कृतज्ञतेचा विसर
कृतज्ञता – ०७
प्रश्न : माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की, माताजी मी तुमच्यापाशी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू?
श्रीमाताजी : माझ्याप्रति तशी (कृतज्ञता व्यक्त करण्याची) तसदी कोणीच घेत नाही. जेव्हा कधी एखादी अडचण येते, एखादा अडथळा येतो, किंवा एखादा आघात होतो तेव्हा लगेच माझ्यापाशी प्रार्थना केली जाते, मदतीची अशी याचना केली जाते की, “कृपा करून मला वाचवा. कृपा करून मला संरक्षण द्या.” किंवा अडचणींवर मात करण्याच्या हेतुनेसुद्धा अशी विनवणी केली जाते की, “माताजी, आम्हाला साहाय्य करा, आमचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातांचा आधार द्या. तुमचा करुणावर्षाव आमच्यावर होऊ द्या. आमच्यावर दया करा.”
आणि मग जेव्हा ईश्वरी ‘कृपे’ने तिचे कार्य पूर्ण केलेले असते… मी त्यांच्यासाठी ज्या हजारो गोष्टी सातत्याने करत असते त्याबद्दल ते कधीच कृतज्ञतेचा एक शब्दही उच्चारात नाहीत. मी जेव्हा त्यांचे रक्षण करते, किंवा त्यांच्यासाठी एखाद्या अडचणीवर मात करते, त्यानंतर मात्र एकही शब्द नसतो… ईश्वरी ‘कृपे’ ने जेव्हा त्यांच्यासाठी सारे काही केलेले असते म्हणजे त्यांना वाचविलेले असते, त्यांचे संरक्षण केलेले असते आणि सर्व अडचणींवर मात केलेली असते तेव्हा खालून कृतज्ञतेचा एक शब्दही ईश्वरी ‘कृपे’ बाबत उच्चारला जात नाही. त्यांना लगेचच विसर पडलेला असतो. ज्या प्रचंड ईश्वरी शक्तीने त्यांना संकटातून बाहेर खेचून काढले, त्या शक्तीविना ते कसे काय वाचू शकले असते किंवा ते कसे काय सुरक्षित राहू शकले असते, शांत कसे राहू शकले असते? पण याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना पूर्ण विसर पडलेला असतो आणि त्यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसतो, ज्या महान अद्भुत अपूर्व गोष्टीने त्यांना वाचविलेले असते, त्याची त्यांना साधी आठवणदेखील नसते. कृतज्ञतेचा दृष्टिकोन खरोखर अगदी दुर्लक्षित आहे, कृतज्ञतेची कृती या जगात शोधण्यात अर्थ नाही. किमान हे मात्र नक्की की, कृतज्ञता ही अगदी दुर्मिळ गोष्ट आहे.
– श्रीमाताजी
(The Supreme : 59-60)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026






