Tag Archive for: प्रामाणिक

जीवन जगण्याचे शास्त्र – ०५

(सहजस्फूर्त असण्याचे महत्त्व काय असते याबाबत श्रीमाताजींनी केलेले विवेचन आपण गेल्या दोन भागात पाहिले. त्या आता त्याच संदर्भातील अधिक बारकावे उलगडवून दाखवत आहेत.)

आता प्रश्ना असा निर्माण होतो की, “सहजस्फूर्त (spontaneous) कसे व्हायचे?”

“सहजस्फूर्त असण्यासाठी तुम्ही संपूर्णतया साधे असले पाहिजे.” आणि त्यातून मग पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, संपूर्णतया साधे कसे बनायचे?

“संपूर्णतया साधे बनण्यासाठी तुम्ही पूर्णतया प्रामाणिक (sincere) असले पाहिजे.”

आणि आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, पूर्णतया प्रामाणिक बनायचे म्हणजे काय?

“पूर्णतया प्रामाणिक असणे म्हणजे तुमच्या व्यक्तित्वामध्ये कोणतीही दुफळी नको किंवा कोणतीही विसंगती अथवा कोणताही विरोधाभास नको.”

तुमचे व्यक्तित्व जर तुकड्यातुकड्यांनी बनलेले असेल तर त्या तुकड्यांमुळे तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक प्रकारची दुफळी तयार होते. हे तुकडे केवळ वेगवेगळेच असतात असे नाही तर, बऱ्याचदा ते परस्पर विसंगत असतात. उदाहरणार्थ, तुमच्यामधील एक भाग दिव्य जीवनाची आस बाळगत असतो; ईश्वराला जाणण्याची, त्याच्याशी ऐक्य पावण्याची, त्याच्यासमवेत पूर्णतया जीवन जगण्याची आस बाळगत असतो. आणि त्याच वेळी तुमच्यामधील दुसरा एक भाग मात्र असा असतो की, जो इच्छावासना, आसक्ती बाळगून असतो. त्यांना तो भाग ‘गरजा’ असे संबोधतो आणि तो भाग या गोष्टींच्या नुसत्या प्राप्तीची अभिलाषाच बाळगतो असे नाही तर, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो अस्वस्थसुद्धा होतो. इतर कोणत्याही विसंगतीपेक्षा ही विसंगती सर्वात जास्त सुस्पष्ट असते.

अशा आणखीही काही विसंगती असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला ईश्वराप्रति संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, ईश्वरी संकल्पाला आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाला पूर्णपणे शरण जावे अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा तसा खरोखरच अनुभव येतो तेव्हा आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, इतकेच काय पण जर ईश्वर अस्तित्वात नसता तर आपण जगूच शकलो नसतो आणि काहीच करू शकलो नसतो, आपण कोणीच नसतो… हा अनुभव व्यक्तीला येतो. (व्यक्ती जेव्हा ईश्वराप्रति खरोखरच प्रामाणिकपणे आत्मदान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा, योगमार्गावर येणारा हा सार्वत्रिक अनुभव असतो.)

वास्तविक, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्य या भूमिकेतून तो अनुभव आलेला असतो. परंतु हा अनुभव येतो तेव्हा, तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक भाग असा असतो की, जो अचानक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “पण का? मला ‘मी’ म्हणून अस्तित्वात राहायचे आहे, मी पण कोणीतरी आहे, मला सर्व गोष्टी स्वतःच करायच्या आहेत, मला माझे (स्वतंत्र) व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि मग स्वाभाविकपणे, पहिल्या भागाने (आत्मदान केलेल्या भागाने) जे काही केले होते ते दुसऱ्या भागाकडून नामशेष केले जाते. ही उदाहरणे अपवादात्मक आहेत असे नाही तर, हे असे नेहमी घडत असते. मी तुम्हाला यासारखी, व्यक्तित्वातील परस्परविरोधाची अगणित उदाहरणे सांगू शकते. म्हणजे जेव्हा तुमच्यामधील एखादा भाग पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा, दुसरा भाग आडवा येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतो. आणि तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 283-284)

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]