ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

निसर्गाचे रहस्य – ०४

व्यक्तीकडे जेव्हा अशी अंतर्दृष्टी असते, की जी आपल्या अस्तित्वाची आतली द्वारे उघडून देते आणि ज्यामुळे व्यक्ती वस्तुमागील सत्य काय आहे ते पाहायला सुरुवात करते तेव्हा, व्यक्तीला हे उमगू लागते की, अगदी या भौतिक विश्वामध्येसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्या सामान्य नजरेतून निसटून जातात. व्यक्तीने अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली किंवा अगदी दुर्बिणीतून पाहिले तरी, किंवा आधुनिक छायाचित्रणाच्या साधनांद्वारे त्याचे पुनरुत्पादन करण्यात व्यक्ती सक्षम ठरली तरी, या साऱ्या गोष्टी म्हणजे केवळ वर्गीकरण असते, ‘निसर्गा’ची रहस्यं शोधण्याच्या दिशेने टाकलेली ती पहिलीवहिली पावले असतात. ‘निसर्गा’च्या कार्यप्रणाली मागे काय दडलेले आहे, याचे वर्णन कोणतेही मानवनिर्मित यंत्र करू शकणार नाही. ती कार्यप्रणाली इतकी सुंदर, इतकी बहुविध, इतकी सूक्ष्म आणि तिच्या अचूकतेबाबतीत, तिच्या बारकाव्यानिशी केलेल्या कार्याच्या परिपूर्णतेबाबत इतकी उत्कृष्ट आहे, की या छोट्याशा मेंदूने त्याचे वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. आणि मनुष्याला मात्र असे वाटत असते की, ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणालीमध्ये यंत्रांच्या मदतीने आणि त्याने लावलेल्या शोधांच्या माध्यमातून तो सुधारणा घडवून आणू शकतो; भौतिक क्षेत्रात त्याने ज्या क्षमता संपादन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणाली तो शास्त्रीय पद्धतीने बदलवून टाकू शकतो, अशी त्याची समजूत असते. मनुष्य त्याच्या सूत्रांद्वारे, त्याच्या अनुभवाच्या पद्धतीद्वारे आणि ‘निसर्गा’च्या कार्यप्रणालीवर विजय मिळविण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या शोधांच्या साहाय्याने ‘निसर्गा’वर प्रभुत्व मिळवू शकतो असा त्याचा उद्दाम विश्वास असतो. केवढी ही मूर्खता, केवढा हा वेडेपणा!… कसली ही तुलना !

अनंताला कवळणाऱ्या ‘निसर्गा’च्या क्षमतेच्या परिघालासुद्धा मनुष्य आजवर स्पर्श करू शकलेला नाही आणि तो ‘निसर्गा’वर सत्ता गाजविण्याचा दावा करत आहे. – हा मनुष्याचा फाजील गर्व आणि त्याचा अहंकार आहे; असाध्य रोगाच्या तावडीत सापडलेल्या आणि ज्याचे आयुष्य गिळंकृत केले जात आहे अशा एखाद्या प्राण्याने व्यर्थ फुशारक्या माराव्यात तसे हे आहे.

आणि तरीही, मनुष्य विजय मिळविण्याची इच्छा बाळगून आहे, त्यावर ठाम आहे, आणि तो अतिशय उत्सुक आहे. परंतु त्यासाठी ज्या मार्गाचा तो अवलंब करत आहे त्यामुळे त्याला प्रदीर्घ काळ लागू शकतो. आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बरीच वेडीवाकडी वळणं पार करावी लागू शकतात.

– श्रीमाताजी
(Blessings of the Grace : 77-78)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

18 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago