Tag Archive for: समत्वबुद्धी

(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी शक्तीच ते कर्म करत आहे, असा अनुभव साधकाला आला पाहिजे, असे श्रीअरविंद सांगत आहेत. पण असे करत असताना प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो हेदेखील ते येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकाने त्याच्या माध्यमातून ती दिव्य शक्ती, दिव्य उपस्थिती, दिव्य संकल्प कार्य करत आहे याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. परंतु ही जाणीव बाळगण्याचा प्रयत्न करत असताना एक धोकासुद्धा असतो. तो असा की, छुप्या अहंकाराला किंवा एखाद्या निम्नस्तरीय शक्तीलाच तो ईश्वर समजण्याची शक्यता असते आणि त्यांच्या मागण्या हाच ‘ईश्वरी आदेश‌’ आहे, असे तो समजण्याची शक्यता असते. त्याच्यावर या कनिष्ठ प्रकृतीचा हल्ला होण्याचा धोका असतो. आणि उच्चतर शक्तीप्रत असणाऱ्या त्याच्या या तथाकथित समर्पणात विकार निर्माण होण्याची शक्यता असते. (म्हणजे ते समर्पण, समर्पण न ठरता उलट,) स्व-इच्छा आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या स्वतःच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांमध्ये अधिकत्वाने आणि अनियंत्रितपणे रममाण होण्याचे निमित्त ठरू शकते.

आणि असे होऊ नये यासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. आणि हा प्रामाणिकपणा त्याने फक्त स्वतःच्या सचेत मनामध्येच बाणवला पाहिजे असे नाही तर, त्यापेक्षाही, गुप्त गतिविधींनी भरलेल्या स्वतःच्याच अंतस्तलीय (subliminal) भागामध्येसुद्धा बाणवण्याचा प्रयत्न करणे अधिक आवश्यक असते. कारण, तेथे म्हणजे विशेषतः त्याच्या अंतस्तलीय प्राणिक प्रकृतीमध्ये, एक नाटकं करणारा आणि निगरगट्ट असा भोंदू वसलेला असतो. साधकाने त्याच्या कर्माचे ओझे ईश्वराकडे सोपविण्यापूर्वी, योगमार्गावर त्याची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे. म्हणजे, इच्छावासनांचे निर्मूलन व्हावे या दिशेने आणि सर्व कर्म व सर्व घटना यांच्याकडे पाहण्याची एक स्थिर समत्वबुद्धी यावी यासाठी त्या साधकाची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 23 : 229-230)