Tag Archive for: समता

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

भारताचे पुनरुत्थान – १२

‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. १६ मार्च १९०८

मानवतेला पुन्हा एकदा मानवी स्वातंत्र्य, मानवी समता, मानवी बंधुता यांच्या खऱ्या उगमस्रोताकडे वळविणे हे भारताचे जीवितकार्य आहे. मनुष्य जेव्हा आत्मस्वातंत्र्य अनुभवतो तेव्हा इतर सर्व स्वातंत्र्य त्याच्या सेवेला हजर असतात; कारण ईश्वर हा ‘मुक्त’ असतो आणि तो कशानेही बांधला जाऊ शकत नाही. मनुष्य जेव्हा भ्रांतीपासून मुक्त झालेला असतो तेव्हा त्याला या जगामध्ये अंतर्भूत असलेल्या दिव्य समत्वाचा बोध होतो. प्रेम आणि न्याय यांच्या माध्यमातून हे दिव्य समत्व स्वतःची परिपूर्ती करत असते. व्यक्तीला जेव्हा असा बोध होतो तेव्हा तो बोधच स्वयमेव शासनाच्या व समाजाच्या कायद्यामध्ये रूपांतरित होतो.

एखाद्या व्यक्तीला जेव्हा या दिव्य समत्वाचा बोध होतो तेव्हा तो अखिल जगाचा बंधू होतो आणि त्याला कोणत्याही पदावर विराजमान केले तरी तो प्रेमाच्या व न्यायाच्या कायद्याने, बंधुत्वाच्या नात्याने, सर्व मानवांची सेवा करतो. जेव्हा हा बोध धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक अनुमानांचा तसेच राजकीय आकांक्षांचा आधार बनेल तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजव्यवस्थेच्या रचनेमध्ये त्यांच्या त्यांच्या योग्य जागी विराजमान होतील आणि मग पुन्हा ‘सत्ययुग’ अवतरेल.

हे लोकशाहीचे आशियाई आकलन आहे आणि ते जगाला ज्ञात करून देण्यापूर्वी भारताने प्रथम लोकशाहीचा स्वत:साठी म्हणून पुनर्शोध घेतला पाहिजे. मनुष्याने आत्म्यामध्ये मुक्त असावे आणि सक्तीने नव्हे तर, प्रेमाने सेवाकार्यास बांधील असावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. आत्म्याप्रमाणे समान असावे आणि इतरांच्या स्वार्थी हितसंबंधांनुसार नव्हे तर, समाजाची सेवा करण्याची त्याची जी क्षमता असेल त्यानुसार त्याने स्वत:चे समाजातील स्थान निर्धारित करावे, हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे. त्याच्या बंधुभगिनींशी त्याचे नाते सुसंवादी असावे, दोघांमध्ये शोषक व शोषिताचे किंवा भक्ष्य व भक्ष्यकाचे नाते नसावे, तसेच दास्यत्वाच्या बेड्यांनी नव्हे तर परस्परांच्या प्रेमाने व सेवाभावामुळे एकमेकांशी संबंधित असावे; हा प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे.

लोकशाही ही माणसाच्या हक्कांवर आधारलेली असते असे म्हटले जाते; त्याला प्रत्युत्तर देताना असे म्हटले जाते की, ती हक्कांपेक्षा मनुष्याच्या कर्तव्यांवर आधारली गेली पाहिजे; परंतु हक्क असोत वा कर्तव्य या दोन्ही संकल्पनाच मुळात युरोपियन आहेत. जेथे स्वार्थीपणा हाच कृतीचा मूलाधार असतो अशा जगाच्या दृष्टिकोनातून, हक्क आणि कर्तव्य हे द्वंद्व (कृत्रिमरित्या) तयार करण्यात आलेले असते. मात्र धर्म ही अशी एक भारतीय संकल्पना आहे की, ज्या संकल्पनेमध्ये हक्क आणि कर्तव्य या दोहोंमधील कृत्रिम द्वंद्व मावळून जाते आणि त्यांच्यामधील सखोल व शाश्वत ऐक्य त्यांना पुन्हा प्राप्त होते. धर्म हाच लोकशाहीचा आधार आहे हे सत्य आशियाने ओळखले पाहिजे. कारण युरोपचा आत्मा आणि आशियाचा आत्मा या दोहोंमधील फरक नेमका येथेच आहे. आशियाई उत्क्रांती धर्माच्या माध्यमातून तिच्या परिपूर्णतेला पोहोचते, हे तिचे रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 931-932)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१५)

व्यक्तीला जेव्हा सामान्य नोकरीव्यवसायात आणि सामान्य परिस्थितीमध्ये राहून जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वतःला तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यक्तीने संपूर्ण समत्व व अनासक्ती बाळगली पाहिजे; तसेच ‘ईश्वर’ आहे आणि आत्ता जरी सर्व गोष्टी ‘अज्ञान’मय जगताच्या परिस्थितीमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्येसुद्धा ‘ईश्वरी संकल्प’ कार्यकारी आहे या श्रद्धेनिशी व्यक्तीने भगवद्गीतेमधील समता-भावाची जोपासना केली पाहिजे. याच्यापलीकडे (या अज्ञानमय जगताच्या पलीकडे) ‘प्रकाश’ आणि ‘आनंद’ आहेत आणि त्यांच्याप्रत जाण्यासाठी जीवन कार्यरत आहे. व्यक्तीमधील आणि तिच्या प्रकृतीमधील त्यांच्या आगमनासाठीचा आणि त्यांच्या सुस्थिर होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिने या समत्वामध्ये स्वत:ला वृद्धिंगत करत नेले पाहिजे. त्यामुळे असुखकर, असहमत गोष्टींविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असुखदतेला समता-भावाने सामोरे गेले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 344)

साधक : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : हो, सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. ही शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना असते; आणि हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; हा शांतपणा म्हणजे जडत्वातून आलेला शांतपणा नसतो तर, एकाग्र शक्तीमुळे येणारी ती शांतीची संवेदना असते; ती तुम्हाला कायम स्थिर राहायला मदत करते. परिस्थिती कोणती का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती असली तरी, त्यावेळी देखील ती तुम्हाला अगदी स्थिर ठेवते. ही पहिली खूण आहे.

दुसरी खूण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखादी अभेद्य भिंत तुम्हाला पाडायची आहे, असे तुम्हाला वाटते. आणि त्या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्या भेदणे तुम्हाला जमत शक्य होत नाही. ही सुद्धा सुरुवातीच्या काही खुणांपैकी एक खूण आहे. याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक चेतना अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचलेली असते की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडू लागतो. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या किरकोळ वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी आवश्यक असणारी एक शक्ती तुम्हाला तुमच्या आतूनच जाणवू लागते.

अजून एक खूण आहे, ती अशी की, तुमच्यामध्ये एक आस असते, आणि जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही प्रतिसाद मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तीही अगदी त्वरित – तुम्हाला त्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला प्रतिसाद मिळतो. यावरूनही हे लक्षात येते की, (तुमचे ईश्वराबरोबरचे) ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झाले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)

कोणत्याही परिस्थितीत अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व.
*
सुदृढ मनाच्या नियमनामुळे समता प्राप्त होऊ शकते. (संसारी माणूस सर्व प्रकारच्या अडचणी पेलूशकतो.) पण ती ‘समता’ नव्हे;तर ती ‘तितिक्षा’ असते. सहन करण्याची ही शक्ती समतेची पहिली पायरी आहे किंवा समतेचे पहिले तत्त्व आहे.
*
समता म्हणजे अहंकाराचा अभाव नव्हे तर, इच्छेचा आणि आसक्तीचा अभाव म्हणजे समत्व.
*
इतर लोक काय बोलतात किंवा काय सुचवितात याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही. या दोन्ही गोष्टींमुळे प्रभावित न होण्यास शिकले पाहिजे. खरे संतुलन प्राप्त करून घेण्यासाठी, एक विशिष्ट अशी समता आवश्यक असते. ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130,135,133),(CWSA 31 : 314)

ज्या व्यक्तीची चेतना ईश्वरी चेतनेशी एकत्व पावलेली असते अशी व्यक्ती सर्व गोष्टींना परिपूर्ण समत्वानेच सामोरी जाते.

– श्रीमाताजी
(Conversation with a Disciple, August 9, 1969)

*

समता हा या योगाचा (पूर्णयोगाचा) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समता बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ईश्वरी संकल्पावर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे.मात्र समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. एखाद्या वेळी साधनेतील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडता कामा नयेत. उलट, तुम्ही त्यामागचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

कर्म आराधना – ४५

अडीअडचणींचा नाईलाजास्तव स्वीकार करणे हा कर्मयोगाचा भाग असू शकत नाही – तर घटना साहाय्यकारी असोत वा विरोधी असोत, त्या सद्भाग्यपूर्ण असोत वा दुर्भाग्यपूर्ण असोत; सौभाग्य असो अथवा दुर्भाग्य असो, प्रयत्नांना यश मिळो वा अपयश, या साऱ्या गोष्टींना स्थिर समतेने सामोरे जाणे आवश्यक असते. आवश्यक ते ते सारे करत असताना, गडबडून न जाता, न डगमगता, राजसिक आनंदाविना किंवा दुःखाविना, व्यक्तीने सर्व गोष्टी सहन करण्यास शिकले पाहिजे; आणि अडचणी वा अपयश आले तरीही खचून जाता कामा नये. एखादी व्यक्ती जीवनाच्या ओझ्याखाली दबून न जाता, जे जे करता येणे शक्य आहे ते ते सारे करत राहू शकते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 243]

कर्म आराधना – ३०

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्यवर्ती जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन अटी आवश्यक असतात –

०१) अचंचलता, समता : घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे आणि स्वतः मनाने समचित्त राहणे.

०२) असीम श्रद्धा : जे सर्वोत्कृष्ट आहे तेच घडेल ही श्रद्धा बाळगणे, पण त्याबरोबरच, व्यक्ती जर स्वतःला खरेखुरे साधन बनवू शकली तर, त्याचे फळ ‘कर्तव्यम् कर्म’ अशा स्वरूपाचे असेल. म्हणजे, ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म करण्याची आवश्यकता भासेल तसे, ते कर्म असेल.

०३) ग्रहणशीलता : ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची व तिचे अस्तित्व अनुभवण्याची व त्यामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती अनुभवण्याची ताकद म्हणजे ग्रहणशीलता. तसेच व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याची मुभा त्या ‘ईश्वरी शक्ती’ला देऊन, तिला कार्य करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय. व्यक्तीला जर या शक्तीची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला या घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. (अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबतच असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची सरमिसळ होऊ देता कामा नये.)

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 266]

विचार शलाका – २६

व्यक्तीला जेव्हा सर्वसामान्य वातावरणात राहून, दैनंदिन जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला तयार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे – सर्वांगीण समता व अलिप्तता, आणि या अज्ञानमय विश्वात सद्यस्थितीतदेखील ‘ईश्वर’ आहे आणि ‘ईश्वरी इच्छा’ सर्व गोष्टींमध्ये कार्यकारी आहे याविषयी सश्रद्ध राहून, ‘गीते’मध्ये सांगितल्यानुसार ‘समता’वृत्तीची जोपासना करणे – हा आहे. …व्यक्तीमध्ये तसेच प्रकृतीमध्ये, प्रकाश व आनंद यांच्या पदार्पणाचा आणि स्थापनेचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आध्यात्मिक समतेमध्ये विकसित होणे, हा असतो. त्यामुळे असुखकर, असहमत वस्तुंविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असमाधानकारकतेचा सामना या ‘समते’च्या वृत्तीद्वारे केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 344)