ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

राजयोगात सर्वप्रथम जी क्रिया हाती घेण्यात येते ती अवधानपूर्वक, काळजीपूर्वक आत्मशासन करण्याची क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडी-पुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी मन व हृदय पवित्र, आनंदमय व विचक्षण बनते.

हे जे आतापर्यंत वर्णन केले ते राजयोगातील केवळ पहिले पाऊल होय. यानंतर साधकाने मनाचे आणि इंद्रियांचे सामान्य व्यापार अगदी शांत करावयाचे असतात; असे केले म्हणजेच साधकाचा आत्मा जाणिवेच्या उच्चतर स्तरांवर चढून जाण्यास मोकळा होतो आणि पूर्ण-स्वातंत्र्य व पूर्ण आत्म-प्रभुत्व यासाठी लागणारा पाया त्याला लाभतो. सामान्य मनाला नाडीसंघाच्या व शरीराच्या प्रतिक्रियांच्या आधीन राहावे लागते आणि त्यामुळे या मनाचे अनेक दोष व उणिवा उत्पन्न होतात, ही गोष्ट राजयोग विसरत नाही. हे दोष व उणिवा घालविण्यासाठी हठयोगातील आसन व प्राणायाम यांचा उपयोग राजयोग करतो; मात्र आसनांचे अनेक गुंतागुंतीचे प्रकार हठयोगात असतात, ते राजयोग बाजूला ठेवतो आणि त्याच्या स्वत:च्या साध्याला पुरेसा उपयोगी असा एकच सर्वात सोपा व परिणामकारक असा आसनाचा प्रकार तो घेतो. प्राणायामाचाही असाच एक सर्वात सोपा व परिणामकारक प्रकार तो घेतो. याप्रमाणे हठयोगाची गुंतागुंत व अवजडपणा राजयोग टाळतो; आणि त्याच्या प्रभावी, शीघ्र परिणामकारी प्रक्रियांचा उपयोग करून शरीर व प्राणक्रिया यांजवर ताबा मिळवतो आणि कुंडलिनी जागृत करतो – कुंडलिनी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून झोप घेत पडलेली शक्तिसर्पिणी; या सर्पिणीत सुप्त अशी सामान्यातीत शक्ति असते. कुंडलिनीची जागृती केल्यानंतर राजयोग हा चळवळ्या, चंचल मनाला पूर्ण शांत करून उच्चतर पातळीवर नेण्याचे कार्य करतो; याकरता तो क्रमाक्रमाने मानसिक शक्ती अधिकाधिक एकाग्र करीत जातो; या क्रमवार एकाग्रतेचा शेवट समाधीत होतो.

समाधी ही, मनाला त्याच्या मर्यादित जागृत व्यापारांपासून परावृत्त होऊन, अधिक मोकळ्या व अधिक उन्नत अशा जाणिवेच्या अवस्थांमध्ये जाण्याची शक्ति देते; या समाधि-शक्तीमुळे राजयोग एकाच वेळी दोन कार्यं साधतो. बाह्य जाणिवेच्या गोंधळापासून मुक्त अशी शुद्ध मानसिक क्रिया करून, मनाच्या पातळीवरून तो राजयोगी उच्चतर अतिमानसिक पातळीवर जातो; या पातळीवर व्यक्तीचा आत्मा आपल्या खऱ्या आध्यात्मिक अस्तित्वात प्रविष्ट होतो: हें एक कार्य; दुसरें कार्य : जाणिवेचा जो कोणता विषय असेल, त्या विषयावर जाणिवेची अनिर्बध एकाग्रता करण्याची शक्ति समाधीमुळे राजयोग्याला प्राप्त होते. आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आद्य विश्वशक्तीचे कार्य वरीलप्रमाणे चालते; जगावर दिव्य क्रिया घडते ती वरील पद्धतीने घडते.

राजयोगी हा समाधिस्थितीत उच्चतम विश्वातीत ज्ञान व अनुभव यांचा भोक्ता असतोच; त्याला वरील अनिर्बध एकाग्रतेने कोणत्याहि विषयावर आपली जाणीव वापरण्याची शक्ति मिळाली म्हणजे तो या शक्तीचा वापर करून, जागृत अवस्थेत त्याला हवे ते वस्तुविषयक ज्ञान मिळवू शकतो; तसेच वास्तव जगांत हवे ते प्रभुत्व, अर्थात् जगाला उपयुक्त व आवश्यक असे प्रभुत्व गाजवू शकतो.

राजयोगाची प्राचीन पद्धति ही, केवळ स्व-राज्य हे राजयोगाचे साध्य मानीत नव्हती, तर साम्राज्य हे पण त्याचे साध्य मानीत होती. स्व-राज्य म्हणजे आत्म्याचे स्वत:वरचे राज्य, स्वत:च्या क्षेत्रांतील सर्व अवस्था व व्यापार याजवर आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेचा पूर्ण ताबा असणे. साम्राज्य म्हणजे आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेने, तिच्या बाह्य व्यापारांवर आणि परिसरावर सुद्धां हुकमत चालविणे.

प्राणशक्ति व शरीर यांजवर हठयोग आपलें कार्य करतो, शारीरिक जीवन आणि या जीवनाच्या शक्ति पूर्णत्वास नेणे, त्यांना अतिनैसर्गिक सामर्थ्य येईल असे करणे हे आपले साध्य मानतो; तसेच हे साध्य साधून तो मानसिक जीवनाच्या क्षेत्रात पाऊल टाकतो; त्याप्रमाणे राजयोग मनाशी आपला व्यवहार करतो व मानसिक जीवनाच्या शक्तींत, अतिनैसर्गिक पूर्णत्व व व्यापकत्व आणण्याचे साध्य स्वत:समोर ठेवतो; आणि त्यापुढे पाऊल टाकून, आध्यात्मिक अस्तित्वाच्या क्षेत्रांत तो प्रवेश करतो.

हे सर्व ठीक – परंतु राजयोगांत हा दोष आहे कीं, समाधीच्या अनैसर्गिक अवस्थांवर तो प्रमाणाबाहेर भर देतो. राजयोगाच्या या दोषामुळे, मर्यादेमुळे, राजयोगी भौतिक जीवनापासून काहीसा दूर राहतो; हे भौतिक जीवन आमच्या सर्व जीवनाचा पाया असते, आणि आम्ही मानसिक व आध्यात्मिक गोष्टी ज्या मिळवतो, त्या शेवटी आम्हाला भौतिक जीवनाच्या क्षेत्रांत आणावयाच्या असतात. राजयोगांत आध्यात्मिक जीवन समाधिस्थितीशी फारच निगडित असते, हा त्याचा विशेष दोष आहे.

आध्यात्मिक जीवन आणि या जीवनाचे अनुभव जागृतीच्या अवस्थेत आणि आमच्या सामान्य व्यवहारात पूर्णतया उपयोगात आणावे, पूर्णतया कार्यकारी करावे, हा आमचा उद्देश आहे. परंतु राजयोगांत आध्यात्मिक जीवन आमचे सर्व अस्तित्व व्यापण्यासाठी खाली उतरत नाही, ते आमच्या सामान्य अनुभवांच्या पाठीमागे राहते, दुय्यम भूमिका घेते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 36)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

12 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

1 day ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

2 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

3 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

4 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

5 days ago