ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सत्य-चेतनेनिशी कर्म करणे

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या गोष्टी बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविकपणे येत असतात. एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानाला बसलेली असते तेव्हा तिला ईश्वराचे स्मरण राखणे आणि ईश्वरी उपस्थितीची जाणीव ठेवणे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि स्मरण हे क्रमाक्रमानेच यायला हवे, ते एकदमच एकावेळी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही. ते दोन मार्गांनी घडते – पहिला मार्ग म्हणजे, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे स्मरण राखण्याचा सराव केला तर आणि व्यक्ती जेव्हा काहीतरी करते तेव्हा त्या प्रत्येक वेळी ती कृती ‘श्रीमाताजीं’ना अर्पण करण्याचा व्यक्तीने सराव केला तर (कर्म करत असताना सर्वकाळ नाही, तर कर्मारंभी किंवा व्यक्तीला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा) मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीच्या दृष्टीने सवयीची होऊन जाते. दुसरा मार्ग म्हणजे – ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते, जी चेतना एकाएकी किंवा अचानकपणे नाही तर, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची व्यक्तीला जाणीव होऊ लागते. कर्म करत असताना व्यक्तीला सुरुवातीला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच व्यक्तीला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून आपल्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू काही आपल्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी व्यक्तीला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच ‘श्रीमाताजीं’चे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी व्यक्तीला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा सत्य-चेतनेनिशी कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 259)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago