(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्यावर एका साधकाने शंका विचारली आहे.)
साधक : मग व्यक्तीवर सर्व आघात एकदमच का होत नाहीत?
श्रीमाताजी : तसे झाले तर ते तुम्हाला मारक ठरेल. कारण तो प्रहार जर तुम्हाला वठणीवर आणण्याइतपत पुरेसा जोरदार असेल तर तो तुम्हाला चिरडूनदेखील टाकू शकेल. तुमचं अगदी चिपाड होऊन जाईल. परंतु तुम्ही जर थोडी थोडी प्रगती करत राहिलात, आज थोडी, उद्या थोडी अशी क्रमाक्रमाने प्रगती करत राहाल, ते आघात पचवत राहाल तर मग तुम्ही टिकून राहू शकाल.
अर्थातच ही गोष्ट आंतरिक सामर्थ्यावर, आंतरिक प्रामाणिकपणावर आणि प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, अनुभवातून शहाणपण शिकण्यावर आणि मुख्य म्हणजे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ते शहाणपण विसरून न जाण्यावर अवलंबून असते. ते न विसरण्याइतपत जर व्यक्ती भाग्यवान असेल तर मग ती वेगाने प्रगती करू शकते. अशी व्यक्ती वेगाने पुढे जाऊ शकते.
आणि त्याच वेळी जर समजा व्यक्तीकडे आंतरिक नैतिक सामर्थ्य असेल तर, तिची प्रगती अधिक वेगाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा, व्यक्ती त्या दुःखाग्नीमुळे पोळून निघाली आणि त्याची धग कमी होऊ न देता जर ती व्यक्ती त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचली तर, तिची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. परंतु बहुसंख्य लोक एवढे सामर्थ्यशाली नसतात. उलट ते चटकन ती गोष्ट लपवून ठेवण्याचा, अगदी स्वतःपासूनसुद्धा ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती स्वतःच स्वतःला अगदी क्षुद्र किरकोळ स्पष्टीकरणं देत असते. व्यक्तीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यासाठी ती अनेकानेक कारणं सांगत असते. (क्रमशः)
• श्रीमाताजी (CWM 06 : 324)





