Tag Archive for: सहजस्फूर्त

जीवन जगण्याचे शास्त्र – ०६

(व्यक्तित्व विभागलेले असताना कशी स्थिती असते, ते आपण कालच्या भागात पाहिले. प्रामाणिकपणासाठी काम करणे कसे आवश्यक आहे तेही श्रीमाताजींनी अधोरेखित केले. आता ते कसे करायचे यासंबंधी त्या मार्गदर्शन करत आहेत.)

तुमच्या व्यक्तित्वामधील एखादा भाग तुम्हाला (तुमच्या ध्येयाच्या) विरुद्ध दिशेने खेचत आहे, असे जेव्हा तुमच्या लक्षात येते तेव्हा तुम्ही त्याला काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. एखाद्या बालकाला समजावून सांगावे त्याप्रमाणे, त्याला समजावून सांगितले पाहिजे आणि त्याला केंद्रवर्ती अस्तित्वाशी सुसंवादी केले पाहिजे. हे करणे म्हणजे प्रामाणिकपणासाठी कार्य करणे आणि ते अत्यावश्यक असते.

जेव्हा व्यक्तित्वाच्या सर्व भागांमध्ये ऐक्य असते, सहमती असते, सर्व इच्छांमध्ये सुसंगती असते तेव्हा तुमचे व्यक्तित्व साधे, सालस आणि कृती व प्रवृत्तींमध्ये एकसंध असते. तुमचे समग्र व्यक्तित्व जेव्हा एकाच मध्यवर्ती तत्त्वाभोवती गुंफले जाते तेव्हाच तुम्ही सहजस्फूर्त (spontaneous) बनू शकता. कारण जर, तुमच्यामध्ये, असे काहीतरी असेल की, जे ईश्वराभिमुख आहे आणि अंतःस्फूर्ती व प्रेरणा मिळावी यासाठी प्रतीक्षा करत आहे आणि त्याचवेळी तुमच्यामधीलच एक भाग त्याच्या स्वतःच्याच स्वार्थासाठी धडपडत असेल, स्वतःच्या वासना भागवण्याच्या दृष्टीने धडपडत असेल तर तुम्ही घेतलेली भूमिका नक्की काय आहे हेच तुम्हाला कळेनासे होते. तसेच तुमच्या बाबतीत काय घडणार आहे हेदेखील तुम्हाला कळेनासे होते. कारण तुमच्यामधील एक भाग हा, दुसरा भाग जे करू इच्छित असतो ते केवळ उद्ध्वस्तच करतो असे नाही तर, तो त्याला पूर्ण विरोध करत असतो.

काय आवश्यक आहे आणि काय केले पाहिजे हे आपण इथे स्पष्टपणे पाहिले. परंतु हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोणतीही जबरदस्ती करता कामा नये किंवा अतिरेकी घाई देखील करता कामा नये. कारण त्यामुळे दिव्य चेतनेच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या शांती, समचित्तता आणि स्थिरता या गोष्टींना हानी पोहोचू शकते.

आणि सरतेशेवटी आपल्या असे लक्षात येते की, येथे संतुलन (Balance) अत्यावश्यक असते. कोणत्याही दोन टोकाच्या गोष्टी काळजीपूर्वक टाळू शकेल असा एक मार्ग आवश्यक असतो. अति घाई तुम्हाला संकटात लोटते; अधीरता तुम्हाला प्रगत होण्यापासून अडवते. आणि त्याचबरोबर हेही खरे आहे की, अति संथपणा, जडता (inertia) तुमचे पाय मागे खेचते. आणि म्हणूनच, गौतम बुद्ध ज्याला ‘मध्यम मार्ग’ असे संबोधतात तो मार्ग सर्वोत्तम असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 284-285)

जीवन जगण्याचे शास्त्र – ०५

(सहजस्फूर्त असण्याचे महत्त्व काय असते याबाबत श्रीमाताजींनी केलेले विवेचन आपण गेल्या दोन भागात पाहिले. त्या आता त्याच संदर्भातील अधिक बारकावे उलगडवून दाखवत आहेत.)

आता प्रश्ना असा निर्माण होतो की, “सहजस्फूर्त (spontaneous) कसे व्हायचे?”

“सहजस्फूर्त असण्यासाठी तुम्ही संपूर्णतया साधे असले पाहिजे.” आणि त्यातून मग पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, संपूर्णतया साधे कसे बनायचे?

“संपूर्णतया साधे बनण्यासाठी तुम्ही पूर्णतया प्रामाणिक (sincere) असले पाहिजे.”

आणि आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, पूर्णतया प्रामाणिक बनायचे म्हणजे काय?

“पूर्णतया प्रामाणिक असणे म्हणजे तुमच्या व्यक्तित्वामध्ये कोणतीही दुफळी नको किंवा कोणतीही विसंगती अथवा कोणताही विरोधाभास नको.”

तुमचे व्यक्तित्व जर तुकड्यातुकड्यांनी बनलेले असेल तर त्या तुकड्यांमुळे तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक प्रकारची दुफळी तयार होते. हे तुकडे केवळ वेगवेगळेच असतात असे नाही तर, बऱ्याचदा ते परस्पर विसंगत असतात. उदाहरणार्थ, तुमच्यामधील एक भाग दिव्य जीवनाची आस बाळगत असतो; ईश्वराला जाणण्याची, त्याच्याशी ऐक्य पावण्याची, त्याच्यासमवेत पूर्णतया जीवन जगण्याची आस बाळगत असतो. आणि त्याच वेळी तुमच्यामधील दुसरा एक भाग मात्र असा असतो की, जो इच्छावासना, आसक्ती बाळगून असतो. त्यांना तो भाग ‘गरजा’ असे संबोधतो आणि तो भाग या गोष्टींच्या नुसत्या प्राप्तीची अभिलाषाच बाळगतो असे नाही तर, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो अस्वस्थसुद्धा होतो. इतर कोणत्याही विसंगतीपेक्षा ही विसंगती सर्वात जास्त सुस्पष्ट असते.

अशा आणखीही काही विसंगती असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला ईश्वराप्रति संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, ईश्वरी संकल्पाला आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाला पूर्णपणे शरण जावे अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा तसा खरोखरच अनुभव येतो तेव्हा आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, इतकेच काय पण जर ईश्वर अस्तित्वात नसता तर आपण जगूच शकलो नसतो आणि काहीच करू शकलो नसतो, आपण कोणीच नसतो… हा अनुभव व्यक्तीला येतो. (व्यक्ती जेव्हा ईश्वराप्रति खरोखरच प्रामाणिकपणे आत्मदान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा, योगमार्गावर येणारा हा सार्वत्रिक अनुभव असतो.)

वास्तविक, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्य या भूमिकेतून तो अनुभव आलेला असतो. परंतु हा अनुभव येतो तेव्हा, तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक भाग असा असतो की, जो अचानक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “पण का? मला ‘मी’ म्हणून अस्तित्वात राहायचे आहे, मी पण कोणीतरी आहे, मला सर्व गोष्टी स्वतःच करायच्या आहेत, मला माझे (स्वतंत्र) व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि मग स्वाभाविकपणे, पहिल्या भागाने (आत्मदान केलेल्या भागाने) जे काही केले होते ते दुसऱ्या भागाकडून नामशेष केले जाते. ही उदाहरणे अपवादात्मक आहेत असे नाही तर, हे असे नेहमी घडत असते. मी तुम्हाला यासारखी, व्यक्तित्वातील परस्परविरोधाची अगणित उदाहरणे सांगू शकते. म्हणजे जेव्हा तुमच्यामधील एखादा भाग पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा, दुसरा भाग आडवा येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतो. आणि तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 283-284)