केवळ प्राणामध्येच जोश असतो आणि आंतरात्मिक प्रेम (Psychic love) मात्र कोणत्याही ज्वालेविना काहीसे थंड असते, असे समजण्याची चूक करता कामा नये. …आंतरात्मिक प्रेमामध्ये सुद्धा जोश असू शकतो, प्राणिक प्रेमाइतकीच उत्कट किंबहुना त्याहूनही अधिक उत्कट अशी ज्वाला असू शकते. तो शुद्ध अग्नी असतो, तो अहंकारात्मक इच्छावासनांच्या पूर्तीवर अवलंबून नसतो. तसेच, हे आंतरात्मिक-प्रेम ज्याला कवळते त्या समिधेचे (fuel) ते भक्षण करत नाही. ती ज्वाला लाल नसते, ती शुभ्र असते; परंतु उष्णतेच्या बाबतीत लाल उष्णतेपेक्षा ही धवल उष्णता कणभरदेखील उणी नसते. हे खरे आहे की, सहसा आंतरात्मिक प्रेमाला मानवी नातेसंबंध व मानवी प्रकृतीमध्ये पूर्ण वाव मिळत नाही; जेव्हा ते प्रेम ईश्वराभिमुख होऊन उन्नत होते तेव्हा तिथे त्याच्या अग्नीला अधिक सहजतेने पूर्णत्व आणि परमानंद गवसतो. मानवी नातेसंबंधांमध्ये हे आंतरात्मिक प्रेम इतर घटकांमध्ये मिसळून जाते; ते घटक लगेचच त्याला वापरण्याचा प्रयत्न करतात, त्याला झाकोळून टाकतात. अगदी क्वचितच काही क्षणी या प्रेमाला स्वतःची परिपूर्ण उत्कट अभिव्यक्ती करण्यास वाव मिळतो. अन्यथा, ते केवळ एक तत्त्व म्हणून प्रवेशते परंतु तरीसुद्धा ते प्राणप्रधान अशा त्या प्रेमामध्ये सर्व उच्चतर गोष्टी प्रदान करते – सुंदर असे माधुर्य, कोमलता, एकनिष्ठता, आत्मदान, आत्मत्याग, आत्म्याचे आत्म्याला भेटणे ह्या साऱ्या गोष्टी ते प्रदान करते. मानवी प्रेमाला स्वत:च्या अतीत जात, त्याला उन्नत करण्याची, त्याचे उदात्तीकरण करण्याची, त्याला आदर्श प्रेम बनविण्याची प्रक्रिया अंतरात्म्याकडूनच घडते. आंतरात्मिक प्रेम जर मानवी प्रेमाच्या मानसिक, प्राणिक, शारीरिक या इतर घटकांवरही वर्चस्व राखू शकले आणि त्यांच्यावर शासन करू शकले आणि त्या घटकांचे परिवर्तन घडवू शकले तर, या द्वैती जीवनामध्ये (dual life), असे प्रेम म्हणजे, आत्मा आणि त्याच्या साधनांचे ‘परिपूर्ण ऐक्य’ हे जे वास्तव आहे त्याचे या पृथ्वीवरील काहीसे प्रतिबिंब असू शकते किंवा ती त्या वास्तवतेची पूर्वतयारी असू शकते, असे म्हणता येईल. परंतु आंतरात्मिक प्रेमाची अशा प्रकारची अपूर्ण रुपेसुद्धा खूप दुर्मिळ असतात.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 307-308)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…