ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आपल्याला असे आढळून येते की, जर आपण प्रयत्न केला तर, मनामध्ये शरीरापासून अलग होण्याची शक्ती आहे. मन शरीरापासून केवळ कल्पनेनेच नव्हे, तर कृतीनेही अलग होऊ शकते; शरीरापासून ते भौतिक दृष्टीने, किंबहुना प्राणिक दृष्टीनेही अलग होऊ शकते.

शरीरविषयक गोष्टींसंबंधी एक प्रकारची अलिप्त वृत्ती धारण करून, मनाच्या या अलगपणाला आपण ही बळकटी दिली पाहिजे. शरीराचे झोपणे किंवा जागे राहणे या गोष्टींना अनाठायी महत्त्व दिल्यामुळे, त्याच्याबद्दल निष्कारण वाटणारी काळजी आपण सोडून दिली पाहिजे; शरीराचे हालणे-चालणे किंवा विसावा घेणे, शरीराचे सुख किंवा दुःख, त्याचे आरोग्य किंवा अनारोग्य, त्याचा जोर किंवा थकवा, त्याचा आराम किंवा अस्वस्थता यासंबंधाने काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे; शरीर काय खातेपिते यासंबंधानेही काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे. आपण आपले शरीर सुस्थितीत ठेवू नये असा ह्याचा अर्थ नव्हे; परंतु अतिरेकी संन्यासी व्रते आपण टाळली पाहिजेत; शरीराची जाणूनबुजून हेळसांड करणे हेसुद्धा आपण टाळले पाहिजे.

इत्यर्थ असा की, आपण भूक, तहान, अस्वस्थता, अनारोग्य या शरीराच्या अवस्थांमुळे आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नये; शारीरिक आणि प्राणिक प्रवृत्तीचा माणूस शरीरविषयक गोष्टींना जे महत्त्व देतो, ते आपण देऊ नये. द्यायचेच असेलच तर, त्याला दुय्यम स्थान द्यायला हरकत नाही आणि तेही, शरीराचा ‘साधन’ म्हणून उपयोग आहे हे लक्षात ठेऊनच ! शरीर एक साधन आहे म्हणून जे महत्त्व त्याला द्यावयाचे तेही मर्यादित ठेवावे, ते फुगवून त्याला निकडीच्या गोष्टींचे स्वरूप येईल असे करता कामा नये. उदाहरणार्थ, आपण काय खातोपितो यावर मनाची शुद्धता अवलंबून असते अशी वृथा कल्पना आपण करू नये. (एक मात्र खरे की, काही एका अवस्थेमध्ये खाण्यापिण्यासंबंधी नियंत्रणे आपल्या आंतरिक प्रगतीसाठी उपकारक ठरतात.) तसेच, आपले मन वा जीवन केवळ खाण्यापिण्यावरच अवलंबून असते, अशी वृथा कल्पनाही आपण बाळगता कामा नये.

खाणेपिणे ही फक्त एक सवय आहे, निसर्गाने लावलेली ती व्यवस्था आहे; प्रकृतीने मन किंवा प्राण व खाद्यपेय यांजमध्ये एक संबंध निर्माण करून, तो रूढ केला आहे इतकेच; त्यामुळे त्यापेक्षा त्याला अधिक काही मूल्य आहे असे समजण्याची गरज नाही.

वस्तुत: मानसिक व प्राणिक अस्तित्वाच्या उर्जेमध्ये, कोणत्याही प्रकारे घट न होऊ देता, नव्या पद्धतीने, सध्याच्या सवयीच्या उलट पद्धतीने, अन्नसेवनाचे प्रमाण आपण किमान पातळीवर आणू शकतो.

परंतु त्याहीपेक्षा, विवेकपूर्ण प्रशिक्षणाने, मन व प्राण यांना, शारीरिक पोषणाच्या किरकोळ मदतीवर विसंबून ठेवण्यापेक्षा, त्यांचा ज्यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध आहे अशा, मानसिक व प्राणिक शक्तीच्या गुप्त झऱ्यांवर विसंबून राहण्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना उर्जेच्या अधिक मोठ्या स्त्रोतांकडे वळविता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 343-344)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago