Tag Archive for: साधना

कृतज्ञता – १३

आपल्या अस्तित्वाची प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण म्हणजे त्या ‘शाश्वता’प्रत सातत्यपूर्वक चाललेले श्रद्धायुक्त आत्मदान असले पाहिजे. आपल्या साऱ्या कृती, मग त्या अगदी महान, असामान्य आणि उदात्त असल्या काय, नाहीतर अगदी किरकोळ, अगदी सर्वसामान्य आणि क्षुल्लक असल्या काय, त्या साऱ्या कृती या ‘आत्मनिवेदित कृती’ (consecrated acts) म्हणून सादर केल्या पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत प्रकृतीने अशा एकमेव चेतनेमध्ये निवास केला पाहिजे की, जिच्या साऱ्या आंतरिक आणि बाह्य गतिविधी या आपल्या अहंकाराहून श्रेष्ठ आणि आपल्या अतीत असणाऱ्या ‘कोणत्या तरी गोष्टीप्रत’ अर्पित केलेल्या असतील. आपण काय प्रदान करतो किंवा आपण ते कोणाला प्रदान करतो या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत, तर त्या गोष्टी आपण सर्व जीवजातामध्ये अंतर्हित असणाऱ्या एकमेव ईश्वरी अस्तित्वालाच अर्पण करत आहोत, ही चेतना आपल्या कृतीमध्ये असली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 111)

कृतज्ञता – १२

(श्रीअरविंद येथे यज्ञबुद्धीने केलेल्या अर्पणाबद्दल सांगत आहेत.) हे अर्पण कोणा व्यक्तींना केलेले असेल, ‘ईश्वरी शक्तीं’ना केलेले असेल, ते ‘विश्वात्मक ईश्वरा’ला केलेले असेल किंवा विश्वातीत असणाऱ्या ‘परमेश्वरा’ला केलेले असेल. त्याचप्रमाणे अर्पण केलेली वस्तू म्हणजे एखादे पान असेल, फुल असेल, पाणी असेल, मुठभर धान्य असेल, अन्नधान्य असेल, किंवा आपल्यापाशी जे जे काही आहे त्या सर्वाचे अर्पण असेल, अगदी सर्वस्वाचे अर्पण असेल. स्वीकारणारे कोणीही असू दे, अर्पण म्हणून दिलेली वस्तू कोणतीही असू दे, अगदी नजीकच्या स्वीकारकर्त्याने जरी ती गोष्ट अव्हेरली किंवा दुर्लक्षित केली तरीही, त्या गोष्टीचे ग्रहण करणारा आणि तिचा स्वीकार करणारा, वस्तुमात्रामध्ये ‘शाश्वत’ रूपाने वसणारा ‘परमेश्वर’च असतो. विश्वाच्या अतीत असणारा जो परमेश्वर, तो येथेसुद्धा आहे, मग तो भले कितीही परिवेष्टित (veiled) का असेना, तो आपल्यामध्ये आहे, या विश्वामध्ये आहे आणि विश्वाच्या घडामोडीमध्येसुद्धा तो आहे. तो येथे सर्वसाक्षी ‘साक्षीदार’ या नात्याने उपस्थित आहे आणि तोच आपल्या सर्व कर्मांचा ‘ग्रहणकर्ता’ आणि आपल्या सर्व कर्मांचा गुप्त ‘स्वामी’ आहे. आपल्या साऱ्या कृती, आपले सारे प्रयत्न, इतकेच काय पण आपली पापं आणि आपले अडखळणे, आपले दुःखकष्ट, आपले संघर्ष या साऱ्या गोष्टी जाणते-अजाणतेपणे, ज्ञात-अज्ञातपणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे, अंतिमतः त्या ‘एका ईश्वरा’कडूनच संचालित होतात. त्याच्या अगणित रूपांद्वारे सारे काही ईश्वराभिमुखच झालेले असते आणि त्या असंख्य रूपांच्या माध्यमातून सारे काही त्या ‘सर्वव्यापी’ असलेल्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच अर्पण होत असते. आपण कोणत्याही रूपाच्या माध्यमातून, कोणत्याही भावाने त्याच्याकडे गेलो तरीही, त्या त्या रूपाच्या माध्यमातून, आणि त्या त्या भावाने तो ईश्वरच आपल्या यज्ञाचा स्वीकार करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 110)

कृतज्ञता – १०

काही जण असे असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे एक आश्चर्यकारक गोष्ट दडलेली आहे अशी त्यांची समजूत असते, आणि त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत ‘कृपा’ किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.

मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना फारसे काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते फार शिकलेले होते असे नाही, त्यांची मने अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची क्षमता होती; ज्यामुळे ते सर्व काही देऊ करण्यास तयार असत, ज्यामुळे त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत.

अशा व्यक्तींचा, त्यांच्या अंतरात्म्याशी वारंवार संपर्क (Psychic contact) होत असे, तो जवळजवळ नेहमीचाच झाल्यासारखा असे. त्या व्यक्ती जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत (अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोड्याशा सजग असल्या तरीसुद्धा) तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, काहीतरी साहाय्य मिळाल्याचे अशा व्यक्तींना जाणवत असे.

कृतज्ञतेची ही भावना तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढत असते. …स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ‘ईश्वरा’च्या संपर्कात येण्यासाठीची ही अतिशय शक्तिशाली तरफ (lever) आहे. चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून ती कार्य करते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 418-419)

कृतज्ञता – ०९

‘ईश्वरा’कडून जी ‘कृपा’ प्राप्त झालेली असते त्याबद्दलची स्नेहार्द्र जाणीव म्हणजे कृतज्ञता.

‘ईश्वरा’ने आजवर तुमच्यासाठी जे केले आहे आणि तो आजही तुमच्यासाठी जे करत आहे त्याची एक विनम्र जाणीव म्हणजे कृतज्ञता.

कृतज्ञता म्हणजे ‘ईश्वरा’प्रति दायित्वाची अशी एक उत्स्फूर्त भावना असते की जी तुम्हाला – ‘ईश्वर’ तुमच्यासाठी जे काही करत आहे त्याला तुम्ही अपात्र ठरू नये म्हणून – सर्वोत्तम तेच करायला भाग पाडते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 154)

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांनी डिसेंबर १९३८ मध्ये परत एकदा सांगितले की, ”साधना जेव्हा जडभौतिकामध्ये (physical) आणि अवचेतनेमध्ये (subconscient) खाली उतरली तेव्हा गोष्टी खूपच अवघड झाल्या. मला स्वतःला त्यासाठी दोन वर्षे संघर्ष करावा लागला कारण अवचेतन हे अतिशय जड असते, ते एखाद्या दगडासारखे जड असते. माझे मन ऊर्ध्वदिशेने जागृत असूनसुद्धा ते स्वतःचा कोणताही प्रभाव निम्नस्तरावर टाकू शकले नाही. हे भगीरथ परिश्रम होते, कारण जेव्हा व्यक्ती तेथे प्रवेश करते तेव्हा जणू काही अस्पर्शित प्रदेशामध्ये प्रवेश केल्यासारखे ते असते. पूर्वीचे योगी हे प्राणशक्तीपर्यंत खाली आलेले होते… पण मी माझे कार्य जर तेथेच सोडून दिले असते तर माझे खरे कार्य अपुरेच राहिले असते. जडभौतिकावर एकदा का विजय प्राप्त झाला की, माझ्यानंतर माझ्या मागून जे लोक या मार्गावर वाटचाल करतील त्यांच्यासाठी या गोष्टी सुकर होतील, यालाच ‘सर्वांमध्ये त्या एकमेवाद्वितीयाचा साक्षात्कार’ असे म्हणता येईल.” (क्रमश:)

साधनेची मुळाक्षरे – ३७

आपले पूर्वीचे सर्व संबंध आणि परिस्थिती यांचा सातत्याने परित्याग करत; येणाऱ्या प्रत्येक नवीन क्षणी, आपण जणू काही जीवनाला नव्यानेच सुरुवात करत आहोत असे समजून जीवन जगण्याकडे वाटचाल करणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय.

आपल्या गतकाळातील कृतींचा जो प्रवाह असतो, ज्याला ‘कर्म’ असे म्हटले जाते, त्यापासून मुक्त होणे म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय; वेगळ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, ‘प्रकृती’च्या कार्यकारणाची जी सामान्य गतिविधी असते त्या बंधनापासून सुटका, मुक्तता म्हणजे ‘आध्यात्मिक पुनर्जन्म’ होय. जाणिवेमधून हे भूतकाळाचे बंध जेव्हा अगदी यशस्वीरीत्या तोडून टाकले जातात तेव्हा आपल्यातील सर्व चुका, सर्व गुन्हे, सर्व दोष आणि मूर्खपणाच्या साऱ्या गोष्टी ज्या आपल्या स्मरणामध्ये अजूनही जाग्या असतात; रक्त शोषणाऱ्या जळवांप्रमाणे ज्या आपल्याला अजूनही चिकटून बसलेल्या असतात, त्या सर्व गोष्टी गळून पडतात आणि आपण अत्यंत आनंददायीरीत्या मुक्त व्हावे म्हणून त्या आपल्याला सोडून जातात.

हे स्वातंत्र्य ही काही केवळ विचारगम्य गोष्ट नाही; तर ते अतिशय सघन, व्यावहारिक आणि भौतिक असे वास्तव आहे. आपण खरोखरच मुक्त असतो, आपल्याला कोणतीच गोष्ट बंधनात टाकू शकत नाही, कोणतीच गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकत नाही, जबाबदारीच्या जाणिवेने आपण ग्रस्त नसतो.

आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रतिकार करायचा असेल, तो पुसून टाकायचा असेल किंवा त्याच्यातून बाहेर पडायचे असेल तर, केवळ पश्चात्ताप किंवा तत्सम गोष्टींद्वारे तसे करता येणार नाही; तर अशा प्रकारचा अरूपांतरित भूतकाळ कधी अस्तित्वात होता हेच आपण विसरून गेले पाहिजे आणि आपल्याला जखडून ठेवणाऱ्या बंधनांना तोडणाऱ्या, चेतनेच्या प्रबुद्ध अवस्थेमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे.

आध्यात्मिक पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे जेथे आपण ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेले असतो आणि ‘कर्मा’च्या प्रतिक्रियांपासून शाश्वतपणे मुक्त असतो अशा चैत्य चेतनेमध्ये आपण प्रथम प्रवेश केला पाहिजे. चैत्य पुरुषाविषयी (psychic being) जाग आल्याखेरीज हे करता येणे शक्य नाही; परंतु आत्मा जो सदासर्वदा ‘ईश्वरा’प्रत समर्पित झालेला असतो, त्या आपल्या अंतर्यामी असणाऱ्या आत्म्याविषयी आपण एकदा का निःशंकपणे जागृत झालो की, सर्व बंधने नाहीशी होतात. मग मात्र भूतकाळ आपल्याला जखडून ठेवत नाही आणि जीवन कायमसाठी पुन्हा एकदा नव्याने सुरू होते. आध्यात्मिक पुनर्जन्माच्या अंतिम उच्चावस्थेची तुम्हाला कल्पना यावी म्हणून सांगते की, ‘अखिल विश्व प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाला नाहीसे होत असते आणि प्रत्येक क्षणाला ते नव्याने निर्माण होत असते,’ असा सदासर्वकाळ अनुभव येऊ शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 176-177)

साधनेची मुळाक्षरे – ३६

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून या मानवी हृदयाचा विकास अधिक विविधतेचा असतो, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहज-प्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते; प्रत्येक लहानमोठ्या ऊर्मीची गुलामगिरी करून ते हिणकस झालेले असते. भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाप्रिय प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये खोटा वासनात्मा (A false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही, हे योग्यच आहे आणि त्यामुळे या अंगावर आपले नियंत्रण असावे असे बुद्धीला वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी जे नियंत्रण आणू शकते, किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीपण ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (The true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी ‘प्रकाशा’त आपला आत्मा निवास करत असतो; या अगदी खोल असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फार थोड्यांनाच असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात आहे पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्यांना त्याच्याकडून थेट प्रेरणा आल्याचे जाणवते. तेथे, म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ‘ईश्वरा’च्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला अंतरात्मा, आपले चैत्य अस्तित्व, साकार आत्मा, आपल्यातील खरा ‘पुरुष’ वृद्धिंगत होतो. मानवातील हे चैत्य अस्तित्व वृद्धिंगत होऊ लागले आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याची भविष्यवाणी व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मानवाला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व जाणिवांकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 150)

साधनेची मुळाक्षरे – ३३

(श्रीअरविंदलिखित पत्रामधून…)

हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा तरी आहे, म्हणजे असे की, यामध्ये, संपूर्ण जीवच त्याच्या सर्व अंगांनिशी ‘ईश्वरा’कडे वळणे अभिप्रेत आहे.

याचा अर्थ असा की, तेथे ज्ञान, कर्म तसेच ‘भक्ती’देखील असली पाहिजे. त्यात अधिकची भर म्हणजे, त्यामध्ये प्रकृतीच्या पूर्ण परिवर्तनाचा, परिपूर्णत्वाच्या ध्यासाचा समावेश होतो, ज्यामुळे प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकात्म होईल. केवळ हृदयच ईश्वराकडे वळले आणि त्याचे परिवर्तन झाले, असे होऊन चालणार नाही, तर मनसुद्धा ईश्वराकडे वळले पाहिजे आणि म्हणून ज्ञानसुद्धा गरजेचे आहे; त्याचबरोबर इच्छाशक्ती, कर्मशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा ईश्वराकडे वळली पाहिजे म्हणून कर्मसुद्धा आवश्यक आहे.

या ‘योगा’मध्ये इतर ‘योगमार्गां’च्या पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे – उदा. ‘पुरुष-प्रकृती’ची पद्धत, परंतु अंतिम उद्दिष्टाबाबत मात्र फरक आहे. ‘पुरुषा’चे ‘प्रकृती’पासून विलगीकरण येथेही आहे, पण ते तिचा त्याग करण्यासाठी नाही तर, पुरुषाने स्वतःला आणि प्रकृतीला जाणावे या हेतूने आहे. पुरुष हा प्रकृतीचे खेळणे म्हणून नव्हे तर प्रकृतीचा ज्ञाता म्हणून, स्वामी म्हणून आणि पालनकर्ता म्हणून असावा, या हेतुने हे विलगीकरण आहे; आणि हे असे घडत असताना किंवा झाल्यानंतर, व्यक्ती स्वतःचे सर्वस्व ईश्वरार्पण करते.

व्यक्ती ज्ञानापासून किंवा कर्मापासून किंवा ‘भक्ती’पासून वा परिपूर्णत्वासाठी (प्रकृतीचे परिवर्तन) आत्म-शुद्धिकरणाच्या ‘तपस्ये’पासून प्रारंभ करू शकते आणि उर्वरित गोष्टी या त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रक्रिया म्हणून विकसित करू शकते किंवा व्यक्ती या साऱ्या गोष्टी एकाच प्रक्रियेमध्येदेखील समाविष्ट करू शकते. सर्वांसाठी एकच एक असा नियम नाही, ते व्यक्ती आणि तिच्या प्रकृतीवर अवलंबून असते.

समर्पण ही या ‘योगा’ची मुख्य ताकद आहे, परंतु समर्पण हे प्रगमनशील (Progressive) असले पाहिजे, प्रारंभीच संपूर्ण समर्पण शक्य नसते, तर प्रारंभी, त्या संपूर्णतेची जिवामध्ये असलेली ती एक इच्छाच असते – वस्तुतः या साऱ्याला वेळ लागतो. आणि जेव्हा समर्पण परिपूर्ण होते तेव्हाच साधनेचा पूर्ण बहर शक्य असतो. तोपर्यंत, समर्पणाच्या चढत्यावाढत्या वास्तवानिशी वैयक्तिक प्रयत्न असणे देखील आवश्यक असते. व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’च्या सामर्थ्याला आवाहन करते आणि एकदा का ती शक्ती त्या जिवामध्ये अवतरित व्हायला सुरुवात झाली की, मग ती सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांना आधार पुरविते, नंतर ती हळूहळू व्यक्तीची समग्र कृतीच हाती घेते, अर्थात यासाठी साधकाची संमती असणे ही बाब नेहमीच गरजेची असते.

एकदा ‘शक्ती’ने कार्य हाती घेतले की, साधकाच्या दृष्टीने ज्या ज्या विभिन्न प्रक्रिया आवश्यक असतात, त्या साऱ्या प्रक्रिया ती घडवून आणते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्ञानाच्या, ‘भक्ती’च्या, आध्यात्मिक कर्माच्या प्रक्रिया, प्रकृतीच्या रूपांतरणाच्या प्रक्रिया ती घडवून आणते. या साऱ्या प्रक्रिया एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत, ही कल्पना दोषपूर्ण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 207-208)

साधनेची मुळाक्षरे – ३२

हृदयाच्या दृष्टीने विचार केला तर, ईश्वरभेटीच्या तळमळीपोटी येणारे भावनावेग, रडू येणे, दुःखीकष्टी होणे, व्याकूळ होणे या गोष्टी ‘पूर्णयोगा’मध्ये गरजेच्या नाहीत. एक दृढ अशी अभीप्सा जरूर असली पाहिजे, त्याबरोबरच एक उत्कट आसदेखील असू शकते, उत्कट प्रेम आणि ऐक्याची इच्छा असली पाहिजे पण दु:ख किंवा अस्वस्थता असण्याचे काही कारण नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 377)

साधनेची मुळाक्षरे – ३१

तुम्ही मनाला शांत करण्याचा थेट प्रयत्न करत असाल, तर तसे करणे ही अवघड गोष्ट आहे, जवळजवळ अशक्यच असे म्हटले तरी चालेल. कारण मनाचा जो सर्वांत भौतिक भाग असतो तो त्याची क्रिया कधीच थांबवत नाही – एखादे न थांबणारे रेकॉर्डिंग मशीन असावे तसा मनाचा तो भाग चालूच राहतो. त्याने ज्या ज्या गोष्टींची नोंद घेतलेली असते, त्या त्या साऱ्या गोष्टी तो पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर आणत राहतो आणि त्याला थांबविण्यासाठी लागणारे बटण जोपर्यंत आपल्याकडे नसते तोपर्यंत तो थांबत नाही, तो चालूच राहतो, तो अनंतकाळपर्यंत चालूच राहतो. उलट, तुम्ही जर तुमची चेतना ही सामान्य मनाच्या वर असणाऱ्या, उच्चतर क्षेत्रामध्ये नेऊ शकलात तर, ‘प्रकाशा’प्रत झालेल्या या उन्मुखतेमुळेच मन शांतस्थिर होते, मग आता त्यामध्ये कोणतीही खळबळ होत नाही, आणि अशा रीतीने मिळविलेली मानसिक शांतता ही नित्याचीच होऊन जाते. तेथे बाह्यवर्ती मन हे कायमस्वरूपी शांतस्थिर झालेले असते. एकदा का तुम्ही या प्रांतात प्रवेश केलात की मग, तुम्ही कदाचित तिथून कधीच बाहेर येऊ इच्छिणार नाही.

‘उच्चतर प्रकाशाप्रत अभीप्सा’ हाच मन शांत करण्याचा एकमेव उपाय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 182)