Tag Archive for: सद्भाव

तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या अभीप्सेला साहाय्यक ठरतील अशा रितीनेच रचल्या जातील. त्या तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतील म्हणजे, एकतर एखाद्या नवीन गोष्टीशी त्या तुमचा संपर्क साधून देतील किंवा तुमच्या प्रकृतीमधील जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी एखादी गोष्ट त्या काढून टाकतील. ही बाब काहीशी लक्षणीय असते.

तुम्ही खरोखरच जर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल तर, ही अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी अगदी प्रत्येक परिस्थिती साहाय्यभूत ठरते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित ती ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि जेव्हा तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार सर्व गोष्टींची रचना करत असतो आणि ती परिस्थिती स्वीकारण्याऐवजी तुम्ही तिला प्रतिकार करत राहिलात, कितीही तक्रार करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वांत प्रभावीपणे कार्य करत असतो.

• श्रीमाताजी (CWM 06 : 176)

मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, ”काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे घडते ते तुम्हालाच शिकविण्यासाठी की, व्यक्तीने काहीतरी हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे इतर लोक तुमच्याशी चांगले वागावेत म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले असावयास हवे.

नेहमीसाठी तोच धडा आहे : जितकं काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर बनेल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, ह्या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते. चांगुलपणाच्या प्रेमापोटी तुम्ही चांगले असला पाहिजेत, तुम्ही न्यायाच्या प्रेमापोटी न्यायी असला पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असावयास हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

(CWM 03 : 264-265)

रुपांतरणाचा हा योग करणे हे सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. जर का व्यक्तीला असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दुःखे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी ते तितकेसे महत्त्वाचे नाही, ”मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी स्थिती असेल तर मात्र गोष्ट निराळी ! अन्यथा मी म्हणेन, ”सुखी असा, चांगले वागा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जगत आहात, ती अपवादात्मक अशी परिस्थिती आहे, हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग या चेतनेचा काही अंश, त्याचा प्रकाश, त्याचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल आणि ते खूप चांगले असेल.”

(CWM 07 : 200)

तोंडात असलेल्या गोड पदार्थापेक्षा एखाद्या सत्कृत्याची गोडी ही हृदयाला अधिक गोड वाटते. सत्कृत्याविना एखादा दिवस घालविणे म्हणजे आत्म्याविना एक दिवस घालविण्यासारखे आहे.

(CWM 15 : 225)

व्यक्तीने अंत:करणामध्ये नेहमी सद्भाव व प्रेम बाळगले पाहिजे आणि तिने समचित्ततेने, समतेने सर्वांवर त्याची पखरण केली पाहिजे.

(CWM 14 : 186)

स्वच्छ दृष्टी व सर्वसमावेशकता असणारी, कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियांपासून मुक्त असणारी, अथक अशी परोपकारिता, हा ईश्वरावर प्रेम करण्याचा व या भूतलावर त्याची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

(CWM 14 : 187)