समग्र अस्तित्व - ईश्वराचे साधन

 

आमच्या योगमार्गात पहिली जरुरीची गोष्ट ही आहे की, आमच्या मनाची जुनी केंद्रभूत सवय आणि दृष्टी पार मोडून काढावयाची; ही सवय आणि दृष्टी बहिर्मुख असते; बाह्य विश्वव्यवस्थेत आपला स्वतःचा विकास करावा, आपली स्वतःची तृप्ती करून घ्यावी, आपले स्वतःचे हितसंबंध सांभाळावे, ह्यावरच जुन्या सवयीचे व दृष्टीचे लक्ष खिळलेले असते. म्हणून मनाचे हे जुने वळण व दृष्टी पार मोडून काढणे ही आमच्या योगात पहिली जरुरीची गोष्ट मानली जाते. मनाच्या ह्या बहिर्वर्ती सवयीची व दृष्टीची जागा – जिला फक्त ईश्वरच दिसतो आणि ईश्वरप्राप्तीसाठीच जिची धाव असते अशा – सखोल श्रद्धेने व दृष्टीने घेणे हे या योगामध्ये आवश्यक असते.

दुसरी जरुरीची गोष्ट ही असते की, आमच्या निम्नतर अस्तित्वाने या नव्या श्रद्धेला आणि महत्तर दृष्टीला आपली निष्ठा अर्पण करावी, किंवा आम्ही त्यास तसे करावयास लावावे. आमच्या सर्व प्रकृतीने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे; नवदृष्टिहीन इंद्रियरूप मनाला भौतिक जग आणि त्यातील वस्तू यांजहून जे आंतरिक जग कितीतरी कमी सत्य वाटते, त्या आंतरिक जगासाठी आमच्या प्रकृतीच्या प्रत्येक अंगाने, आणि प्रत्येक व्यापाराने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे. आमच्या सर्व अस्तित्वाने – आमचा आत्मा, मन, इंद्रियगण, हृदय, इच्छा, प्राण, शरीर या सर्वांनी आपल्या सर्व शक्ती इतक्या पूर्णतेने, अशा रीतीने ईश्वरचरणी समर्पित करावयास हव्यात की, ज्यायोगे आमचे समग्र अस्तित्व हे ईश्वराचे सुयोग्य साधन होईल.

हे घडवून आणणे हे काही सोपे काम नाही; कारण जगातील प्रत्येक वस्तू एका ठाम चाकोरीतून चालत असते; ही चाकोरी, ही सवय हाच तिचा कायदा असतो; कोणत्याही वस्तूला आमूलाग्र बदल नको असतो; ती अशा बदलाला विरोध करते आणि पूर्णयोग तर जी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या क्रांतीहून कोणताही बदल अधिक आमूलाग्र असू शकत नाही.

पूर्णयोगाचा अभ्यास करीत असताना प्रकृतीच्या प्रत्येक अंशाला केंद्रभूत श्रद्धेकडे, इच्छेकडे सतत ओढून आणावे लागत असते. उपनिषदांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर, प्रत्येक विचाराला व ऊर्मीला ही आठवण करून द्यावी लागते की, “येथे लोक ज्याची ईश्वर म्हणून उपासना करत आहेत तो ‘ईश्वर’ नसून; तो ईश्वर ‘तेथे’ आहे.”

प्राणातील प्रत्येक तंतू, जे जीवन आजवर आपले स्वाभाविक जीवन म्हणून मानत आला आहे, त्या जीवनाचा आत्यंतिक त्याग करण्यास त्याने मान्यता द्यावी यासाठी त्याला समजावून सांगितले पाहिजे. मनाने आपले मनपण टाकून द्यायला हवे आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तत्त्वाच्या प्रकाशाने प्रकाशमय व्हावयास हवे. प्राणाने आपले रूप बदलून अत्यंत व्यापक, शांत व समर्थ असे नवे रूप घ्यावयास हवे; आपले जुने, आंधळे, तळमळ करणारे, संकुचित रूप व आपल्या जुन्या क्षुद्र उर्मी आणि वासना नव्या रूपातील प्राणाला आपल्या म्हणून ओळखता येणार नाहीत इतकी नवीनता त्याच्या नव्या रूपात यावी लागते.
शरीरालादेखील परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जावे लागते; आज ते, म्हणजे मार्गातील अडथळा ठरणारी धोंड आहे किंवा ‘हे हवे’ ‘ते हवे’, असा ओरडा करणारा पशु आहे; हे आपले रूप टाकून त्याला आत्म्याचा सुबुद्ध सेवक व्हावे लागते, आत्म्याचे तेजस्वी साधन व्हावे लागते, आत्म्याचे जिवंत रूप व्हावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 72-73)

आमचे सर्व जाणीवयुक्त अस्तित्व ईश्वराशी संपर्क साधेल, ईश्वराशी नाते जुळवेल असे केले पाहिजे; ईश्वराला आम्ही हाक दिली पाहिजे आणि त्याने आमच्यात येऊन आमचे सर्व अस्तित्व रूपांतरित करावे, त्याला स्वत:च्या ईश्वराच्या अस्तित्वाचे रूप द्यावे असे आम्ही त्यास आळवले पाहिजे; याचा अर्थ असा की, आमच्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनला पाहिजे, आणि योगाचा प्रभु या नात्याने त्याने आमच्या खालच्या व्यक्तितेला दिव्य रूपांतराचे केंद्र, स्वत:च्या व्यक्तितेच्या पूर्णतेचे साधन बनवले पाहिजे. या साधना-पद्धतीचा अभ्यास केला असता, त्याचा योग्य तो परिणाम घडून येतो.

दिव्य प्रकृतीच्या कल्पनेत मग्न असलेल्या आमच्या जाणिवेचे, जाणीवशक्तीचे दडपण, अर्थात आमच्या तपाचे दडपण आमच्या एकंदर अस्तित्वावर पडून, या दडपणाला अनुरूप अशी अभिव्यक्ति, अनुभूति आमच्यात घडून येते. अर्थात आमच्या मर्यादित अंधकारमय अस्तित्वावर दिव्य, सर्वज्ञ, सर्वकारक ईशतत्त्व उतरून, आमच्या सर्व निम्नतर प्रकृतीला क्रमशः अधिकाधिक प्रकाश देऊन, अधिकाधिक समर्थ करते आणि कमी दर्जाचे मानवी ज्ञान व मर्त्य क्रिया सर्वथा बाजूला सारून, त्याच्या जागी आपली स्वत:ची क्रिया चालू करते.

या साधनेच्या कार्याचे मानसशास्त्रीय स्वरूप सांगायचे तर असे म्हणता येईल की, या पद्धतीमुळे अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रासह, सर्व साधनसंभारासह क्रमशः अहंभावातीत परमतत्त्वाच्या स्वाधीन होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, हा मार्ग जवळचा मार्ग नाही, तेथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहून अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. या मार्गात तीन टप्पे असतात; केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमय असते.

पहिला टप्पा : या टप्प्यांत आमचा अहंभाव हा ईश्वराशी संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यांत केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याने होत असते, खालच्या प्रकृतीने वरच्या प्रकृतीचे स्वागत करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे ह्यासाठी खालच्या प्रकृतीची व्यापक व परिपूर्ण तयारी करावयाची असते. त्यामुळे हे काम मोठ्या कष्टाचे असते; हा झाला दुसरा टप्पा.

तिसरा टप्पा : खालच्या प्रकृतीचे या टप्प्यांत वरच्या प्रकृतीत अंतिम रूपांतर होत असते. हा शेवटला टप्पा आनंदमय व लवकर चालून संपतो. बाकी दोन टप्प्यांसाठी महान श्रद्धा, धैर्य, सबुरी लागते, हे वर आलेच आहे. तथापि, एक गोष्ट येथे सांगणे योग्य होईल की, वास्तवांत ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आम्हांकडे बघत असते व ती आमचा दुबळेपणा पाहून स्वत:च पुढे होते आणि आम्हाला आधार देते. आमची श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी आम्हाला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती ‘आंधळ्याला पाहण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते ‘, असे एका ठिकाणी तिचे वर्णन आहे. आमच्या बुद्धीला ही जाणीव होते की, आम्हाला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आमच्या मदतीला आहे, तिला अशीही जाणीव होते की, आम्हाला मदत मिळत आहे व या मदतीमुळेच आम्ही चढण्याचे कष्ट करू शकत आहोत; आमचे हृदय आम्हाला सांगते की, सर्व वस्तुजाताचा स्वामी आम्हा मानवांचा मित्र आहे; ते सांगते की, विश्वमाता आम्हाला हात देत आहे. आम्ही अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व माता आम्हाला हात देऊन सावरतात. तेव्हा आमच्या बुद्धीची व आमच्या हृदयाची ही जाणीव व हे सांगणे लक्षात घेता, असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाने मिळणारे प्राप्तव्य, यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद

(CWSA 23-24 : 45-46)