मानसिक परिपूर्णत्व – २४

 

श्रीअरविंद एका साधकाला उत्तरादाखल लिहितात –

मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच आहे आणि ती गोष्ट म्हणजे श्रद्धा बाळगणे आणि लक्ष्याच्या अंतापर्यंत जाणे. तुम्ही आत्तापर्यंत बरेचदा तसा निश्चय केला आहे – त्यावर दृढ राहा. प्राणाच्या वादळांना तुमच्या आत्म्याची अभीप्सा विझवू देऊ नका.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 71)

मानसिक परिपूर्णत्व – २३

 

श्रद्धा हा एक सर्वसाधारण शब्द आहे. श्रद्धा म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी, त्याच्या प्रज्ञेविषयी, त्याच्या शक्तीविषयी, त्याच्या प्रेमाविषयी आणि त्याच्या कृपेविषयी जीवाला असणारी खात्री. विश्वास (confidence) आणि भरवसा (trust) हे श्रद्धेचे पैलू आहेत आणि श्रद्धेचा परिणाम देखील आहेत.

विश्वास (confidence) ही अशी एक खात्रीची भावना असते की, ईश्वराला प्रामाणिकपणे साद घातली तर, तो ती ऐकेल आणि मदत करेल आणि ईश्वर जे काही करेल ते भल्यासाठीच करेल.

भरवसा (trust) म्हणजे ईश्वरावर, त्याच्या मार्गदर्शनावर आणि त्याच्या संरक्षणावर मन व हृदयाने संपूर्णपणे विसंबून असणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 88)

मानसिक परिपूर्णत्व – २२

 

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण अशी एक जागा नेहमीच असते की, जिथे सारे काही खुले, साधे, सरळ असते – हे अनुभवलेले सत्य मी सांगत आहे. तुम्ही गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहाता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरिक दृष्टिकोनातून तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते – अगदी सहजतेने हे होते.

मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी म्हणत असत, ‘साधे राहा, साधे असा. जे तुम्हाला भावते तसेच साधेपणाने बोला. साधे असा, साधे असा.’ त्यांचा त्यावर खूप भर असे. पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा एक प्रकाशपथच माझ्यासमोर खुला होताना मला दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एक पाऊल, मग दुसरे पाऊल, हेच केवळ आपल्याला करावयाचे आहे,’ असे मला जाणवून गेले.

श्रीमाताजी स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत म्हणतात, सारी जटिलता इथे आहे, खूप जटिल, त्याच्याशी मिळतेजुळते घेणे खूप अवघड आहे. जेव्हा श्रीअरविंद ‘साधेसरळ असा’, असे म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य – तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता आणि अचानकपणे व्यक्ती जणू प्रकाशाच्या बागेतच उदयाला यावी तसे काहीसे झाले.

जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती.

साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, अगदी साधे, सहज. अगदी साधेपणा.

…साधेसरळ असणे असे ते ज्याला म्हणत आहेत, ती म्हणजे अगदी आनंददायी उत्स्फूर्तता, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असा, साधे असा, सरळ असा. एक आनंदी अशी सहजता. ते ज्याला ‘दैवी स्थिती’ असे म्हणतात ती उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे.

आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही मोकळे होते.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple : September 16, 1961)

मानसिक परिपूर्णत्व – २१

 

ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे, ज्याला माणसं प्रेम हे नाव देतात, तशाप्रकारचे नेहमीचे प्राणिक भावना असणारे प्रेम असता कामा नये. कारण ते प्रेम हे प्रेमच नसते, तर ती केवळ एक प्राणिक इच्छा असते, एक प्रकारची स्वीकृतीची सहजबुद्धी असते, मालकीची आणि एकाधिकाराची प्रेरणा असते. हे तर दिव्य प्रेम असतच नाही; पण योगमार्गामध्ये यातील अंशभागाचीही भेसळ होता कामा नये. ईश्वरविषयक प्रेमामध्ये आत्मदान असते, ते कोणत्याही मागणीपासून मुक्त असते; ते शरणागती आणि समर्पणाने परिपूर्ण असते; ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही; मत्सर, अभिमान वा राग यांच्या उद्रेकामध्ये ते गुंतून पडत नाही, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात. आणि त्याच्या बदल्यात दिव्य मातादेखील स्वतःला देऊ करते, पण अगदी मुक्तपणे – आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते.

दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक जाणिवेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना पूर्णत्व आणि परिपूर्तीच्या दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्निर्मिती करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या बाहुंमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. अगदी तुमच्या जडभौतिक अंगापर्यंत तुम्हाला याची संवेदना व्हावी आणि तिने तुमचा ताबा घ्यावा अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. आणि इथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची ! जर तुम्ही खरोखर अशी अभीप्सा बाळगलीत आणि जर ती तुम्हाला साध्य झाली तर, इतर कोणत्याही दाव्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच नाही. आणि जर व्यक्ती खरोखरच अशी अभीप्सा बाळगेल तर, आणि जसजशी व्यक्ती अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतसा आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईल, तसतशी निश्चितपणे व्यक्तीला ती गोष्ट साध्य होईलच.

कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा यांच्यापासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे तुम्ही ग्रहण करू शकता, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे; असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 338-339)

मानसिक परिपूर्णत्व – २०

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

तुमच्यासाठी या पृथ्वीवर करण्याजोगी हीच एकमेव गोष्ट शिल्लक राहिली आहे, अमुक अमुक गोष्ट करावयाची आहे हे एकदाच कायमचे ठरवून टाका ; मग बाकी भूकंप, ढासळती सभ्यता… इ. इ. बाह्य गोष्टी आहेतच. आणखी असे की, जी गोष्ट तुम्ही करणे आवश्यक आहे, ती तुम्हाला करता यावी म्हणून तुमच्या साहाय्यासाठी एक गोष्टदेखील पाठविलेली आहे. तुम्ही म्हणता, तुम्ही ठरविलेली ती गोष्ट अवघड आहे, मार्ग दूरवरचा आहे आणि त्यामानाने देण्यात आलेले प्रोत्साहन अल्प आहे पण म्हणून काय झाले? एवढी मोठी गोष्ट एवढ्या सहजासहजी मिळावी किंवा एकतर त्यात अगदी वेगाने यश प्राप्त व्हावे, नाहीतर नकोच, अशी अपेक्षा तुम्ही का बाळगता? अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्यास सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल.

…यशाचा मूलमंत्र, विजयाचा निर्धार, दृढ संकल्प कायम राखणे हीच एक गोष्ट केली पाहिजे. अशक्यता अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नाही. हां, अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काही नाही. व्यक्तीने एकदा का अमुक एक गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 115-116)

मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)

मानसिक परिपूर्णत्व – १८

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्त्तर देत आहेत.)

या योगासारख्या (पूर्णयोगासारख्या) योगाला धीराची आवश्यकता असते कारण, ह्या योगामध्ये, प्रेरणांमधील आमूलाग्र बदल, प्रकृतीच्या प्रत्येक भागामध्ये आणि तपशीलांमध्ये परितर्वन या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. ”काल याच वेळेस मी श्रीमाताजींप्रत संपूर्ण आत्मदान करावयाचा निश्चय केला आणि बघा, तसे काहीच झालेले नाहीये; तर उलट, सगळ्या विरोधी गोष्टी पुन्हा एकदा उफाळून आल्या आहेत; तेव्हा आता अन्य काही नाही, मी योगासाठी अपात्र आहे असे गृहीत धरून, योगमार्गाचा त्याग करावयास हवा,” असे म्हणणे योग्य नाही. अर्थात, जेव्हा तुम्ही (संपूर्ण आत्मदान करण्याच्या निश्चयापाशी) अशा प्रकारचा काही निश्चय करण्याच्या मुद्द्यापाशी येऊन पोहोचलेले असता तेव्हा, मार्गामध्ये अडथळा येईल अशा साऱ्या गोष्टी ताबडतोब वर उफाळून येतात – हे असे अगदी हमखास घडते.

अशा वेळी, मागे सरायला पाहिजे, त्या गोष्टींचे निरीक्षण करून, त्यांचा त्याग करावयास हवा; अशा गोष्टींना तुमचा ताबा घेण्यास तुम्ही संमती देता कामा नये; तुम्ही तुमची मध्यवर्ती इच्छा त्यांच्यापासून अलिप्त अशी राखली पाहिजे आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी श्रीमाताजींच्या शक्तीला आवाहन केले पाहिजे. आणि तरीसुद्धा जर व्यक्ती त्यामध्ये गुंतून पडली आणि असे बरेचदा घडते, तर अशा वेळी शक्य तितक्या त्वरेने त्यापासून अलिप्त होऊन, पुढे वाटचाल केली पाहिजे. प्रत्येक जण, प्रत्येक योगी हे असेच करत असतो. प्रत्येक गोष्ट त्वरेने करावयास जमत नाही म्हणून निराश होणे, हे जडभौतिक सत्याच्या काहीसे विरोधी आहे. व्यक्तीचे स्खलन झाले म्हणजे, याचा अर्थ ती व्यक्ती अपात्र आहे असा होत नाही. तसेच एखाद्या गोष्टीमध्ये एखादी अडचण दीर्घकाळ टिकून राहिली, तर ती गोष्ट त्या व्यक्तीसाठी अशक्यच आहे, असाही याचा अर्थ होत नाही.

जेव्हा तुम्ही निराश होता, तेव्हा तुम्हाला तुमचे नेहमीचे काम सोडून देणे भाग पडते, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही स्थिरता प्राप्त करून घेतलेली नाही. तर याचा अर्थ एवढाच की, जी स्थिरता तुम्हाला प्राप्त झाली आहे, ती स्थिरता हा तुमचा वैयक्तिक गुण नाही तर, तुम्ही श्रीमाताजींशी जो संपर्क राखू शकता, त्यावर तो गुण अवलंबून आहे. कारण त्याच्या पाठीशी आणि तुम्ही जी काही प्रगती करू शकता, त्या सर्व प्रगतीच्या पाठीशी श्रीमाताजींची शक्ती असते. त्या शक्तीवर अधिकाधिक विसंबून राहायला शिका, त्या शक्तीप्रत अधिकाधिक पूर्णतेने स्वतःला खुले करा आणि ज्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्ही प्रयत्नशील असता, ती प्रगतीसुद्धा स्वतःसाठी नाही तर ईश्वराखातर करत आहात, हे लक्षात ठेवा – जर असे केलेत, तर तुम्ही या मार्गावर सहजतेने प्रगत होऊ शकाल. अगदी बाह्यवर्ती शारीर जाणिवेमध्येसुद्धा पूर्णपणे चैत्य खुलेपणा राखा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 113-114)

मानसिक परिपूर्णत्व – १७

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

ईश्वरी कृपेविषयी कोणतीच शंका घेण्याचे कारण नाही. जर माणूस प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत पोहोचेलच, हे म्हणणेही अगदी खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तो अगदी लगेचच, सहजपणे, कोणताही विलंब न लागता पोहोचेल. इथेच तुमची चूक होत आहे. तुम्ही देवासाठी पाच वर्षे, सहा वर्षे, अमुक इतकी वर्षे असा कालावधी नेमून देत आहात आणि अजूनपर्यंत कोणताच परिणाम दिसत नाही म्हणून त्याविषयी शंका घेत आहात. एखादी व्यक्ती ही तिच्या गाभ्यामध्ये प्रामाणिक असू शकते आणि तरीही तिच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्या गोष्टींमध्ये, साक्षात्कार होण्यापूर्वी परिवर्तन घडविण्याची आवश्यकता असते. व्यक्ती तिच्या प्रामाणिकपणामुळे नेहमीच चिकाटी बाळगण्यास सक्षम झाली पाहिजे. कारण ईश्वरासाठीची तळमळच अशी असते की, जी कशामुळेही मावळू शकत नाही. विलंबामुळे, निराशेमुळे, कोणत्याही अडचणीमुळे किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे ही इच्छा मावळता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 116-117)

मानसिक परिपूर्णत्व – १६

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्त्तर देत आहेत.)

मी बलवान अशा केंद्रवर्ती आणि शक्यतो परिपूर्ण श्रद्धेविषयी तुमच्याशी बोललो; कारण तुम्ही फक्त परिपूर्ण अशा प्रतिसादाचीच तमा बाळगता असे दिसते. म्हणजे इतर साऱ्या गोष्टी तुम्हाला समाधान देणाऱ्या नाहीत; साक्षात्कार, ईश्वरी अस्तित्व यांचेच तुम्हाला मोल आहे. मात्र ते तुम्हाला तुमच्या प्रार्थनेमधून गवसत नव्हते. परंतु निव्वळ प्रार्थनेद्वारे या गोष्टी लगेचच प्राप्त होतील, असे सहसा घडत नाही. जर का केंद्रामध्ये ज्वलंत श्रद्धा असेल किंवा अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये परिपूर्ण श्रद्धा असेल तरच तसे घडून येते. परंतु ह्याचा अर्थ असा मुळीच होत नाही की, ज्यांची श्रद्धा तितकी खंबीर नाही, किंवा ज्यांचे समर्पण परिपूर्ण नाही ते तिथवर पोहोचूच शकत नाहीत. परंतु मग बहुतेक वेळा, त्यांना आधी छोट्या छोट्या पायऱ्या पार कराव्या लागतात; आणि जोवर प्रयत्नसातत्याद्वारे किंवा तपस्येद्वारे पुरेसे खुलेपण प्राप्त होत नाही तोवर, त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. अगदी डळमळणारी श्रद्धा आणि संथ, आंशिक समर्पण ह्यांचीसुद्धा स्वत:ची म्हणून काहीएक शक्ती असते, त्यांचे स्वत:चे असे काही परिणाम असतात. तसे नसते तर, अगदी मोजक्याच लोकांना साधना करणे शक्य झाले असते. केंद्रवर्ती श्रद्धा म्हणजे वर किंवा मागे असलेल्या आत्म्याच्या केंद्रवर्ती अस्तित्वावर श्रद्धा असे मला म्हणावयाचे आहे. ही अशी श्रद्धा असते की, जेव्हा मन शंका घेते, प्राण खचून जातो, आणि शरीर ढासळू पाहते तेव्हाही ही श्रद्धा टिकून असते. आणि जेव्हा हा हल्ला संपतो, तेव्हा ही श्रद्धा पुन्हा उसळून येते आणि पुन्हा एकदा मार्गावर वाटचाल करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करते. ती बळकट आणि तेजस्वी असू शकते, ती फिकी, दिसायला दुबळी अशी असू शकते; पण तरीदेखील ती प्रत्येक वेळी सतत टिकून राहिली तर, मग ती खरीखुरी श्रद्धा होय. निराशा आणि अंधकाराचे झटके ही साधनामार्गावरील एक परंपराच आहे. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य योगमार्गांमध्ये तो जणू काही एक नियमच असल्यासारखे दिसते. मला ते स्वतःलादेखील ज्ञात आहे. पण माझ्या अनुभवातून मला असे उमगले की, ह्या अनावश्यक परंपरा आहेत आणि व्यक्तीने जर ठरविले तर, व्यक्तीची त्यापासून सुटका होऊ शकते. म्हणूनच जेव्हा केव्हा या गोष्टी तुमच्यामध्ये किंवा इतरांमध्ये आलेल्या मला आढळतात, तेव्हा मी त्यांना श्रद्धेच्या शिकवणीपुढे उचलून घेऊ पाहतो. आणि तरीसुद्धा जर निराशा आणि अंधकाराचे झटके आलेच तर, व्यक्तीने शक्य तितक्या त्वरेने त्यातून बाहेर पडावे आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात पुन्हा यावे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 95-96)

मानसिक परिपूर्णत्व – १५

 

आत्मप्रकाशाशी आणि ईश्वरी हाकेशी एकनिष्ठ राहण्यासंबंधी मी जे बोलत होतो त्यामध्ये, मी तुमच्या गतायुष्यातील कोणत्या गोष्टीविषयी किंवा तुमच्यामधील एखाद्या उणिवेविषयी बोलत नव्हतो. तर सर्व संघर्षामध्ये, हल्ल्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या एका गोष्टीकडे निर्देश करत होतो – सत्यप्रकाशाला, सत्याच्या हाकेला विरोध करणाऱ्या कोणत्याही सूचना, आवेग, प्रलोभन यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्याच्या आवश्यकतेकडे, मी निर्देश करत होतो. सर्व शंकाकुशंका आणि निराशेच्या वेळी असे म्हणावे की, ”मी ईश्वराचा आहे, मी अपयशी होऊ शकणार नाही.” अशुद्धतेच्या आणि अपात्रतेच्या सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, ”मी ईश्वराने निवडलेले अमर्त्यतेचे बालक आहे. मी फक्त माझ्याशी आणि ईश्वराशी प्रामाणिक असावयास हवे, तर विजय निश्चित आहे; अगदी मी जरी पडलो, धडपडलो तरी मी खात्रीने पुन्हा उभा राहीन.” कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करण्यासाठी, या उच्च्तर ध्येयापासून दूर जाऊ पाहणाऱ्या सर्व आवेगांना उत्तर द्यावे की, “हे सर्वात महान असे ध्येय आहे. माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे समाधान करू शकेल असे हे एकमेव सत्य आहे; या दिव्यत्वाच्या प्रवासामध्ये कितीही परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने ध्येयापर्यंत पोहोचेनच.” ‘प्रकाशाशी आणि हाकेशी एकनिष्ठता’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा होता.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 99)