Tag Archive for: प्राण

नैराश्यापासून सुटका – १८

 

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुमच्या प्राणामधील जो भाग बंड करू इच्छित आहे त्याच्याकडे, त्या बंडाचे समर्थन करण्यासारखी खरंतर कोणतीही कारणं नाहीयेत; त्यामुळे तो अडचणीत सापडल्याची किंवा अपेक्षाभंगाची तीव्र वेदना यांपैकी कोणत्यातरी एका मनोदशेला (mood) कवटाळून बसला आहे. प्राणामधील हा भाग अस्वस्थ, इच्छा-वासनामय, उतावळ्या, उदासीन, चंचल अशा सर्व प्रकारच्या मानवी प्रकृतीमधील एक घटक असतो. त्यापासून स्वतःला वेगळे करा आणि त्याला तुम्ही, तुमच्यावर शासन करण्याची किंवा तुम्हाला संचालित करण्याची मुभा देऊ नका.

प्राणाचा एक सुयोग्य भाग देखील असतो. तो उत्कट असतो, उच्चतर गोष्टींबाबत तो संवेदनशील असतो, त्याच्याकडे महान प्रेमाची आणि भक्तीची क्षमता असते. त्याचा उपयोग केलाच पाहिजे. प्राणाच्या त्या भागाला सामर्थ्यवान बनवा. अंतरात्म्याचा आणि वरून येणाऱ्या शांतीचा व विशालतेचा त्याला आधार द्या.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 142)

नैराश्यापासून सुटका – १७

 

प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.

या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)

नैराश्यापासून सुटका – १६

 

प्राणाच्या असमाधानावर एकच उपाय असतो. प्राण म्हणजेच तुम्ही आहात, असे समजायचे नाही; हाच तो उपाय. जडत्वाबद्दलच्या विचारांमध्ये व्यग्र राहायचे नाही, तर ऊर्ध्वमुख व्हायचे तसेच ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शक्ती‌’ने प्राणामध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना आवाहन करायचे; हा जडत्वावरील उपाय आहे.

*

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याची विकृत अढी असे करतो. प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध ओरडत राहतो आणि ईश्वर, जीवन व इतर सारेजण ‘मला छळत आहेत’ असा आरोप तो करत राहतो. पण बहुतेक वेळा दुःख-संकटे येतात आणि ती टिकून राहतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या भागापासून तुम्ही स्वत:ची पूर्णपणे सुटका करून घेतलीच पाहिजे.

*

प्राण जर अविचल राहिला आणि त्याने मनाला गोष्टींकडे योग्य रितीने पाहू दिले तर ही निराशा येणारच नाही, हे स्वाभाविक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139-140, 178, 186-187)

नैराश्यापासून सुटका – ११

 

(एका साधकाला प्राणाच्या असहकार्यामुळे साधनेमध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत श्रीअरविंद यांनी केलेले मार्गदर्शन…)

तुमच्या शारीर-व्यवस्थेमध्ये काहीशी तामसिकता किंवा सुस्ती येताना दिसते आहे. प्राण (vital) त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याबाबत असमाधानी असेल तर, काहीवेळा असे घडून येते. “मी संतुष्ट नाही, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत रस घेणार नाही आणि काहीही करण्यासाठी तुला मदत करणार नाही,” असे म्हणत, तो एक प्रकारे असहकार किंवा निष्क्रिय प्रतिकार करायला सुरूवात करतो.

*

परिवर्तनाची जी हाक तुम्हाला आली आहे, त्याबद्दल तुमच्यामधीलच एखादा प्रतिरोध करणारा भाग (पूर्ण नव्हे तर एखादा भागच) अजूनही असमाधानी आहे; त्यामुळे तुमच्यामध्ये ही चलबिचल, (अस्वस्थतेची) आंदोलने निर्माण होत आहेत. जेव्हा एखाद्या प्राणिक घटकाला परिवर्तनाची हाक दिली जाते किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते, मात्र तसा बदल करण्यास अद्यापि तो इच्छुक नसतो; आणि जेव्हा तो नाराज व असमाधानी असतो तेव्हा, प्रतिसाद न देण्याची किंवा सहकार्य न करण्याची प्राणाची प्रवृत्ती असते. तसेच प्राणिक जोम नसल्यामुळे शारीरिक घटक हा देखील निरस आणि संवेदनाहीन ठरतो. (परंतु) आंतरात्मिक दबावामुळे प्रतिरोधाचे हे उरलेसुरले अवशेषदेखील निघून जातील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139, 138)

नैराश्यापासून सुटका – १०

(साधनाभ्यासामध्ये प्राण सहकार्य करत नाहीये, हे असे का होत असावे अशी विचारणा एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी केली आहे. तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर…)

तुमचा प्राण (vital) इच्छावासनांच्या कचाट्यात सापडला होता त्यामुळे आणि मानसिक इच्छाशक्तीद्वारे नियंत्रित न झाल्यामुळे, तो आता अशा रितीने स्वत:च्याच तंत्राने वागू लागला आहे. जेव्हाजेव्हा त्याच्या इच्छावासना पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हातेव्हा तो असाच आक्रस्ताळेपणा करत असतो. मानसिक इच्छाशक्तीकडून जेव्हा प्राणावर नियंत्रण ठेवले जात नाही आणि त्याला त्याच्या जागी ठेवले जात नाही तेव्हा, दिसून येणारी मनुष्याच्या प्राणाची ही सार्वत्रिक प्रतिक्रिया असते.
*
पुढील दोन प्रकारच्या परिस्थितीमध्ये प्राण सहकार्य करत नाही.
१) जेव्हा त्याच्या सामान्य अहंनिष्ठ कृतींना किंवा त्या कृतीमागील हेतुंना वाव दिला जात नाही तेव्हा प्राण सहकार्य करत नाही.
२) जेव्हा व्यक्ती अगदी शारीर स्तरापर्यंत खाली उतरते आणि जोपर्यंत वरची ‘शक्ती‌’ तिथे कार्यकारी नसते तोपर्यंत, प्राण कधीकधी किंवा काही काळासाठी सुस्त होऊन जातो.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 138, 138-139)

नैराश्यापासून सुटका – ०९

माणसे ईश्वराभिमुख होत नाहीत आणि त्यामुळे ती स्वत:हूनच दु:ख आणि वेदना यांची अप्रत्यक्षरित्या निवड करत असतात. एवढेच नव्हे तर, प्राणिक चेतनेमध्येच (vital consciousness) असे काहीतरी असते की, जीवनामध्ये जर दुःखसंकटे नसतील तर तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटते. शरीराला दु:खभोगाचे भय असते, तिटकारा असतो; पण ‘प्राण’ मात्र त्याला जीवनरूपी लीलेचाच एक भाग म्हणून स्वीकारतो.
*
प्राण जीवन-नाट्याचा आनंद घेत असतो, दु:खसंकटांमध्ये देखील तो मजा घेत असतो. त्याच्या दृष्टीने नैराश्याचे क्षण म्हणजे विकृती नसते तर, जीवनलीलेचाच तो एक भाग आहे असे म्हणून तो त्यांचा स्वीकार करत असतो. अर्थात प्राणामध्ये देखील बंडखोरीची वृत्ती असते आणि त्यामध्ये तो मजा घेत असतो. ज्या भागाला दु:खभोग नकोसे असतात आणि ज्याला त्यापासून सुटका करून घेणे आवडते ती ‘शारीरिक चेतना’ (physical consciousness) असते; पण प्राण मात्र पुन्हा पुन्हा तिला रेटत राहतो आणि त्यामुळे शारीरिक चेतनेची (दु:खभोगापासून) सुटका होऊ शकत नाही. बंडखोरी असो की निराशेला कवटाळणे असो, दोन्ही बाबींना जबाबदार असतो तो राजसिक-तामसिक प्राणिक अहंकार (rajaso-tamasic vital ego)! रजोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे बंडखोरी असते व तमोगुण प्रबळ असतो तेव्हा तेथे नैराश्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 178, 178)

साधना, योग आणि रूपांतरण – २६७

प्राणाचे रूपांतरण

कृती ‘ईश्वरा’र्पण करणे आणि ते करताना त्यामध्ये जी प्राणिक अडचण उद्भवते त्याविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, ही अडचण टाळणे शक्य नसते. तुम्हाला त्यामधून जावेच लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रयत्न करू लागता त्याक्षणी, या परिवर्तनाला विरोध करण्यासाठी, प्राण त्याच्या सर्व अस्वस्थ अपूर्णतांसह उभा ठाकतो. असे असले तरी, त्या अडचणीची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ती अडचण कमी करण्यासाठी तीन उपाय तुम्ही करू शकता –

१) या प्राणिक-शारीरिक स्तरापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करा. ‘तो स्तर म्हणजे तुम्ही नाही’ या भूमिकेतून तुम्ही त्याचे निरीक्षण करा, त्याला नकार द्या. त्याच्या मागण्यांना, त्याच्या भावावेगांना संमती देण्यास नकार द्या, परंतु जो नकार द्याल तो साक्षी ‘पुरुष’ या भूमिकेतून शांतपणे द्या की ज्याच्या नकाराचा अंतिमतः विजय होणेच आवश्यक आहे. तुम्ही जर आधीपासूनच निर्व्यक्तिक, निर्गुण ‘आत्म्या’मध्ये (impersonal Self) अधिकाधिक राहायला शिकला असाल तर, स्वत:ला अलिप्त करणे तुम्हाला कठीण जाण्याचे काहीच कारण नाही.

२) जेव्हा तुम्ही या निर्व्यक्तिकतेमध्ये नसाल, तेव्हाही तुमची मानसिक इच्छाशक्ती आणि तिची संमती किंवा नकार देण्याची शक्ती उपयोगात आणा. हे करताना कोणताही वेदनादायी संघर्ष नको तर अगदी त्याच पद्धतीने, शांतपणे, इच्छावासनांच्या मागण्यांना नकार द्या. जोपर्यंत अनुमती किंवा संमती न मिळाल्यामुळे या मागण्यांची पुन्हा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्ती शमत नाही आणि ती शक्ती अधिकाधिक क्षीण होत नाही आणि बाहेर पडत नाही, तोपर्यंत मानसिक इच्छाशक्तीचा उपयोग करत राहा.

३) तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या किंवा तुमच्या हृदयांतरी असणाऱ्या ‘ईश्वरा’विषयी तुम्ही जर सजग झालात तर तेथूनच, त्याच्या साहाय्यासाठी त्याला आवाहन करा, स्वयमेव त्या प्राणामध्येच परिवर्तन व्हावे म्हणून प्रकाशाला आणि शक्तीला आवाहन करा. आणि जोपर्यंत तो प्राण स्वतःहून या परिवर्तनासाठी प्रार्थना करायला शिकत नाही तोपर्यंत त्या प्राणाला आग्रहपूर्वक सांगत राहा.

शेवटी, ‘ईश्वरा’बद्दल असलेल्या तुमच्या अभीप्सेच्या प्रामाणिकतेद्वारे आणि तुमच्या समर्पणामुळे, तुमच्या हृदयामध्ये गुप्त असलेला ‘चैत्य पुरुष’ (psychic being) तुम्ही जागृत करू शकलात तर त्यामुळे तो अग्रभागी येईल आणि कायम तेथेच राहील. आणि, तो मन, प्राण आणि शारीरिक चेतनेच्या सर्व गतिविधींवर प्रभाव टाकेल आणि तत्क्षणी तुमच्या अडचणी अगदी कमी होऊन जातील. त्यानंतरसुद्धा रूपांतरणाचे कार्य करावेच लागणार आहे, परंतु त्या क्षणानंतर मात्र ते कार्य तितकेसे कठीण आणि कष्टदायक असणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113-114)

साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )

साधना, योग आणि रूपांतरण – २६५

प्राणाचे रूपांतरण

प्राणाला जबरदस्तीने काही करायला भाग पाडणे शक्य असले तरी तसे करणे सोपे नसते. सातत्याने अत्यंत मनःपूर्वकतेने प्राणाला पटवून सांगणे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे अधिक सोपे असते. परंतु असे करण्याच्या या मानसिक पद्धतीमध्ये, प्राण हा बरेचदा स्वतःच्या कोणत्यातरी फायद्यासाठी आध्यात्मिक आदर्शाला स्वतःहून जोडून घेतो, हे खरे आहे. प्राणाने स्वतःच स्वतःसमोर अनावृत (expose) व्हावे यासाठी, प्राणामध्ये प्रकाश सदोदित खाली उतरवत राहणे हा एक परिणामकारक मार्ग असतो. असे केल्यामुळे स्वतःमध्ये काय चुकीचे आहे हे पाहण्यासाठी तो प्रवृत्त होतो आणि सरतेशेवटी आपल्यामध्ये परिवर्तन घडावे यासाठी तो प्रामाणिकपणे इच्छा बाळगू लागतो.

प्राणिक प्रकृतीमध्ये हा प्रकाश एकतर अंतरंगामधून, चैत्य अस्तित्वाकडून आणता येतो नाहीतर तो वरून, मनाच्या माध्यमातून उतरविता येतो. मनाच्या ऊर्ध्वस्थित असणारा प्रकाश आणि शक्ती अवतरित व्हावी म्हणून त्यांस आवाहन करणे ही पूर्णयोगाच्या अनेकविध पद्धतींपैकी एक प्रमुख पद्धती आहे. परंतु कोणताही मार्ग अवलंबला तरीदेखील तो नेहमीच चिकाटीने आणि धीरयुक्त आध्यात्मिक परिश्रमाने अमलात आणावा लागतो.

प्राणामध्ये अकस्मात परिवर्तन घडविता येऊ शकते पण अशा अकस्मात झालेल्या परिवर्तनानंतरसुद्धा त्याच्या परिणामकारकतेसाठी, त्यावर काम करावे लागते, त्यावर परिश्रम घ्यावे लागतात, ते परिवर्तन प्राणाच्या प्रत्येक भागावर अंमलात आणावे लागते. जोपर्यंत त्याचा परिणाम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत ते करावे लागते आणि त्यासाठी बरेचदा दीर्घ काळ लागतो. शारीरिक चेतनेबाबत सांगायचे तर, दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतरच तिच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य असते. हां, एखाद्या विशिष्ट घटकामध्ये त्वरेने परिवर्तन करता येऊ शकते पण समग्र परिवर्तन घडविण्यासाठी दीर्घकाळ आणि चिकाटीने परिश्रम करावे लागतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 110-111)

साधना, योग आणि रूपांतरण – २६४

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रथमतः तुमच्या प्राणिक अस्तित्वामधील दोषांपासून निर्धारपूर्वक, चिकाटीने सुटका करून घेतली पाहिजे. भलेही मग ते करणे कितीही अवघड असो किंवा त्याला कितीही वेळ लागो, सदासर्वकाळ ‘ईश्वरा’च्या साहाय्यासाठी आवाहन करत राहा आणि स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक होण्यासाठी नेहमी प्रवृत्त करा.

पात्र-अपात्रतेच्या बाबतीत (सांगायचे झाले तर) पूर्णयोगासाठी कोणतीच व्यक्ती पूर्णपणे सुपात्र असते असे म्हणता येणार नाही. अभीप्सा, अभ्यास, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांद्वारे व्यक्तीने स्वतःला सुपात्र बनविणे अभिप्रेत असते. तुमच्यामधील आंतरात्मिक भागाला आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनाची आस होती; मात्र तुमच्या प्राणामुळे त्यामध्ये नेहमीच आडकाठी निर्माण होत आली आहे. तुमच्या प्राणामध्ये एक प्रामाणिक इच्छा प्रस्थापित करा; वैयक्तिक इच्छावासना, मागण्या, स्वार्थीपणा आणि मिथ्यत्व या गोष्टींची सरमिसळ तुमच्या साधनेमध्ये होऊ देऊ नका. असे केलेत तरच तुमच्यामधील प्राण हा साधनेसाठी सुपात्र होईल. तुम्ही यशस्वी होऊ इच्छित असाल तर ते प्रयत्न नेहमीच अधिकाधिक विशुद्ध, अधिक स्थिर आणि चिकाटीपूर्ण झाले पाहिजेत.

तुम्ही जर प्रामाणिकपणे साधना करत राहिलात तर, आवश्यक असलेले साहाय्य तुम्हाला लाभेल. तुमच्या कर्माबाबत तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगलात तर स्वयमेव त्यातूनच तुम्हाला साहाय्य मिळेल. ‘ईश्वरा’साठी ‘ईश्वरा’र्पण भावाने कर्म करणे, त्यामध्ये फळाची कोणतीही मागणी नसणे, त्यामध्ये कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छावासना मिसळलेल्या नसणे, कोणताही दुराग्रह आणि उद्धटपणा नसणे, तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादविवाद न करणे, तुम्ही करत असलेले कर्म हे तुमचे स्वतःचे नाही तर ते श्रीमाताजींचे कार्य आहे, हे लक्षात ठेवणे आणि कर्म करत असताना, त्याच्या पाठीशी त्यांची शक्ती कार्यरत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कर्माबाबत योग्य दृष्टिकोन बाळगणे होय. तुम्ही जर असे करू शकलात तर तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन होईल आणि तुमची प्रगती होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 108-109)