आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व कृतींचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा व्यक्ती रूपांतरणाविषयी बोलत असे तेव्हा तिला केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही निगूढ चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून धुत्कारत असे.
परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही निगूढ अशा सत्याची अभिव्यक्ती करावी, अशी त्या सत्याकडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, – हे कार्य की, जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी – तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे, सघनपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या सत्याचा चरम आविष्कार असेल – किमान आत्ताच्या घडीपुरता तरी ‘चरम’.
या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रहणशीलता, याबद्दल आपण या आधीही बोललो आहोत. रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते.
चेतनेचे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी ह्यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णतया जिवंतच झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा काहीसे असेच घडून येते. खूप काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची जाणीव नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल नाही असेच तुम्हाला वाटत असते. जर का तुमच्यापाशी तीव्र अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोध देखील जाणवतो; जणू काही तुम्ही एखाद्या भिंतीवर धक्के देत असता पण ती काही पडत नाही. पण जेव्हा तुम्ही अंतरंगातून सिद्ध झालेला असता तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धक्के देण्याचा एक प्रयत्न – आणि मग सर्वकाही खुले होते आणि तुम्ही एका आगळ्यावेगळ्या चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 18-19)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…