पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २८

कर्मयोग

 

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ईश्वराशी सायुज्य म्हणजे ‘योग’ होय. योगी, माणसाच्या अंतरंगात असणाऱ्या आणि माणसाच्या बाहेर असणाऱ्या सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वराशी स्वतःचा थेट संपर्क साधतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ईश्वराचे सामर्थ्य ओतण्याचा तो एक स्रोत बनतो. मग तो शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल. जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो; जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेम व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही; जेव्हा तो त्याची सारी कर्मे ईश्वरार्पण करतो आणि प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो; जेव्हा तो भीती आणि द्वेष, घृणा आणि किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि प्रकृतीच्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो; जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या तो वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो; जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अवास्तवतेची जाण येते; जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः निष्क्रिय आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत रीतीने कार्य करत आहे; अशी जाण त्याला येते; अशा रीतीने, सर्वांचा स्वामी, मानवतेचा साहाय्यक आणि सखा असणाऱ्या ईश्वराप्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा तो परित्याग करतो तेव्हा मग, तो कायमस्वरूपी त्या ईश्वरामध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही. हाच योग होय.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 11)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २७

कर्मयोग

 

कर्ममार्ग, प्रत्येक मानवी कर्म परमेश्वराच्या इच्छेला समर्पित करावे, हे ध्येय समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आपल्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू सर्वथा टाकून देणे, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म न करणे, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म न करणे, या गोष्टींपासून होतो. या त्यागामुळे, कर्ममार्ग हा आपले मन व आपली इच्छा अशा प्रकारे शुद्ध करू शकतो की त्यामुळे, महान विश्वशक्ती हीच आपल्या सर्व कर्मांची खरी कर्ती आहे, ही जाणीव आपल्याला सहजपणे होऊ लागते. या शक्तीचा स्वामी ईश्वर हा या कर्मांचा खरा स्वामी व नेता आहे; व्यक्ती हा केवळ एक मुखवटा आहे; व्यक्ती ही सबब आहे; या शक्तीचे ती एक साधन आहे किंवा अधिक सकारात्मकपणे सांगावयाचे झाले तर, व्यक्ती हे कर्माचे व सांसारिक संबंधाचे जाणीवयुक्त केंद्र आहे, ही जाणीव आपल्याला सहजपणे होऊ लागते. कर्मयोगी कर्माची निवड व त्याची दिशा अधिकाधिक जाणीवपुर:सर ईश्वराच्या इच्छेवर आणि विश्वशक्तीवर सोपवितो. आपले कर्म व आपल्या कर्माची फळे शेवटी ईश्वराला व त्याच्या विश्वशक्तीला समर्पित करण्यात येतात. आपला आत्मा दृश्यांच्या कैदेत असतो तो मुक्त व्हावा; आपला आत्मा प्रापंचिक व्यापारांच्या प्रतिक्रियांच्या बंधनात असतो, तो त्या बंधनातून मुक्त व्हावा, हा या समर्पणाच्या मागचा हेतू असतो. भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांच्याप्रमाणे कर्ममार्गही नामरूपात्मक अस्तित्वातून मुक्त होऊन, परमात्म्यात विलीन होण्यासाठी वापरला जातो. परंतु येथेही हा विलिनीकरणाचा परिणाम अपरिहार्य आहे, असे मात्र नाही. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच या मार्गाची परिणती ही, सर्व शक्तींच्या ठायी, सर्व घटनांमध्ये, सर्व कृतींमध्ये, ईश्वराचे दर्शन घडण्यात होऊ शकते; वैश्विक कार्यामध्ये असा कर्मयोगी आत्मा मुक्तपणाने आणि अनहंकारी पद्धतीने सहभागी होऊ शकतो. कर्मयोगाचे याप्रमाणे आचरण केले तर, हा योग सर्व मानवी इच्छा व सर्व कर्म यांचे उन्नतीकरण करून, त्यांना दिव्य पातळीवर नेऊ शकेल; त्यांचे आध्यात्मिकीकरण करू शकेल; मुक्ती, सामर्थ्य आणि पूर्णत्व यासाठी मानव विश्वभर जे परिश्रम करत आहे, त्याचे समर्थन याद्वारे करता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 39-40)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २६

भक्तियोग

प्रेम, भक्ती हे सर्व अस्तित्वाच्या मुकुटस्थानी आहे, अस्तित्वाची परिपूर्ती प्रेमानेच होते; प्रेमानेच अस्तित्व आणि जीवन सर्व प्रकारची उत्कटता, सर्व प्रकारची पूर्णता गाठते आणि पूर्ण आत्मलाभाचा आनंद भोगते. कारण जरी मूळ अस्तित्व हे स्वभावतःच जाणिवेच्या स्वरूपाचे आहे; आणि जाणिवेच्या द्वाराच आपण या अस्तित्वाशी एकरूप होतो, हे खरे असले तरी जाणीव स्वभावतः आनंदरूप आहे आणि आनंदाचे शिखर गाठण्यास प्रेम हे गुरुकिल्लीप्रमाणे उपयोगी पडते.

– श्रीअरविंद
(संदर्भ : योगसमन्वय – सेनापती बापट)
(CWSA 23-24 : 546-547)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २५

भक्तियोग

 

भक्तिपूर्ण मनाच्या द्वारा ईश्वराच्या भेटीसाठी जी साधना केली जाते, तिच्या तीन अवस्था असतात, असे भक्तिमार्गाची व्यवस्था लावू पाहणारे मानतात. पहिली अवस्था म्हणजे श्रवण – ईश्वराच्या नावाचे, त्याच्या गुणांचे आणि या गुणांशी संबंधित असणाऱ्या अशा गोष्टींचे नित्य श्रवण. दुसरी अवस्था म्हणजे मनन – ईश्वराच्या गुणांचे, त्याच्या व्यक्तिरूपाचे, ईश्वराचे नित्य मनन. तिसरी अवस्था म्हणजे ईश्वरावर मन स्थिर करून, ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे. यांद्वारे आणि त्याचबरोबर जर मनोभाव उत्कट असतील, एकाग्रता तीव्र असेल तर, समाधीचाही अनुभव येतो; अशा वेळी मग बाह्य विषयांपासून जाणीव दूर निघून गेलेली असते. परंतु याही सर्व गोष्टी वस्तुतः प्रासंगिक आहेत; मनातील विचार हे पूजाविषयाकडे उत्कट भक्तीने लागले पाहिजेत, हीच एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 574)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २४

भक्तियोग

 

पूर्ण आत्मसमर्पणामध्ये आपले सर्व अस्तित्वच ईश्वराला अर्पण करणे अपेक्षित असते; त्यामुळे अर्थातच त्यामध्ये आपले विचार आणि आपली कर्मे यांचे अर्पणही अपेक्षित असते. असे करताना भक्तियोग हा कर्मयोग व ज्ञानयोगाचे महत्त्वाचे घटक अंतर्भूत करून घेतो, पण तो हे स्वतःच्या पद्धतीने व स्वतःच्या विशिष्ट भावाने करतो. येथेही भक्त त्याच्या कर्माचे आणि त्याच्या जीवनाचे ईश्वराला समर्पण करतो; पण ईश्वरी इच्छेशी आपली इच्छा मिळतीजुळती घेण्यापेक्षा, तो आपल्या प्रेमाचे समर्पण करत असतो. भक्त ईश्वराला आपले जीवन अर्पण करतो म्हणजे तो जे काही असतो, त्याच्यापाशी जे काही असते, तो जे काही कर्म करतो ते सर्व तो ईश्वरार्पण करतो. हे आत्मसमर्पण संन्यासाचे रूप घेऊ शकेल. जेव्हा संन्यासी सामान्य मानवी जीवन सोडून देतो आणि त्याचे सारे दिवस हे पूजाअर्चना, भक्ती किंवा ध्यानसमाधीत व्यतीत करतो, तेव्हा त्याची सारी वैयक्तिक मालमत्ता त्यागून, तो बैरागी किंवा भिक्षू बनतो; ईश्वर हीच ज्याची एकमेव अशी संपदा बनते, ईश्वराच्या सायुज्यतेसाठी आणि इतर भक्तांच्या संबंधांपुरते साहाय्यभूत ठरतील किंवा त्याच्याशी जे निगडित असतील अशा कर्मांव्यतिरिक्तच्या सर्व कर्मांचा तो त्याग करतो; किंवा फार फार तर संन्यासाश्रमाच्या सुरक्षित गढीमध्ये राहून, ईश्वरी प्रकृतीचा आविष्कार असणारी प्रेममय, दयामय, कल्याणमय अशी सेवाकर्मे तो करत राहतो. परंतु पूर्णयोगामध्ये, यापेक्षा अधिक व्यापक असे आत्मसमर्पण असू शकते. पूर्णयोगामध्ये जीवन त्याच्या पूर्णतेसह, विश्व त्याच्या समग्रतेसह, ईश्वराची लीला आहे, असे समजून स्वीकारले जाते; असा भक्त हा स्वतःचे समग्र अस्तित्व ईश्वराच्या ताब्यात देतो. सर्व अस्तित्व म्हणजे तो स्वतः जे काही आहे ते आणि त्याची स्वतःची जी काही मालमत्ता आहे ती सारी, ‘त्या ईश्वराची आहे’ असे समजून, (‘इदं न मम’ या भावनेने) स्वतःकडे बाळगतो. त्या गोष्टी स्वतःच्या आहेत, असे तो मानत नाही. तो सारी कर्मे ईश्वरार्पण म्हणूनच करतो. या व्यापक आत्मसमर्पणात आंतरिक व बाह्य जीवनाचे परिपूर्ण सक्रिय समर्पण होत असते; त्यामध्ये कोणतेही न्यून राहात नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 573-574)