Tag Archive for: पृथगात्म अस्तित्व

आत्मसाक्षात्कार – ११

(कालच्या भागात श्रीमाताजींनी शरीराच्या पृथगात्मतेविषयी (individualisation) सांगितले होते. आज आता आपण प्राणाच्या पृथगात्मतेविषयी त्या काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्ही जर सहजपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडलात आणि प्राणिक विश्वामध्ये (vital world) प्रवेश केलात तर, (तुमच्यापैकी बहुतेकांना हे जमत नाही कारण बहुधा शरीराप्रमाणेच प्राणिक अस्तित्वदेखील फारसे व्यक्तिविशिष्ट झालेले नसते.) तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे आणि त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत असे आढळेल. तिथे सर्व प्रकारची स्पंदनं, शक्तींचे प्रवाह असतात; ते येत असतात, जात असतात; एक-दुसऱ्याशी भांडत असतात; ते एकमेकांना नष्ट करू पाहत असतात, एक दुसऱ्याचा ताबा घेऊ पाहत असतात; एकमेकांना शोषून घेत असतात आणि परस्परांना बाहेर हाकलून देत असतात… आणि तिथे हे असेच चालत राहते. परंतु या सगळयामधून स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व शोधणे हे अतिशय कठीण काम असते.

कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे विविध शक्ती असतात, गतिविधी असतात, इच्छावासना असतात, स्पंदने असतात. अर्थात तिथे स्वतंत्र व्यक्तित्व, व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individualised) लाभलेल्या काही व्यक्तीसुद्धा असतात, व्यक्तिमत्त्वं असतात. परंतु त्या व्यक्ती म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असतात. ज्यांना त्या प्राणिक विश्वामध्ये असे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व असते ते एकतर शूरवीर असतात किंवा दानव असतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258)

आत्मसाक्षात्कार – १०

(कालच्या भागात आपण स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व म्हणजे काय ते पाहिले. येथे आता श्रीमाताजी शरीराच्या पृथगात्मतेविषयी सांगत आहेत.)

(ईश्वरापासून) विभक्त करणारा अहंकार नाहीसा होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःचे समग्रतया, पूर्णतया, हातचे काहीही राखून न ठेवता आत्मदान करता आले पाहिजे. आणि असे आत्मदान करण्यासाठी, व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून घडण झालेली असली पाहिजे. त्यासाठी, ती स्वतंत्र, पृथगात्म (individualized) होणे आवश्यक असते.

तुमचे शरीर जर आत्ता आहे त्याप्रमाणे ताठर, कडक, (rigid) नसते, (आत्ता ते फारच अलवचीक आहे.) समजा, ते तसे नसते आणि (श्रीमाताजी निर्देश करून दाखवितात) तुम्हाला जर अशी सघन त्वचाच नसती तर, काय झाले असते? ज्याप्रमाणे तुम्ही प्राणिक व मानसिक क्षेत्रामध्ये असता (म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसलेले आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असे) जर तुम्ही शरीराने असता, म्हणजे प्राणिक व मानसिक क्षेत्रामधील तुमच्या अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंबच म्हणता येईल असे जर तुम्ही (शरीराने) बाह्यतःदेखील असता तर काय झाले असते? तसे असते तर, तुमची अवस्था एखाद्या जेलीफिशपेक्षासुद्धा वाईट झाली असती. प्रत्येक गोष्टच दुसऱ्या प्रत्येक गोष्टीत मिसळत राहिली असती, विरघळत राहिली असती… आणि मग केवढा मोठा गोंधळ उडाला असता बघा! आणि म्हणून सुरुवातीला असा अगदी जड, कठीण, सघन देहाकार असण्याची आवश्यकता होती.

आता मात्र आपण त्याच्याबद्दल तक्रार करत राहतो. आपण म्हणतो, “हे शरीर किती बद्ध, जखडबंद आहे. किती त्रासदायक आहे हे! ते घडणसुलभ नाही, ते लवचीक नाही. ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी लागणारी तरलता, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये नाही.”

परंतु शरीर तसेच असणे आवश्यक होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257-258)

आत्मसाक्षात्कार – ०९

(व्यक्तीचे जेव्हा स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व निर्माण झालेले नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते हे आपण कालच्या भागात पाहिले. येथे आता श्रीमाताजी पृथगात्म अस्तित्व (individualised being) म्हणजे काय ते समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीला एखाद्या दिवशी अमुक एक गोष्ट हवी असते तर दुसऱ्याच दिवशी दुसरेच काहीतरी हवे असते. व्यक्ती एका क्षणी या बाजूला तर दुसऱ्याच क्षणी दुसऱ्या बाजूला ढकलल्यासारखी होत असते. आत्ता व्यक्ती आकाशाकडे पाहत असते (आशावादी असते) तर दुसऱ्या क्षणी जणू ती खाली खोलवर कोठेतरी एका खड्ड्यात जाऊन पडलेली असते (निराशेच्या गर्तेत पडलेली असते). व्यक्तीचे अस्तित्व अशा प्रकारचे असते.

सर्वप्रथम व्यक्तीची सचेत, व्यवस्थित घडण झालेली असली पाहिजे, व्यक्तीला स्वत:चे स्वतंत्र असे, पृथगात्म अस्तित्व असले पाहिजे. असे अस्तित्व की, जे स्वतःमध्ये राहून स्वतःचे जीवन स्वतंत्रपणे जगू शकेल, कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये ते अस्तित्व स्वतंत्र राहू शकेल. म्हणजे असे की, त्याने काहीही ऐकले, काहीही वाचले, काहीही पाहिले तरी त्यामुळे ते अस्तित्व विचलित होता कामा नये. व्यक्तीला बाहेरून जे स्वीकारायचे आहे तेच ती स्वीकारते; तिच्या नियोजनामध्ये जे बसत नाही अशा सर्व गोष्टींना अशी व्यक्ती आपोआपच नकार देते. आपण अमुक एका गोष्टीचा प्रभाव स्वीकारायचा असे व्यक्ती स्वत:हून ठरवीत नाही तोपर्यंत, तिच्यावर कोणत्याच गोष्टीचा ठसा उमटू शकणार नाही. असे जेव्हा घडून येते तेव्हा, व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनायला लागते; तिला व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individuality) लाभायला सुरुवात होते. आणि व्यक्तीला जेव्हा अशी व्यक्तिविशिष्टता लाभते तेव्हाच ती त्याचे अर्पण करू शकते. कारण, स्वतःकडेच काही नसेल तर ती व्यक्ती देणार तरी काय आणि कशी? त्यामुळे प्रथम व्यक्तीची, ‘व्यक्ती’ म्हणून घडण झाली पाहिजे त्यानंतरच ती आत्मदान करू शकेल. जोपर्यंत व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म अस्तित्वच तयार होत नाही, तोपर्यंत ती काहीच अर्पण करू शकत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257)