ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

सामान्यत: त्याग ह्या संकल्पनेची जी लक्षणे मानली जातात त्याहून ‘त्याग’ ह्या संकल्पनेचा आमचा अर्थ वेगळा आहे.

सामान्यत: त्याग ह्या शब्दाचा अर्थ सुखविषयांचा-त्याग, सुखाचे दमन (inhibition of pleasure), स्वत:चा अव्हेर (Self-denial) असा होतो.

मानवी आत्म्याला त्यागाची ही साधना आवश्यक आहे, कारण अज्ञानामुळे त्याचे हृदय सुखोपभोगांना लगडून बसते. सुखोपभोगांचे दमन आवश्यक ठरते कारण इंद्रियजन्य संवेदना, ह्या इंद्रियोपभोगांच्या परिपूर्तीच्या मधु-कर्दमामध्ये (mud-honey) अडकतात, जणू रुतून बसतात. सुखोपभोगाच्या वस्तूंचा, सुखविषयांचा त्याग करणेही आवश्यक मानण्यात येते कारण, मन विषयाला चिकटते आणि ते एखाद्या विषयाला चिकटून बसले की, त्या विषयाला सोडून पलीकडे जाणे, आणि स्वत:च्या अंतरंगात जाणे त्याला जमत नाही.

माणसाचे मन जर असे अज्ञानी नसते, आसक्तीयुक्त नसते, असे चळवळे, अस्थिर व बंधनप्रिय नसते, वस्तूंच्या आकारांनी फसणारे नसते तर, त्यागाची आवश्यकता भासली नसती; जीवात्मा आनंदमार्गावर प्रवास करू शकला असता; लहान आनंदाकडून मोठ्या आनंदाकडे, दिव्य आनंदाकडून दिव्यतर आनंदाकडे तो प्रवास करू शकला असता. मात्र सध्याच्या स्थितीत असा प्रवास व्यवहार्य नाही.

मन ज्या ज्या गोष्टींना चिकटून बसलेले असते, त्यांच्या वास्तव रूपांची प्राप्ती व्हावयास हवी असेल तर, त्याने त्या प्रत्येक गोष्टीचा अंतरंगातूनच त्याग करावयास हवा. बाह्य त्याग हा अत्यावश्यक नाही, तथापि काही काळ तोही आवश्यक ठरतो; पुष्कळशा बाबतीत तो अपरिहार्य होतो; आणि कधीकधी तर सर्व बाबतीत त्याचा उपयोग असतो.

असे देखील म्हणता येईल की, पूर्ण बाह्य त्याग ही अशी एक अवस्था आहे की, तिच्यातून प्रत्येक जीवात्म्याला, त्याच्या विकासाच्या, प्रगतीच्या कोणत्यातरी कालखंडात असताना, जावेच लागते. मात्र अशा त्यागात केव्हाही अहंकारी आग्रही आत्मपीडनाचे व स्वत:च्या भयंकर छळाचे प्रकार नसावेत, कारण ते आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ईश्वराला अपमानकारक असतात. परंतु शेवटी हा त्याग देखील साधनच असतो, आणि म्हणून त्याचा उपयोग केव्हातरी संपतोच.

जेव्हा एखादी वस्तू आपल्याला तिच्या जाळ्यात ओढू शकत नाही तेव्हा, त्या वस्तूचा त्याग करण्याची आवश्यकता उरत नाही. आता साधकाचा जीव त्या वस्तूचा वस्तू म्हणून उपभोग घेत नसतो तर त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचा आनंद तो घेत असतो. आता सुखाचा संकोच करणेही आवश्यक ठरत नाही; कारण साधक आता सुखासाठी धडपडत नाही तर, सर्व वस्तूंमध्ये समानत्वाने असणाऱ्या ईश्वरी प्रकाशाची त्याला प्राप्ती झालेली असते. त्यामुळे एखादी वस्तू स्वत:ची असली पाहिजे किंवा तिच्यावर आपला भौतिक ताबा असला पाहिजे अशी निकड त्याला भासत नाही. असा जीव आता कोणत्याच गोष्टीवर स्वत:चा हक्क सांगत नाही तर, उलट तो सर्व जीवांमध्ये निवास करून असणाऱ्या त्या एका ईश्वराची इच्छा जाणीवपूर्वकपणे पाळत असतो आणि म्हणून स्वत:चा अव्हेर करण्याची जागाही आता शिल्लक राहत नाही. आणि असे झाले म्हणजे तो प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो आणि आत्म-स्वातंत्र्याप्रत खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 333)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago