ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

8 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago