Tag Archive for: हृदयचक्र

 

व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र करणे सर्वाधिक सुकर असते किंवा व्यक्तीला ज्या केंद्रावर लक्ष एकाग्र केले असता, सर्वात जास्त परिणाम साध्य होतो त्या केंद्रावर तिने चित्त एकाग्र करण्यास हरकत नाही.

०१) हृदयचक्रावरील एकाग्रता

हृदय-चक्रावर एकाग्रता केल्यास ती एकाग्रता-शक्ती ते चक्र (heart-centre) खुले करते आणि चैत्य पुरुषाला (psychic being) झाकणारा पडदा ती अभीप्सेच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या व समर्पणाच्या शक्तीद्वारे दूर करते. ही शक्ती, मन, प्राण व शरीराचे शासन अंतराम्याने किंवा चैत्य पुरुषाने करावे यासाठी त्याला अग्रस्थानी आणते आणि मन, प्राण व शरीराला ती पूर्णपणे ईश्वराभिमुख करते, त्यांना ईश्वराप्रत खुले करते. तसेच त्यांना ईश्वराभिमुख करण्याच्या आणि खुले करण्याच्या आड जे काही येईल ते सर्व त्यांच्यामधून काढून टाकते. पूर्णयोगामध्ये यालाच ‘आंतरात्मिक किंवा चैत्य रूपांतरण’ (psychic transformation) असे संबोधले जाते.

०२) मस्तकाच्या वरच्या बाजूस असलेल्या केंद्रावर एकाग्रता

शांती, निश्चल-नीरवता आणण्यासाठी, शारीर-जाणिवेपासून आणि मन व प्राणाशी असलेल्या एकत्वापासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच उच्चतर चेतनेशी मीलन घडण्यासाठी कनिष्ठ चेतनेचा (मानसिक, प्राणिक व शारिरीक चेतना) मार्ग खुला व्हावा आणि ती चेतना ऊर्ध्वगामी व्हावी तसेच उच्चतर चेतनेच्या (आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना) शक्ती या मन, प्राण व शरीरामध्ये अवतरित व्हाव्यात म्हणून मस्तकाच्या वरच्या बाजूस (above the head) असलेल्या केंद्रावर एकाग्रता-शक्ती केंद्रित केली जाते. या गोष्टीला पूर्णयोगामध्ये ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) असे संबोधले जाते.

एखाद्या व्यक्तीने जर या प्रक्रियेपासून आरंभ केला तर, ती ऊर्ध्वस्थित शक्ती अवरोहण (descent) करताना, अगदी सर्वात खाली असलेल्या चक्रापर्यंतची सर्व चक्रं खुली करते आणि चैत्य पुरुषास अग्रस्थानी आणते. मात्र हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कनिष्ठ चेतनेच्या अडथळ्यास सामोरे जाण्याचा संघर्ष करावा लागण्याची किंवा अडचणींना तोंड द्यावे लागण्याची बरीच शक्यता असते. दिव्य कार्यामध्ये कनिष्ठ चेतनेची भेसळ होण्याची किंवा दिव्य कार्यास ती नकार देण्याची शक्यता असते. मात्र, एकदा चैत्य पुरुष सक्रिय झाला की हा संघर्ष आणि या अडचणी बऱ्याच कमी होण्याची शक्यता असते.

०३) आज्ञाचक्रावरील एकाग्रता

आज्ञाचक्रावर एकाग्रता करणे म्हणजे तेथील चक्र खुले करणे, आंतरिक मन व आंतरिक दृष्टी मुक्त करणे तसेच आंतरिक किंवा योगिक चेतना आणि तिचे अनुभव व तिच्या शक्ती मुक्त करणे. येथूनसुद्धा व्यक्ती ऊर्ध्वमुख होत खुली होऊ शकते आणि निम्नतर स्तरांवर असणाऱ्या चक्रांवर कार्य करू शकते. परंतु, या प्रक्रियेमध्ये व्यक्ती अध्यात्माविषयीच्या स्वतःच्याच मानसिक काल्पनिक रचनांमध्ये बंदिस्त होऊन राहण्याचा धोका असतो. तसे झाले तर, ती त्यातून बाहेर पडून, समग्र आध्यात्मिक अनुभूतीच्या आणि ज्ञानाच्या मोकळ्या वातावरणात न येण्याचा आणि परिणामतः अस्तित्वामध्ये व प्रकृतीमध्ये समग्र परिवर्तन न होण्याचा धोका संभवतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 307)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)