साधनेची मुळाक्षरे – १७
(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)
तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या गोष्टी बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविकपणे येत असतात. एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानाला बसलेली असते तेव्हा तिला ईश्वराचे स्मरण राखणे आणि ईश्वरी उपस्थितीची जाणीव ठेवणे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि स्मरण हे क्रमाक्रमानेच यायला हवे, ते एकदमच एकावेळी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही. ते दोन मार्गांनी घडते – पहिला मार्ग म्हणजे, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे स्मरण राखण्याचा सराव केला तर आणि व्यक्ती जेव्हा काहीतरी करते तेव्हा त्या प्रत्येक वेळी ती कृती ‘श्रीमाताजीं’ना अर्पण करण्याचा व्यक्तीने सराव केला तर (कर्म करत असताना सर्वकाळ नाही, तर कर्मारंभी किंवा व्यक्तीला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा) मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीच्या दृष्टीने सवयीची होऊन जाते. दुसरा मार्ग म्हणजे – ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते, जी चेतना एकाएकी किंवा अचानकपणे नाही तर, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची व्यक्तीला जाणीव होऊ लागते. कर्म करत असताना व्यक्तीला सुरुवातीला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच व्यक्तीला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून आपल्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू काही आपल्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी व्यक्तीला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच ‘श्रीमाताजीं’चे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी व्यक्तीला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा सत्य-चेतनेनिशी कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 259)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…