सद्भावना – १२

प्रश्न : सद्भावनेच्या स्पंदनाने व्यक्ती जगाला मदत करू शकते का?

श्रीमाताजी : सद्भावनेच्या साहाय्याने व्यक्ती अनेक गोष्टी बदलू शकते, फक्त ती सद्भावना अत्यंत शुद्ध आणि निर्भेळ असली पाहिजे. हे तर उघडच आहे की, एखादा विचार, एखादी अतिशय शुद्ध आणि सच्ची प्रार्थना जर विश्वात प्रसृत झाली तर ती तिचे कार्य करतेच. परंतु हा अतिशय शुद्ध आणि सच्चा विचार जेव्हा मानवी मेंदूत प्रवेश करतो तेव्हा त्याचे काय होते? त्याचे अवमूल्यन होते. ज्ञान आणि आंतरिक चेतनेच्या प्रयत्नांच्या माध्यमातून, जर तुम्ही तुमच्यातील एखाद्या इच्छेवर खरोखर मात केलीत, म्हणजे ती इच्छा मावळली आणि नाहीशी झाली, आणि जर का आंतरिक सद्भावनेने, चेतनेच्या, प्रकाशाच्या, ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या इच्छेचा विलय करू शकलात, तर तुम्ही ती इच्छा पूर्ण केली असताना जेवढे समाधानी झाले असता, त्याच्यापेक्षा शतपटीने स्वतःच वैयक्तिकरित्या सर्वप्रथम आनंदी व्हाल आणि नंतर त्याचे अद्भुत परिणाम घडून येतील. तुम्हाला कल्पनाच करता येणार नाही, पण त्याचे जगभरात पडसाद उमटतील. त्याचा परिणाम सर्व जगभरात पसरेल. कारण तुम्ही जी स्पंदने निर्माण केलेली असतील ती पसरत राहतील. या गोष्टी बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वाढत जातात. तुमच्या चारित्र्यामध्ये जो विजय तुम्ही प्राप्त करून घ्याल, तो किती का लहान असेना, तोच विजय संपूर्ण जगात प्राप्त करून घेणे शक्य असते. मी आत्ता हेच सांगितले : आंतरिक प्रकृतीमध्ये परिवर्तन न करता केलेल्या सर्व गोष्टी – हॉस्पिटल्स, शाळा उभारणे इ. इ. – या एक प्रकारच्या घमेंडीतून केल्या जातात, कारण त्या पाठीमागे ‘मी कोणीतरी थोर असल्या’ची भावना असते, पण स्वतःमधील या छोट्याछोट्या अ-लक्षित गोष्टींवर मात केलेली असेल तर, (त्याचे परिणाम जरी लपलेले असले तरी) त्यामुळे अगणित पटीने अधिक महान विजय प्राप्त करून घेता येतो. तुमच्यामधील प्रत्येक कृती जी मिथ्या असते आणि सत्याच्या विरोधी असते, ती प्रत्येक कृती म्हणजे दिव्य जीवनाला दिलेला नकार असतो. तुमच्या छोट्या प्रयत्नांचे लक्षणीय परिणाम होतात, कदाचित तुम्हाला ते समजण्याचे समाधानही मिळणार नाही, परंतु त्याचा खराखुरा आणि नेमकेपणाने अधिक अ-वैयक्तिक (impersonal) आणि सार्वत्रिक परिणाम घडून येतो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 19-20)

सद्भावना – ११

प्रत्येक व्यक्ती तिच्याभोवती स्पंदनांनी बनलेले असे एक वातावरण वागवत असते; ही स्पंदने त्या व्यक्तीच्या चारित्र्यातून, तिच्या विचारसरणीतून, तिच्या मनःस्थितीतून, तिच्या भावनांच्या, तिच्या कृती करण्याच्या पद्धतीतून निर्माण होत असतात. प्रत्येकाचे असणारे असे हे वातावरण, संपर्काच्या द्वारे, परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया करत असते; ही स्पंदने संसर्गजन्य असतात; म्हणजे असे की, आपण ज्या व्यक्तीला भेटतो त्या व्यक्तीची स्पंदने आपण अगदी सहजगत्या स्वीकारतो, विशेषतः त्या व्यक्तीची स्पंदने शक्तिशाली असतील तर! यावरून एक गोष्ट सहज लक्षात येईल की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःभोवती शांती आणि सद्भावना वागवीत असेल तर, ती व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्त्वातील आंशिक का होईना पण शांती आणि सद्भावना यांचे एक प्रकारे प्रक्षेपणच इतरांवर करेल, आणि त्याऐवजी ती व्यक्ती जर तिरस्कार, चिडचिड आणि रागराग या गोष्टी वागवत असेल तर, (तिच्या संपर्कात आलेल्या) इतर व्यक्तींमध्ये देखील तशाच प्रवृत्ती जागृत होतील. याच्या आधारे अनेक घटनांचे स्पष्टीकरण देता येणे शक्य आहे, अर्थात, हे काही एकमेव स्पष्टीकरण नाही.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 32)

सद्भावना – १०

मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे घडते ते तुम्हालाच शिकवण देण्यासाठी असते की, व्यक्तीने कोणतातरी अंतःस्थ हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले वागले पाहिजे.

नेहमीसाठी तोच धडा आहे : जितके काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर होईल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते.

चांगुलपणाच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजेत, न्यायाच्या प्रेमापोटी तुम्ही न्यायी असले पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असायला हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 264-265)

सद्भावना – ०९

तुमच्यामध्ये समजा एखादा दोष असेल, जो तुम्ही दूर करू इच्छित असाल आणि जर का तो तरीही टिकून राहिला आणि जर तुम्ही म्हणाल की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता; कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या अगदी तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात – तुमच्या चेतनेचा भाग नसलेले असे काहीच तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि जे जे काही तुमच्या चेतनेशी संबंधित असते त्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. ज्या गोष्टी किंवा सूचना बाहेरून येतात, त्यासुद्धा तुमच्या चेतनेने ज्याला संमती दिलेली असते अगदी तेवढ्या प्रमाणातच असतात आणि तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची निर्मिती झालेली असते. तुम्ही जर असे म्हणाल की, ”मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, आणि म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. सगळे करून सुद्धा, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट (जॅक इन द बॉक्स) या खेळण्यातल्याप्रमाणे अचानक उसळून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते. म्हणून, करण्यासारखी एकमात्र गोष्ट म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे कोपरे वेचून वेचून काढायचे आणि जर का त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल आणि एके काळी जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटली होती ती नुसती शक्यच होईल असे नाही, ती केवळ व्यवहारातच उतरेल असे नाही, तर ती पूर्ण झालेली असेल. तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रीतीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला अगदी खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि हे सर्व बाबतीत सारखेच असते, शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सारखीच लागू पडते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 74-75)

सद्भावना – ०८

दयाळूपणा आणि सद्भावना यांमध्ये खरी महानता, खरी श्रेष्ठता सामावलेली असते.

*

एकटा मनुष्य त्याच्या आध्यात्मिक शक्तीच्या साहाय्याने जे साध्य करू शकतो तीच गोष्ट, एखादा समूह सद्भावनेच्या विचाराने संघटित झाला तर साध्य होऊ शकते. एक खाल्डियन (Chaldean) म्हण आहे की, “तुम्ही बारा जणं जेव्हा सदाचरणासाठी एकत्रित याल तेव्हा ‘अनिर्वचनीय’ (सद्वस्तु) प्रकट होईल.”

*

सर्वांबद्दलच्या सद्भावना आणि सर्वांकडून मिळणाऱ्या सद्भावना हा शांती आणि सुसंवादाचा पाया असतो.

*

मानवतेची एकता ही एक आधारभूत आणि विद्यमान वस्तुस्थिती आहे. परंतु मनुष्यजातीचे बाह्य एकत्व हे मात्र मनुष्याच्या सद्भावनांवर आणि त्याच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते.

*

जिथे कुठे प्रामाणिकपणा आणि सद्भावना असते, तिथे ईश्वराचे साहाय्यसुद्धा असते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 21), (CWM 02 : 114), (CWM 13 : 243), (CWM 15 : 66), (CWM 14 : 86)

सद्भावना – ०७

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून…)

इतरांविषयी आप-पर भाव, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्यामध्ये आध्यात्मिक स्थिरता आणि समता, सर्वांविषयीची एक सद्भावना किंवा एका विशिष्ट अवस्थेमध्ये ‘ईश्वरा’खेरीज इतर सर्वांविषयी एक निश्चल अलिप्तता असते; चैत्य (psychic) अस्तित्वामध्ये सर्वांविषयी मूलभूतपणे समान दयाळूपणा किंवा प्रेम असते परंतु एखाद्याबाबत विशेष नातेही असू शकते – परंतु प्राण (vital) मात्र नेहमीच असमान असतो, पसंती-नापसंतीने भरलेला असतो.

साधनेद्वारे प्राणाला स्थिर-शांत केलेच पाहिजे; ऊर्ध्वस्थित आत्म्याकडून सर्व वस्तुमात्रांबाबतची त्याची शांत सद्भावना आणि समता आणि चैत्य अस्तित्वाकडून त्याचा सार्वत्रिक दयाळूपणा किंवा प्रेम यांचा स्वीकार प्राणाने करायला हवा. या गोष्टी होतील पण हे घडून येण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. राग, अधीरता किंवा नापसंतीच्या आंतरिक तसेच बाह्य प्रवृत्तींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे.

गोष्टी जर विपरित झाल्या किंवा चुकीच्या पद्धतीने घडून आल्या तर तुम्ही सहजतेने असे म्हटले पाहिजे की, ”श्रीमाताजींना सारे काही माहीत आहे,” आणि कोणत्याही संघर्षाविना शांतपणाने तुम्ही गोष्टी करत राहिल्या पाहिजेत किंवा करवून घेतल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)

सद्भावना – ०६

प्रश्न : एखाद्या व्यक्तीच्या सद्भावनेपेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या दुरिच्छेची ताकद अधिक मोठी असेल तर ?

श्रीमाताजी : हो, खरे आहे, असे घडू शकते. मूलतः म्हणूनच आपण पुन्हा त्याच गोष्टीपाशी येऊन पोहोचतो – व्यक्तीने स्वतःला शक्य असेल तितके सारे काही, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आणि ते सारे ‘ईश्वरा’ला अर्पण या भावनेने करायचे आणि मग, जेव्हा ते स्थिरस्थावर आणि सुव्यवस्थित झालेले असेल तेव्हा आणि त्या व्यक्तीमध्ये जर खरोखरच अभीप्सा असेल आणि ती व्यक्ती जर प्रकाशमय अस्तित्व असेल तर, ती व्यक्ती सारे वाईट प्रभाव निष्प्रभ करू शकते. पण एकदा का व्यक्तीने या जगात पाऊल टाकले की, सारे काही अगदी शुद्ध आणि वाईट प्रभावांपासून मुक्त असेल, अशी फारशी आशा बाळगता येत नाही. प्रत्येक वेळी व्यक्ती जेव्हा अन्नग्रहण करते, तेव्हा त्या प्रत्येक घासाबरोबर ते प्रभाव ती ग्रहण करत असते; प्रत्येक श्वासागणिक ते प्रभाव आत शोषून घेत असते. आणि त्यामुळेच, कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, होता होईल तेवढे, हळूहळू, एकेक करून, शुद्धिकरणाचे काम करत राहायचे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 413)

सद्भावना – ०५

मानवी जीवनामधील सामान्य प्राणिक प्रकृतीचा (Vital nature) भाग असणाऱ्या नातेसंबंधांचे आध्यात्मिक जीवनात काहीच मोल नसते – किंबहुना ते नातेसंबंध प्रगतीमध्ये अडथळा उत्पन्न करतात; (असा अडथळा उत्पन्न होऊ नये म्हणून) मन आणि प्राणसुद्धा पूर्णतः ईश्वराकडेच वळविले पाहिजेत. इतकेच नव्हे तर, साधनेचा हेतूच आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि साऱ्या गोष्टी एका नव्या आध्यात्मिक आधारावर उभ्या करणे हा असतो; आणि या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा व्यक्ती ईश्वराशी पूर्णतया एकात्म पावलेली असते. तोपर्यंत व्यक्तीमध्ये सर्वांबाबत एक स्थिर सद्भावना असली पाहिजे, परंतु प्राणिक प्रकारच्या नातेसंबंधांचा काहीही उपयोग नाही कारण ते नातेसंबंध व्यक्तीची चेतना ही प्राणिक स्तरावरच ठेवतात आणि चेतनेला उच्च स्तराप्रत उन्नत होण्यास प्रतिबंध करतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)

सद्भावना – ०४

सत्याने वागण्याचा एकच एक मार्ग आहे, व्यक्तीला जे सर्वोच्च सत्य आहे असे जाणवते केवळ तेच आपल्या प्रत्येक कृतीमधून, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला अभिव्यक्त होत राहील, यासाठी व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच वेळी व्यक्तीला ही जाणीव देखील असली पाहिजे की, तिचे सत्याविषयीचे आकलन हे प्रगमनशील (progressive) आहे आणि त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या घडीला जे सर्वाधिक सत्य वाटते ते उद्या तसेच असेल असे नाही आणि त्याहूनही अधिक उच्च सत्य तुमच्या माध्यमातून अधिकाधिक अभिव्यक्त होईल. येथे आरामदायी तामसिकतेमध्ये झोपून राहणे याला थाराच नाही; व्यक्तीने सदैव जागे असले पाहिजे – मी शारीरिक झोपेविषयी बोलत नाहीये – व्यक्तीने कायम जागे असले पाहिजे, म्हणजे नेहमी सचेत (conscious) असले पाहिजे आणि नेहमी सद्भाव व प्रकाशमान ग्रहणशीलतेने परिपूर्ण असले पाहिजे. नेहमी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे, नेहमी उत्तम, नेहमीच उत्तम. तुम्ही स्वतःशी असे कधीच म्हणता कामा नये की, “बापरे, हे फारच थकवणारे आहे. मला आता विश्रांती घेऊ दे, मला आराम करू दे. बास, आता मी हे प्रयत्न थांबवणार आहे.” असे केलेत तर मग तुम्ही लगेचच एका गर्तेत सापडणार आहात आणि घोडचूक करणार आहात, हे निश्चित!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 282-283)

सद्भावना – ०२

तुम्ही खरोखर जर अभीप्सेच्या उत्कट अवस्थेमध्ये असाल, तर ती अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी साहाय्यभूत ठरणार नाही, अशी कोणतीच परिस्थिती नसते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित हे ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ते पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ झालेले असता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्हाला हे माहीत आहे का की, एक संकल्प, परम सद्भाव (Good will) हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत असतो आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक प्रभावीपणे कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)