‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीमाताजी सांगत आहेत की, “बाह्य कामकाजाची सर्व जबाबदारी श्रीअरविंदांनी आता माझ्यावर सोपविली होती कारण अतिमानसिक चेतनेचे आविष्करण त्वरेने व्हावे यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून ते सर्व बाह्य कामकाजापासून दूर जाऊ इच्छित होते. आणि त्यांनी काही मोजक्या लोकांपाशी असे जाहीररित्या सांगितलेही होते की, त्या सर्वांना साहाय्य करण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी माझ्यावर सोपविलेले आहे. मी श्रीअरविंदांच्या संपर्कात राहीन आणि अर्थातच ते माझ्या माध्यमातून कार्य करतील, असेही त्यांनी सांगितले होते.

अचानकपणे, गोष्टींना एक विशिष्ट आकार येऊ लागला : एका असाधारण बारकाव्यानिशी एक अतिशय प्रतिभाशाली अशी निर्मिती झाली होती, अतिशय अदभुत असे अनुभव येत होते, दिव्य जिवांसोबत संपर्क प्रस्थापित होत होते, आणि ज्याला चमत्कार मानले जाते अशा सर्व प्रकारचे आविष्कार घडून येत होते. एका पाठोपाठ एक ‘अनुभव’ येत होते आणि गोष्टी अगदी झगमगीतपणे उलगडत चाललेल्या होत्या… अतिशय अदभुत रीतीने त्या घडत होत्या, असे मी नक्की म्हणू शकते.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे श्रीअरविंदांना घडलेल्या गोष्टी सांगायला गेले, आम्ही एका खरोखरच स्वारस्यपूर्ण गोष्टीपाशी येऊन पोहोचलो होतो आणि काय घडले ते सांगत असताना मला वाटते मी, काहीसा अधिकच उत्साह दाखविला असावा… श्रीअरविंदांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, “हो, ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. खरोखरच ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे, छान झाले. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल असे चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल, तुम्ही खरोखरच या पृथ्वीवरील घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…”

ते हसून म्हणाले, “ते एक महान यश असेल. परंतु ही ‘अधिमानसिक’ सृष्टी आहे. आणि आपल्याला अपेक्षित असलेले यश हे नव्हे, आपल्याला या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची (supramental) स्थापना करायची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी, अतिमानसिक जगताच्या अखंड निर्मितीसाठी, हाती आलेल्या तात्कालिक यशाचा कसा परित्याग करायचा, हे व्यक्तीला माहित असले पाहिजे.”

श्रीअरविंद काय म्हणू पाहत आहेत हे मला माझ्या आंतरिक चेतनेनिशी लगेचच लक्षात आले… काही तासांमध्ये ती (अधिमानसिक) सृष्टी नाहीशी झाली होती आणि त्या क्षणापासून आम्ही पुन्हा अन्य गोष्टींच्या आधारे नव्याने कार्याला सुरुवात केली. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीअरविंद स्वत: आश्रमाच्या स्थापनेविषयी येथे खुलासा करत आहेत. श्रीअरविंद स्वत:च्या नावाचा उल्लेख, त्रयस्थ व्यक्तीचा उल्लेख करावा त्याप्रमाणे, श्रीअरविंद असाच करत असत, हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.)

श्रीअरविंद राजकारण-संन्यास घेऊन, सुरुवातीला पाँडिचेरी येथे चार-पाच शिष्यांसमवेत राहात होते. त्यांच्या आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यासाठी येणाऱ्या साधकांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि ती एवढी वाढली की, उच्चतर जीवनासाठी सर्वस्वाचा त्याग करून आलेल्या या साधकांच्या निर्वाहासाठी आणि त्यांना सामूहिक मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून साधकपरिवाराची रचना करणे अत्यावश्यक ठरले. अशा रीतीने, ‘श्रीअरविंद आश्रमा’ची स्थापना झाली. ती करण्यात आली असे म्हणण्यापेक्षा, श्रीअरविंदांभोवती केंद्र म्हणून त्याची स्वाभाविकपणे वाढ होत गेली, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

सुरुवातीला आश्रम नव्हता. तर काही थोडे लोक श्रीअरविंदांपाशी येऊन राहू लागले आणि साधना करू लागले. कालांतराने जेव्हा श्रीमाताजी जपानहून परतल्या, तेव्हा त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. श्रीअरविंदांचा किंवा श्रीमाताजींचा तसा काही हेतूही नव्हता किंवा तसे काही नियोजनही नव्हते, पण बऱ्याच साधकांना त्यांचे समग्र आंतरिक व बाह्य जीवन श्रीमाताजींवर मोठ्या विश्वासाने सोपवायचे होते आणि त्यामधून त्याला आश्रमाचा आकार येऊ लागला. दरम्यानच्या काळात, श्रीमाताजी फ्रान्स आणि जपानमधील दीर्घ वास्तव्यानंतर दि. २४ एप्रिल १९२० रोजी पाँडिचेरीला परतल्या आणि त्यानंतर मग अनुयायांची संख्या वेगाने वाढू लागली, असे दिसून आले. (१९२६ साली फक्त २४ साधक होते, पण लवकरच ती संख्या वाढत गेली. १९२७ मध्ये ती संख्या ३६ झाली आणि नंतरच्या वर्षांत ती संख्या ८५ झाली.) जेव्हा आश्रम विकसित होऊ लागला तेव्हा त्याची व्यवस्था लावण्याची जबाबदारी श्रीमाताजींवर आली. श्रीअरविंद लवकरच एकांतवासामध्ये निघून गेले आणि आश्रमाची सारी भौतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी श्रीमाताजींवर आली.

श्री. के. आर. श्रीनिवास अय्यंगार त्यांच्या श्रीअरविंद-चरित्रामध्ये नमूद करतात की, “योगाचे स्वामी (श्रीअरविंद) आता दृश्य-पटलाच्या मागे सरकले होते आणि श्रीमाताजींनी शिष्यांच्या साधनेची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती आणि आता ‘श्रीअरविंद आश्रम’ औपचारिकरित्या अस्तित्वात आला होता.” श्रीअरविंदांचा एकांतवास हा अगदी निरपवाद असा नव्हता. कारण ते वर्षातून तीनवेळा साधकांना दर्शन देत असत.

दि. २१ फेब्रुवारी (श्रीमाताजींचा जन्मदिवस),
दि. १५ ऑगस्ट (श्रीअरविंद यांचा जन्मदिवस)
आणि दि. २४ नोव्हेंबर (सिद्धी दिन)

या तीन दिवशी ते साधकांना दर्शन देत असत. आणि १९३९ नंतर, दि. २४ एप्रिल हा दिवसही ‘दर्शनदिन’ म्हणून साजरा व्हायला सुरूवात झाली. (श्रीमाताजी कायमस्वरूपी पाँडिचेरी येथे वास्तव्यास आल्या तो दिवस.)

श्रीमाताजी आणि एकदोन निवडक साधक, श्रीअरविंदांच्या कायम संपर्कात असत. आणि श्रीअरविंद साधकांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पत्रांच्या माध्यमातून देत असत. त्यांची आश्रमीय जीवनामधील आस्था पूर्वीप्रमाणेच कायम होती पण त्याचे रूप मात्र बदलले होते. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीअरविंदांचे एक अनुयायी श्री. के. डी. सेठना ‘श्रीअरविंद’ या नामाविषयी काही खुलासा करत आहेत…)

श्रीअरविंदांनी स्वतःच्या आध्यात्मिक वाटचालीच्या दरम्यान एका विशिष्ट टप्प्यावर ‘श्रीअरविंद’ असे नाम धारण केले. त्यापूर्वी ते अरविंद घोष किंवा ए.जी. अशी सही करत असत. ‘आर्य’ च्या कालखंडामध्ये देखील ते अरविंद घोष अशीच सही करत असत. विसाव्या दशकाच्या मध्यावर ‘श्री. अरविंद घोष’ हे ‘श्रीअरविंद’ बनले असावे असे मला वाटते. त्यांच्या स्वाक्षरीमधील बदल हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील रूपांतरणाचे द्योतक होते. कदाचित त्यांच्या स्वतःच्या देहामध्ये जेव्हा अधिमानस चेतनेचे अवतरण झाले त्या दिवसानंतर म्हणजे दि. २४ नोव्हेंबर १९२६ नंतर हा बदल घडून आला असावा. वास्तविक हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. हे नवीन नाम महत्त्वाचे आहे कारण ते आध्यात्मिक साक्षात्कारानंतर उदयाला आलेले होते. ते केवळ साधकवर्गाने केलेल्या गौरवातून उदयाला आलेले नव्हते. श्रीमाताजी एकदा म्हणाल्या होत्या, “आपण आपल्या प्रभूंना (श्रीअरविंद यांना) ज्या नामाने ओळखतो त्या नामाचा ‘श्री’ हा अविभाज्य भाग आहे.”

यातून हेच ध्वनित होते की, आपण म्हणजे भारतीयांनी आणि पाश्चात्त्यांनीदेखील त्यांना श्रीअरविंद असेच म्हणावे असे श्रीमाताजींना अपेक्षित होते.

कदाचित या अवस्थांतराची चाहूल श्रीअरविंद यांना आधीच लागली होती असे दिसते. कारण दि. २२ मार्च १९२६ च्या एका पत्रामध्ये आशीर्वाद देताना, पत्राखाली ‘श्रीअरविंद’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

(श्रीमाताजींकडे श्रीअरविंद-आश्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली तो प्रसंग त्या येथे सांगत आहेत.)

व्यक्तीमध्ये देवदेवतांचे अवतरण घडवण्यासाठी, मी तेव्हा ‘अधिमानसिक निर्मिती’ला (Overmind Creation) एक प्रकारे सुरुवात केली होती आणि त्यावेळी गोष्टी एका असामान्य ऊर्ध्वगामी वळणावर जाऊन पोहोचल्या होत्या. मी माझ्या स्वत:च्या अंत:चक्षुंनी पाहिले, तेव्हा श्रीकृष्णाने स्वत:ला श्रीअरविंदांमध्ये एकजीव केले आहे, असे मला दिसले. मग मी श्रीअरविंदांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले, ”मला आत्ता असे असे दिसले.” ते म्हणाले, “हो, मला माहीत आहे. हे उत्तम झाले. आता मी माझ्या खोलीतच राहायचे ठरविले आहे, तेव्हा तुम्ही आता सर्व साधकांची जबाबदारी घ्या.”

पुढे श्रीमाताजी सांगतात, आलेल्या प्रत्येकाला भेटण्यासाठी पूर्वी, श्रीअरविंद व्हरांड्यामध्ये जात असत आणि त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाशी ते बोलत असत. (येथेच श्री. निरोदबरन यांच्या ‘Talks with Sri Aurobindo’ या प्रसिद्ध पुस्तकाची निर्मिती झाली.) तेव्हा मी आतल्या खोलीमध्ये थांबत असे आणि कोणालाही भेटत नसे. ते मात्र व्हरांड्यात जात असत, प्रत्येकाला भेटत असत, आलेल्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, चर्चा करणे असे सारे चालत असे. ते जेव्हा आत येत असत तेव्हाच फक्त मी त्यांना भेटत असे. कालांतराने मी देखील सर्वांबरोबर ध्यानाला बसू लागले.

तेव्हा त्यांनी भेटीसाठी सर्वांना एकत्रित बोलाविले. ते स्वत: बसले आणि त्यांच्या शेजारी मला बसवून घेतले आणि ते बोलू लागले, “मी येथे तुम्हाला असे सांगायला बोलाविले आहे की, आजपासून मी माझ्या साधनेसाठी म्हणून एकांतवासात जात आहे आणि यापुढे आता तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी श्रीमाताजी घेतील. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही त्यांना सांगावे. त्या माझे प्रतिनिधित्व करतील आणि त्याच सर्व कार्य करतील.” (येथेच प्रथमच ‘श्रीमाताजी’ हा शब्द श्रीअरविंदांकडून उच्चारण्यात आला होता, पूर्वी श्रीअरविंद त्यांना ‘मीरा’ असे संबोधत असत.)

सर्वजण त्यांना विचारू लागले, “असे का? असे का?” ते म्हणाले, “ते तुम्हाला सांगण्यात येईल.” मी कोणतीच गोष्ट स्पष्ट करू इच्छित नव्हते म्हणून मी खोलीत जाण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबरच बाहेर पडले पण तेवढ्यात दत्ताने बोलायला सुरुवात केली.

(दत्ता या एक इंग्लिश स्त्री होत्या. आणि त्या माझ्यासोबतच युरोप सोडून येथे आल्या होत्या. त्यांना काही ‘अंत:प्रेरणा’ येत असत.) दत्ताने सगळ्यांना सांगितले की, श्रीअरविंद त्यांच्या माध्यमातून बोलत आहेत अशी त्यांना जाणीव झाली आहे आणि मग त्यांनी सारे काही स्पष्ट करून सांगितले. ते असे की, “श्रीकृष्णाचे अवतरण झालेले आहे. श्रीअरविंद आता अतिमानसाच्या अवतरणासाठी खूप कठोर साधना करणार आहेत; या सगळ्याचा अर्थ असा की, श्रीकृष्णाची पृथ्वीवरील अतिमानसाच्या अवतरणाला संमती आहे. आणि आता येथून पुढे श्रीअरविंद त्या कार्यामध्ये इतके व्यग्र होऊन जातील की, त्यामुळे त्यांना आता लोकांशी भेटणे बोलणे शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांनी श्रीमाताजींकडे ही जबाबदारी सोपविली आहे आणि म्हणून आता पुढील सारे कार्य त्याच पाहतील.”

ही तारीख होती, २४ नोव्हेंबर १९२६. तेव्हापासून हा दिवस श्रीअरविंद आश्रमात ‘सिद्धी-दिन’ म्हणून ओळखला जातो. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

पाँडिचेरीला अज्ञातवासामध्ये निघून गेल्यानंतर अरविंद घोष यांच्या साधनेचे स्वरूप काय होते, ते साधनेच्या कोणत्या अवस्थेत होते इत्यादीसंबंधी त्यांचे स्वतःचे विचार जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी त्यांच्या धाकट्या भावाला म्हणजे बारीन्द्रकुमार घोष यांना लिहिलेले पत्र उपयुक्त ठरते. हे मूळ पत्र खूप विस्तृत आहे, परंतु त्यातील अंशभाग येथे विचारात घेऊ.

पाँडिचेरी, ०७ एप्रिल १९२०
प्रिय बारीन,

सर्वप्रथम तुझ्या योगाविषयी सांगतो. तू तुझी योगसाधना माझ्या हाती सोपवू इच्छितोस. आणि मीसुद्धा ती स्वीकारण्यास तयार आहे. परंतु याचा वास्तविक अर्थ असा की, ती साधना त्या ईश्वराकडे सोपवायची असते की, जो ईश्वर तुला आणि मला उघडपणे वा गुप्तपणे, त्याच्या दिव्य ‘शक्ती’ने संचालित करत आहे. आणि याचा अपरिहार्य परिणाम असा असेल की, त्या ईश्वराने जो मार्ग मला दाखविला आहे त्या मार्गाचे तू देखील अनुसरण केले पाहिजेस, हे तुला ज्ञात असले पाहिजे. या मार्गाला मी ‘पूर्णयोग’ असे संबोधतो.

….मी ज्यापासून योगसाधनेला आरंभ केला, विष्णू भास्कर लेले यांनी मला जे काही दिले किंवा कारावासात असताना मी जे काही केले ते सारे म्हणजे योगमार्गाचा शोध घेणे होते; इकडे शोध, तिकडे शोध असे करत त्याच त्या वर्तुळात फिरणे होते; जुन्या आंशिक योगमार्गांना स्पर्श करायचा, त्याचा अंगीकार करायचा, ते पडताळून पाहायचे, त्यांचा अनुभव घ्यायचा, कमी-अधिक प्रमाणात त्यापैकी एकाचा अनुभव घ्यायचा आणि मग दुसऱ्या मार्गाचा शोध घ्यायला सुरुवात करायची, असे सारे ते होते. त्यानंतर मी जेव्हा पाँडिचेरीला आलो तेव्हा मात्र माझी ही अस्थिर अवस्था नाहीशी झाली. नंतर ‘जगद्गुरू’ने – जो आपल्या आतमध्ये असतो त्याने मला माझा मार्ग पूर्णपणे दाखविला. त्याने त्याच्या पूर्ण सिद्धान्ताचा, या योगाच्या अंगांच्या दहा चरणांचा निर्देश केला आहे. मी त्या अनुभूतीमध्ये विकसित व्हावे म्हणून तो गेली दहा वर्षे मला घडवत आहे; आणि माझ्यामध्ये तो विकास अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाही. त्याला कदाचित अजून दोन वर्षे तरी लागतील.

….तूर्तास मी एवढेच सांगू शकतो की, पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना संपूर्ण पूर्णत्व प्रदान करणे, हे या योगाचे मूलभूत तत्त्व आहे. मन आणि तर्कबुद्धी आणि ‘आत्मा’ या गोष्टी ज्ञात असूनही, पूर्वीच्या योगपद्धती मानसिक स्तरावरील आध्यात्मिक अनुभवामध्येच समाधानी राहिल्या; हा जुन्या योगपद्धतींचा दोष होता.

परंतु मन हे तुकड्यातुकड्यानेच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अखंड अशा तत्त्वाला समग्रतेने कवळू शकत नाही. त्या तत्त्वाचे आकलन करून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे, समाधीच्या तुर्यावस्थेत निघून जाणे, मोक्ष-मुक्ती मिळविणे, किंवा निर्वाणामध्ये विलय पावणे किंवा तत्सम काही गोष्टी हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नसतो. या मार्गाने कोठेतरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अलक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्याने या इथेच स्वत: मूर्तिमंत ईश्वर व्हावे, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही त्याने ईश्वरच व्हावे, त्याने या जीवनामध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे.

…प्रथमतः व्यक्तीने मानसिक स्तरावरील सर्व प्रकारचे आंशिक अनुभव घेतले पाहिजेत, व्यक्तीचे मन आध्यात्मिक आनंदाने ओथंबून वाहिले पाहिजे आणि ते आध्यात्मिक प्रकाशाने उजळून निघाले पाहिजे, त्यानंतर मग व्यक्ती ऊर्ध्वगामी चढून जाते. जोपर्यंत व्यक्ती अशा रीतीने ऊर्ध्वगामी उन्नत होत नाही, ती जोपर्यंत अतिमानसिक स्तरावर चढून जात नाही, तोपर्यंत तिला विश्वाच्या अस्तित्वाचे परमरहस्य ज्ञात होणे कदापिही शक्य नाही; विश्वाचे कोडे उलगडणे शक्य नाही.

….शरीर, प्राण, मन आणि तर्कबुद्धी, ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘आनंदमय’ अस्तित्व हे आत्म्याचे पाच स्तर आहेत. जसजसे आपण वर वर जातो तसतशी मनुष्याच्या आध्यात्मिक उत्क्रांतीच्या सर्वोच्च पूर्णत्वाची स्थिती जवळजवळ येत जाते. आपण एकदा का ‘अतिमानसा’पर्यंत उन्नत झालो की मग ‘आनंदमया’मध्ये उन्नत होणे सुकर होते. या अवस्था अविभाज्य आहेत आणि मग अनंत ‘आनंद’ हा केवळ कालरहित ‘परम’ सद्वस्तु’मध्येच नव्हे तर अगदी शरीर, विश्व आणि जीवनामध्ये सुद्धा दृढपणे प्रस्थापित होतो. पूर्ण सत्, पूर्ण चित्, पूर्ण आनंद बहरून येतो आणि या जीवनामध्ये आकार धारण करतो. आणि हा प्रयास हाच माझ्या योगामार्गाचे मध्यवर्ती सूत्र आहे, मूलभूत संकल्पना आहे.

परंतु ही काही सोपी गोष्ट नाही. पंधरा वर्षांनंतर आत्ता कुठे मी ‘अतिमानसा’च्या स्तरांपैकी केवळ खालच्या तीन स्तरांपर्यंत उन्नत होत आहे आणि सारे कनिष्ठ व्यापार त्यामध्ये उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा ‘ईश्वर’ माझ्या माध्यमातून हे अतिमानसिक पूर्णत्व इतरांना अगदी विनासायास देऊ करेल, याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. तेव्हा मग माझ्या खऱ्या कार्यास प्रारंभ होईल. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

मीरा अल्फासा (श्रीमाताजी) दि. २४ एप्रिल १९२० रोजी या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पाँडिचेरी येथे परतल्या.

पुढे एकदा कधीतरी त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, ”मी जेव्हा जपानहून परत येत होते (१९२० साली) तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.

पुढे ‘सत्प्रेम’ या एका साधकाशी बोलताना त्या म्हणतात, ”जेव्हा मी जपानवरून परतले तेव्हा आम्ही दोघांनी (श्रीअरविंद आणि मी) एकत्रितपणे कार्य सुरु केले; त्यांनी अगोदरच मनोमय जगतामध्ये अतिमानसिक प्रकाश उतरविलेला होता आणि ते मनाचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नात होते. श्रीअरविंद मला म्हणाले, “हे खूपच विलक्षण आहे, हे कधीही न संपणारे कार्य आहे. वास्तविक सर्व काही करून झाले आहे तरीही काहीच पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हापुन्हा परत एकदा तेच सगळे करावे लागत आहे.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

‘आर्य’च्या प्रकाशनाला सुरुवात केल्यानंतर अरविंद घोष यांना काही पदवीधर युवकांचे एक पत्र आले आणि त्यात त्या युवकांनी लिहिले विचारले होते की, ज्यामधून ‘माणसाची जडणघडण’ होईल असे काही लिखाण तुम्ही आर्य मध्ये द्याल का? त्यावर अरविंद घोष यांनी पुढील उत्तर दिले होते.

”माणूस घडविण्याचा माझा वाटा मी उचलला आहे आणि ही अशी गोष्ट आहे की, आता ती कोणीही करू शकतो. अखिल विश्वामध्ये स्वतः प्रकृतीच आता त्याकडे लक्ष पुरवीत आहे, अन्य ठिकाणच्या तुलनेत भारतातच तिचे कार्य संथपणे चालू आहे. आता ‘माणूस घडविणे’ नाही; तर ‘दिव्य माणूस घडविणे’ हे माझे कार्य आहे.

माझी सध्याची शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी तयार होत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश या मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या योगपद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये मांडले आहे. ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे.

वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.

०१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.

०२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.

०३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

दिव्य चेतनेचे माध्यम म्हणून कार्य करू पाहणाऱ्या योगी अरविंद आणि मीरा व पॉल रिचर्ड्स या त्रयीने मिळून ‘आर्य’ नावाचे मासिक काढावयाचे ठरविले. १५ ऑगस्ट १९१४ रोजी ‘आर्य’ या तत्त्वज्ञानात्मक मासिकाच्या प्रकाशनाला आरंभ केला. त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्याची जबाबदारी मीरा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वर्गणीदारांची यादी त्यांनी स्वत: लिहून काढली. त्या जमाखर्च ठेवू लागल्या. ‘आर्य’च्या फ्रेंच आवृत्तीसाठी पॉल रिचर्डस् हे अरविंदांचे लिखाण फ्रेंचमध्ये अनुवादित करत. त्या कामातही मीरा त्यांना मदत करू लागल्या….

नंतर अरविंदांचे बहुतेक सगळे मुख्य लिखाण, म्हणजे Isha Upanishad, Essays on the Gita, Life Divine, The Synthesis of Yoga हे ‘आर्य’ या नियतकालिकामध्ये क्रमशः प्रकाशित होत असे. योगसाधना करत असताना त्यांच्यामध्ये ज्या आंतरिक ज्ञानाचा उदय झाला ते ज्ञान या ग्रंथांमध्ये शब्दबद्ध झाले आहे.

त्यांचे इतर लिखाण हे भारतीय सभ्यता व संस्कृतीचे महत्त्व आणि तिचा आत्मा, वेदांचा खरा अर्थ, मानवी समाजाची प्रगती, काव्याचा विकास आणि त्याचे स्वरूप, मानवी वंशाच्या एकात्मतेची शक्यता या विषयांशी संबंधित आहे. इंग्लंडमध्ये व बडोद्यात असताना आणि नंतर राजकीय चळवळीच्या कालावधीमध्ये आणि पाँडिचेरीच्या वास्तव्यामधील पहिल्या काही वर्षांमध्ये त्यात आणखी काही कवितांची भर पडली, अशा सर्व कविता त्यांनी याच सुमारास प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

मात्र दि. २२ फेब्रुवारी १९१५ पॉल व मीरा फ्रान्सला जाण्यासाठी निघावे लागले; निमित्त होते पहिल्या महायुद्धाचे. आता दर महिन्याला ६४ पाने लिहिण्याची जबाबदारी एकट्या अरविंदांवर येऊन पडली होती. (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

दिनांक २९ मार्च १९१४. सकाळच्या वेळी अरविंदांना पॉल रिचर्ड्स भेटून आले होते. मीरा अरविंदांना दुपारी भेटणार होत्या. वातावरणात एक कुंद गभीरता होती, उत्सुकता होती. हा पुढील सर्व भाग त्यांच्याच शब्दांत जाणून घेणे श्रेयस्कर आहे. “मी काही पायऱ्या चढून वर गेले तर पायऱ्या जिथे संपत होत्या तेथे, सर्वात वर ते माझी वाट पाहत उभे होते अगदी तसेच, हुबेहूब दर्शनातल्यासारखे! ध्यानावस्थेत दिसलेल्या व्यक्तीसारखेच, तोच पेहराव, तीच स्थिती, तीच शरीरयष्टी, माथा काहीसा उन्नत. त्यांनी त्यांची दृष्टी माझ्याकडे वळवली मात्र…. मला त्यांच्या दृष्टीकडे पाहताक्षणीच जाणवले, हेच ते ! क्षणार्धात असे काही घडून आले की, माझे आंतरिक दृश्य व आत्ता समोर असलेले बाह्य दृश्य एकमेकांत बेमालूमपणे मिसळून गेले. माझ्या दृष्टीने हा निर्णायक असा सुखद, अद्भुत धक्का होता.”

पुढे अनेक वर्षानंतर श्रीमाताजी त्यांच्या प्रथम भेटीची आठवण व त्याचे महत्त्व सांगताना म्हणाल्या, ”मी प्रथम पाँडिचेरी येथे अरविंदांना भेटले तेव्हाचा हा प्रसंग आहे. मी गाढ ध्यानावस्थेत होते, अतिमानसातील (Supramental) गोष्टी मी पाहात होते. त्या गोष्टी जशा असावयास हव्यात तशाच होत्या, पण काही कारणाने त्या आविष्कृत होत नव्हत्या. जे काही मी पाहिले, ते मी अरविंदांना सांगितले आणि विचारले त्या गोष्टी आविष्कृत होतील का? ते फक्त एवढेच म्हणाले, “हो.” आणि त्याक्षणी मला असे दिसले की, अतिमानसाने या पृथ्वीला स्पर्श केला आहे आणि ते प्रत्यक्षीभूत होण्यास प्रारंभ झाला आहे. जे सत्य आहे ते वास्तवात उतरविण्याची ताकद काय असते, याचा पहिला अनुभव मला येथे पाहावयास मिळाला.”

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या पद्धतीने त्या ध्यानाला बसल्या. मनात विचार होता नुकत्याच झालेल्या भेटीचा. दि. ३० मार्च १९१४, मीरा यांच्या दैनंदिनीत पुढील नोंद आढळते – ”हळूहळू क्षितिज अधिकाधिक सुस्पष्ट होत आहे. मार्ग सुनिश्चित होताना दिसत आहे. आणि आम्ही अधिकाधिक विश्वासाने पुढे पुढे पावले टाकीत आहोत. घोर अंधकारात बुडालेले आज हजारो लोक आजूबाजूला दिसत असले तरी, ते तितकेसे चिंतेचे कारण नाही; मी ज्यांना काल पाहिले ते याच भूतलावर अस्तित्वात आहेत. एक ना एक दिवस अंधकार प्रकाशात परिवर्तित होईल आणि त्या ईश्वराचे सार्वभौम साम्राज्य या पृथ्वीवर खरोखरीच प्रस्थापित झालेले असेल, याची हमी देण्यास त्यांचे केवळ अस्तित्वच पुरेसे आहे. हे ईश्वरा, या अद्भुताच्या दिव्य रचनाकारा, मी जेव्हा या साऱ्याचा विचार करते तेव्हा, माझे हृदय अतीव आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जाते आणि माझ्या आशेला पारावार उरत नाही. माझी भक्ती, अभिव्यक्तीच्या पलीकडील आहे आणि माझी आराधना मौन झाली आहे.”

त्या परमेश्वराला उद्देशून लिहित होत्या, “परमेश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकलीस. तुझ्याजवळ मी जे मागितले ते तू मला दिले आहेस. माझ्यातील ‘मी’ लुप्त झाला आहे; आता फक्त तुझ्याच सेवेस वाहिलेले एक विनीत साधन शिल्लक राहिले आहे. माझे जीवन हाती घेऊन, ते तू तुझेच केले आहेस; माझी इच्छाशक्ती घेऊन, ती तुझ्या इच्छाशक्तीशी जोडली आहेस; माझे प्रेम घेऊन, ते तू तुझ्या प्रेमाशी एकरूप केले आहेस; माझा विचार हाती घेऊन, त्याच्या जागी तुझी चेतना तू भरली आहेस. हा आश्चर्यमग्न देह आपले मस्तक विनम्र करून, मौनयुक्त विनीत भक्तिभावाने, तुझ्या चरणधुलीस स्पर्श करीत आहे. निर्विकार शांतीमध्ये विलसणाऱ्या तुझ्याखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात उरलेले नाही.”

अशा रीतीने संपूर्णत: समर्पित झालेल्या मीरा यांच्याविषयी अरविंद म्हणतात, “मी आजवर कधीच कोठेही इतके नि:शेष आणि इतके खुले आत्म-समर्पण पाहिलेले नाही.” (क्रमश:)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

मि. पॉल व मीरा रिचर्ड्स (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) यांच्याबरोबर अरविंद घोष यांचा पत्रव्यवहार होत राहिला. त्याबद्दल अरविंद यांनी म्हटले आहे की, “युरोपमधील दुर्मिळ योग्यांमध्ये पॉल व मीरा रिचर्ड्स यांची गणना होते, माझा त्यांच्याशी गेल्या चार वर्षांपासून भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरील पत्रव्यवहार चालू आहे.”

अरविंदांनी आपल्या निकटवर्तियांना, (जे त्यांच्याबरोबर देशासाठी क्रांतिकार्यात सहभागी झाले होते, आणि जे आता त्यांच्याबरोबर राहत होते), सांगितले होते की, ”फ्रान्सच्या उच्चस्तरीय सांस्कृतिक वर्तुळातील दोन व्यक्ती योगसाधना करण्यासाठी, आपल्या येथे येणार आहेत.” त्यामुळे सर्वांच्याच मनात या दोन पाहुण्यांच्या भेटीची उत्सुकता दाटली होती.

या सुमारास अरविंदांची आध्यात्मिक अवस्था काय होती? या वेळेपर्यंत म्हणजे १९१४ साल उजाडेपर्यंत अरविंदांना, त्यांचा ‘पूर्णयोग’ ज्या चार साक्षात्कारांवर आधारलेला आहे, त्यापैकी दोन साक्षात्कार झालेले होते. जानेवारी १९०८ मध्ये, महाराष्ट्रीय योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांच्या मार्गदर्शनाखाली, अरविंदांना ‘स्थल-कालाच्या अतीत असलेल्या ब्रह्मा’चा साक्षात्कार झालेला होता. नंतरचा साक्षात्कार होता ‘विश्वात्मक ब्रह्मा’चा. अलीपूरच्या तुरुंगात ‘वासुदेवम् सर्वमिती’ हा साक्षात्कार त्यांना झाला होता. उर्वरित दोन साक्षात्कारांच्या दिशेने आवश्यक अशी साधना अलीपूरच्या तुरुंगातच सुरु झाली होती. एकाचवेळी स्थितिमान आणि गतिशील असणाऱ्या ब्रह्माचा (Static and Dynamic Brahman) साक्षात्कार अजून बाकी होता. तो साधनामार्ग आणि अतिमानसाच्या (Supramental) पातळ्या यांचे अचूक दिग्दर्शन त्यांना तुरुंगातच झाले होते. आणि आता पाँडिचेरी येथे त्यानुसार मार्गक्रमण चालू होते.

त्यांनी स्वत:च्या आंतरिक आणि बाह्य जीवनातील घटनांसाठी, केवळ अंतर्यामीच्या दिव्य शक्तीवर, म्हणजेच ‘श्रीकृष्णा’वर विसंबून राहायला सुरुवात केली होती. आता पाँडिचेरीत आल्यापासून, योगमार्गातील सप्तचतुष्टयाचा साधनाक्रम हाती घेतला होता. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला होता. (क्रमश:)