सामान्यत: त्याग ह्या संकल्पनेची जी लक्षणे मानली जातात त्याहून ‘त्याग’ ह्या संकल्पनेचा आमचा अर्थ वेगळा आहे.

सामान्यत: त्याग ह्या शब्दाचा अर्थ सुखविषयांचा-त्याग, सुखाचे दमन (inhibition of pleasure), स्वत:चा अव्हेर (Self-denial) असा होतो.

मानवी आत्म्याला त्यागाची ही साधना आवश्यक आहे, कारण अज्ञानामुळे त्याचे हृदय सुखोपभोगांना लगडून बसते. सुखोपभोगांचे दमन आवश्यक ठरते कारण इंद्रियजन्य संवेदना, ह्या इंद्रियोपभोगांच्या परिपूर्तीच्या मधु-कर्दमामध्ये (mud-honey) अडकतात, जणू रुतून बसतात. सुखोपभोगाच्या वस्तूंचा, सुखविषयांचा त्याग करणेही आवश्यक मानण्यात येते कारण, मन विषयाला चिकटते आणि ते एखाद्या विषयाला चिकटून बसले की, त्या विषयाला सोडून पलीकडे जाणे, आणि स्वत:च्या अंतरंगात जाणे त्याला जमत नाही.

माणसाचे मन जर असे अज्ञानी नसते, आसक्तीयुक्त नसते, असे चळवळे, अस्थिर व बंधनप्रिय नसते, वस्तूंच्या आकारांनी फसणारे नसते तर, त्यागाची आवश्यकता भासली नसती; जीवात्मा आनंदमार्गावर प्रवास करू शकला असता; लहान आनंदाकडून मोठ्या आनंदाकडे, दिव्य आनंदाकडून दिव्यतर आनंदाकडे तो प्रवास करू शकला असता. मात्र सध्याच्या स्थितीत असा प्रवास व्यवहार्य नाही.

मन ज्या ज्या गोष्टींना चिकटून बसलेले असते, त्यांच्या वास्तव रूपांची प्राप्ती व्हावयास हवी असेल तर, त्याने त्या प्रत्येक गोष्टीचा अंतरंगातूनच त्याग करावयास हवा. बाह्य त्याग हा अत्यावश्यक नाही, तथापि काही काळ तोही आवश्यक ठरतो; पुष्कळशा बाबतीत तो अपरिहार्य होतो; आणि कधीकधी तर सर्व बाबतीत त्याचा उपयोग असतो.

असे देखील म्हणता येईल की, पूर्ण बाह्य त्याग ही अशी एक अवस्था आहे की, तिच्यातून प्रत्येक जीवात्म्याला, त्याच्या विकासाच्या, प्रगतीच्या कोणत्यातरी कालखंडात असताना, जावेच लागते. मात्र अशा त्यागात केव्हाही अहंकारी आग्रही आत्मपीडनाचे व स्वत:च्या भयंकर छळाचे प्रकार नसावेत, कारण ते आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ईश्वराला अपमानकारक असतात. परंतु शेवटी हा त्याग देखील साधनच असतो, आणि म्हणून त्याचा उपयोग केव्हातरी संपतोच.

जेव्हा एखादी वस्तू आपल्याला तिच्या जाळ्यात ओढू शकत नाही तेव्हा, त्या वस्तूचा त्याग करण्याची आवश्यकता उरत नाही. आता साधकाचा जीव त्या वस्तूचा वस्तू म्हणून उपभोग घेत नसतो तर त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचा आनंद तो घेत असतो. आता सुखाचा संकोच करणेही आवश्यक ठरत नाही; कारण साधक आता सुखासाठी धडपडत नाही तर, सर्व वस्तूंमध्ये समानत्वाने असणाऱ्या ईश्वरी प्रकाशाची त्याला प्राप्ती झालेली असते. त्यामुळे एखादी वस्तू स्वत:ची असली पाहिजे किंवा तिच्यावर आपला भौतिक ताबा असला पाहिजे अशी निकड त्याला भासत नाही. असा जीव आता कोणत्याच गोष्टीवर स्वत:चा हक्क सांगत नाही तर, उलट तो सर्व जीवांमध्ये निवास करून असणाऱ्या त्या एका ईश्वराची इच्छा जाणीवपूर्वकपणे पाळत असतो आणि म्हणून स्वत:चा अव्हेर करण्याची जागाही आता शिल्लक राहत नाही. आणि असे झाले म्हणजे तो प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो आणि आत्म-स्वातंत्र्याप्रत खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 333)

त्याग हा आम्हाला साधन म्हणूनच मान्य होईल; साध्य म्हणून कदापि मान्य होणार नाही; मानवात ईश्वरी पूर्णता प्रकट करणे हे आमचे साध्य आहे व ते सकारात्मक आहे, त्यामुळे त्याग हे नकारात्मक साधन आमचे मुख्य किंवा एकमेव साधन होऊ शकत नाही.

ईश्वराच्या मानवातील आत्मपरिपूर्तीहून वेगळे आणि तिला विरोधी असे जे असेल त्याचा आपण पूर्ण त्याग केला पाहिजे. तसेच या आत्मपरिपूर्तीपेक्षा निम्नतर वा आंशिक अशी जी जी सिद्धी असेल तिचाही आपण क्रमशः त्याग केला पाहिजे.

विश्वातील जीवनावर आपली आसक्ती असता कामा नये. ती जर असेलच तर, तिचा आपण नि:शेष त्याग करावयास हवा. तसेच विश्वातून होणाऱ्या सुटकेविषयी, मुक्तीविषयी, महान आत्मनिर्वाणाविषयीचीही आसक्ती आपल्यामध्ये असता कामा नये. आणि ती असेलच तर, तिचादेखील आपण नि:शेष त्याग केला पाहिजे. हा पूर्ण त्याग आमच्या साध्याला धरून आहे. आम्हाला आसक्ती मुळीच नको आहे; मग ती संसाराविषयी असो वा मुक्तीविषयी असो.

*

आपला त्याग हा आंतरिक त्याग असला पाहिजे हे उघड आहे; आसक्तीमय अशी इंद्रियांची वासना व हृदयाची वासना; विचार आणि आचार यांचा हट्टाग्रह; आणि जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव या तीन गोष्टींचा आपण विशेषेकरून सर्वप्रथम त्याग करणे आवश्यक आहे. आपल्या निम्नतर प्रकृतीशी आपल्याला जखडून ठेवणारी अशी ही तीन बंधने आहेत. ह्या तीन बंधनांचा, आम्ही संपूर्ण त्याग केल्यावर, इतर कोणतेही बंधन आपल्याला बांधू शकत नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या ठिकाणची आसक्ती आणि वासना पूर्णपणे फेकून दिली पाहिजे.

आसक्ती व वासनाविषयक त्याग :

आपण आसक्ती बाळगावी असे या जगात काहीही नाही; ना संपत्ती ना दारिद्रय, ना सुख ना दुःख, ना जीवन ना मरण, ना मोठेपणा ना लहानपणा, ना दुर्गुण ना सद्गुण; ना मित्र ना पत्नी, ना मुलेबाळे, ना देश, ना आपले कर्तव्य, ना सेवाकार्य, ना स्वर्ग, ना पृथ्वी, ना त्यांच्या आतले काही, ना त्यांच्या पलीकडचे काही. अगदी कशाविषयीही आपल्या ठिकाणी आसक्ती असता कामा नये.
मात्र याचा अर्थ असा नव्हे की, आपण कशावरच प्रेम करू नये, कोणताच आनंद उपभोगू नये; कारण आसक्ती म्हणजे प्रेमातील अहंभाव होय, प्रेम नव्हे. वासना म्हणजे विषयोपभोगाची जी भूक आहे त्यातील संकुचितता व असुरक्षितता आहे; तो वस्तुजातातील दिव्यानंदाचा शोध असत नाही.

आचारविचारांचा हट्टाग्रह :

आपल्या कनिष्ठ प्रकृतीशी आपल्याला बांधून ठेवणाऱ्या तीन बंधनांपैकी पहिल्या बंधनाचा, आसक्ती व वासनारूप बंधनाचा विचार झाला. आता दुसरे बंधन, विचार व आचार यांचा हट्टाग्रह. पूर्णत्व मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे आपला अहंकारी आग्रह आपल्याला दिव्यकर्ममार्गात सर्वथा टाकून द्यावा लागतो त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान परिपूर्ण व्हावयास हवे असेल तर तेथेही आपला अहंकारी आग्रह सोडावा लागतो.

जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव :

उपरोक्त स्व-इच्छा म्हणजे मनातील अहंकारच असतो; की जो स्वत:च्या आवडीनिवडी, स्वत:च्या सवयी, स्वत: केलेल्या विचारांच्या, दृष्टिकोनांच्या, आणि इच्छेच्या भूतकाळातील वा भविष्यातील कल्पनांना घट्ट धरून राहतो. कारण त्या कल्पना वा रचना म्हणजेच तो स्वत: आहे किंवा त्या त्याच्या स्वत:च्या आहेत अशी त्याची धारणा असते. आणि मग त्यातून तो ‘मी’ आणि ‘माझे’ यांचे एक अतिशय नाजूक धाग्यांचे जाळे स्वत:भोवती विणत राहतो आणि एखादा कोळी ज्याप्रमाणे आपल्या जाळ्यात जीवन जगत राहतो तसाच हाही राहू लागतो.

कोळ्याला जसा त्याच्या जाळ्यावर केलेला आघात रुचत नाही, त्याचप्रमाणे कोणी धक्का दिलेला ह्या अहंकारी मनाला रुचत नाही, त्याचा ते द्वेष करते. कोळ्याला स्वत:च्या जाळ्याहून निराळ्या जाळ्यात राहावे लागल्यास परकेपणा वाटतो, त्याप्रमाणे अहंकारी मन नव्या दृष्टिकोनाकडे नव्या रचनांकडे, नव्या स्वप्नांकडे नेले गेले की, त्याला परकेपणा वाटतो, त्याला दु:ख होते. ही आसक्ती मनातून अजिबात काढून टाकली पाहिजे.

जगासंबंधाने व जीवनासंबंधाने असलेली आपली सामान्य वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे; जागृत न झालेले मन या सामान्य वृत्तीला स्वभावधर्म असे समजून चिकटून राहते; परंतु आपण येथेच थांबता उपयोगी नाही; आपण निर्माण केलेल्या कोणत्याही मानसिक रचनेला, बुद्धिप्रधान विचारपंथाला, धार्मिक मतवादाला किंवा तार्किक सिद्धांताला आपण बांधलेले राहता कामा नये; मनाचे व इंद्रियांचे जाळे आपण तोडूनच टाकले पाहिजे. पण तेथेही आपण थांबता कामा नये; विचारकाचे जाळे, धर्मवाद्यांचे जाळे, धर्मसंस्थापकांचे जाळे थोडक्यात ‘शब्दांचे’ व ‘कल्पनांचे’ जाळे यापासून आपण स्वत:ला दूर केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 329)

एकाग्र ध्यान :

इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय म्हणजे, इकडेतिकडे न ढळता स्थिरपणे, एकच विषय घेऊन, त्यावर एकाच दिशेने क्रमबद्ध विचार करण्याची सवय होय. मनाने हा विचार करताना सर्व मोह, तसेच त्याला ढळवू पाहणारे सर्व हाकारे कटाक्षाने टाळले पाहिजेत. आपल्या सामान्य जीवनात अशी एकाग्रता वरचेवर पाहावयास मिळते, अनुभवावयास मिळते; मनाला सामान्य जीवनात बाह्य विषय, बाह्य क्रिया यांवर एकाग्र व्हावयाचे असते व ते तसे एकाग्र होतेही; परंतु असा बाह्य विषय नसताना आंतरिक विषयावर एकाग्र होणे हे मनाला फार अवघड जाते; तथापि, ज्ञानाच्या साधकाला अशी ही आंतरिक एकाग्रता प्रत्यक्षात आणणे आवश्यकच आहे.

एकाग्रता ही कल्पनेच्या फलदायी सारतत्त्वावर करावयाची असते. जीवाच्या इच्छेने एकाग्र होऊन तसा आग्रह धरला की, ही कल्पना तिच्यात अंतर्भूत असलेल्या सत्याची सर्व अंगे प्रकट करते. उदाहरणार्थ, जर ‘दिव्य प्रेम’ हे आपल्या एकाग्रतेचा विषय असेल तर, प्रेम म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेच्या सारभूत तत्त्वावर एकाग्रतेने चिंतन केले पाहिजे. त्या दिव्य प्रेमाचे बहुविध आविष्करण तेजोमय रीतीने उदित व्हावे अशा पद्धतीने मनाने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ही एकाग्रता फक्त विचारांमध्ये नाही तर हृदयात, अस्तित्वात आणि साधकाच्या दृष्टीमध्येही असली पाहिजे. येथे विचार आधी आणि अनुभव नंतर असे होऊ शकते, पण कधीकधी, अनुभव आधी आणि नंतर त्या अनुभवातून ज्ञानाचा उदय असेही होऊ शकते. त्यानंतर मग प्राप्त झालेल्या गोष्टीचे अधिकाधिक चिंतन, मनन केले पाहिजे आणि ती जोवर नित्याचा अनुभव बनत नाही आणि पुढे जाऊन, जीवाचा तो नियमच किंवा धर्मच बनत नाही तोवर ती गोष्ट धरून ठेवली पाहिजे.

निदिध्यास :

एकाग्र ध्यानाची प्रक्रिया वर सांगितली; परंतु ह्या प्रक्रियेहून जोरदार, अधिक कष्टाची प्रक्रिया म्हणजे, समग्र मन हे कल्पनेच्या केवळ सारभूत अंशावरच एकाग्र करणे, त्याचे एकाग्रतेने निदिध्यासन करणे ही आहे. ध्यानविषयाचा फक्त मानसिक अनुभव घेण्यासाठी किंवा फक्त विचारगत ज्ञान मिळविण्यासाठी हा निदिध्यास केला जाऊ नये, तर कल्पनेच्या मागे असणाऱ्या वस्तूचे सार गाठण्यासाठी हा निदिध्यास केला जावा. या प्रक्रियेमध्ये साधकाचा विचार थांबतो आणि साधक तन्मयतेने वस्तूचे आनंदभरे दर्शन घेत राहातो अथवा आंतरिक समाधीच्या द्वारा त्या वस्तूत विलीन होऊन जातो. ही दुसरी प्रक्रिया जर उपयोगात आणली असेल तर नंतर, या प्रक्रियेने ज्या अवस्थेप्रत आपण चढून जातो त्या अवस्थेला खाली बोलावून, आपल्या निम्नतर अस्तित्वाचा ती ताबा घेईल, आपल्या सामान्य जाणिवेला ती प्रकाश, सामर्थ्य, आनंद प्रदान करेल असे करावे लागते. असे न केल्यास, आंतरिक समाधीत किंवा उच्च पातळीवर ती अवस्था आपली असेल पण आपण जागृतीत येऊन जगाच्या संपर्कात उतरलो की, आपल्या पकडीतून ती निसटलेली असेल, असे बरेच जणांचे होते. तेव्हा, हे असे अर्धवट प्रभुत्व हे पूर्णयोगाचे साध्य नाही.

मन निर्विषय करणे :

एकाच विषयावर मन एकाग्र करणे ही एक प्रक्रिया; विचार दृष्टिविषय झालेल्या एकाच वस्तूचा जोरदार निदिध्यास घेणे ही दुसरी प्रक्रिया; ह्या प्रक्रिया वर वर्णिल्या. तिसरी प्रक्रिया मन एकदम शांत, निर्विषय करणे ही आहे. अनेक मार्गांचा वापर करून, मन शांत करता येते. एक मार्ग असा आहे – मन क्रिया करीत असताना त्या क्रियेत साधकाने भाग घेऊ नये तर अगदी तटस्थ राहावे. मनाकडे केवळ पाहत राहावे; असे सारखे तटस्थतेने मनाकडे पाहात राहिले, तर शेवटी मन कंटाळते. त्याच्या उड्या, त्याची धावपळ ही त्याच्या मालकाच्या संमतीशिवाय चालली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग ते अधिकाधिक शांत होत जाते व शेवटी पूर्ण शांत होते. मन शांत करण्याचा दुसरा मार्ग असा – मन जे विचार सुचवील ते साधकाने असंमत करावे. ते मनातून बाहेर फेकून द्यावे. ते जसजसे त्याच्या समोर येत जातील तसतसे त्यांना फेकून देत राहण्याचे कार्य त्याने करीत राहावे; आणि आपल्या अस्तित्वात मनाच्या धांगडधिंग्यामागे जी शांती नेहमीच वसत असते, त्या शांतीला चिकटून राहावे. असे करीत राहिल्याने, अस्तित्वातील गुप्त शांती प्रकट होते; साधकाच्या मनात, सर्व अस्तित्वांत महान शांती प्रकटपणे स्थिर होते आणि या शांतीबरोबर सर्वव्यापी शांत ब्रह्माची अनुभूती साधकाला प्राप्त होते. या महान शांतीच्या पायावर दुसरी सर्व उभारणी करता येते. ही उभारणी, ज्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर केली जाते ते ज्ञान वस्तूंविषयीच्या वरवरच्या लक्षणांचे ज्ञान नसते तर, ते ईश्वरी अभिव्यक्तीच्या अति-खोल असणाऱ्या सत्याचे ज्ञान असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 323-324)

एकाग्रतेच्या तीन शक्ती आहेत. या तीन शक्तींचा उपयोग करून आपल्याला आपले साध्य साधता येते.

ज्ञानविषयक एकाग्रता :
कोणत्याही वस्तूवर आपण एकाग्रतेचा प्रयोग केला की त्या वस्तूचे ज्ञान आपण करून घेऊ शकतो; त्या वस्तूची दडलेली रहस्ये तिला प्रकट करावयास लावू शकतो. ही एकाग्रतेची शक्ती अनेक वस्तूंचे ज्ञान होण्यासाठी नव्हे, तर एकमेव सद्वस्तु जाणून घेण्यासाठी आपण वापरावयाची असते. ही झाली ज्ञानविषयक एकाग्रता ! Read more

पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णज्ञानाचा मार्ग :

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलांत विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग नकाराचा, दूरीकरणाचा पाढा वाचीत जातो. ‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘ही इंद्रिये म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’ आणि ‘हे विचार म्हणजे देखील मी नव्हे’ असे म्हणत तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो. मात्र पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण जीवात्म्यांनी संपूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करावयाची आहे : ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम.

अस्तित्वाचा खोटेपणा : आमच्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आम्ही दूर करावे, म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल;

प्राणाचा खोटेपणा : केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आमच्या भौतिक अस्तित्वाने यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे हे आम्ही दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद व्यक्त होईल.

इंद्रियांचा खोटेपणा : भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या आधीन झाल्यामुळे आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते.

हृदयाचा खोटेपणा : वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आमच्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते.

विचारांचा खोटेपणा : अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार-नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आमच्या विचाराची खोटी संपदा असते, ही दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली थोर ज्ञानशक्ती; ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 291-292)

व्यक्तिगत मोक्षाच्या इछेचे स्वरूप कितीही उदात्त असले तरी, ती एक प्रकारची वासनाच असते आणि ती अहंभावातून निर्माण झालेली असते. आपल्या व्यक्तित्वाची कल्पना प्रामुख्याने आपल्या समोर असते; आपल्याला व्यक्ती म्हणून वैयक्तिक हिताची, वैयक्तिक कल्याणाची इच्छा असते; दुःखापासून सुटका व्हावी अशी एक व्यक्ती म्हणून आपली तळमळ असते; जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका व्हावी अशी आपल्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होते; आणि यातूनच मोक्षाची कल्पना निर्माण होते; अर्थात ही कल्पना हे अहंभावाचे अपत्य आहे.

अहंभावाचा पाया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, व्यक्तिगत मोक्षाच्या इच्छेच्या वर उठणे आवश्यक असते. आपण जर ईश्वर-प्राप्तीसाठी धडपडत असू, तर ती धडपड केवळ ईश्वरासाठीच असली पाहिजे, अन्य कोणत्याही कारणासाठी नव्हे; कारण आपल्या जीवाला आलेली ती परमोच्च हाक असते, आपल्या चैतन्याचे ते सर्वात गहन असे सत्य असते.

*

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर तो ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील आपल्या कवेत घेतो; असा हा ‘पूर्णयोग’ व्यक्तिगत मोक्ष किंवा सुटका एवढ्यापुरता मर्यादित राहूच शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो. या विश्वातील त्याचे दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 269-70)

पूर्णयोगाचा मार्ग फार दीर्घ आहे; आपल्यातील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल आहे; हा मनाचा आणि हृदयाचा दृष्टिकोन आहे, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड आहे.

या मार्गावरील दुसरे पाऊल म्हणजे, कर्मफळावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे आहे. त्यागाचे खरे, अटळ, अतिशय इष्ट असे फळ, एकमेव आवश्यक असे फळ म्हणजे ईश्वराने आमच्यामध्ये प्रकट व्हावे आणि आम्हामध्ये दिव्य जाणीव व दिव्य शक्ती यावी हे आहे; हे फळ मिळाले म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतीलच मिळतील. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील, वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर हे होय; कर्मसमर्पण-वृत्तीहूनही रूपांतराची ही गोष्ट फारच अवघड आहे.

या मार्गावरील तिसरे पाऊल, केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वरी साधन झाल्याच्या अहं संवेदनेचे देखील उच्चाटन हे आहे. हेच रूपांतर सर्वात अधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतर पूर्णपणे होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकले जात नाही तोपर्यंत, म्हणजेच ह्या तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

जेव्हा हा क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच साधकाला स्वत:च्या वर असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराचे सामर्थ्य आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला ह्या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी-शक्तीच्या इच्छेव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा व प्रेरणांचा त्याग करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 247)

क्रांतिकारक श्री अरविंद घोष यांच्या जीवनातील ही कहाणी.

ब्रिटिशविरोधी कारवाईमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून त्यांना दि. ०२ मे १९०८ रोजी अटक करण्यात आली. अलिपूरच्या तुरुंगात त्यांना एक वर्षभर राहावे लागणार होते. बळजबरीच्या ह्या एकांतवासामध्ये, दिवस घालविण्यासाठी कोणतेच साधन तेव्हा त्यांच्या हाताशी नव्हते. बाहेर असताना एक क्षणही न दवडता, अखंड कार्यरत असणारे अरविंद घोष, स्थानबद्ध झाल्यावर एकदम निर्माण झालेल्या पोकळीने मात्र काहीसे अस्वस्थ झाले होते.

काही दिवस अशा रीतीने अस्वस्थतेमध्ये घालविल्यानंतर, एके दिवशी दुपारी ते विचार करत बसले असताना, विचारांचा ओघ अनिर्बंधपणे वाहू लागला आणि त्यांना जाणीव झाली की, हे विचार अनियंत्रितपणे, असुसंगत रीतीने येऊन आदळत आहेत. हे प्रमाण इतके वाढले की, त्यांना वाटू लागले की, मनाची नियंत्रणक्षमताच जणू नाहीशी झाली आहे. आता भ्रमिष्टच होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली.

श्रीअरविंद म्हणतात, “माझी बुद्धी गमावण्यापासून माझे रक्षण कर, अशी मी त्यावेळी अगदी उत्कटतेने, आर्ततेने ईश्वराची प्रार्थना केली, त्याची करूणा भाकली. त्याच क्षणी माझ्या सर्वांगावरून एक अतिशय हळूवार, थंडगार झुळूक वाहत गेली, माझे भणाणलेले मस्तक विश्रांत पावले. एखादे तान्हे मूल जसे त्याच्या आईच्या कुशीत निश्चित, निर्धास्तपणे झोपी जावे, तसा मी देखील मग विश्वमातेच्या कुशीत निर्धास्तपणे झोपी गेलो.

संपूर्ण जीवननाट्याकडे एखाद्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून कसे पाहावयाचे हेच माझ्या बुद्धिला या प्रसंगातून त्या ईश्वराने शिकविले होते. त्या दिवसापासून कारावासातील माझे सर्व त्रास संपूनच गेले.

या प्रसंगामधून मला प्रार्थनेची परिणामकारकता आणि प्रार्थनेची असामान्य शक्ती ह्यांची जाणीव झाली.”

-आधार : (Tales of Prison Life)

प्रत्येक मनुष्य जाणताअजाणता विश्वशक्तीचे साधन असतो; एखाद्याला त्याच्या अंतरंगात विश्वशक्तीची उपस्थिती असल्याचे ज्ञान असते; इतरांच्या ठिकाणी हे ज्ञान नसते; हाच काय तो माणसामाणसांत भेद असतो. कृतीकृतीत वा साधना साधनामध्येही काही सारभूत भेद नसतो, म्हणून साधनत्वाचा अहंकारी अभिमान बाळगणे हा मूर्खपणा आहे. Read more

आम्ही जो उच्चस्थानी जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्या प्रयत्नात सुरुवातीलाच वासनेचा हीन घटक प्रवेश करतो, आणि हे स्वभाविकच आहे. ह्या हव्यासमय प्राणशक्तीचा वा वासनात्म्याचा स्वीकार करायचा झालाच तर तो स्वीकार रुपांतर करण्याच्या हेतूनेच आम्ही करावयास हवा. आरंभीच त्याला ही शिकवण द्यावी लागते की, दुसऱ्या सर्व वासना त्याने दूर कराव्यात आणि ईश्वरप्राप्तीचाच एकमेव ध्यास बाळगावा.

हा महत्त्वाचा मुद्दा साधल्यावर त्याला दुसरी शिकवण अशी द्यावी लागते की, त्याने आस बाळगावी परंतु ती स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी बाळगू नये, तर विश्वात पसरलेल्या ईश्वरासाठी आणि आम्हात असलेल्या ईश्वरासाठी धरावी.

जरी या योगमार्गात आम्हाला सर्व प्रकारचे आध्यात्मिक लाभ मिळण्याची खात्री असली, तरी आपला कोणताही आध्यात्मिक लाभ हे आपण आपले उद्दिष्ट ठेवू नये; तर आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये जे महान कार्य करावयाचे आहे त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

ज्या आगामी उच्च आविष्काराने, विश्वात इश्वरेच्छेची वैभवपूर्ण परिपूर्ती होणार आहे, त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी. ज्या सत्याची प्राप्ती आम्हाला करून घ्यावयाची आहे, जे आमच्या जीवनात आम्हाला व्यक्त करावयाचे आहे आणि जे आम्हाला सिंहासनावर कायमचे बसवावयाचे आहे, त्या सत्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

वासनात्म्याला शेवटी हे शिकविणे आवश्यक आहे की, त्याने केवळ ‘योग्य उद्दिष्टासाठी’च धडपड करायची आहे असे नाही तर, ही धडपड त्याने ‘योग्य रीतीनेही’ करावयाची आहे, पण ही गोष्ट त्याला अतिशय जड जाणारी आहे. कारण योग्य रीतीने साधना करणे हे योग्य उद्दिष्टासाठी साधना करण्याहून, वासनात्म्याला अवघड आहे. त्याला शेवटी हेही शिकवणे जरूर आहे की, त्याला इच्छा बाळगायचीच असेल तर ती स्वतःच्या अहंभावी मार्गाने बाळगू नये, तर ईश्वरी मार्गाने बाळगावी.

आता त्याने स्वतंत्र विभक्तपणे इच्छा बाळगू नये. मला पसंत असेल त्याच प्रकारे परिपूर्ती व्हावी, माझे जे स्वामीत्वाचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे, माझी जी योग्य आणि इष्ट यासंबंधाची कल्पना आहे तीच मान्य केली जावी असा आग्रह त्याने धरू नये. आपल्या इच्छेहून महान असलेली ईश्वरी इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास त्याने बाळगावा, त्याने अधिक ज्ञानपूर्ण, नि:स्वार्थी मार्गदर्शनाची वाट पाहावयास संमती द्यावी.

सामान्य वासनेला या प्रकारची शिकवण व शिस्त लागली तर तिचे दिव्य वासनेत रूपांतर होऊ शकेल; सामान्य वासना ही माणसाला त्रास देणारी, अनेक प्रकारे ठेचा खावयास लावणारी, स्वास्थ्यनाशक, तापदायक वस्तू आहे; तिला वर सांगितल्याप्रमाणे शिस्त लागली तर तिजमध्ये दिव्य रूपांतराची पात्रता येईल.

सामान्य वासना आणि सामान्य तळमळ यांचीच उच्च व दिव्य रूपेही असतात. सर्व प्रकारची तृष्णा आणि अनुरक्ती, आसक्ती यांच्या पलीकडे आत्माचा एक विशुद्ध आनंद असतो, परमसिद्धीप्राप्तीच्या वैभवात विराजमान होऊन बसलेल्या दिव्य आनंदाचा एक संकल्प असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 84)