Tag Archive for: प्राणिक विश्व

आत्मसाक्षात्कार – ११

(कालच्या भागात श्रीमाताजींनी शरीराच्या पृथगात्मतेविषयी (individualisation) सांगितले होते. आज आता आपण प्राणाच्या पृथगात्मतेविषयी त्या काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्ही जर सहजपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडलात आणि प्राणिक विश्वामध्ये (vital world) प्रवेश केलात तर, (तुमच्यापैकी बहुतेकांना हे जमत नाही कारण बहुधा शरीराप्रमाणेच प्राणिक अस्तित्वदेखील फारसे व्यक्तिविशिष्ट झालेले नसते.) तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे आणि त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत असे आढळेल. तिथे सर्व प्रकारची स्पंदनं, शक्तींचे प्रवाह असतात; ते येत असतात, जात असतात; एक-दुसऱ्याशी भांडत असतात; ते एकमेकांना नष्ट करू पाहत असतात, एक दुसऱ्याचा ताबा घेऊ पाहत असतात; एकमेकांना शोषून घेत असतात आणि परस्परांना बाहेर हाकलून देत असतात… आणि तिथे हे असेच चालत राहते. परंतु या सगळयामधून स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व शोधणे हे अतिशय कठीण काम असते.

कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे विविध शक्ती असतात, गतिविधी असतात, इच्छावासना असतात, स्पंदने असतात. अर्थात तिथे स्वतंत्र व्यक्तित्व, व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individualised) लाभलेल्या काही व्यक्तीसुद्धा असतात, व्यक्तिमत्त्वं असतात. परंतु त्या व्यक्ती म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असतात. ज्यांना त्या प्राणिक विश्वामध्ये असे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व असते ते एकतर शूरवीर असतात किंवा दानव असतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258)

प्रश्न : चैत्य पुरुषाचे कार्य काय असते?

श्रीमाताजी : वीजेच्या दिव्याला विद्युतजनित्राला (Power Generator) जोडणाऱ्या विजेच्या तारेप्रमाणे त्याचे कार्य असते, समजले?

श्रोता : ईश्वर म्हणजे विद्युतजनित्र आणि दिवा म्हणजे आपले शरीर, असेच ना?

श्रीमाताजी : शरीर म्हणजे आपले दृश्य अस्तित्व. म्हणजे असे की, जडभौतिकामध्ये जर चैत्य अस्तित्व नसते तर, जडाला ईश्वराशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित करता आला नसता. जडातील या चैत्य अस्तित्वामुळेच, जडाचा ईश्वराशी थेटपणे, सुखाने संबंध निर्माण होऊ शकतो आणि ते अस्तित्व मानवाला सांगू शकते की, ‘तुझ्या अंतरंगामध्ये ईश्वराचा निवास आहे, तू फक्त आत प्रवेश कर म्हणजे मग तुला तेथे तो गवसेल.’ ही अशी गोष्ट आहे की, जी खासकरून मनुष्याला लागू पडते किंवा खरंतर ती पृथ्वीवासियांना लागू पडते असे म्हणता येईल. हे चैत्य अस्तित्व मनुष्यमात्रांमध्ये अधिक जागृत, अधिक सुघटित, अधिक जागृत आणि अधिक स्वतंत्रदेखील बनते. मनुष्य-प्राण्यामध्ये ते अधिक व्यक्तिभूत (individualised) होते; वास्तविक, ही पृथ्वीचीच खासियत आहे. अगदी अचेतन, अस्पष्ट अशा जडभौतिकामध्ये ते थेटपणे, खासकरून आणि मोक्षद स्वरूपात ओतण्यात आले आहे; जेणेकरून ते पुन्हा एकवार दिव्य चेतना (Divine Consciousness), दिव्य उपस्थिती (The divine Presence) आणि अंतत: स्वत:च दिव्यत्व (The Divine Himself) या स्थितींमधून जागृत होत जाईल; मनुष्यामध्ये असणाऱ्या या चैत्याच्या अस्तित्वामुळेच मनुष्य हा अपवादात्मक जीव ठरतो. …
त्यात तथ्य आहे – इतके की, या विश्वाच्या इतर पातळ्यांवर असे काही जीव असतात, ज्याला काही माणसं देवसदृश्य, किंवा देव असे म्हणतात, किंवा श्रीअरविंदांनी ज्याला ‘अधिमानसिक जीव’ (The Overmind) असे म्हटले आहे, असे जीव चैत्य अस्तित्वाचा अनुभव घेता यावा म्हणून, या पृथ्वीतलावर शरीरधारणा करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात कारण त्यांना तो अनुभव मिळत नसतो. मानवाकडे नसणारे असे अनेक गुण ह्या जीवांकडे निश्चितपणे असतात पण केवळ या पृथ्वीवरच, अन्यत्र कोठेही न आढळणाऱ्या या अत्यंत खास अशा, दिव्य अस्तित्वाचा मात्र त्यांच्यामध्ये अभाव असतो. उच्चतर मन, अधिमानसिक पातळी व अशा इतर प्रांतांतील, उच्चतर विश्वांमधील या रहिवाशांमध्ये चैत्य अस्तित्व नसते.

अर्थातच, प्राणिक विश्वांमधील (The vital worlds) जीवांमध्येही ते नसते. परंतु त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते कारण त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाही. त्यातही काही अगदी अपवादात्मक, दुर्मिळ जीव असे असतात की, ज्यांना स्वत:मध्ये बदल घडून यावा असे वाटत असते, आणि त्यासाठी ते त्वरा करतात, ते ताबडतोब प्राकृतिक देह धारण करतात. इतरांना मात्र ते नको असते….परंतु ही वस्तुस्थिती आहे, आणि मला हे सांगणेच भाग आहे की, हे सारे असे असे आहे.

स्वत:मध्ये असे हे चैत्य अस्तित्व बाळगणे हा मनुष्यमात्राचा अगदी अपवादात्मक असा गुणधर्म आहे आणि खरे सांगायचे तर, मनुष्य मात्र त्याचा पूर्ण लाभ घेत नाही. ज्याची वांछा बाळगावी असा हा काही गुणधर्म आहे असे लोकांना वाटतच नाही. त्यांच्या मनातील संकल्पना, त्यांच्या प्राणाच्या इच्छावासना, आणि त्यांच्या शरीराच्या सवयी यांनाच ते प्राधान्य देतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 160-161)