मध्यवर्ती विचार
जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ईश्वराच्या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये देवाला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण ”सर्व प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे कारण ती देवाच्या पुत्रांना (मानवांना) साक्षात्कार होण्याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आमच्या स्मरणात असला पाहिजे.
म्हणून मी आज तुम्हाला ह्या गोष्टींची आठवण करून दिली. एखाद्या दुर्मिळ हिऱ्याप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात ह्या विचाराची जपणूक करून मार्गक्रमण केले आणि त्याला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे काम आपल्यामध्ये करू देण्यास मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे एकत्व आपण अनुभवू शकतो.
तेव्हा आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल; आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जाताना, आपला मंद अहंकार, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी कोसळून पडताना आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंधांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व वाहून जात असल्याचे आपल्याला जाणवेल.
व्यक्तिमधील आत्मा आणि वैश्विक आत्मा हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे.
– श्रीमाताजी
(CWM 02 : 40-41)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025