Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – २७४

शरीराचे रूपांतरण

व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक सर्वसाधारण अडचण असते. जडभौतिक प्रकृती ही संथ, सुस्त आणि परिवर्तनासाठी अनिच्छुक असते. ढिम्म राहणे आणि अल्पशा प्रगतीसाठी दीर्घ काळ लावणे ही तिची प्रवृत्ती असते. अतिशय दृढ मानसिक किंवा प्राणिक किंवा आंतरात्मिक संकल्पालासुद्धा या जडतेवर मात करणे अतिशय अवघड जाते. वरून सातत्याने चेतना, शक्ती आणि प्रकाश खाली उतरवीत राहिल्यानेच या जडतेवर मात करता येणे शक्य असते. त्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीकडे सातत्यपूर्ण संकल्प व आस असणे आवश्यक असते. आणि शारीर-प्रकृतीने अतीव प्रतिकार केला तरी त्या प्रतिकारामुळे थकून जाणार नाही असा स्थिर आणि चिवट संकल्प असणे आवश्यक असते.

*

गहनतर शांती इत्यादीचा अभाव हे जडभौतिक नकाराचे मूळ स्वरूपच आहे आणि हा जडभौतिक नकारच जगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे अस्तित्व नाकारण्याचा समग्र पाया असतो. जडभौतिकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टी चिवट, हटवादी असतात आणि त्यांच्यामध्ये जडत्व आणि नकाराची प्रचंड ताकद असते. त्या गोष्टी जर तशा नसत्या तर साधना अतिशय लवकर पूर्ण झाली असती. शारीर-प्रतिकाराच्या या स्वभावधर्माला तुम्हाला सामोरे जावेच लागते आणि तो प्रतिकार कितीही वेळा उफाळून आला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा मात करावीच लागते. पृथ्वी-चेतनच्या रूपांतरणासाठी ही किंमत मोजावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359, 360)

साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २५०

मानसिक रूपांतरण

शंकाकुशंकांना नकार देणे म्हणजे स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळविणे, हे (तुमचे) म्हणणे निश्चितच योग्य आहे. योगसाधनेसाठी व्यक्तीने आपल्या शरीराच्या हालचालींवर किंवा स्वतःच्या प्राणिक इच्छावासनांवर, आवडीनिवडींवर नियंत्रण मिळविणे जितके आवश्यक असते, तेवढेच विचारांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. परंतु, हे नियंत्रण फक्त योगसाधनेसाठीच आवश्यक असते असे मात्र नाही. एखाद्याचे जर स्वतःच्या विचारांवर नियंत्रण नसेल, तो जर त्या विचारांचा साक्षी, अनुमन्ता, ईश्वर नसेल, तर तो मनुष्य पूर्णपणे विकसित झालेला मनोमय पुरुष आहे असे म्हणता येणार नाही.

इच्छावासना आणि आवेगांच्या वादळामधील सुकाणूविना होडी बनणे जसे योग्य नाही किंवा शरीराच्या जडत्वाचे किंवा आवेगांचे गुलाम बनणे जसे योग्य नाही तसेच व्यक्तीच्या मनोमय पुरुषाने बेलगाम आणि अनियंत्रित विचारांचा टेनिसचा चेंडू होणे हे सुद्धा योग्य नाही. मला हे माहीत आहे की, ही गोष्ट अधिक अवघड आहे कारण मनुष्य हा मूलतः मानसिक प्रकृतीचा प्राणी असल्याने तो मनाच्या गतिप्रवृत्तींशी स्वतःला एकरूप करतो आणि त्यामुळे तो स्वतःला एकाएकी त्या मनापासून अलिप्त करू शकत नाही आणि मनरूपी भोवऱ्याच्या गरगर फिरण्यापासून स्वतःला मुक्तही करू शकत नाही. शरीरावर किंवा शरीराच्या हालचालींच्या काही विशिष्ट भागावर नियंत्रण मिळविणे हे मनुष्याला तुलनेने सोपे असते. प्राणाच्या आवेगांवर आणि इच्छावासनांवर मनाद्वारे नियंत्रण मिळविणे हे काहीसे अवघड असले तरीही काहीशा संघर्षानंतर, ते शक्य असते. परंतु एखादा तांत्रिक योगी नदीच्या पाण्यावर (ध्यानस्थ) बसतो त्याप्रमाणे विचाररूपी भोवऱ्यावर आरुढ होणे हे काही तितकेसे सोपे नाही. असे असले तरीही ते करता येणे शक्य असते.

जी माणसं सर्वसामान्य माणसांच्या पुढे गेलेली असतात अशा सर्व विकसित मानसिक स्तरावरील माणसांना या ना त्या प्रकारे किंवा किमान काही विशिष्ट वेळी आणि काही विशिष्ट हेतुंसाठी मनाच्या दोन भागांना विलग करावे लागते; विचारांचा जणू कारखानाच असणारा असा मनाचा सक्रिय भाग आणि त्याच वेळी साक्षी असणारा, संकल्प करणारा, विचारांचे निरीक्षण करणारा, त्यांचे निर्णयन करणारा, त्यांना नकार देणारा, त्यांना वगळणारा, त्यांना स्वीकारणारा, त्यांच्यामध्ये सुधारणा आणि बदल घडवण्याची आज्ञा देणारा असा मनाचा एक (विचारांवर) प्रभुत्व बाळगणारा अविचल भाग असतो. तो मनाच्या निवासस्थानाचा स्वामी असतो, तो साम्राज्य उभारण्यासाठी सक्षम असतो.

योगी याच्याही अजून पुढे जातो. तो फक्त तेथीलच स्वामी असतो असे नव्हे तर तो मनामध्ये असतानाही, एक प्रकारे, मनातून जणू बाहेर पडतो आणि तो त्या मनाच्या वर उभा ठाकतो किंवा त्याच्यापासून मागे हटतो आणि (अशा प्रकारे तो) त्या मनापासून मुक्त होतो. आणि मग अशा योग्याच्या बाबतीत विचारांचा कारखाना ही प्रतिमा पुरेशी योग्य ठरत नाही. कारण विचार बाहेरून, वैश्विक मनाकडून किंवा वैश्विक प्रकृतीकडून आत येत असताना तो पाहतो. कधी ते विचार आकार धारण करून येतात आणि सुस्पष्ट असतात, तर कधीकधी ते विचार आकारविहीन असतात आणि ते आपल्यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मग त्यांना आकार देण्यात येतो. या विचारतरंगांना (त्याचबरोबर प्राणिक लाटांना, सूक्ष्म शारीरिक ऊर्जेच्या लाटांनासुद्धा) नकार देणे किंवा त्यांचा स्वीकार करणे या दोन्हीपैकी कोणतातरी एक प्रतिसाद देणे किंवा परिसरीय ‘प्रकृती’तील विचारद्रव्याला किंवा प्राणिक गतिविधींना वैयक्तिक-मानसिक रूपाकार देणे हा मनाचा मुख्य उद्योग असतो.

हे सारे मला श्री. विष्णू भास्कर लेले यांनी दाखवून दिले आणि म्हणून मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. ते म्हणाले, “ध्यानाला बसा, परंतु विचार करू नका, नुसते मनाकडे पाहत राहा. तुम्हाला असे दिसेल की विचार आतमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना हद्दपार करा. तुमचे मन पूर्णपणे निश्चल-नीरव होईपर्यंत हे असे करत राहा.” विचार असे बाहेरून दृश्यरूपात मनामध्ये प्रवेश करतात हे मी त्यापूर्वी कधी ऐकले नव्हते परंतु त्याच्या सत्यतेबद्दल किंवा त्याच्या शक्यतेबद्दल शंका घ्यावी असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही, मी ध्यानाला बसलो आणि त्यांच्या सांगण्याबरहुकूम तसे केले. उंच गिरीशिखरांवर निर्वात हवा असावी त्याप्रमाणे माझे मन क्षणार्धात निश्चल-नीरव झाले. आणि तेव्हा मला असे दिसले की एका पाठोपाठ एक विचार बाहेरून मनात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत. मात्र त्यांनी आत प्रवेश करून, माझ्या मेंदूचा ताबा घेण्यापूर्वीच मी त्यांना बाहेरच्या बाहेरच घालवून देत होतो आणि अशा रीतीने मी तीन दिवसातच विचारमुक्त झालो.

आणि तत्त्वतः त्या क्षणापासून माझ्यामधील मनोमय पुरुष जणू मुक्त बुद्धीच झाला होता, तो म्हणजे जणू एक वैश्विक मनच झाले होते. तो आता विचारांच्या कारख्यानात काम करणाऱ्या कामगारासारखा स्वतःच्या संकुचित वर्तुळापुरताच मर्यादित राहिला नव्हता तर, आता तो व्यक्तित्वाच्या शेकडो प्रांतांमधून ज्ञान ग्रहण करणारा झाला होता. दृश्याच्या आणि विचाराच्या साम्राज्यामधून त्याला वाटेल त्याची निवड करण्यास आता तो मुक्त झाला होता. मनोमय पुरुषाच्या संभाव्यता या मर्यादित नसतात आणि तो स्वतःच्या घराचा स्वामी आणि मुक्त साक्षी होऊ शकतो, हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठीच मी याचा उल्लेख केला आहे.

मी या निर्णायक गतिविधींबाबतीत जी त्वरा केली त्याच त्वरेने, आणि ज्या पद्धतीचा अवलंब केला त्याच मार्गाचा अवलंब सर्वजण करू शकतात, असे मला म्हणायचे नाही. (अर्थात, या नवीन बंधनमुक्त अशा मानसिक शक्तीचा संपूर्ण विकास होण्यासाठी मला काही वर्षे लागली.) ज्या व्यक्तीपाशी श्रद्धा असते आणि प्रयत्न करण्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला मनावर स्वामित्व मिळविणे आणि प्रगमनशील स्वातंत्र्य मिळविणे या गोष्टी शक्य असतात.

– श्रीअरविंद (CWSA 24 : 1257-1258)

साधना, योग आणि रूपांतरण – २४९

मानसिक रूपांतरण

व्यक्तीकडे श्रद्धा आणि खुलेपणा, उन्मुखता (openness) असणे पुरेसे असते. याशिवाय, दोन प्रकारचे आकलन असते. एक प्रकार म्हणजे बुद्धीद्वारे होणारे आकलन आणि दुसरा प्रकार म्हणजे चेतनेद्वारे होणारे आकलन. बुद्धीद्वारे होणारे आकलन जर अचूक असेल तर ते आकलन असणे चांगले, परंतु असे आकलन अनिवार्यच असते, असे मात्र नाही. श्रद्धा आणि खुलेपणा असेल तर चेतनेमधून आकलन होऊ लागते. अर्थात, असे आकलन क्रमशः आणि अनुभवांच्या पायऱ्या ओलांडल्यानंतरच होण्याची शक्यता असते. मी काही अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की, ज्या फारशा शिकलेल्या नव्हत्या किंवा ज्यांच्यापाशी फारशी बौद्धिकता नव्हती मात्र तरीही त्यांनी चेतनेच्या साहाय्याने, योगमार्गाचे परिपूर्ण आकलन करून घेतले होते. पण बुद्धिवादी माणसं मात्र मोठ्या चुका करतात. उदाहरणार्थ, अशी माणसं विरक्त मानसिक अविचलतेलाच (quietude) आध्यात्मिक शांती समजतात आणि मार्गावर अजून प्रगत होण्यासाठी, त्या अविचल अवस्थेतून बाहेर पडण्यास नकार देतात.
*
मनाद्वारे मिळालेली माहिती (जी नेहमीच अनुभवविरहित असते त्यामुळे तिचे योग्य रीतीने आकलन होत नाही.) ही साहाय्यक ठरण्याऐवजी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. वास्तविक, या गोष्टींबाबत कोणतेही निश्चित असे मानसिक ज्ञान नसते, त्यामध्ये अगणित प्रकारचे वैविध्य असते. मानसिक माहितीच्या उत्कंठेच्या पलीकडे जायला आणि ज्ञानाच्या खऱ्या मार्गाप्रत खुले व्हायला तुम्ही शिकलेच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 53, 10)

साधना, योग आणि रूपांतरण – २४८

मानसिक रूपांतरण

आपल्याला आपल्या बुद्धीकडून योग्य विचार, योग्य निष्कर्ष, वस्तु व व्यक्ती यांच्याबद्दलचे योग्य दृष्टिकोन, त्यांच्या वर्तणुकीबद्दलचे किंवा घटनाक्रमाबद्दलचे योग्य संकेत मिळत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि त्या कल्पनाच सत्य आहेत असे मानून ते त्यांचा स्वीकार करतात. किंवा मग, त्या कल्पना त्यांच्या स्वतःच्या असल्यामुळे त्या कल्पनांचे अशा व्यक्ती अनुसरण करतात. आपल्या मनाची चूक झाली आहे हे लक्षात आले तरीही, ते त्या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाहीत किंवा आधीपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक काळजीपूर्वक वागण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत.

प्राणिक क्षेत्रामध्ये लोकांना हे माहीत असते की, नियंत्रणाविना स्वतःच्या इच्छावासना किंवा आवेग यांच्या मागे धावता कामा नये. ते काय करू शकतात आणि त्यांनी काय करावे किंवा त्यांना काय करता येणे शक्य नाही किंवा त्यांनी काय करू नये यामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक असणारा विवेक किंवा नैतिक दृष्टिकोन त्यांच्यापाशी असला पाहिजे हे त्यांना माहीत असते. परंतु बुद्धीच्या प्रांतामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.

माणसांनी आपल्या बुद्धिमत्तेचे अनुसरण करावे असे म्हटले जाते. त्यामुळे माणसं त्यांच्या कल्पना, मग त्या योग्य असू देत वा अयोग्य असू देत त्या बाळगत राहतात, त्या ठासून सांगत राहतात. असे म्हटले जाते की, बुद्धी ही मनुष्याचे सर्वोच्च साधन आहे आणि त्यामुळे त्याने विचार केलाच पाहिजे आणि त्यानुसार त्याने आचरण केले पाहिजे, (असे अपेक्षित असते.) परंतु हे तितकेसे खरे नाही. प्राणाला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जशी आंतरिक प्रकाशाची आवश्यकता असते तशीच आवश्यकता बुद्धीलादेखील असते.

बुद्धीच्याही वर असणारी अशी जी गोष्ट आहे तिचा व्यक्तीने शोध घेतला पाहिजे आणि खऱ्या ‘ज्ञाना’च्या त्या स्रोताच्या कार्यासाठी बुद्धी ही फक्त मध्यस्थ झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13)

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – २३१

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश असणे हे ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचे असते. केवळ ध्यानाद्वारे हे रूपांतरण शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे कर्म हे येथे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. फक्त ते योग्य वृत्तीने आणि योग्य जाणिवेने केले पाहिजे. आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेदेखील साध्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 221)

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

उत्तरार्ध

चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटायच्या त्यातील तुमचे स्वारस्य नाहीसे होते. परंतु हे चेतनेमधील ‘परिवर्तन’ असते; आम्ही ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो ते हे नव्हे. कारण रूपांतरण हे मूलभूत आणि परिपूर्ण असते, तो काही केवळ बदल नसतो अथवा परिवर्तन नसते, तर ते चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal) असते. म्हणजे यामध्ये व्यक्तीचे अस्तित्व हे जणू काही अंतर्बाह्य पालटते, आणि त्यामुळे व्यक्ती पूर्णतः एका वेगळ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते.

प्रत्युत्क्रमित झालेल्या या चेतनेमध्ये व्यक्ती ही जीवन आणि वस्तुमात्रांच्या ऊर्ध्वस्थित झालेली असते आणि तेथून त्यांच्याशी व्यवहार करते. ती चेतना प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते आणि ती व्यक्तीच्या बाह्यवर्ती सर्व कृतींना तेथून दिशा दर्शन करत असते. उलट सामान्य चेतनेमध्ये व्यक्ती बाहेर आणि खालच्या बाजूस स्थित असते. बाहेरून, खालून ती केंद्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि असे करत असताना ती स्वतःच्याच अज्ञानाच्या व अंधतेच्या ओझ्यामुळे दबली जाते. त्यांच्या अतीत जाण्यासाठी ती अत्यंत निकराचा प्रयत्न करत असते. वस्तु प्रत्यक्षात कशा आहेत, त्यांचे वास्तव काय आहे याबाबत सामान्य चेतना अज्ञ असते, ती त्यांचे फक्त बाह्य आवरणच पाहू शकते. परंतु खरी चेतना ही केंद्रस्थानी असते, ती वास्तवाच्या हृदयस्थानी असते आणि तिला सर्व गतिविधींच्या उमगाबद्दलची थेट दृष्टी असते. ती अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित वसलेली असल्याने तिला सर्व गोष्टींचा व शक्तींचा उगमस्रोत आणि कार्यकारणभाव ज्ञात असतो.

मी पुन्हा एकदा सांगते की, हे प्रत्युक्रमण अचानकपणे घडून येते. तुमच्यामधील काहीतरी खुले होते आणि अचानकपणे तुमचा एका नवीन जगामध्ये प्रवेश झाला असल्याचे तुम्हाला आढळते. प्रारंभी हे परिवर्तन अंतिम आणि निर्णायक स्वरूपाचे असेलच असे नाही. ते परिवर्तन चिरस्थायी रूपात स्थिरस्थावर होऊन, तो तुमचा प्रकृतिधर्म होण्यासाठी कधीकधी अधिक कालावधीची आवश्यसकता असते. परंतु एकदा का हे परिवर्तन घडून आले की मग ते तेथे कायम राहते; तत्त्वतः कायमसाठी ते तेथे स्थिर होते. आणि नंतर मग कशाची गरज असेल तर ती म्हणजे ते परिवर्तन क्रमाक्रमाने व्यावहारिक जीवनाच्या तपशिलात अभिव्यक्त करण्याची!

रूपांतरित चेतनेचे पहिले आविष्करण हे नेहमीच अचानकपणे झाल्यासारखे दिसते. तुमचे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये, हळूहळू, क्रमाक्रमाने परिवर्तन होत आहे हे तुम्हाला जाणवतही नाही; तर आपण अचानकपणे एका नवीन चेतनेमध्ये जागृत झालो आहोत किंवा नव्याने जन्माला आलो आहोत असे तुम्हाला जाणवते. कोणत्याही मानसिक प्रयत्नांमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. कारण हे रूपांतरण नक्की कसे असते याची कल्पना मनाच्या साहाय्याने तुम्ही करू शकत नाही. कोणतेच मानसिक वर्णन येथे पुरेसे ठरू शकत नाही. (पूर्णयोगांतर्गत) संपूर्ण रूपांतरणाचा आरंभबिंदू हा असा असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 80-81)

साधना, योग आणि रूपांतरण – २२०

आपल्याला संपूर्ण रूपांतरण अपेक्षित आहे, म्हणजे शरीर आणि त्याच्या सर्व कृती यांचे रूपांतरण आपल्याला अपेक्षित आहे. परंतु अन्य कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, पहिली पायरी अगदी अनिवार्य असते आणि ती म्हणजे चेतनेचे रूपांतरण. या रूपांतरणासाठी अभीप्सा असणे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प असणे हा अर्थातच आरंभबिंदू आहे, त्याशिवाय काहीच होणे शक्य नाही. परंतु या अभीप्सेबरोबर जर व्यक्तीमध्ये आंतरिक खुलेपणा, उन्मुखता असेल, एक प्रकारची ग्रहणशीलता असेल तर अशी व्यक्ती या रूपांतरित चेतनेमध्ये एका प्रयत्नामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वतःला तेथे सुस्थिर करू शकते. तसे म्हटले तर, चेतनेमधील हे परिवर्तन काहीसे आकस्मिक (abrupt) असते. म्हणजे जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा ते अचानकपणे घडून येते, जरी या परिवर्तनाची पूर्वतयारी ही संथपणे आणि दीर्घकाळ चालू असण्याची शक्यता असली तरीसुद्धा जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा मात्र ते अचानकपणे घडून येते.

मी येथे फक्त मानसिक दृष्टिकोनात होणाऱ्या परिवर्तनाविषयी बोलत नाहीये तर स्वयमेव चेतनेमधील परिवर्तनाविषयी बोलत आहे. हे अगदी संपूर्ण आणि परिपूर्ण असे परिवर्तन असते, म्हणजे त्याच्या मूलभूत अवस्थेमध्येच एक प्रकारची क्रांती घडून येते. एखादा चेंडू आतून बाहेरच्या बाजूस उघडावा तशी ही प्रक्रिया असते. (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) रूपांतरित चेतनेला प्रत्येक गोष्ट नवीन आणि निराळी वाटते; एवढेच नाही तर सामान्य चेतनेला एखादी गोष्ट जशी दिसते त्याच्या जवळजवळ उलट अशा पद्धतीने ती गोष्ट रूपांतरित चेतनेला दिसते. सामान्य चेतनेमध्ये असताना तुम्ही अतिशय संथपणाने, एकापाठोपाठ एक अनुभव घेत घेत, अज्ञानाकडून खूप दूरवर असणाऱ्या आणि बरेचदा संदिग्ध ज्ञानाच्या दिशेने प्रगत होता. परंतु रूपांतरित चेतनेमध्ये मात्र तुमचा आरंभबिंदू ज्ञान हा असतो आणि तुम्ही ज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगत होत जाता. तथापि, ही केवळ एक सुरुवात असते. कारण आंतरिक रूपांतरणाचा परिणाम म्हणून बाह्यवर्ती चेतना, बाह्यवर्ती सक्रिय व्यक्तित्वाचे विविध स्तर आणि विविध घटक हे संथपणे आणि क्रमाक्रमाने रूपांतरित होतात. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 80)