Tag Archive for: सकारात्मक विचार

 

(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला.)

मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले गेले नाही किंवा त्यांच्या उत्साहाला मुरड घातली गेली तर, त्यांची जाणीव एका (नकारात्मक) सवयीमध्ये बदलते आणि जरा कोठे काही चांगले झालेले दिसले की, अशा मुलांच्या मनात लगेच असा विचार येतो की, “हं! हे काही फार दिवस टिकणार नाही.” जेव्हा एखादा माणूस दयाळू आहे असे त्याला दिसते तेव्हा, त्याच्या मनात लगेच असा विचार येतो की, “या माणसाचा दयाळूपणा फार काळ टिकणार नाही; तो लवकरच बदलेल.” स्वत:ला एखादी गोष्ट करायला जमते आहे असे जेव्हा त्या मुलाला आढळते तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो की, “ठीक आहे, (आज मला ही गोष्ट चांगल्या रितीने करता आली) पण उद्या मला हीच गोष्ट इतक्या चांगल्या रितीने करता येईलच असे काही सांगता येणार नाही.” आणि अशी वृत्ती एखाद्या ॲसिडप्रमाणे काम करते; म्हणजे भावी काळातील संभाव्यतांबद्दलची आशा, विश्वास, खात्री उद्ध्वस्त करणाऱ्या एखाद्या विघातक ॲसिडप्रमाणे ती काम करते.

जेव्हा एखादे मूल अतिशय उत्साहात असते तेव्हा त्याच्या उत्साहाला कधीही मुरड घालू नका. “हे बघ बाळा, जीवन असे नसते,” असे त्याला कधीही सांगू नका. तुम्ही त्याला नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि असे सांगितले पाहिजे की, “आज ज्या (वाईट) गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी नेहमी तशाच राहणे, हे काही आवश्यक नाही. आज त्या दिसताना कुरूप दिसत असतील; पण वास्तविक त्याच्या पाठीमागे एक सौंदर्य दडलेले आहे आणि ते अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे (हे तू लक्षात घेतले पाहिजेस.) तू त्या सौंदर्यावर प्रेम केले पाहिजेस. तुझ्या स्वप्नांचे, तुझ्या आशाआकांक्षांचे ते उद्दिष्ट असले पाहिजे.”

आणि लहानपणीच जर असा (सकारात्मक) विचार मुले करू शकली तर मग पुढे जाऊन, त्यांना फार अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. अन्यथा त्यांना लागलेल्या चुकीच्या वळणाचे दुष्परिणाम त्यांना आधी नाहीसे करावे लागतात; वर सांगितली ती कंटाळवाणी आणि ग्राम्य सामान्य जाणीव त्यांना आधी नाहीशी करावी लागते. सामान्य जाणीव की जी, जीवनापासून कोणत्याच चांगल्या गोष्टींची अपेक्षा बाळगत नाही; जी जीवनाला रटाळ, कंटाळवाणे बनविते आणि सर्व आशाआकांक्षांच्या आणि सौंदर्याच्या तथाकथित भ्रमांच्या विरोधात जाते अशा सामान्य जाणिवेपासून त्याला स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. (क्रमश:)

• श्रीमाताजी (CWM 09 : 163)