‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
१९४२ साली जेव्हा दुसरे महायुद्ध भारताच्या दिशेने अधिकाधिक सरकू लागले तेव्हा आश्रमापासून लांब राहत असलेले साधकही, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या थेट संरक्षणाच्या छत्रछायेखाली पाँडिचेरीला येऊ इच्छित होते. अनेक साधकांना तशी परवानगीही देण्यात आली होती. काही साधकांनी तर येताना आपल्याबरोबर स्वतःच्या सर्व कुटुंबीयांनाच आश्रमात आणले. तोपर्यंत आश्रमातील लहान मुलांची संख्या अगदीच मर्यादित होती, त्याकाळी अगदी फार लहान वयाचे असे आश्रमात कोणीच नव्हते, परंतु आता मात्र त्यांची संख्या बऱ्यापैकी झाली होती आणि ती दिवसेंदिवस वाढत चालली होती. काही काळानंतर, त्यांच्या शिक्षणाची काही ना काहीतरी व्यवस्था लावणे आता आवश्यक होऊन बसले होते. त्यानुसार दि. ०२ डिसेंबर १९४३ रोजी श्रीमाताजींनी साधारणपणे वीस विद्यार्थ्यांसाठी एक शाळा सुरू केली.
तेव्हापासून, आजपर्यंत या शाळेमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करण्यात येत आहेत. येथे मुक्त प्रगती-शिक्षण प्रणाली (Free Progress Education System) अस्तित्वात आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादित केलेल्या समग्र शिक्षण (Integral Education) या शैक्षणिक तत्त्वज्ञानानुसार येथे शिक्षण दिले जाते. या शिक्षणाचे शारीरिक शिक्षण, प्राणिक शिक्षण, मानसिक शिक्षण, आंतरात्मिक शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण हे पाच पैलू आहेत.
पुढे १९५१ मध्ये, पाँडिचेरी येथे एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये श्रीअरविंद यांचे उचित स्मारक व्हावे या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय विद्यापीठ केंद्र’ स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार, दि. ०६ जानेवारी १९५२ रोजी श्रीमाताजींच्या हस्ते ‘श्रीअरबिंदो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. १९५९ साली, त्याचे नाव बदलून ‘श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ असे करण्यात आले. येथे बालवाडीपासून महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.
शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र असल्याने जगभरातील विविध प्रांतांमधील विविध संस्कृतीचे प्रतिबिंब येथे दिसावे तसेच वैश्विक सांस्कृतिक समन्वयामध्ये प्रत्येक राष्ट्राने परस्पर सामंजस्य आणि मानवी एकात्मतेला चालना देण्यासाठी अद्वितीय योगदान द्यावे अशी येथे अपेक्षा आहे. (क्रमश:)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…