श्रीअरविंदांच्या क्रांतदर्शी दृष्टीला जे दर्शन झाले होते त्याला मूर्त रूप देण्याचे कार्य श्रीमाताजींवर सोपविण्यात आले होते. नवचेतनेला अभिव्यक्त करणाऱ्या आणि तिला मूर्त रूप देणाऱ्या एका नवीन जगताच्या, एका नव्या मानवतेच्या, एका नवीन समाजाच्या निर्मितीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. मूलत:च हा एक असा सामूहिक आदर्श आहे की, जो सामूहिक प्रयत्नांसाठी साद घालत आहे; जेणेकरून मानवी पूर्णत्व सर्वांगाने प्रत्यक्षात येईल.

श्रीमाताजींनी केलेली आश्रमाची स्थापना व त्याची उभारणी हे या ध्येयपूर्तीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते. मानववंशाच्या सामूहिक जीवनात, शरीर आणि अंतरात्मा, प्रकृती आणि पुरुष, पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यात सुमेळ प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा पाया व्यापक करू पाहणारा ऑरोविल हा प्रकल्प होय. ते अधिक बाह्य असे पुढचे पाऊल होय.

*

युनेस्कोसाठी संदेश

अतिमानसिक वास्तवाचे आगमन पृथ्वीवर त्वरेने घडून यावे यासाठी ऑरोविलची निर्मिती आहे.

जग जसे असावयास हवे तसे ते नाही असे ज्यांना वाटते, त्या सर्वांच्या सहकार्याचे येथे स्वागत आहे.

प्रत्येकाला हे माहीत असायलाच हवे की, त्याला मृत्युपंथाला लागणाऱ्या जुन्यापुराण्या जगामध्ये सहयोगी व्हावयाचे आहे का जन्मण्याच्या तयारीत असणाऱ्या नूतन अशा, अधिक चांगल्या जगतासाठी कार्य करावयाचे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 204), (CWM 13 : 215)

श्रीमाताजी