जीवन जगण्याचे शास्त्र – २१
जो सशक्त असतो तो नेहमीच अविचल, दृढ असतो. दुर्बलतेमुळे अस्वस्थता येते.
*
साधक : शांती (peace), अविचलता (quietness) आणि स्थिरता (calm) ग्रहण करण्यासाठी मी काय केले पाहिजे?
श्रीमाताजी : या गोष्टी तुमच्या केवळ एखाद्या भागाला हव्याशा वाटणे पुरेसे नाही तर, त्यांची तुम्हाला अगदी संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे गरज जाणवली पाहिजे.
*
श्रीमाताजी : तुम्हाला वाटते तेवढी मी तुमच्यापासून दूर नाही. तुम्ही केवळ तुमच्या मनाची आणि प्राणाची खळबळ थोडीशी स्थिरशांत केली पाहिजे; तुम्ही थोडे शांत आणि एकाग्र राहिले पाहिजे; असे केलेत तर तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये आणि तुमच्या सभोवार माझी उपस्थिती लगेचच जाणवेल.
*
साधक : ‘क्ष’ हा सध्या खूप कष्ट सोसत आहे. त्याच्या व्यवसायात त्याच्यावर रोज एक नवीन संकट येऊन आदळत आहे आणि त्या परिस्थितीशी तोंड द्यायला तो असमर्थ आहे. आणि त्याने तुमची विशेष कृपा लाभावी यासाठी तुम्हाला प्रार्थना केली आहे.
श्रीमाताजी : त्याने जर त्याचे मन अविचल आणि हृदय शांत ठेवले तर, तो त्या परिस्थितीला (धीराने) तोंड देऊ शकेल.
– श्रीमाताजी (CWM 16 : 125), (CWM 17 : 60, 68-69, 404-405)





