मानसिक परिपूर्णत्व – ०४

 

एकमेव अनिवार्य आवश्यक अट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.
*
प्रामाणिकपणा म्हणजे काय ? प्रामाणिकपणा म्हणजे कोणत्याही कनिष्ठ शक्तींचे प्रभाव न स्वीकारता, केवळ ईश्वरी प्रभावच स्वीकारणे.
*
सर्वथा ईश्वराकडेच वळणे आणि केवळ ईश्वरी आवेगच तेवढे स्वीकारणे म्हणजे प्रामाणिकपणा. तसे बनण्याची खरीखुरी, सततची इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रामाणिकपणा होय.
*
प्रामाणिकपणा म्हणजे तुमची इच्छा ही खरीखुरी इच्छा असली पाहिजे. “मी अभीप्सा बाळगतो’ असा जर का तुम्ही नुसताच विचार कराल आणि त्या अभीप्सेशी विसंगत अशा गोष्टी करत राहाल किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छावासनांचीच पूर्ती करत राहाल किंवा विरोधी असणाऱ्या प्रभावांप्रत स्वतःला खुले कराल, तर ती इच्छा प्रामाणिक नाही, असे समजावे.
*
प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराभिमुख असलेल्या सर्वोच्च अभीप्सेला, विरोध करण्यास आपल्यामधील कोणत्याच भागाला संमती न देणे.
*
सर्व प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम नक्कीच होतो; जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही ईश्वरी जीवनामध्ये उन्नत होता. पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे – फक्त आणि फक्त ईश्वरी सत्याचीच अभीप्सा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या वैयक्तिक सर्व मागण्या व वासना यांचा परित्याग करणे; जीवनातील प्रत्येक कृती ही ईश्वरालाच समर्पण करणे आणि कोणताही अहंकार आड येऊ न देता, ते कार्य ईश्वराने दिलेले आहे असे मानून कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे. व्यक्ती एकाएकी एकदम अशी होऊ शकत नाही. पण जर ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून तिचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ इच्छेने, नेहमी धावा करत राहील; तर व्यक्ती या चेतनेप्रत अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 50-51)

मानसिक परिपूर्णत्व – ०३

 

….आध्यात्मिक प्रयत्नांसाठी प्रामाणिकपणा ही अगदी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कुटिलता हा कायमस्वरूपी अडथळा आहे. सात्विक प्रवृत्ती ही आध्यात्मिक जीवनासाठी नेहमीच योग्य आणि तयार अशी मानण्यात आली आहे, तर राजसिक प्रवृत्ती ही मात्र इच्छाआकांक्षाच्या भाराने दबून जाते. त्याच वेळी हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही गोष्ट द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी जर का कशाची आवश्यकता असेलच तर ती, ऊर्ध्वमुख अभीप्सेची असते.

आणि ही अभीप्सा (Aspiration) सात्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही उदित होऊ शकते. जशी एखादी सात्विक प्रवृत्तीची व्यक्ती तिच्या गुणांच्या अतीत होऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, ईश्वरी शुद्धता, प्रकाश आणि प्रेमाप्रत वळू शकते. अर्थात, जेव्हा व्यक्ती स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय प्राप्त करून घेईल आणि स्वतःमधून ती फेकून देईल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण ती जर पुन्हा कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती व्यक्ती मार्गभ्रष्ट होण्याची पण शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती त्यामध्ये रमलेली असते तोपर्यंत तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहासामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी वा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रुपांतर होताना वारंवार आढळून आले आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये चैतन्याचे जगाई आणि मधाई, बिल्वमंगल आणि त्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी ईश्वराच्या घराचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात मग त्या माणसाच्या भूतकाळातील ठोकरा किंवा चुका किती का असेनात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावर अनुक्रमे असणारी तेजस्वी व काळोखी आवरणे होत. पण जेव्हा ही आवरणे भेदली जातात तेव्हा, आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, ती दोन्ही आवरणे चांगली भाजून निघतात.

ईश्वरासमोरील विनम्रता ही देखील आध्यात्मिक जीवनाची एक अनिवार्य अट आहे आणि आध्यात्मिक गर्व, उद्धटपणा किंवा घमेंड आणि स्वतःवरील फाजील विश्वास या गोष्टी नेहमीच खाली खेचणाऱ्या असतात. या मार्गावरील अडचणी लक्षात घेता, ईश्वरावरील विश्वास आणि स्वतःच्या आध्यात्मिक नियतीवरील श्रद्धा (म्हणजे, मी अंतःकरणपूर्वक, जीवाच्या निकराने ईश्वराचा शोध घेत आहे; त्यामुळे एक ना एक दिवस मी त्याच्यापर्यंत पोहोचेनच हा विश्वास) या गोष्टी खूपच आवश्यक असतात. ईश्वर सगळ्यांमध्येच असल्यामुळे, इतरांचा तिरस्कार करणे या गोष्टीला येथे थाराच नाही. अंतिमतः, माणसाच्या कृती आणि आकांक्षा या कधीच क्षुल्लक आणि निरुपयोगी असत नाहीत कारण, सगळे जीवन म्हणजेच अंधकारातून प्रकाशाकडे चाललेली जीवाची वाटचाल असते. आमचा दृष्टिकोन असा आहे की, राजकारण, सामाजिक सुधारणा, परोपकार यांसारख्या मानवाने स्वीकारलेल्या कोणत्याही सामान्य मार्गाने, मानवता स्वतःच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तात्पुरती केलेली मलमपट्टी असते. यातून खरी सुटका ही जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्यावरच घडून येते; व्यक्ती आपल्या जीवाच्या अधिक महान, अधिक व्यापक आणि अधिक विशुद्ध अशा पद्धतीत परिवर्तित होईल आणि त्यावर आधारित कृती करू लागेल, जीवन जगू लागेल तेव्हाच यामधून सुटका घडून येते. एकदा का आध्यात्मिक दिशा निश्चित झाली की मग, व्यक्तीने आपली सारी ऊर्जा त्या दिशेनेच वळविली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 42-43)

मानसिक परिपूर्णत्व – ०२

 

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

*

व्यक्तीला जर ईश्वर हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धीकरण प्रक्रिया पण ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि त्याला आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्याला देऊ करावेत, ही जी तुमची योगाविषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी तसे लिहिले होते. मला असे म्हणावयाचे होते की, असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते.

पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असावयास हवा, भरवसा असावायास हवा आणि समर्पणाची इच्छा असावयास हवी. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर न विसंबता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत आहे. यामध्ये व्यक्तीची सारी श्रद्धा आणि विश्वास ईश्वरावरच असणे आणि त्याने उत्तरोत्तर आत्मसमर्पण प्रगत करत राहणे अभिप्रेत आहे. खरंतर, हेच साधनेचे तत्त्व आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे. मला वाटते, रामकृष्णांनी मांजराच्या पिल्लाची जी प्रतिमा वापरली आहे, ती पद्धत हीच आहे. पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येत नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69 – 70)

तुम्हाला जर बरे व्हायचे असेल तर दोन अटी आहेत. पहिली अट अशी की, तुम्ही भीती बाळगता कामा नये, अगदी निर्भय राहायला हवे. आणि दुसरी अट अशी की, तुमच्यामध्ये ईश्वरी संरक्षणाबद्दल पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 15: 141)

अंतिम विजयाविषयी कोणतीही शंका न बाळगता योगमार्गावरून वाटचाल करा – तुम्हाला अपयश येऊच शकणार नाही! शंकाकुशंका या क्षुल्लक गोष्टी आहेत; अभीप्सेचा अग्नी प्रज्ज्वलित ठेवा, हाच तो अग्नी असतो जो विजयी होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28: 347)

एकत्व – ११

 

नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकडूनच केली जात आहे ह्याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, इतकेच काय पण तुमच्या अगदी सामान्यातिसामान्य, खाण्यापिण्यासारख्या अगदी बाह्य गोष्टीसुद्धा त्या ईश्वरालाच समर्पित करा. जेव्हा तुम्ही जेवण करत असाल तेव्हा, तुम्हाला असे जाणवले पाहिजे की, तो ईश्वरच तुमच्या माध्यमातून अन्नग्रहण करत आहे. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमच्या सगळ्याच हालचाली ह्या एका अस्तित्वामध्ये एकत्रित कराल, तेव्हाच तुम्ही विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगू लागाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23-24)

जग जसे आहे तसे आहे. जग क्षुद्रतेने आणि अंधकाराने भरलेले आहे; त्याला तुम्हास अस्वस्थ करण्याची मुभा देऊ नका. केवळ ईश्वरच प्रकाश आणि व्यापकता, सत्य आणि करुणा आहे. म्हणून त्या ईश्वराचाच आश्रय घ्या आणि जगाच्या क्षुद्रतेविषयी काळजी करू नका; केवळ ईश्वराची उपस्थिती, त्याच्या शांती व निश्चलतेसहित तुमच्यामध्ये बाळगा.

– श्रीमाताजी
(White roses : 02)

एकत्व – १०

 

जागतिक परिस्थितीबद्दल श्रीमाताजी येथे बोलत आहेत. – मला आता खात्रीच पटली आहे की, हा सगळा जो गोंधळ चालू आहे तो, आपण आपले दैनंदिन जीवन कसे जगले पाहिजे हे शिकविण्यासाठीच चाललेला आहे. म्हणजे असे की, काय घडणार आहे, कसे होईल, याविषयी व्यग्र न राहता, व्यक्तिने जे कर्म करावयास हवे त्यामध्ये स्वतःला रोज व्यस्त ठेवले पाहिजे. सगळे विचार, पूर्वनियोजनं, व्यवस्था, सारे सारे काही हे या अव्यवस्थेलाच अनुकूल आहेत.

ऊर्ध्वमुख होत, अभीप्सा बाळगत क्षणाक्षणाला जीवन जगणे, त्या त्या क्षणाला जी गोष्ट करणे आवश्यक आहे, केवळ त्याकडेच लक्ष पुरविणे आणि बाकी सारे काही त्या सर्व-साक्षी चेतनेला ठरवू देणे… कितीही व्यापक दृष्टी असली तरी, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकत नाहीत. आपण त्या आंशिकरित्याच जाणू शकतो, अगदीच आंशिकपणे जाणू शकतो. त्यामुळे आपले लक्ष इकडे किंवा तिकडे वेधले जाते, आणि आणखीही इतर काही गोष्टी असतातच. भयंकर आणि हानीकारक गोष्टींना जास्त महत्त्व दिल्यामुळे, आपण त्यांना अधिकच बळकटी देत असतो.

जेव्हा तुमच्यावर अशा गोंधळाचा आणि अशा प्रकारच्या अव्यवस्थेचा आघात होतो तेव्हा, तुम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे. जेथे तुम्हाला केवळ एकमेवाद्वितीयाचेच, एकमेव चेतनेचे, एकमेव शक्तिचे दर्शन घडेल अशा चेतनेमध्ये प्रवेश करावयाचा – तेथे केवळ एकमेव एकात्मता आहे. जे जे सर्व काही घडत आहे ते ह्या एकात्मतेमध्येच घडत आहे. आपली सारी क्षुल्लक दृष्टी, जाणकारी, आपली मते हे सगळं सगळं त्या चेतनेच्या तुलनेमध्ये काहीच नाही, या सर्वाला व्यापून असणाऱ्या चेतनेच्या तुलनेमध्ये हे अगदीच अणुवत आहे. त्यामुळे, ज्या कोणाकडे थोडीशीही तर्कबुद्धी असेल त्याला हे समजून येईल की, स्वतंत्र अस्तित्वं निर्माण का झाली. व्यक्तिला हे कळू शकेल की, अभीप्सा बाळगण्यासाठी, अभीप्सा असावी ह्याचसाठी, आत्मदान, समर्पणप्रक्रिया असावी ह्याचसाठी, विश्वास आणि श्रद्धा बाळगता यावी ह्याचसाठी स्वतंत्र व्यक्तित्वं अस्तित्वात आली. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची घडण झाली ती ह्याच कारणासाठी. आणि मग तुम्ही काय करावयास हवे ? तर संपूर्ण सचोटीने, तीव्रतेने तुम्ही तो ईश्वरच व्हावयास हवे.. हेच केवळ आवश्यक आहे.

हीच एकमेव आवश्यक अशी गोष्ट आहे, ही एकच गोष्ट टिकून राहणारी आहे. बाकी सारे काही – स्वप्नातल्याप्रमाणे क्षणभंगुर आहे.
– श्रीमाताजी
(CWM 11 : 184-185)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

भीती म्हणजे मूक संमती असते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती बाळगता तेव्हा, तिची संभाव्यता तुम्ही मान्य करता असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे तुम्ही तिचे हात बळकट करत असता. ती अवचेतन संमती असते असे म्हणता येईल. भीतीवर अनेक मार्गांनी मात करता येते. धैर्याचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा मार्ग हे त्यापैकी काही मार्ग आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14:243-244)

एकत्व – ०९

 

इच्छावासना आणि त्यासारख्या इतर गोष्टी शंभरापैकी नव्वद वेळा तरी तुमच्याकडे इतर कोणाकडून तरी, किंवा एका विशिष्ट परिस्थितीमधून, किंवा परिस्थितीच्या संचाकडून आलेल्या असतात किंवा एखाद्या दुसऱ्याच व्यक्तिकडून किंवा इतर अनेक लोकांकडून आलेले ते स्पंदन असते. त्यामधील फरक कळणे ही गोष्ट खूपच सोपी आहे, फरक करण्याची पहिली कोणती गोष्ट असेल तर ती हीच. ते एक असे स्पंदन असते की, जे अचानकपणे तुमच्या मधील त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या कशाला तरी जागे करते. कशाचातरी तुमच्यावर प्रभाव पडतो आणि ह्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये एक प्रतिसाद जागा होतो, ज्याप्रमाणे तुम्ही एखादा स्वर वाजवत असता तेव्हा होते तसेच. वासनेचे एक स्पंदन येते आणि विशिष्ट प्रकारे तुमच्यावर हल्ला करते आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देता.

व्यक्ती सातत्याने सामूहिक सूचनांच्या गर्दीमध्ये वावरत असते, अगदी सातत्याने. उदाहरणार्थ, मला माहीत नाही, तुम्ही कधी अंत्ययात्रेला गेलेला आहात की नाही ते, किंवा एखाद्या घरात जिथे व्यक्तिचे निधन झाले आहे, अशा घरात तुम्ही गेला आहात की नाही ते मला माहीत नाही. अर्थातच तुम्ही स्वतःचे थोडेफार तरी निरीक्षण करत असला पाहिजेत, तसे नसेल तर मग तुम्हाला काहीच जाणवणार नाही – परंतु तुम्ही थोडेफार जरी निरीक्षण करत असाल तर, तुमच्या असे लक्षात येईल की, त्या निधन पावलेल्या व्यक्तिबद्दल दुःख वाटावे, शोक वाटावा असे खरंतर काहीच कारण नव्हते; तुमच्या लेखी ती व्यक्ती इतर अनेक व्यक्तिंप्रमाणेच होती. वास्तविक सामाजिक परिस्थितीचा सामायिक परिणाम म्हणून तुम्ही त्या घरी गेलेला असता. आणि तेथे, का कोण जाणे पण एकाएकी, काहीही कळत नसताना, तुम्हाला एकदम खूप दुःख, गहिरे दुःख जाणवते, तशी खूप तीव्र भावना तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुम्ही स्वतःलाच विचारता, “मी इतकी का बरे दुःखी आहे ?” तर त्याचे उत्तर असे की, ती भावना म्हणजे दुसरी तिसरी काही नसते, तर त्या स्पंदनांनी तुमच्यामध्ये प्रवेश केलेला असतो.

हे निरीक्षण करण्यासाठी अगदीच सोपे आहे. मी अगदी लहान होते तेव्हा हा अनुभव मला आलेला होता. तेव्हाही मी योगसाधना करत होते पण ती जागरुकपणे करत नव्हते. आणि तरीदेखील मी याचे अगदी स्पष्टपणे निरीक्षण केले होते. मी मलाच समजावून सांगितले, “नक्कीच, जे मला जाणवत आहे ते त्या इतरांचे दुःख आहे, कारण त्या व्यक्तिच्या जाण्याचा माझ्यावर काही खास परिणाम व्हावा असे काहीच कारण नाहीये.” आणि त्याचवेळी अचानक माझे डोळे अश्रूंनी भरून आले; गळा दाटून आला आणि मला रडावेसे वाटू लागले, जणू काही मी खूप दुःखामध्ये आहे – मी तेव्हा अगदीच लहान होते पण तेव्हा देखील चटकन माझ्या लक्षात आले की, “त्यांच्या दुःखाने माझ्यामध्ये प्रवेश केला आहे.”

हीच गोष्ट रागाबाबत देखील असते. हे अगदी उघड आहे, व्यक्ती कोणत्यातरी व्यक्तिकडून किंवा वातावरणातून – हो, वातावरणामध्ये तो असतो – त्या वातावरणातून अचानकपणे तो राग तुमच्यामध्ये शिरतो आणि तो सहसा खालून तुमचा ताबा घेतो, तो वर वर चढत जातो आणि तो राग मग तुमच्या मस्तकात जातो. अगदी एक मिनिटापूर्वी तुम्ही शांत असता, तुम्ही अगदी स्वतःमध्ये मग्न असता, तुमचा तोल ढळण्याचे तसे कोणतेच कारणही नसते. आणि अचानक तो राग तुमचा इतक्या ताकदीने ताबा घेतो की, तुम्हाला तो आवरतच नाही कारण तुम्ही पुरेसे जागृत नसता, तुम्ही त्याला खुशाल आत शिरकाव करू देता आणि मग तो तुमचा वापर करतो.. ज्याला तुम्ही स्वतः असे म्हणता, त्याचा वापर तो करतो. म्हणजे तुमच्या शरीराचा ! कारण वरवर पाहता तरी, शरीर हीच तुमच्यातील अशी गोष्ट असते की, जी तुम्हाला तुमच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तिच्या शरीरापेक्षा वेगळी करते. अर्थात, हा सुद्धा एक दृष्टिभ्रम आहे; कारण वस्तुतः सदासर्वकाळ ज्याला सूक्ष्मकण म्हणता येतील असे अगदी भौतिक कण असतात, फाकले जाणारे किरण असावेत तसे ते तुमच्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि इतरांच्या सूक्ष्मकणांमध्ये मिसळत असतात. आणि त्यामुळेच व्यक्ती जर पुरेशी संवेदनशील असेल तर, दुसऱ्याचे अस्तित्व एखाद्या व्यक्तिला दूर अंतरावरून देखील जाणवू शकते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 53-55)