Tag Archive for: संघर्ष

विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]

इ. स. १९५५ च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्रीमाताजींनी साधकांना जो संदेश दिला होता, त्याची पार्श्वभूमी खालील प्रश्नोत्तरामध्ये अभिव्यक्त झालेली आहे. कठीण काळाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःला जाणिवपूर्वकपणे आणि निरपवादपणे ईश्वराच्या बाजूस राखले पाहिजे; त्यामुळे सरतेशेवटी विजयाची सुनिश्चिती आहे, हे त्यांनी त्यामध्ये नमूद केले होते.

आज काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, संदर्भ बदललेला आहे तरीही श्रीमाताजींनी दिलेला संदेश तेवढाच सार्थ आहे, म्हणून येथे त्या संदेशाची पुन्हा एकदा आठवण…

*

प्रश्न : येणारे हे वर्ष आश्रम किंवा भारतासाठी आणि अखिल जगासाठी अवघड असेल का?

श्रीमाताजी : सामान्यतः जग, भारत, आश्रम आणि व्यक्तींसाठी सुद्धा हे वर्ष अवघड असेल. अर्थात ते ज्याच्या त्याच्या अवस्थेवर अवलंबून आहे, सर्वांसाठी ते सारखेच असेल असे मात्र नाही. काही गोष्टी या इतरांपेक्षा अधिक सोप्या भासतील. पण हो, सर्वसामान्यतः सांगायचे झाले तर हे वर्ष अवघड असेल – जर तुम्ही समजून घेऊ इच्छित असाल तर, मी तुम्हाला सांगू शकते की, सद्यकालीन साक्षात्काराच्या विरोधात विजय प्राप्त करून घेण्याची विरोधी शक्तींसाठीची ही शेवटची संधी असेल.

परंतु व्यक्तीने या काही महिन्यांच्या कालावधीत स्वतःला दृढ राखले तर, या विरोधी शक्ती फारसे काही बिघडवू शकणार नाहीत; त्यांचा विरोध ढासळून पडेल.

हा मूलतः विरोधी शक्तींचा, अदिव्य शक्तींचा संघर्ष आहे; ह्या शक्ती दिव्य साक्षात्काराला त्यांच्या परीने होता होईल तेवढे मागे रेटू पाहत आहेत.. त्या हजारो वर्षे या आशेवर आहेत. आणि आता तो संघर्ष टोकाला गेला आहे. ही त्यांची शेवटची संधी आहे; आणि या त्यांच्या बाह्य कृत्यामागे जे कोणी आहेत ते पूर्णतः जागृत जीव आहेत; त्यांना हे चांगलेच माहीत आहे की, ही त्यांची शेवटची संधी असणार आहे आणि म्हणूनच त्यांना जेवढे शक्य आहे तेवढे आटोकाट प्रयत्न ते करणार. आणि ते जे काही करू शकतात ते खूपच जास्त आहे. सामान्य किरकोळ मानवी जाणिवांसारखी त्यांची जाणीव नाही. त्यांची जाणीव अजिबातच मानवी नाही. मानवी जाणिवांच्या शक्यतेच्या तुलनेत पाहता, त्यांच्या जाणिवा ह्या, त्यांच्या शक्तीच्या, सामर्थ्याच्या आणि अगदी त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीतसुद्धा दैवी आहेत असे भासते.

म्हणून हा एक भयानक संघर्ष असणार आहे आणि तो पूर्णतः पृथ्वीवर केंद्रित झालेला असणार आहे कारण, त्यांना हे माहीत आहे की, पहिला विजय मिळवायचा आहे तो या पृथ्वीवरच! एक निर्णायक विजय, असा विजय जो पृथ्वीच्या भवितव्याची दिशा ठरविणारा असेल.

जेव्हा गोष्टी भयावह बनतील तेव्हा, जे उदात्त हृदयाचे असून, आपला माथा उन्नत ठेऊ शकतील, ते कुशलमंगल राहू शकतील.

स्वतःचे उत्थान करून घेण्याची ही एक संधी असेल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 459-460)