विकसनानंतर, आता एका नवीन उत्क्रांती-टप्प्याकडे तिच्या विकसनाची वाटचाल चालू आहे. अधिमानस, अतिमानव, आणि अतिमानसिक जीव या मार्गाने ती वाटचाल करत आहे, असे श्रीअरविंद यांनी स्पष्ट केले आहे.

आजवरच्या वाटचालीमध्ये प्रकृती एकाकी रीतीने हे कार्य करत होती. परंतु मानव – हा तिचा अधिक विकसित जीव आता या कार्यामध्ये तिचा सहभागीदार होऊ शकतो, ही शक्यता प्रथमतः श्रीअरविंद यांच्या दृष्टिक्षेपात आली. आणि प्रकृतीच्या या कार्यामध्ये, तिला त्वरेने पुढच्या टप्प्याकडे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये साहाय्य करण्याच्या दृष्टीने श्रीअरविंद यांच्या समवेत श्रीमाताजीदेखील सहभागी झाल्या.

अधिमानसाचे अवतरण (Descent of Over-mind) दि. २४ नोव्हेंबर १९२६ रोजी घडून आल्याचे आपण विचारात घेतले. त्यानंतर अतिमानसाकडे (Supramental) वाटचाल सुरू झाली. आणि याच अधिक उच्चतर कार्यासाठी, अधिक गहनतर कार्यासाठी, अधिक एकाग्रतेने, एकदिश होत कार्य करण्याची आवश्यकता होती. ती आवश्यकता लक्षात घेऊन, दैनंदिन जीवनामधून स्वतःला बाजूला करून, श्रीअरविंदांनी एकांतवास स्वीकारला. पुढे चोवीस वर्षे ते आश्रमातील त्यांच्या खोलीमधून एकदाही बाहेर आले नाहीत. श्रीअरविंदआश्रम आणि साधकांच्या साधनेची सर्व जबाबदारी त्यांनी श्रीमाताजींवर सोपवली होती.

‘अतिमानसिक जीव’ (Supramental Being) ही नवीनच श्रेणी प्रकृतीच्या विकासक्रमामध्ये उदयाला यायची असेल तर, पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसाची प्रस्थापना करणे आवश्यक आहे, हे मानवी बुद्धीच्या आकलनापलीकडचे असे कार्य श्रीअरविंद आणि श्रीमाताजी करू पाहत होते. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या ‘अवतारद्वया’ची सारी योगसाधना त्या दिशेने उत्क्रांत होत होती. त्या साधनेच्या दरम्यान एका विवक्षित क्षणी श्रीअरविंद यांच्या लक्षात आले की, दोघांपैकी कोणा एकाच्या देहामध्ये अतिमानसिक चेतनेची रूजवण करून, तो देह पृथ्वी-चेतनेमध्ये समरस करणे आवश्यक आहे, म्हणजे मग अतिमानसाची प्रस्थापना पृथ्वी-चेतनेमध्ये होईल. श्रीअरविंदांनी हे जेव्हा श्रीमाताजींना सांगितले तेव्हा, श्रीमाताजींनी आपला देह या कार्यासाठी देण्याची तयारी दाखविली. मात्र श्रीअरविंदांनी त्यांना सांगितले की, “त्यासाठी तुम्ही देहत्याग करता कामा नये, कारण माझ्या देहापेक्षा तुमचा देह ‘रूपांतरणा’च्या कार्यासाठी अधिक सुयोग्य आहे. तेव्हा तुम्हाला देहामध्ये राहूनच कार्य पुढे न्यावे लागेल.” याचा अर्थ असा की, देहत्यागाची जेव्हा आवश्यकता निर्माण होईल तेव्हा ‘मी देहत्याग करीन’, असे श्रीअरविंदांनी सूचित केले होते. हा संवाद होता सन १९३८ मधील!

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी हा जो उत्क्रांतियोग करत होते, त्यामध्ये आता तो क्षण जवळ येत चालला होता. जणू अनंत काळ आपल्या हाती आहे, अशी कार्यपद्धती असणारे श्रीअरविंद नोव्हेंबर १९५० च्या सुमारास ‘सावित्री’चे लेखनकार्य त्वरेने पूर्ण करण्यामागे लागले होते, अशी माहिती सावित्रीचे लेखकु झालेले निरोदबरन देतात. Book of Death and the Epilogue हे सावित्रीमधील शेवटचे दोन अध्याय वगळता, श्रीअरविंद यांनी सावित्रीच्या पुनर्लेखनाचे सर्व कार्य पूर्ण केले होते. हे दोन अध्याय बाकी आहेत, असे निरोदबरन यांनी सांगताच “ते नंतर पाहू,” असे म्हणत श्रीअरविंदांनी आपल्या निर्गमनाचा सूचक संकेत दिला होता.

एरवी साधकांच्या तब्येतीवर आपल्या योगसामर्थ्याने उपचार करणारे श्रीअरविंद, स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र त्या योगशक्तीचा वापर करत नव्हते. ते पाहून, ‘आपण आपली योगशक्ती का वापरत नाही’, असे निकटवर्तीयांनी विचारले तेव्हा, “त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही, तुम्हाला ते कळणार नाही,” असे श्रीअरविंद यांनी सांगितले होते. या साऱ्याच गोष्टी त्यांच्या हेतुपूर्वक चाललेल्या निर्गमनाकडे निर्देश करणाऱ्या होत्या. श्रीमाताजींना याची जाणीव होत होती, त्यांनीही डॉ. संन्याल (अखेरच्या काळात श्रीअरविंदांवर उपचार करणारे डॉक्टर) यांना सांगितले होते, “…he is withdrawing.”

आणि अखेर तो दिवस उजाडला, दि. ०५ डिसेंबर १९५०, पहाटे ०१ वाजून २० मिनिटांनी अगदी शांतपणे श्रीअरविंदांनी निर्गमन केले. रूढ अर्थाने ज्याला ‘मृत्यू’ म्हणता येईल असा हा मृत्यू नव्हता. याची ग्वाही, निर्गमनानंतरही पाच दिवसपर्यंत त्यांचा पार्थिव देह तसाच टिकून राहिला होता, यामधून मिळते. या अद्भुत घटनेची वार्ता कळल्यानंतर, यामध्ये काही रासायनिक पदार्थांचा वापर करून देह टिकवून ठेवला असावा, अशी शंका घेऊन फ्रेंच डॉक्टर येऊन तपासणी करून गेले होते. उष्णकटिबंधीय प्रांतामध्ये देहावर अंतिम संस्कार न करता, तो देह जास्तीत जास्त ४८ तास ठेवता येतो, असे कायदा सांगत होता. आणि इथे १०० तास, कोणत्याही रसायनांचा वापर न करता, श्रीअरविंदांचा देह विघटन न होता, तसाच शाबूत होता, याची निःसंशय ग्वाही त्या फ्रेंच डॉक्टरांनी दिली. हा एक ‘चमत्कार’ असल्याचा स्पष्ट निर्वाळा त्यांनी दिला.

श्रीअरविंदांचे निर्गमन होऊनही देह तसाच कायम आहे, हे लक्षात आल्यावर श्रीमाताजींनी अध्यात्ममार्गाने, उच्च पातळीवरून त्यांची भेट घेतली आणि ‘आपण पुन्हा या देहात परतणार आहात काय?’ असे विचारले. तेव्हा श्रीअरविंदांनी उत्तर दिले, “I have left this body purposely. I will not take it back. I shall manifest again in the first Supramental body built in the Supramental way.” मी या देहाचा हेतुपूर्वक त्याग केला आहे, तेव्हा मी या देहामध्ये आता परतणार नाही. अतिमानसिक पद्धतीने घडण होऊन जेव्हा पहिला अतिमानसिक देह तयार होईल तेव्हा मी त्या माध्यमातून आविष्कृत होईन, असे श्रीअरविंदांनी उत्तर दिले होते.

श्रीमाताजींनी डिसेंबर १९५० मध्ये सांगितले, “He was not compelled to leave his body, he choose to do so for reasons so sublime that they are beyond the reach of human mentality.” (“त्यांना देहत्याग करणे भाग पडले नव्हते, तर त्यांनी तो स्वतःहून घेतलेला निर्णय होता. त्याची कारणे इतकी उदात्त आहेत की, कोणत्याही मानवी मानसिकतेच्या आकलनशक्तीच्या ती पलीकडची आहेत,’ असे श्रीमाताजींनी सांगितले होते.)

‘सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा’ या भूमिकेतून श्रीअरविंदांनी हे बलिदान केले होते. पृथ्वी-चेतनेमध्ये अतिमानसिक चेतना स्थापित करण्यासाठी केलेली ही सर्वोच्च कृती होती. श्रीअरविंद पृथ्वीच्या गर्भात शिरून पुढील कार्य अदृश्यरूपाने करू पाहात होते. आणि त्यांच्यानंतर, तेच कार्य या पृथ्वीतलावर करण्यासाठी परमेश्वराने श्रीमाताजींची योजना केली होती. श्रीअरविंदांच्या निर्गमनानंतर, श्रीअरविंदांच्या देहामध्ये साठविलेली योगशक्ती त्यांनी श्रीमाताजींमध्ये संक्रमित केली. श्रीअरविंदांच्या देहावर विघटनाचे पहिले लक्षण दिसून येताच डॉ. संन्याल यांनी श्रीअरविंदांचे ‘निधन’ झाल्याचे घोषित केले. त्यानंतर लगेचच या शक्ती-संक्रमणाचा सघन अनुभव श्रीमाताजींना आला. “हा अनुभव इतका सघन होता, की आपल्या देहाच्या रंध्रांमधून ती शक्ती संक्रमित होत असताना, जणू काही घर्षण होत आहे,’ अशी जाणीव श्रीमाताजींना होत होती.

अतिमानसिक चेतनेसंदर्भातील, पृथ्वी-चेतनेच्या रूपांतरणाच्या संदर्भातील हे कार्य श्रीअरविंदांच्या निर्गमनानंतर, सन १९७३ पर्यंत श्रीमाताजींनी पुढे चालू ठेवले. महायोगी श्रीअरविंद यांच्या जीवनातील साऱ्याच घटना इतक्या अगम्य आहेत, मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडील आहेत की, त्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने वेध घेणे अवघड आहे, एक प्रकारे अशक्यप्राय आहे. त्यांचे चरित्रलेखन करू पाहणाऱ्या लेखकांना श्रीअरविंदांचे सांगणे होते की, “माझे चरित्र लिहिण्याच्या फंदात पडू नका. तुमचा तो प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही. कारण तुम्हाला काय किंवा अन्य कोणालाही काय माझ्या जीवनाबाबतीत तीळमात्र माहिती नाही, कारण माझे जीवन, माणसाच्या दृष्टीला दिसू शकेल अशा पद्धतीने पृष्ठभागावर जगण्यात आलेले नाही.”

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ही मालिका म्हणजे, श्रीअरविंदांचे पृष्ठस्तरीय जीवन समजावून घेण्याचा एक तोकडा प्रयत्न होता, याची जाणीव मनात बाळगत, येथे या चरित्रपर मालिकेची परिसमाप्ती करत आहोत. या प्रवासामध्ये सारे वाचक आमच्या सोबत होते, याबद्दलची कृतज्ञता येथे व्यक्त करावीशी वाटते. मनापासून धन्यवाद!!

– संपादक, अभीप्सा मराठी मासिक

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचे प्रतीक : अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा ही ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोणांच्या संधीस्थानी असलेला मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.

*

ऊर्ध्वगामी त्रिकोणाद्वारे सृष्टीची अभीप्सा दर्शविली जाते; आणि अधोगामी त्रिकोणाद्वारे ईश्वरी प्रतिसाद दर्शविला जातो आणि या दोन्हींच्या संधीस्थानी आविष्करणाचा चौरस तयार होतो.

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचा देह समाधिस्थ करण्यात आल्यानंतर, दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी श्रीमाताजींनी पुढील संदेश दिला. हा संदेश श्रीअरविंदांच्या समाधीवर संगमवरामध्ये कोरण्यात आला आहे.

“आमच्या प्रभूचे भौतिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुझ्याप्रत आमची अनंत कृतज्ञता!! ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली; ज्याने सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्याच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आम्ही हे विसरू नये की, आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

दि. ०७ डिसेंबरला श्रीमाताजींनी लिहिले आहे – “हे प्रभू, तुमचे कार्य जोवर साध्य होत नाही तोवर तुम्ही आमच्या सोबत असाल, मार्गदर्शन आणि प्रबोधन करणारी केवळ चेतना म्हणूनच नव्हे तर, कृतीमधील गतिशील ‘उपस्थिती’ म्हणूनदेखील तुम्ही आमच्या सोबत असाल, असा विश्वास तुम्ही मला आज सकाळी दिला आहे. जोवर पृथ्वीचे रूपांतरण होत नाही तोवर तुमच्यामधील सारे सारेकाही येथेच राहील; तोवर तुम्ही पृथ्वीचे वातावरण सोडून जाणार नाही, असे अगदी निःसंशय पद्धतीने तुम्ही वचन दिले आहे. या अद्भुत ‘उपस्थिती’ ला आम्ही सुपात्र ठरू आणि आमच्यामधील प्रत्येक गोष्ट यापुढे, तुमच्या उदात्त कार्याच्या परिपूर्तीसाठी अधिकाधिक परिपूर्णपणे समर्पित व्हावी या एकाच इच्छेवर केंद्रित होवो, असे आम्हास वरदान द्या.”

“श्रीअरविंदांनी देह ठेवण्याचा जो निर्णय घेतला त्याला पृथ्वीच्या आणि माणसांच्या ग्रहणशीलतेचा अभाव कारणीभूत ठरला. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, शारीरिक स्तरावर हे जे काही घडले त्याचा त्यांच्या शिकवणुकीच्या सत्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांनी जे सांगितले आहे ते पूर्णतया सत्य आहे आणि ते तसेच राहणार आहे. येणारा काळ आणि घटनाक्रम ते सत्य असल्याचे सिद्ध करतील.

देह ठेवल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे दि. ०९ डिसेंबर १९५० श्रीअरविंदांचा देह आश्रमातील प्रांगणामध्ये समाधिस्थ करण्यात आला. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांमध्ये १९४८ ते १९४९ च्या दरम्यान आजारपणाची काही लक्षणं दिसून आली. मध्यंतरीच्या काळात ती दिसेनाशी झाली होती पण कालांतराने म्हणजे १९५० च्या मध्यावर ती पुन्हा एकदा दिसू लागली. आणि दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी पहाटे ०१ वाजून २६ मिनिटांनी श्रीअरविंदांनी देह ठेवला.

श्रीअरविंद यांचा देह समाधि-स्थानी ठेवण्याची सारी व्यवस्था करण्यात आली होती पण सहा डिसेंबरला संध्याकाळी श्रीमाताजींनी पुढील संदेश प्रसृत केला की, “श्रीअरविंदांचा अंतिमसंस्कार आज करण्यात आलेला नाही. त्यांच्या देहामध्ये ‘अतिमानसिक प्रकाशा’चे (Supramental Light) संघनीकरण झालेले असल्यामुळे, त्या देहावर विघटनाची कोणतेही चिन्ह दिसत नाही आणि जोवर तो देह जसाच्या तसा आहे तोवर त्यांचा देह तसाच ठेवण्यात येईल.’’

श्रीअरविंदांच्या देहाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

श्रीअरविंद यांच्या महासमाधीनंतर ५ दिवसपर्यंत देह विघटन न होता तसाच कायम राहणे, या अद्भुत घटनेची नोंद The Hindu यासारख्या तत्कालीन प्रसिद्ध वृत्तपत्रांनी देखील घेतली होती. पुढे त्या घटनेचे स्पष्टीकरण करताना ज्येष्ठ साधक श्री. अमल किरण (श्री. के. डी. सेठना) यांनी असे म्हटले होते की, “श्रीअरविंद यांच्या देहाभोवती अनेकांनी पाहिलेला अद्भुत सोनेरी प्रकाश पाच दिवस, त्यावरील तजेला निघून न जाता किंवा त्याला विघटनाचा किंचितसाही स्पर्श न होता, तसाच टिकून राहणे, ही गोष्ट म्हणजे, त्यांनी स्वत:च्या भौतिक देहरूपी-रचनेचा त्याग करून, पृथ्वीसाठी जो विजय संपादन केला होता, त्या विजयाचे द्योतक आहे.”(क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंद एकांतवासात गेले तेव्हापासून, म्हणजे सन १९२६ पासून ते १९५० पर्यंतच्या कालावधीतील त्यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. कारण जेव्हा त्यांचे छायाचित्र काढण्याची परवानगी मागण्यात आली होती तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला होता आणि टिप्पणी केली होती : “बऱ्याच लोकांनी यापूर्वी देखील असा प्रस्ताव मांडला होता.”

छायाचित्रांची ही प्रतीक्षा एप्रिल १९५० मध्ये संपली, जेव्हा हेन्री कार्टियर-ब्रेसाँ (फ्रेंच छायाचित्रकार) यांना श्रीअरविंद यांच्या खोलीत त्यांच्या छायाचित्रांची मालिका घेण्याची परवानगी मिळाली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र दि. २४ एप्रिल १९५० या दर्शनदिनी काढण्यात आलेले आहे. (हे छायाचित्र आजच्या post सोबत जोडत आहोत.) पुढे सात महिन्यांनंतर, ५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद यांनी देह ठेवला. अशाप्रकारे कार्टियर-ब्रेसाँ यांनी काढलेली छायाचित्रे ही श्रीअरविंद यांच्या हयातीत काढली गेलेली शेवटची छायाचित्रे ठरली.

हेन्री कार्टियर-ब्रेसाँ १९५० मध्ये पाँडिचेरीला आले तेव्हा ते जगातील आघाडीच्या छायाचित्रकारांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. रमण महर्षी, महात्मा गांधी यांची त्यांनी काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध होती.

श्रीअरविंद यांच्या दहा मिनिटांच्या दर्शनाने कार्टियर-ब्रेसाँ प्रभावित झाले. बाहेर ब्रेसाँ यांची वाट पाहत असलेल्या मंडळींनी उत्सुकतेने विचारले, “छायाचित्रण कसे झाले?” कार्टियर-ब्रेसाँ यांनी उत्तर दिले, “त्यांच्यासारखी व्यक्ती मी आजवर पाहिलेली नाही. ते तिथे अगदी अविचल बसले होते.” (क्रमश:)