विचार शलाका – ३९
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल तेव्हा कळेल की, ‘देव’च तुमचा गुरु आहे. योगाची स्वाभाविक प्रक्रिया घडून यावी म्हणून, अनंत प्रज्ञेने तुमच्या जीवनातील प्रत्येक लहानसहान आंतरिक आणि बाह्य परिस्थिती कशी सूक्ष्मपणाने नियोजित केली आहे, त्याची कशी अंमलबजावणी केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आंतरिक व बाह्य प्रवृत्तींना परस्परांवर कार्य करता यावे म्हणून, त्या कशा रीतीने रचल्या आहेत, कशा रीतीने एकत्रित आणल्या आहेत, जेणेकरून त्या प्रवृत्ती, पूर्णत्वामध्ये अपूर्णतांवर काम करू शकतील, हे तुम्हाला उमगेल. तुमच्या उन्नतीसाठी सर्वशक्तिमान प्रेम आणि प्रज्ञा कार्यरत आहेत. त्यामुळे जरी खूप वेळ लागताना दिसत असला तरी त्याविषयी काळजी करण्याचे काही कारण नाही, परंतु जेव्हा अपूर्णता आणि अडथळे उद्भवताना दिसतील तेव्हा अप्रमत्त (सावध) राहा, धीर धरा आणि उत्साह टिकवून ठेवा आणि इतर सारे काही ‘देवा’वर सोपवून द्या.
काळ आवश्यक आहे. तुमच्यामध्ये प्रचंड कार्य चालू आहे, तुमच्या समग्र मानवी प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण घडविण्याचे, उत्क्रांतीच्या अनेक शतकांचे कार्य काही थोड्या वर्षांमध्ये घडविण्याचे कार्य तुमच्यामध्ये सुरु आहे, त्यामुळे काळ आवश्यकच आहे. तुम्ही काळाविषयी कुरकूर करता कामा नये. इतरही काही मार्ग असतात की, ज्यामधून तुम्हाला त्वरित परिणाम दिसून येतात; तुम्ही स्वतःच करू शकाल, अशा काही निश्चित क्रिया ते मार्ग तुम्हाला देतात; तुम्ही काही (साधना) करत आहात, आज इतके अधिक प्राणायाम केले, आज इतक्या जास्त वेळ आसन स्थिर केले, आज इतक्या अधिक वेळा जप केला, इतके इतके केले, त्यातून तुम्ही निश्चित अशी किती प्रगती केली ते कळून येते आणि या भावनांच्या माध्यमातून तुमच्या अहंकाराला समाधान लाभते. त्या साऱ्या मानवी पद्धती झाल्या, परंतु अनंत ‘शक्ती’ अशा पद्धतीने कार्य करत नाही. ती सावकाशपणे वाटचाल करते, कधीकधी तर ती तिच्या ध्येयाप्रत अव्यक्त गतीने वाटचाल करते, कुठे ती प्रगती करताना दिसते, तर कधी मध्येच थांबलेली दिसते, आणि पुढे मग केव्हातरी अगदी जोरकसपणाने आणि विजयी रीतीने, तिने जे भव्य कार्य उभारले आहे ते आपल्यासमोर उघड करते.
उपरोक्त कृत्रिम मार्ग हे मानवी बुद्धीने काढलेल्या कालव्यांप्रमाणे असतात; त्यामधून तुम्ही सुलभपणे, सुरक्षितपणे आणि खात्रीपूर्वक प्रवास करू शकता पण तो प्रवास एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत अशा प्रकारचा असतो. पण एकदा का तुम्ही पूर्णयोगाचा मार्ग निवडलात की, मग तुम्ही त्या मार्गालाच धरून राहिले पाहिजे. हा मार्ग मात्र विस्तृत आणि पथविरहित समुद्रासारखा आहे की, ज्यामध्ये अनंताच्या स्वातंत्र्यामध्ये तुमचा प्रवेश झालेला असतो आणि तुम्ही या जगातील विविध प्रांतांमध्ये मुक्तपणे विहार करू शकता. तुम्हाला जर का कशाची आवश्यकता असेल, तर ती एका जहाजाची, त्याला दिशा देणाऱ्या चक्राची, दिशादर्शक यंत्राची, प्रेरक शक्तीची आणि कुशल कप्तानाची!
‘ब्रह्मविद्या’ हे आहे तुमचे जहाज, श्रद्धा म्हणजे दिशा देणारे चक्र, आत्म-समर्पण हे आहे तुमचे दिशादर्शक यंत्र, ईश्वराच्या आज्ञेनुसार जगताची निर्मिती करणारी, त्यांना दिशा देणारी आणि त्यांचा विनाश घडवून आणणारी शक्ती ही आहे तुमची प्रेरकशक्ती आणि स्वतः ‘देव’च तुमचा कप्तान आहे. परंतु त्याचा कार्य करण्याचा स्वतःचा असा एक मार्ग आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचा स्वतःचा असा एक काळ आहे. त्याच्या मार्गाकडे लक्ष ठेवून राहा आणि त्याच्या योग्य काळाची वाट पाहा.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 87-88)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…