Tag Archive for: श्रीमाताजी

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

तुमचे आध्यात्मिक परिवर्तन व प्रगती हीच तुमच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे आणि त्यासाठी, तुमच्यासोबत असणाऱ्या श्रीमाताजींच्या शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवरच पूर्णतः विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टींमुळे किंवा लोकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका. कारण तुमच्या अंतरंगातील सत्याशी आणि श्रीमाताजींच्या चेतनेच्या पूर्ण प्रकाशाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या वाटचालीपुढे या गोष्टी अगदी नगण्य आहेत.

*

श्रीमाताजी हे ध्येय आहे, (कारण) सारेकाही त्यांच्यामध्येच सामावलेले आहे. त्यांची कृपा प्राप्त झाली की सारे प्राप्त झाल्यासारखेच आहे. तुम्ही जर श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये राहिलात तर अन्य सारेकाही स्वतःहूनच उलगडत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 397)

अस्वस्थतेपासून सुटका करून घेण्यासाठी श्रीमाताजींकडे प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही आणि ते उपयोगाचे देखील नाही. तुम्ही आंतरिकरित्या त्यांच्या आश्रयाला गेले पाहिजे आणि चुकीची वृत्ती टाकून दिली पाहिजे.

त्यांना प्रत्यक्ष भेटायला येण्यामुळे, तुम्ही चूक करायची आणि ती दुरूस्त करण्यासाठी श्रीमाताजींकडे यायचे अशी सवयच तुम्हाला लागण्याची शक्यता असते. आणि त्यातून आणखी एक चुकीची गोष्ट घडण्याची शक्यता असते; ती म्हणजे, अंतरंगातून, मुळातून ती चुकीची गोष्ट सोडून देण्याऐवजी आणि ती त्यांना समर्पित करण्याऐवजी, तुम्ही ती चुकीची गोष्ट त्यांच्यावर सोपवून मोकळे होण्याची शक्यता असते. येथे एका सर्वसमावेशक समर्पणाची आवश्यकता असते. असे समर्पण करता आले तर, किरकोळ गोष्टींवरून अस्वस्थता, अहंकार, स्वतःच्या दृष्टिकोनावर अतिरिक्त भर, राग या गोष्टींना आळा बसतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 499-500)

श्रीमाताजी या अनंतरूपधारिणी आहेत हे खरे आहे, पण आंतरिक रूपातील श्रीमाताजी आणि दृश्य रूपातील श्रीमाताजी यांच्यामध्ये फार फरक करता कामा नये. कारण केवळ दृश्यरूपात दिसणाऱ्या श्रीमाताजीच तेवढ्या अस्तित्वात आहेत असे नाही तर, त्यांच्यामध्येच त्यांची इतर अनेक रूपं सामावलेली आहेत आणि त्यांच्यामध्येच आंतरिक अस्तित्व व बाह्य अस्तित्व यांच्यामधील सुसंवाद प्रस्थापित झालेला आहे.

परंतु दृश्य रूपातील श्रीमाताजींना खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी, व्यक्तीने केवळ त्यांच्या बाह्य रूपाकडे पाहता कामा नये तर, त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे हे जाणून घेतलेच पाहिजे. व्यक्ती जर त्यांना अंतरंगाद्वारे भेटेल आणि त्यांच्या चेतनेमध्ये वृद्धिंगत होईल तरच हे जाणणे शक्य होते. जे कोणी त्यांच्याशी फक्त बाह्यतः नाते ठेवू पाहतात त्यांना ते समजणे शक्य नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 483)

वैश्विक ‘ईश्वरी प्रेम’ सर्वांसाठी समानच असते. त्याचबरोबर व्यक्तिगत असणारा असा एक आंतरात्मिक अनुबंधदेखील (psychic connection) असतो. मूलतः तोदेखील सर्वांसाठी समानच असतो, पण त्यामध्ये प्रत्येकाशी असलेल्या विशेष नात्याला मुभा असते, आणि हे नाते मात्र सर्वांसाठी समान नसते, तर ते प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असते. आणि त्याचे त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र स्वरूप असते, ते त्याच्याच पद्धतीचे असते आणि त्याची इतरांशी तुलना करता येत नाही. इतर नात्यांशी तुलना करता ते तसेच असावे किंवा तोलूनमापून, संतुलित असावे अशी अपेक्षा इथे बाळगता येत नाही कारण ते प्रत्येक नाते अगदी स्वतंत्र असते.

…श्रीमाताजींचे प्रेम व्यक्तीला जाणवेल किंवा नाही हे ती व्यक्ती त्यांच्याप्रति खुली आहे किंवा नाही यावर अवलंबून असते, ती व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्यापासून किती जवळ वा दूर आहे यावर ते अवलंबून नसते. आंतरिक नात्याबद्दल व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी अचेत, जाणीवरहित (unconscious) बनवितात त्या गोष्टी तिने स्वतःमधून काढून टाकणे म्हणजे खुलेपणा (Openness). व्यक्तीला अंतरंगामध्ये जे नाते जाणवते त्याऐवजी त्या नात्याच्या बाह्याविष्करणाद्वारे त्याचे मोजमाप करणे, या संकल्पनेइतकी अन्य कोणतीच संकल्पना व्यक्तीला अचेत बनवीत नाही; (इतकेच नव्हे तर) या संकल्पनेमुळे, आंतरिक नात्याचे जे काही बाह्य आविष्करण दिसून येत असते त्याबद्दलही व्यक्ती अंध किंवा असंवेदनशील बनते. व्यक्ती श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या दूर अंतरावर असली किंवा ती त्यांना क्वचितच भेटत असली तरीही व्यक्तीला ते नाते जाणवते; उलट व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्याजवळ असूनही किंवा ती नेहमी श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वावरत असली तरीदेखील, म्हणजे असे नाते असूनसुद्धा ते त्या व्यक्तीला न जाणवण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 507-508)

श्रीमाताजी आणि समीपता – २९

(श्रीमाताजींनी मला दूर लोटले आहे, त्या माझ्यावर नाराज आहेत, माझ्यापेक्षा त्या इतरांवर अधिक कृपा करतात अशा प्रकारच्या कल्पना, विचार हे साधकांच्या मार्गामधील अडथळे असतात, त्यापासून साधकांनी कटाक्षाने दूर राहिले पाहिजे; हे श्रीअरविंदांनी एका साधकाला पत्रामधून लिहिले आहे. असे विचार मनात निर्माणच होऊ नयेत म्हणून कोणती पथ्यं पाळली पाहिजेत, कोणत्या तीन नियमांच्या पालनापासून त्याची सुरूवात केली पाहिजे हे श्रीअरविंद येथे लिहीत आहेत…)

१) श्रीमाताजी तुमची जी काळजी घेत असतात, तुमच्यावर जे प्रेम करत असतात त्याबद्दल तुम्ही नेहमी विश्वास बाळगला पाहिजे; त्याविषयी खात्री बाळगली पाहिजे आणि त्याच्याशी विसंगत दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही सूचनांवर विश्वास ठेवता कामा नये.

२) श्रीमाताजींसोबत तुमचे जे खरेखुरे नाते आहे, त्यांच्यासोबत तुमची जी आंतरिक जवळीक आहे, त्यांच्याबाबत तुम्हाला जो एक साधासरळ विश्वास वाटतो त्यापासून, दूर नेणाऱ्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक आवेगाला तुम्ही त्वरित नकार दिला पाहिजे.

३) बाह्य लक्षणांवर जास्त भर देऊ नका; (कारण) त्या बाबतीतल्या तुमच्या निरीक्षणामुळे तुमची सहजगत्या दिशाभूल होऊ शकते. तुम्ही श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले ठेवा आणि तुमच्या हृदयातून, अंतःकरणातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पृष्ठवर्ती प्राणिक इच्छांच्या माध्यमातून नव्हे तर, तुमच्या खऱ्या भावनांच्या गाभ्यातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे मग त्या तुम्हाला गवसण्याची अधिक शक्यता असते आणि मग श्रीमाताजी तुमच्या अंतरंगामध्ये, नेहमीच तुमच्या समीप असण्याची आणि त्या तुम्हाला जे प्रदान करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत ते तुम्ही ग्रहण करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 489)

श्रीमाताजी आणि समीपता – ३४

एखाद्याचे श्रीमाताजींशी जर आंतरिक नाते असेल तर त्या नेहमी आपल्या समीप आहेत, आपल्या अंतरंगात आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत असे त्याला जाणवत असते. आणि मग आपण प्रत्यक्ष श्रीमाताजींच्या जवळ असावे असा त्याचा आग्रह असत नाही. ज्यांचे श्रीमाताजींबरोबर अजून अशा प्रकारचे आंतरिक नाते निर्माण झालेले नाही त्यांनी त्यासाठी आस बाळगावी; मात्र आपण त्यांच्या प्रत्यक्षपणे समीप असावे असा आग्रह धरू नये. समजा, अगदी बाह्य सान्निध्य जरी त्यांना लाभले तरी त्यांच्या असे लक्षात येईल की, आंतरिक समीपतेखेरीज किंवा आंतरिक एकत्वाखेरीज त्या बाह्य सान्निध्याला विशेष अर्थ नाही. एखादी व्यक्ती भौतिकदृष्ट्या श्रीमाताजींच्या जवळ असूनदेखील आंतरिकदृष्ट्या मात्र ती त्यांच्यापासून खूप दूर असू शकते.

*

बाह्य परिस्थिती कशी का असेना, वृत्ती अंतर्मुख ठेवून, श्रीमाताजींशी आंतरिक संपर्क प्रस्थापित करणे ही एकमेव आवश्यक गोष्ट आहे, आणि एकदा ही गोष्ट साध्य झाली की तीच स्वत:हून इतर सर्व आवश्यक गोष्टी घडवून आणेल. काहीजण असे आहेत की, जे योगामध्ये प्रगत झाले आहेत परंतु ते प्रत्यक्षात श्रीमाताजींना वारंवार भेटतातच असे नाही. त्याचप्रमाणे असेही काहीजण आहेत की, जे प्रणाम आणि सायं-ध्यान याव्यतिरिक्त, श्रीमाताजींना वर्षातून फक्त एकदाच भेटतात आणि असे असूनही ते सारे सदोदित श्रीमाताजींच्या समीप असतात किंवा ऐक्यभावात असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 495, 496)

श्रीमाताजी आणि समीपता – ३३

श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असणे ही त्यांच्याशी आपले नाते असण्याची एक खूण आहे किंवा असे सान्निध्य लाभणे म्हणजे त्यांची आपल्यावर विशेष कृपा आहे असे मानणे किंवा असे सान्निध्य लाभणे हे वेगवान प्रगतीचे साधन आहे असे समजणे यासारख्या सर्व गोष्टी म्हणजे मनाच्या कल्पना असतात; ज्या अर्थातच अगदी स्वाभाविक असतात, मात्र त्या अनुभवातून नसतात. खरे महत्त्व असते ते आंतरिक समीपतेला!

असे काही जण आहेत जे श्रीमाताजींना दररोज भेटतात आणि असे असूनही, काही वर्षांपूर्वी ते प्रगतीच्या ज्या टप्प्यावर होते त्यापेक्षा त्यांच्यात फार काही प्रगती झाली आहे असे नाही. उलट काही जण असेही आहेत की ज्यांची अधोगतीच झाली आहे कारण, त्यामुळे (म्हणजे आपण श्रीमाताजींच्या जवळ आहोत असा अभिमान त्यांच्यामध्ये वाढीस लागल्यामुळे) त्यांच्या प्राणिक मागण्या वाढीस लागल्या. तर दुसऱ्या बाजूला असे काही जण आहेत, की जे अगदी कधीतरीच श्रीमाताजींना भेटायला येतात तरीही ते श्रीमाताजींच्या समीप आहेत आणि योगमार्गावर प्रगत झाले आहेत, आणि श्रीमाताजी त्यांचा सांभाळ करत आहेत. मी वानगीदाखल अशा एका व्यक्तीचे उदाहरण देऊ शकतो की, ती व्यक्ती श्रीमाताजींना वर्षातून एकदाच भेटते पण त्या व्यक्तीइतकी वेगाने प्रगती केलेला दुसरा कोणी नाही, तसेच त्या व्यक्तीमध्ये ज्या तीव्रतेने आणि उत्कटतेने भक्तीचे नाते विकसित झाले आहे तसे दुसऱ्या कोणामध्येही झालेले नाही.

सारांश असा की, या सर्वच बाबतीत श्रीमाताजींवर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रकाशावर संपूर्ण विश्वास ठेवणे हे सर्वोत्तम!

– श्रीअरविंद (CWSA 32 : 494)

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा वृद्धिंगत होऊ लागतो आणि अग्रभागी येऊन मन, प्राण, शरीर यांचे शासन करू लागतो आणि त्यांच्यात बदल घडवितो तेव्हा आणि फक्त तेव्हाच वैयक्तिक कल्पना, इच्छा, सवयी गळून पडतात. तेव्हा मग, व्यक्तीचे ईश्वराशी थेट नाते निर्माण होऊ लागते आणि ईश्वराशी असलेले निकटत्व वाढीस लागते. समग्र चेतना ईश्वराशी एकत्व पावेपर्यंत हे निकटत्व वृद्धिंगत होत राहते. जेव्हा तुम्ही चैत्याच्या, अंतरात्म्याच्या (psychic) गहनतेमध्ये प्रवेश करता, तसतशा श्रीमाताजी तुमच्या समीप आहेत अशी जाणीव तुम्हाला होऊ लागते. जेव्हा मन वा प्राण हे चैत्याच्या प्रभावाखाली येऊ लागतात तसतशी त्यांच्यामध्येसुद्धा ही जाणीव वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 360)

श्रीमाताजी आणि समीपता – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधक : पूर्ण दिवसभर माझा प्राण आक्रंदन करत होता. श्रीमाताजी आपल्याबाबत निष्ठुर झाल्या आहेत असे त्याला वाटत होते आणि त्यांच्या प्रेमापासून तो वंचित झाला आहे असे वाटल्यामुळे, तो आकांत करत होता. त्यांच्या मौनामुळे तो कोलमडून पडतो, आणि त्यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर तो कोमेजून जातो.

श्रीअरविंद : जो प्राण अहंकाराने, इच्छा-आकांक्षांनी, अपेक्षांनी भरलेला असतो आणि त्यामुळे जो असमाधानी होतो, सारखी कुरबुर करत राहतो आणि जो भ्रांत कल्पना आणि स्वयं-निर्मित दुःखाने भरलेला असतो, अशा परिवर्तन न झालेल्या प्राणाची ही लक्षणे आहेत.

साधक : पण माझ्यामध्येच अशीही एक प्रवृत्ती आहे की जिला ही सारी सुख-दुःखं टाळावीशी वाटतात, जिला फक्त श्रीमाताजींवर विसंबून राहण्याची इच्छा असते. मात्र माताजींकडून काहीतरी प्राप्त व्हावे अशी त्या प्रवृत्तीची इच्छा नाहीये, तर आपण श्रीमाताजींप्रति स्वतःचे आत्मदान करावे असे तिला वाटत असते, श्रीमाताजींनी आपल्यामध्ये अवतरित व्हावे आणि आपल्याला वर उचलून न्यावे यासाठी ती प्रवृत्ती प्रार्थना करत असते. ती माझ्या हृदयामध्ये आहे. आणि तिचा स्थायीभाव ‘समर्पण’ हा आहे.

श्रीअरविंद : तुम्ही जे काही सांगत आहात ते चैत्य पुरुषाचे (psychic being) आणि त्याच्या श्रीमाताजींसोबत असलेल्या नात्याचे तंतोतंत वर्णन आहे. हे खरे नाते होय. ‘पूर्णयोगा’मध्ये यशस्वी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्यामधील अहंकारी प्राणिक प्रवृत्तीला नकार दिला पाहिजे आणि तुमची साधना या आंतरात्मिक नात्यावर (psychic relation) सुस्थिर केली पाहिजे. चैत्य पुरुष अग्रभागी येणे आणि तो तेथेच स्थिरावणे ही पूर्णयोगामधील एक निर्णायक पायरी असते.

मागच्या वेळी जेव्हा तुम्ही श्रीमाताजींना भेटला होतात तेव्हा हेच घडले होते, तुमचा चैत्य पुरुष अग्रभागी आला होता. परंतु तुम्ही तो कायम तसाच पुढे ठेवला पाहिजे. मात्र जर तुमचा प्राणिक अहंकार आणि त्याचा आक्रोश यांचेच म्हणणे तुम्ही ऐकत राहिलात तर तसे करणे तुम्हाला शक्य होणार नाही. श्रद्धा, समर्पण आणि विशुद्ध आत्मदानाचा (self-giving) आनंद यामुळे, म्हणजेच या आंतरात्मिक दृष्टिकोनामुळेच व्यक्ती ‘सत्या’मध्ये उन्नत होते आणि ईश्वराशी एकात्म पावते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 464-465)