Tag Archive for: वासनामुक्ती

असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते.” पण मला तरी हा सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही. कारण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो.

या देहाद्वारेच (वासनामुक्तीची) ही समस्या जर सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने साधेपणाने, पूर्णपणे, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्ती‌प्रत, परमोच्च अस्तित्वा‌प्रत स्वतःला समर्पित केले; त्याच्या हाती, स्वत:च्या संपूर्ण अस्तित्वाला सर्व अंगांनिशी संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग असतो. लोकं म्हणतील की, तो मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु तेथे किमान एक प्रकारची आत्मीयता तरी आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान असते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (Positive way) असे म्हणते. स्वत:च्या स्वार्थाचा कोणताही विचार न करता, स्व-केंद्रित न होता, स्वत:शी काहीही निगडित न करता; सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्येच निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १८

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : नैतिक नियमांचे पालन करून किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने किंवा ध्यानधारणेच्या सरावाने, किंवा विजनवासातील जीवन जगण्याने वा विचाराने व्यक्तीला खराखुरा आनंद प्राप्त होत नाही; तर वासनामुक्तीतूनच खराखुरा आनंद प्राप्त होतो. इच्छावासनांपासून सुटका होणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही. कधीकधी तर ह्यासाठी उभे आयुष्य खर्ची पडते. पण खरे सांगायचे तर, जरी विकासाच्या एका ठरावीक टप्प्यावर, अशा प्रकारची साधना पुष्कळ उपयुक्त, किंवा अनिवार्य असली तरी देखील मला हा नकारार्थी मार्ग वाटतो. कारण अगदी सुरुवातीला तुम्ही मोठ्या प्रबळ वासनांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करता, की ज्या अगदी स्पष्ट असतात आणि त्यांचा तुम्हाला प्रचंड त्रास होत असतो आणि त्याबद्दल तुमच्या मनात तीळमात्रही शंका नसते.

नंतर क्रम लागतो तो सूक्ष्म अशा वासनांचा, की ज्या कधीकधी कर्तव्याचे रूप धारण करून समोर येतात, अत्यंत निकडीच्या असल्याप्रमाणे त्या भासतात, कधीकधी तर आंतरिक आदेशाच्या रूपात समोर येतात आणि त्यांचा शोध लागण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी पुष्कळ प्रामाणिकपणा व वेळ देण्याची आवश्यकता असते.

सरतेशेवटी या बाह्य गोष्टींमधून, भावभावना, संवेदना यांच्या विश्वामधून, कल्पनांच्या मानसिक विश्वामधून, भौतिक जगातील पापी वासनांपासून तुमची सुटका झाल्यासारखे तुम्हाला वाटते, पण पुढे गेल्यावर, परत एकदा त्या तुम्हाला आध्यात्मिक विश्वामध्येही आढळतात. तेथे त्या अधिक भयंकर, अधिक सूक्ष्म, अधिक तीक्ष्णभेदक, अधिक अदृश्य आणि सात्विकतेच्या पडद्याआड दडलेल्या असतात की त्यांना वासना म्हणण्यासदेखील कोणी धजावणार नाही.

आणि एखादी व्यक्ती जेव्हा त्यांच्यावरदेखील मात करण्यात यशस्वी होते; त्यांचा शोध लावण्यात, त्यांना दूर करण्यात, त्यांचे निर्मूलन करण्यात यशस्वी होते, तरीदेखील वासनामुक्तीच्या कार्यातील ही केवळ अकरणात्मक बाजूच (Negative Side) पूर्ण झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)