ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

ध्यानधारणा आणि आध्यात्मिक जीवन

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २५

प्रश्न : ध्यान करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही का? आणि जितके अधिक तास एखादी व्यक्ती ध्यान करेल, तेवढ्या प्रमाणात तिची प्रगती अधिक होईल, हे खरे नाही का ?

श्रीमाताजी : ध्यानामध्ये व्यतीत केलेले तास हा काही आध्यात्मिक प्रगतीचा पुरावा होऊ शकत नाही. मात्र ध्यान करण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करावा लागत नसेल तर ती तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची खूण असते. तेव्हा अशा अवस्थेत, खरंतर तुम्हाला ध्यान थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; ध्यान थांबविणे अवघड असते; ईश्वरासंबंधीचे विचार थांबविणे अवघड असते; सामान्य चेतनेमध्ये उतरणे अवघड असते. असे असेल तेव्हा तुम्ही प्रगतीची खात्री बाळगू शकता. जेव्हा ईश्वरावर एकाग्रता करणे ही तुमच्यासाठी जीवनावश्यक गोष्ट झाली असेल, जर तुम्ही त्याविना जगू शकत नाही, तुम्ही कशामध्येही गुंतलेले असाल तरीही जर ती अवस्था रात्रंदिन सातत्याने टिकून राहत असेल, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती केली आहे, असे होईल. तुम्ही ध्यान करत असाल किंवा इकडेतिकडे फिरत असाल, काही करत असाल, काही काम करत असाल, तर तेव्हा तुम्हाला आवश्यकता असते ती चेतनेची! ईश्वराची सातत्याने जाणीव असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे.

प्रश्न : पण ध्यानाला बसणे ही एक अपरिहार्य साधना नाही का? आणि त्यातून ईश्वराशी अधिक उत्कट आणि सघन ऐक्य प्राप्त होत नाही का?

श्रीमाताजी : तसे होऊ शकते. परंतु आपण काही साधनेसाठी साधना करत नाही. तर, आपण जे काही करत असू, सदा सर्व काळ, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक क्षणी ईश्वरावर एकाग्र असणे ही गोष्ट साध्य करण्यासाठी आपली धडपड आहे. इथे आश्रमात (श्रीअरविंद आश्रम) असे काही जण आहेत की ज्यांना ध्यान करायला सांगण्यात आले आहे. पण असेही काही जण आहेत की ज्यांना ध्यान करण्यास अजिबात सांगण्यात आलेले नाही. परंतु ते प्रगती करत नाहीयेत असा विचार करता कामा नये. तेही साधनाच करत आहेत पण ती वेगळ्या स्वरूपाची साधना आहे. कर्म करणे, भक्तिभावाने कर्म करणे आणि आंतरिक निवेदन (conscecration) करणे ही देखील एक प्रकारची आध्यात्मिक साधनाच आहे. केवळ ध्यानाच्या वेळीच नव्हे तर सर्व परिस्थितीमध्ये, जीवनातील प्रत्येक क्रियाकलापांमध्ये ईश्वराशी नित्य तादात्म पावून राहणे हे अंतिम ध्येय आहे.

असे काही जण आहेत की, जे ध्यानाला बसले असताना, त्यांना जी स्थिती अतिशय छान, आनंदी वाटते अशा स्थितीत ते जातात. ते त्यामध्ये आत्मसंतुष्ट होऊन राहतात आणि जगाला विसरतात. पण जर का ते विचलित झाले तर, ते अगदी रागारागाने आणि अस्वस्थ होऊन त्यातून बाहेर पडतात कारण त्यांच्या ध्यानामध्ये कोणीतरी बाधा आणलेली असते. ही काही आध्यात्मिक प्रगतीची किंवा साधनेची खूण नव्हे. काही जण असेही असतात की, जे ध्यान करणे म्हणजे ईश्वराचे ऋण चुकते करणे आहे असे समजतात. आठवड्यातून एकदा चर्चला गेलो की आपले ईश्वराविषयी जे कर्तव्य होते ते आपण पार पाडले असे समजणाऱ्या माणसांसारखी ही माणसं असतात.

तुम्हाला ध्यानात शिरण्यासाठी जर प्रयत्न करावे लागत असतील तर आध्यात्मिक जीवन जगण्यापासून अजून तुम्ही खूप दूर आहात. परंतु जर का तुम्हाला ध्यानातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर मग तुमचे ध्यान हे तुम्ही आध्यात्मिक जीवन जगत असल्याचे द्योतक आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19-21)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

8 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago